वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !

Submitted by अगो on 3 October, 2009 - 23:35
weight loss apple

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.

वजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील इतका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.

व्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम ! पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.

१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.
२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे ? माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.
३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )
४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.
५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.
६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.
७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.

व्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :

१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need ? असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.
२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.
३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.
४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत ! सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही ! म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.
५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे ! खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.

ह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :

उठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.

साधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून ! केळं मात्र नाही.

बारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स !
उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :
दोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )
ब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )
उकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून
अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश
सॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.
आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.
मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.
एकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य !
भाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.

संध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.

साडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.
सकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )

या व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी

मल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.

जेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही Happy )

आहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

डाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटची भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :

दिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )
दिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )
दिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )
दिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )
दिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो
दिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.
दिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )
रोज किमान दहा ग्लास पाणी.

मी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे Happy वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.

टीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाला तूरडाळीनी त्रास होतो. त्याला ओकर बाळ्स होत, सा.बा. नी सल्ला दिला मला डाळ बदलाय्चा. आम्ही गेले आठ वर्षे आता घरात तूरडाल खात नाही.(मूगाचच वरण, आमटी, वरण्फळ, सांबार इ.) फक्त इतरांकडे दोनाच्या वर जेवण असतील आणि मी सांगाय्ला विसरले तर लगेच पित्ताचा त्रास जाणवतो. जवळचे आत्या, मावशी, काकू आम्ही जेवाय्ला असलो तर निदान त्याच्यापूर्ते तरी मूगडाळ शिजवतात.

मी हि.मि. सोडल्यापासून माझ्या पायाचे कात्रे / भेगा पूर्ण बर्‍या झाल्यात, घशांत जळजळ होत नाही. मी लाल मिरची वापर्ते. हि.मि. बद्द्ल मला कोणी सांगीतले नाही, एकदा अचानक १५-एक दिवस भाजीबरोबर हि.मि आणायचे विसरले गेले. घरातली लाल मिरची वापर्ली आणि हे फाय्दे लक्षात आल्यावर थोडे अजून दिवस हा प्रयोग चालू ठेवला तर पाय एकदम गुळगुळीत. दसरा सुट्टीत बाहेरगावी गेले तर, आता आजिबातच हि.मि चलत नाही हे लक्षात आलय Sad

गेल्या फेब्रुवारीपासून सोसायटी क्लब हाऊस मध्ये योगा क्लासला जॉइन केला(वजन 58 kg) होते, तेव्हा पासून सेप्टेंबर पर्यन्त वजनात नाही पण inches मध्ये फरक पडला. या महिन्यापासून zumba क्लास जॉइन केला काल वजन केले तर 56.400 होते. zumba आठवड्यातून 3 दिवस असतो. 15 नोवेंबर पासून योगा क्लास परत सुरू होणार आहे(दिवाळी सुट्टी संपवून), तर दोन्ही क्लास सुरू ठेवले तर चालेल का की जास्त exersion होईल. प्लीज कोणी सांगेल का?

herbal life is chain marketing.protien powder with original amount say x rs sold at 2x,2.5x.3x,5x.... rs.
मुळ किंमत १५० असलेले product १००० ला विकले जाते.
तुम्ही चेनमधे कुठे आहात त्यावर comission मिळते. dealership घेतलेले लोक बकर्‍यांच्या शोधात फिरत असतात.तुम्ही जितके जास्त लोक चेनमधे आणाला तितका फायदा जास्त.
एक flavored powder(this can be compared with any other brand like complan) सकाळ संध्याकाळ दुधत टाकुन प्यायची.तेव्हा जेवायचे नाही.दुपारी २ फुलके ,२ भाज्या आणि दाळ खायची.एव्हडे उपाशी राहिले की वजन ३ महिन्यात कमी होते.

मला तर रावणाच्या दरबारात कामाला आहे असं वाटू लागलं होतं >>१++++.

इडली आणि रावणाचा दरबार हसून हसून पडले मी. पण खरेच आहे, माझ्या सासरी पण असेच होते. इडली किंवा डोसे असेल तर प्रत्येकाला द्या रे - खा रे कमरेचा कट ढिला होतो अगदी.

