वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !

Submitted by अगो on 3 October, 2009 - 23:35
weight loss apple

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.

वजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील इतका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.

व्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम ! पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.

१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.
२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे ? माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.
३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )
४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.
५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.
६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.
७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.

व्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :

१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need ? असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.
२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.
३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.
४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत ! सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही ! म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.
५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे ! खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.

ह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :

उठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.

साधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून ! केळं मात्र नाही.

बारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स !
उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :
दोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )
ब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )
उकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून
अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश
सॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.
आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.
मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.
एकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य !
भाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.

संध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.

साडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.
सकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )

या व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी

मल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.

जेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही Happy )

आहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

डाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटची भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :

दिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )
दिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )
दिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )
दिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )
दिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो
दिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.
दिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )
रोज किमान दहा ग्लास पाणी.

मी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे Happy वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.

टीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, तुमच्या सगळ्या आहारयादीमध्ये चहा खटकतोय...! चहा पूर्ण सोडा. माझा ८-१० कप व्हायचा. सोडल्यावर २ दिवस प्रचंड डोके दुखले. ३ र्‍या दिवशी काहीही त्रास नाही. २ वर्षे झाली.

इथे सगळं केवळ वजन उतरवणे याच आणि केवळ याच हेतूने चाललंय कांय? माझ्या मते अ‍ॅसिडिक अन्न कमी खाऊन अल्कलाईन अन्नाचा आहारात समावेश वाढवला तर आपले शरीरच ठरवते वजन किती ठेवायचं ते..! आणि वजन हा फक्त एक भाग झाला. व्यक्तीच्या शरीरात जर ७५% पेक्षा जास्त स्नायू असतील नि चरबी २०% असेल, तर त्या व्यक्तीचे वजन १०० किलो असले तरी ती योग्य म्हणायला हवी. अर्थात स्नायूंचे वजन वाढवण्यासाठी कांय कांय करायला लागतं ते मी सांगायला नको. Happy

आता अल्कलाईन कांय नि अ‍ॅसिडिक कांय यासाठी या दुव्याची मदत होईल.
http://www.rense.com/1.mpicons/acidalka.htm

ता.क.: वरच्या दुव्यात साखरेला Poison! Avoid it. असा शेरा आहे. त्यामुळे थोडी साखर खाल्ली तर काय होत नाही म्हणणार्‍यांना फाट्यावर मारा! Happy

हा देखील दुवा पहा... http://www.maayboli.com/node/33632

हेम ,
केदार, तुमच्या सगळ्या आहारयादीमध्ये चहा खटकतोय...! चहा पूर्ण सोडा. >> बरोबर आहे तुमच . पण मी विचार केला की जर मला हे ६ महिने करायचे असेल तर अती Strict करण्यात अर्थ नाही . माझ्या डाएटिशियननेही एक कप चहा सकाळी घ्यायला हरकत नाही असे सांगितले , अर्थात मी इतर गोड काहीही खात नाही त्यामुळे .

इथे सगळं केवळ वजन उतरवणे याच आणि केवळ याच हेतूने चाललंय कांय? >> नाही . माझ्या मते वर प्रत्येकाने सांगितलय की हे हेल्दी व्हायसाठी चाललय , वजन हा फक्त सहज मोजता येईल असा पॅरामीटर आहे.

क्रेक्ट केदार.
हेम मी चहा दीड वर्ष पुर्ण पणे सोडला होता. इव्हन साखर पुर्ण बंद. पण मला तरी वजनात काही फरक पडला नाही. आता सध्या चहा होतोच दोन तीन कप दिवसाला. बाकी गोड काही खात नाही म्हणून इतके चालते अस वाटतय. लिंका वाचतो.

नाही . माझ्या मते वर प्रत्येकाने सांगितलय की हे हेल्दी व्हायसाठी चाललय , वजन हा फक्त सहज मोजता येईल असा पॅरामीटर आहे.>>> है शाबास!!!

एका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर बंद करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. दिवसभराची शारीरीक आणि मानसिक ऊर्जा मिळवण्याचं काम चहा करत असेल तर तो पूर्ण बंद करण्यात काहीच अर्थ नाही. हळूहळू प्रमाण कमी करत आणणं मात्र नक्कीच जमतं आणि फायदेशीर ठरतं.

एका फटक्यात चहा/ कॉफी/ साखर बंद करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. >>> मी २-३ वेळा प्रयत्न केला होता. जमलंच नाही. दिवसातून २ चहा आणि २ कॉफी होतात पण ते मला हवेच वाटतात.

