1993चा भूकंप..

Submitted by राजेंद्र भंडारी on 5 October, 2013 - 01:13

(भय इथले संपत नाही...पुढील भाग..)

मृत्यूचे महानाट्य......(भाग2)

सातत्याने नवोन्मेषशाली असणारी सृष्टी सृजनशील सर्जनशीलतेची मोठी प्रतिभा आहे.परंतू नैसर्गिक प्रलयाचा महासागर जेव्हा तिला आपल्या कवेत घेतो तेव्हा ती बिनबोभाटपणे त्याला सर्वस्वाचं दान देवून टाकते आणि रिती होते पुन्हा नवीन काहीतरी जन्माला घालण्यासाठी....
उगम आणि विनाश...जन्म आणि मृत्यु...या दोन टोकामध्येच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरु आहे.मृत्युचा हा सामुहिक उच्छाद पाहाताना ही जाणीन प्रकर्षाने होते..आणि आपण स्तब्ध होउन जातो. त्याने कुणालाच सुटकेची संधी दिली नाही एखाद्या लहरी ,बेछूट दरोडेखोरासारखा येउन कठोर होउन निरपराधांना मरण देउन गेला..क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेला..आणि मागे ठेवून गेला हळहळत्या निश्वाःसांसह फाटलेल्या आभाळाखाली गोठून गेलेली माणसं....व्याकुळतेच्या खोल डोहात बुडालेली माणसं...मृत्यूच्या महानाट्याचा जिताजागता प्रपात पाहणारी माणसं...किल्लारीसह बावन्न खेडी उध्वस्त झाली. हजारो संसार बेचिराख झाले. अनेक निष्पाप जीव उमलण्यापूर्वीच खुडले गेले, मागे राहीले फक्त मन हेलावून सोडणारे..आर्त विव्हळणारे स्वर...माझा बाबा गेला sss…..माझं तान्हुलं कुटं हाय...sss…इवल्या इवल्या चिल्यापिल्यांच्या मृतदेहाला कवटाळून,,आयाबायांचा...नातेवाईकांचा अनावर शोक...सगळीकडे हे मन छिन्नविछिन्न करणारे दृष्य काळजाला पीळ पाडत होते..मृत्यूने आपल्या अक्राळविक्राळ जबड्यात गुलाबाच्या कळ्यांसारख्या...फुलपाखरासारख्या गोजिरवाण्या..निष्पाप..गोंडस जिवांसहीत.....तरण्याताठ्या लेकी-सुनांसहीत...म्हाता-या कोता-या कष्टक-यांना गिळून टाकलं होतं...रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी आपलं सर्वस्व असलेली आपल्या कुटुंबातली माणसं सकाळी सुर्योदयापूर्वी आपलं आता कुणीच नाही या भावनेने वेडीपिशी झाली होती.......

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तेंव्हा भूम-परांड्यात संघाचा पूर्णवेळ प्रचारक होतो. त्यादिवशी भूमला होतो. चारला काही मिनिटे बाकी असतांना भूकंप झाला. ते काही क्षण उमजण्या पल्याडले होते. मी झोपेत होतो. पाटीत कोणी तरी दणके देतोय असे जाणवले. तेव्हा उठून बाहेर पडलो. वर्च्या मजल्यावर होतो. गोंधळात वरच्या पायरीवरून पंधराव्या पायरीपर्यंत घसरलो. एक मिनिटे तरी भूकंपाची आवर्तने सुरू होती.
त्या दिवशी रात्री आम्ही सास्तूर या गावी मदत कार्यासाठी निघालो होतो. तिथलं द्रुश्य भयान होतं.एका शाळेच्या आवारातील म्रूतदेहांचा खच मन बधिर करणारा होता. ट्रक्मध्ये केळीच्या खांबासारखे प्रेत रचून ती जेसीबीने खणलेल्या खड्यात आम्ही ओतून यायचो.

त्या वेळी निलंग्याला होतो. निलंगा किल्लारी एरिअल डिस्टंस १०-१२ कि मी असेल. त्यामुळे निलंग्यात भुकंप जोरात जाणवला पण जिवीतहानी वगैरे फार झाली नाही.
आम्ही एका जुन्या घरामध्ये वरच्या मजल्यावर रहायचो, त्या दिवशी जुळ्या मुली बरोबर ११ महिन्यांच्या झाल्या होत्या. मी गॅलरीत गेल्यावर लोकांनी खाली या असे सांगीतल्याने सौ ने एक व मी एक असे मुलींना घेउन खाली पळालो. आजही कुणी कुठली मुलगी घेतली होती , आम्हाला नाही माहीत.
नंतरची वर्तमानपत्र आम्ही ठेवली आहेत. मुलींना त्या दिवसाचा प्रकोप दाखवायला.

बँक कर्मचार्‍यांतर्फे आम्ही २ महिने जेवण पुरवायचो, एका गावात (सिरसल)बँक कर्मचारी संघटनेने १२ घ्ररे बांधून दिली आहेत.