मी आपलं रोजच्या स्वैपाकात वापरायचा विचार करतेय. >>
मी रोजच्या स्वैपाकात गूळ / साखर कशातही वापरत नाही. आमटी, उसळी, भाज्या, कोशिंबीर कशातही गू़ळ /साखर घालत नाही. पुपो केल्या तर कटाची आमटी असते - वर्षातून दोनदा . त्यात गूळ असतो अन सासरच्या पद्धतीची अंबाडीची भाजी महिन्याभरात एखाद वेळेस होते त्यात गूळ असतो.

महाराष्ट्रात सुद्धा सर्वच प्रदेशात रोजच्या स्वैपाकात गूळ / साखर असतेच असं नाही. इतर राज्यांमधे सुद्धा रोजच्या वरण / आमटी / भाजी यात गूळ/ साखर घालायची पद्धत नाही. त्यामूळे रोजच्या स्वैपाकातली साखर / गूळ टाळणे अशक्य नाही .

मेधा +१
आमच्यकडे पण रोजच्या स्वैपाकात गुळ /साखर नसते. दिड-दोन महिन्यातून एकदा चिंगु वरणफळं होतात त्यात गुळ असतो आणि क्वचीत कधीतरी रायत्यामध्ये किंवा कोशिंबीरीमध्ये चिमुटभर साखर.
माझी आई पण अदी क्वचीत कधीतरी आमटीत गुळ घालायची.

आमच्यकडे पण रोजच्या स्वैपाकात गुळ /साखर नसते>>>+१

सकाळच्या चहा(२ च. साखर) व्यतिरिक्त माझ्याकडून गोड खाल्ले जात नाही. तसेही मला जास्त किंवा अधून मधून, येता-जाता गोड खायची सवय नाही. पण मग अचानक कधीतरी खूप गोड खावेसे वाटते. म्हणजे १-१.५ महिना झाला कि गुलाबजामून/रसगुल्ले, केक, मिठाई खूप खाविशी वाटते. काहि चुकते का? कि हे नॉर्मल आहे (मी जाड नाहीये)

काहि चुकते का? कि हे नॉर्मल आहे (मी जाड नाहीये)>>>>> Lol चुक काही नाही हो. ह्या गोष्टींची गरज नसली तरी आपण जन्मल्यापासून त्या आपल्या आस पास असतात. त्यांचा मोह होणे सहाजिक आहे. १-१.५ महिन्यात थोडं फार गोड खाण्यात काही प्रॉबलेम नसावा.
१) ह्या अतिगोड, साखर असलेल्या गोष्टी आपण किती फ्रिक्वेंटली खातो आणि २) आपल्या नेहमीच्या आहारात साखरेचा खुप शिरकाव झालाय का ह्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे.

रोजच्या स्वैपाकातली साखर / गूळ टाळणे अशक्य नाही . >>> पटलं. माझ्याकडून एखाद्याच भाजीत पण वरणात आमटीत हमखास गूळ घातला जातो. आता बंदच करेन आजपासून.
थँक्यू. Happy

अरेच्चा पण लहानपणापासून चिंचगुळाची आमटी खायची सवय असेल तर पातेलंभर आमटीत/उसळीत घातलेल्या एका गुळाच्या खड्याने इतकं नुकसान होणार आहे का? नॉर्मल वजन असलेल्या आणि काही हेल्थ इश्यूज नसलेल्या व्यक्तीला?

केदार= जर मला हे ६ महिने करायचे असेल तर अती Strict करण्यात अर्थ नाही>>>>>> म्हणजे??? ६ महिन्यांनंतर कांय??

मंजुडी= एका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर बंद करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. दिवसभराची शारीरीक आणि मानसिक ऊर्जा मिळवण्याचं काम चहा करत असेल तर तो पूर्ण बंद करण्यात काहीच अर्थ नाही.>>>>>
खरं तर ती उर्जा घालवण्याचं काम करत असतो चहा!
-आपल्या आहारात जे शोषणयोग्य फेरस लोह असतं त्याचं चहातील टॅनिनमुळे शोषण-अयोग्य फेरीक लोहात रुपांतर होतं, म्हणजे लोहाच्या शोषणात अडथळा.
-चहातील टॅनिक अ‍ॅसिड आपल्या पेशी व टिश्यू कठीण करतं. त्यांची कार्यक्षमता कमी होते.
- चहातून फर्फ्युराल, टॅनिन, थेईन, सायनोजेन, थिओब्रोमिन, थिओफिलिनसारखे पदार्थ पोटात जातात. यामुळे डोकेदुखी, श्वसन तक्रारी, कातडी खरखरीत होणं, गाऊट, युरिक अ‍ॅसिडचा त्रास अशा तक्रारी उद्भवू शकतात.