मी या बाफवर आधी आले होते का नाही आठवत नाही, पण आता वाचेन. मलाही पांढरा भात / साखर पूर्ण बंद करणं अवघडच जातंय. Sad

मी २-३ वेळा प्रयत्न केला होता. जमलंच नाही. दिवसातून २ चहा आणि २ कॉफी होतात पण ते मला हवेच वाटतात. >> अश्विनी , मलाही सेम प्रॉब्लेम होता . यावर एक सोपा उपाय म्हणजे तलफ संपली की उरलेला चहा ओतून टाकायचा . बर्याचदा पहिल्या काही घोटातच तो तजेला/स्टिम्युलस्/फ्रेशनेस काही म्हणा तो येतो , उरलेला चहा आपण उगाचच पितो .आता हा काहीना अपव्यय वाटेल पण "पोटात टाकण्यापेक्षा ताटात टाकणे बरे"

साखरेऐवजी गूळ खा म्हणतात तर मी एक ऑर्गॅनिक Molasses म्हणून लिक्विड आणलंय, ते ठीक आहे का ? कारण इंग्रो मधला गूळ सेंद्रीय आहे की कसे ते कळले नाही. भारतातून मागवलेला संपलाय आता.

असेल. हे असं दिसतं.
http://en.wikipedia.org/wiki/Molasses

मी वापरलं २-३ दिवस, आमटीत वगैरे टाकलं थोडंसं, काहि फरक जाणवला नाही. गूळ वापरायचे आधी तशीच वाटली चव.

भारताबाहेर असताना मी गुळाच्या जागी अमृतसरी शक्कर वापरायचे. गुळाची पावडर असते. पूर्णपणे ऑर्गॅनिक असते की नाही ते माहीत नाही पण रंगावरुन पिवळ्या गुळापेक्षा केमिकल्स खूपच कमी असावीत. मोलॅसेस पुरणात वापरायला त्रास होईल. आता ऑरगॅनिक गूळ पावडर वापरते.

छे गं पुरण वगैरे कुठे करायला ! मी आपलं रोजच्या स्वैपाकात वापरायचा विचार करतेय. गुळाचे जे चांगले गुणधर्म आहेत ते यात असतात का ते हवे होते. :). तशी डार्क रंगाची गुळाची पावडर मिळते इथे, ती आणून पहाते.

ही अमृतसरी शक्कर रामदेवबाबाच्या दुकानातही मिळते. खरेच ऑर्गॅनिक आहे का ते माहित नाही, नैसर्गिक खते वापरुन केलीय असे पाकिटावर छापलेय. मी साखरेच्या जागी आता सगळीकडे हीच वापरते, कोरडी पुड असल्याने केकमध्ये वगैरे वापरायलाही बरी पडते.

चहा मीही पुर्ण बंद केला. मला तर खुप अ‍ॅडिक्षन होते चहाचे. डोके दुखायचे प्याय्ले नाही तर. काही दिवस सकाळी चहाच्या जागी कपभर दुधात चहाचा मसाला (चहा पावडर नाही तर फक्त एवरेस्ट मसाला) वापरुन दुध प्यायले. आता चहाही आठवणही होत काही. कधी कधी ऑफिसात एसी खुपच जास्त झाला तर एखादा कप मारते Happy

ज्यांना चहा कॉफी हवेच वाटतात त्यांनी एकदोन पेग मारावे अधुन मधुन... आपण जे काही आपल्यासाठी करतो ते करताना आनंद मिळायला हवा असे मला नेहमी वाटते. उगीच स्वतःवर कसलाही ताण घ्याय्चा नाही हे आता सगळ्या बाबतीत ठरवलेय.

हेम सहमत. मी साखरही पुर्ण बंद केलीय. माझ्या घरी चहा, साखर, डाळी इ. वस्तु पडुन आहेत सध्या. कशा संपवाय्च्या हा प्रश्न आहे.

माझ्या घरी चहा, साखर, डाळी इ. वस्तु पडुन आहेत सध्या. कशा संपवाय्च्या हा प्रश्न आहे. >>

पत्ता द्या. न्यायला येतो. अन्नदान हे श्रेष्ठ दान Happy

<<<ज्यांना चहा कॉफी हवेच वाटतात त्यांनी एकदोन पेग मारावे अधुन मधुन... >>>.. लै भारी
<<<आपण जे काही आपल्यासाठी करतो ते करताना आनंद मिळायला हवा असे मला नेहमी वाटते. उगीच स्वतःवर कसलाही ताण घ्याय्चा नाही हे आता सगळ्या बाबतीत ठरवलेय.>>>> १०० % अनुमोदन....
ति शक्कर शोधली पाहिजे ..... Happy

डाळी अ‍ॅसिडीक म्हणुन पडुन आहेत. भाताबरोबर मोड आलेल्या कडधान्याच्या आमट्या खातेय.

असो, पडुन आहेत हो, पण माझ्यातली गृहिणी त्यांना टाकु देत नाही. इडल्या, डोसे अधुनमधुन करुन संपवतेय.


बिन साखरेचा चहा घेतला तर ?

चहातली चहा पावडर वाईट आणि साखरही वाईट. मग काय घेणार? अगदीच सुटत नसेल चहा तर दुधात चहा मसाला घाला, चांगले उकळवा, मग गॅस बंद करुन त्यात गुळ घाला, विरधळवा आणि प्या. हे करुन बघा थोडे दिवस. मज्जा येते प्यायला आणि चहाही आठवणही होत नाही. रासायनिक गुळ दुध उकळत असताना घातला तर दुध फाटते म्हणुन गॅसवरुन उतरवुन मग गुळ टाका.

green tea without sugar कसा आहे पर्याय ?
.....सवय झाली की मस्त लागतो ....