चहा सोडवत नाही म्हणून चहा चांगला.. असे समर्थन असेल तर ते बरोबर नाही. मला पूर्वी रात्रपाळीमुळे अ‍ॅसिडीटीचा जाम त्रास होता. चहा सोडल्यावर आठवड्याभरात तो त्रास गेला. मलाच नव्हे तर आणखीही अनेकांना याचा अनुभव आलाय. ज्याला क्रोनिक अ‍ॅसिडीटी आहे त्याने चहा-साखर- बेकरी पदार्थ बंद करावेत. १००% गुण येईल..

डाळी, धान्ये, कडधान्ये ही अ‍ॅसिडीक आहेत. नागली/नाचणी फक्त अल्कली आहे. मोड आलेली कडधान्ये अल्कली आहेत, त्यामुळे डाळींऐवजी उसळीची आमटी, मोड आलेल्या मुगाची खिचडी हे अधिक पोषण देतं. मोड आलेल्या कडधान्यातून प्रोटीन मिळणार आहेच.

आनंदी, रिफाईंडच्या जागी फिल्टर्ड तेल वापरायचे.

असो= पण डोसे ??? मग आहेच ये रे माझ्या मागल्या (वजन ).>>>> नाही. साखर-चहा-बेकरी पदार्थ- पापड- रिफाईंड तेल पूर्ण बंद केल्यावर, शरीरात अल्कलॉसिस वाढल्यावर फॅट सेल्स धरुन ठेवल्या जाणार नाहीत. (माझे रोज ५ किमी. धावणे असतांनाही ६ महिन्यात ६ किलो वजन वाढले होते. वरील पदार्थ बंद केल्याबरोब्बर १ महिन्यात ४ कि. कमी झाले. अल्कलॉसिस वाढल्याने फॅट सेल्स मोकळ्या झाल्या. धावणे सुरु असल्याने फॅट बर्न झाली) नियमित व्यायाम असेल तर डोसेही पळतात..
तुमच्या लक्षात एक गोष्ट येत असेल वर ज्यांचे वजन उतरलेय त्यांच्या आहारात अल्कली गोष्टींचे प्रमाण वाढल्यामुळे फरक पडतोय. उदा.- फळे, उकडलेल्या भाज्या, सॅलड्स, मोड आलेली कडधान्ये इ.
साखर-चहा-बेकरी पदार्थ- पापड- रिफाईंड तेल पूर्ण बंद केल्यावर आणखी लवकर आणखी चांगला रिझल्ट मिळेल.

बस्के, शूम्पी, मलाही असंच वाटत होतं, व कायम आमटीत चिमूटभर गूळ (रसायनविरहित) घालायची सवय होती, पण आता सगळीकडूनच तेवढाही गूळ / गोड खाऊ नका असाच सल्ला मिळत आहे, तेव्हा मी एखादा महिनाभर तसेच करुन बघणार आहे.
बायदवे, मला वजन अजिबात कमी करायचं नाहीये, फक्त शुगर लेवल थोडी कमी करायची आहे.

शूम्पी
असं रोजच्या आमटीत , उसळीत एका गुळाच्या खड्यापायी महिन्याला , वर्षाला किती गूळ वापरला जात असेल एका कुटुंबात ? त्यातल्या अर्ध्या जरीपदार्थात गूळ घालणे टाळले तर किती कॅलरीज वाचतील ?
इट ऑल अ‍ॅडस अप! त्या अतिरिक्त कॅलरीजची खरच गरज असते का ?