साधना, डाळी बिलकूल बंद मग प्रोटीनचा स्रोत काय?

आणि घरातल्या बाकीच्यांना का शिक्षा? Wink

तुझ्यासाठी करत असशील तर ठीक आहे, पण तुझी मुलगी वाढत्या वयाची आहे, तिला चौरस आहार मिळेल असं बघ असं माझं म्हणणं आहे. पटत असेल तर बघ, नाहीतर सोडून दे.

केदार मला तुमच्या पोस्ट्स आवडल्या. तुम्ही समजून मनापासून हेल्दी खाताय हे कळतंय.
डाळी खाल्ल्यानी काय होतं? मला तर प्रोटिनचा तो एक रेग्युलर सेफ सोर्स वाटतो. रोज एक वाटी तरी खातेच मी. Uhoh

अगं माझ्यावरतीच प्रयोग चालु आहेत सध्या . Happy बा़की स्गळे नेहमीचेच खातात. मीही तसे नेहमीचेच खातेय, खाताना पोटात एसिडिक कमी आणि अल्कली जास्त जावे हा प्रयत्न करतेय. फक्त डाळींऐवजी मोड आलेले मुग, मटकी, मसुर, इ. च्या आमट्या करते. मासे-चिकन-अंडी असतात आठवड्यातुन एक-दोनदा. डाळी सध्या फक्त इडली डोशासाठी वापरतेय, पण संपल्यावर परत आणणार नाही.

साखर, रिफाईंड तेल, वनस्पती तुप, चहा, कॉफी, बेकरी पदार्थ, विकतचे लोणचे, विकतचे पापड इ. मात्र घरात सगळ्यांचेच बंद केलेय.

घरात बाकी कोणी आधीही चहा घेत नव्हते, ऐशु ओकेजनल कॉफीवाली आहे, ती घेते कॉफी लहर लागली की. ती गोडही खात नाही जास्त. तरी मी गोड पदार्थ जसे लापशी, शीरा इ. आठवड्यातुन एकदातरी करते पण तो गुळातुन.

पण संपल्यावर परत आणणार नाही.>>> मग तेच मी विचारतेय, घरातले बाकीचे डाळी कश्या खाणार? Happy

डाळी वापरणार नाही आता. घरचे डाळभाताऐवजी आमटी भात खातात. आमटीसाठी डाळींऐवजी त्यांचेच मुळ रुप वापरतेय. ते नाही बंद केले.

मुग, तुर, मसुर, चणा, उडीद ह्या पाच डाळी सोडुन मी इतर कुठल्या वापरल्या नव्हत्या. आता फक्त तुर सोडुन इतर डाळी ज्या कडधान्यापासुन बनल्यात ती कडधान्ये व्यवस्थित मोड आणवुन त्यांचा आमट्या करतेय. अख्खी तुर मिळाली तर तीही वापरेन.

इडल्या, डोसे अधुनमधुन करुन संपवतेय. >>>>

काय सांगायचं गृहिणीपणाचं !! टाकायचं नाही म्हणून इडल्या ठीक हो, पण डोसे ??? मग आहेच ये रे माझ्या मागल्या (वजन ).

आमच्याकडे पण इडल्या केल्या कि त्या रविवारी सकाळी सांबर होईपर्यंत एकदा चटणीबरोबर इडली, नंतर सांबर झालंय म्हणून त्याबरोबर इडली. मग अधून मधून कुकरमधल्या सगळ्या इडल्या संपेपर्यंत इडली. त्या इडलीमय प्रेमळ वातावरणात लक्षात येत नसे, पण नंतर लक्षात आलं कि हॉटेलात जाऊन खाल्लं तर दोनपेक्षा जास्त इडल्या पोटात जाणार नाहीत. मग हे सगळं बंद झालं.

डोसे पण खूपच छान, कुरकुरीत आणि हलके झालेत म्हणून किती वाढावेत ? मला तर रावणाच्या दरबारात कामाला आहे असं वाटू लागलं होतं.

मीही तसे नेहमीचेच खातेय, खाताना पोटात एसिडिक कमी आणि अल्कली जास्त जावे हा प्रयत्न करतेय. फक्त डाळींऐवजी मोड आलेले मुग, मटकी, मसुर, इ. च्या आमट्या करते. >>> डॉक्टरांनी सांगितले आहे का असे काही?
माझ्या एका मैत्रिणीला तूरडाळीने पित्ताचा त्रास व्हायचा. तसा काही त्रास होतो का डाळींचा?

रीफइंड ऑईल कसे ओळ्खायचे आणि त्या जागी काय घ्यायचे .. फिल्टर्ड का?
मग ते पण कसे ओळ्खायचे ऑइल पॅकेट वर लिहिलेले असते काय?
फरक काय दोन्हीत?

Pages