अर्थात कुठे कपात करायची अन कुठे करायची नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे. आजकाल मिळणार्‍या गुळाचे रासायनिक कंटेंट काय याची चिंता करण्यापेक्षा गुळाचा वापर ड्रास्टिकली कमी करणे हे सुद्धा शक्य आहे एवढेच मला सांगायचे होते.

साखरेतून न्युट्रीशन काहीही नाही मात्र गुळातून आहे.
मवा, ठिक आहे पण कधी गोड खायची इच्छा झाली तर गो फॉर गुळ, किक ऑफ साखर!
गुळात आम्ही आतापर्यंत गुलाबजाम, जिलबी, बासुंदी, रबडी, लाडू, आईस्क्रिम, श्रीखंड बनवले आहे. Happy

(वाटलंच! ... देतो उत्तर! आधी दुध नीट आटवून घ्या नि मग सर्व्ह करायच्या आधी गुळ घालून ढवळा. मग नाय फाटणार. गुळ घालून परत गरम केलंत की फाटेल!! Happy )

त्या अतिरिक्त कॅलरीजची खरच गरज असते का ? >>अर्थातच नाही.

अर्थात कुठे कपात करायची अन कुठे करायची नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं आहे>> म्हणूनच माझा प्रश्न हेल्दी वजन असलेल्या आणि तब्बेतिच्या कोणत्याही तक्रारी नसलेल्या (जसे की डायबेटिस, बीपी, कॅन्सर, अ‍ॅसिडिटी वगैरे) लोकांबद्दल होता.

पण तुझं बरोबरे. हा धागा वजन कमी करण्याचा आहे तेव्हा मी इथे असं काही लिहिणं चूकच.

हो, साखर बंद केलीच आहे. गोड पदार्थ पण मुद्दाम करणार नाहीच. फक्त रोजच्या जेवणातलाच प्रश्न होता. तुम्ही म्हणालात तसं एखादवेळी गूळ वापरत जाईन.

कार्ब कमी केल्याने ग्लुकोज लेवल कमी होते असं वाचलं, गेले ८ दिवस प्रय्तन करत आहे. पण कार्ब क्रेविंग्स वर काय उपाय करायचा ? सलाड्स फारशी आवडत नाहीत पण भाज्या आवडतात. सध्या भाजी जास्त, पोळी/भात कमी असे करत आहे.

तसंच पांढरा भात बंद म्हणजे अगदी बंदच करावा लागेल का, की अगदी रोज खायचे त्याऐवजी आठवड्यातून १-२ चालेल ? पांढरा भात खूप आवडतो. Sad

ब्लु अगावे वगैरे बद्दल काय मत आहे ?

चहा सोडवत नाही म्हणून चहा चांगला.. असे समर्थन असेल तर ते बरोबर नाही.>>> मी असं म्हटलंय का? Uhoh
माझं त्याच पोस्टीतलं पुढचं वाक्य वाचलं नाही का?
<<हळूहळू प्रमाण कमी करत आणणं मात्र नक्कीच जमतं आणि फायदेशीर ठरतं.>>

मी स्वतः चहा सहा महिन्यातून एकदा वगैरे पिते.

मवा, ब्लु आगावे चांगलयं, पण त्यापेक्षा जास्त चांगले स्टिविया एक्स्ट्राक्ट्स आहे. स्टिविया एक्स्ट्रॅक्ट्स पावडर फॉर्ममध्ये हे बेस्ट आहे.. (ट्रेडर जोज मध्ये मिळेल) किंवा ट्रुविया नावाचा सॅशेचा बॉक्सही मिळतो (हा कुठेही मिळेल..)

कार्ब्स कमी करायला तुला प्रोटीन्स वाढवावे लागतील. फिश चिकन खातेस का? ते ग्रिल करून वगैरे खा..
आणि पांढरा भात, सॉरी. कधीतरी पंढरवड्यातून एकदा आठवण आली, राहवत नाहीये तर ठिके. पण अदरवाईज नो नो.. Happy

स्टिविया एक्स्ट्रॅक्ट्स पावडर फॉर्ममध्ये हे बेस्ट आहे.. (ट्रेडर जोज मध्ये मिळेल) >> बघते, थँक्स. Happy
फिश चिकन खातेस का? >> नाही अजून.
प्रोटीन्स वाढवायचे अजून सोर्सेस बद्दल वाचतेय. कडधायांमधे प्रोटीन आहे पण कार्ब्स पण आहेत.

>>मवा, ब्लु आगावे चांगलयं, पण त्यापेक्षा जास्त चांगले स्टिविया एक्स्ट्राक्ट्स आहे. स्टिविया एक्स्ट्रॅक्ट्स पावडर फॉर्ममध्ये हे बेस्ट आहे.. (ट्रेडर जोज मध्ये मिळेल) किंवा ट्रुविया नावाचा सॅशेचा बॉक्सही मिळतो (हा कुठेही मिळेल..)
>> माझा ह्या सब्स्टिट्युट्सवरही विश्वास नाही अजिबात. त्यापेक्षा मला साखर बरी असं वाटतं.

सायो, हे वेगळं आहे. म्हणजे सब्स्टिट्युटच आहे साखरेला. पण नॅचरल प्रॉडक्ट आहे. पानं/ plant असतात स्टिवियाची.. असो.. Happy

@हेम, तुमच्या पोस्ट्स वाचल्यात. एक प्रश्न आहे, युरिक अ‍ॅसिडचा त्रास असल्यास कडधान्ये खाल्लेली चालतात का ? कारण डाळी पूर्ण वंद केल्या आहेत.

हेम,
चहा सोडवत नाही म्हणून चहा चांगला.. असे समर्थन असेल तर ते बरोबर नाही. >>
चहा चांगला अस कुणीच म्हणत नाहीये .
तुमचे सगळे मुद्दे योग्य आहेतच.
पण तुम्ही रांगता न येणार्या बाळाला धावायला सांगताय .
कदाचित तुम्ही इतके Health conscious असाल की तुम्ही इतके स्ट्रीक्टली पाळत असाल .
इथे येणारे बरेच लोक (माझ्यासह) तसे असणार नाहीयेत अस माझ मत. Happy
चहा , साखर , तेल हे वाईट हे सगळ्यानाच कळतय पण वळत नाही. शरीराला २०-३० वर्षे लागलेली सवय १५ दिवसात जाणार ही नाहीच.
म्हणूनच थोड थोड टप्प्या टप्प्याने कराव अस माझ मत.
कारण Otherwise खूप स्ट्रीक्ट असल्याने हे काही आपल्याला जमणार नाही म्हणून हातच घातला जात नाही .
उलट थोडे थोडे करून परिणाम दिसू लागले की तुम्ही जास्ती प्रयत्न करता असा माझा अनुभव आहे.
उदा . मी स्वतः रोज ८-१० कप चहा प्यायचो , आता ७० दिवसानी २ वेळा अर्धा कप असा १ कप पितो .

के जा...अनुमोदन.......भारी कन्ट्रोल आहे बो....१ कप चहा दिवसातुन Happy

फारच वाटले तर ग्रीन टी प्यावा डिप डिप करुन .,.....

>>>>मी स्वतः चहा सहा महिन्यातून एकदा वगैरे पिते.<<

आणि मग मिळालेली शारीरीक व मानसिक एनर्जी इथे मायबोलीवर येवून वादात घालवता ना? Proud

सायो= माझा ह्या सब्स्टिट्युट्सवरही विश्वास नाही अजिबात. त्यापेक्षा मला साखर बरी असं वाटतं.>>>> साखर बनवतांना त्यात सल्फर, फॉर्मल डिहाईड, फॉस्फरिक अ‍ॅसिड वापरले जाते. its corrosive. शिवाय no neutrition..
मग ती बरी कशी???

केदार, जोपर्यंत माहिती नाही तोवर ठिक पण दुष्परिणाम माहित झाल्यावरही चालू राहिले तर ..!
..आणि तुम्ही जेव्हा 'पूर्ण नाही' म्हणून घण घालत रहाता तेव्हाच ते 'नाही' च्या निर्णयाप्रत पोहोचेल अन्यथा सवलत घेत रहाण्याची वाईट खोड जात नाही. Happy मी एकदम पूर्ण बंद करुन कॅलेंडरवर खुणा करायला लागलो की 'आज खाल्ले नाही' तेव्हा सुटले नाहीतर.. चहा नि गोड पदार्थ ?? माझे जीव की प्राण होते.

Pages