सुखाशी भांडतो आम्ही .....एक उत्कृष्ट नाटक ….!!

Submitted by मी मी on 6 July, 2013 - 15:00

सुख सुख म्हणतात म्हणजे नेमके काय … ??

या प्रश्नावर नाही तर उत्तराच्या नेपथ्यावर खेचून उभं करणारं आणि तुमच्या सुखाच्या सर्व काल्पनिक, बेगड्या कल्पना धुऊन काढून मन ढवळून काढून सुप्त अन खऱ्या सुखाच्या इच्छा जागृत करणारं नाटक पहिलं आज ….

'सुखाशी भांडतो आम्ही'

लेखकाच्या यथार्थ लिखाणाची , दिग्दर्शकाच्या प्रभावशाली दिग्दर्शनाची आणि कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाची … नाही खरतर व्यक्तिरेखा साकारण्याच्या त्यांच्या गुणांची अकल्पिक अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी हे नाटक बघायलाच हवं ….

लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी फार वेगळा विषय या नाटकातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे …. भद्रकाली प्रॉडक्शनचे कुमार सोहोनी दिग्दर्शित आणि कविता कांबळी निर्मित 'सुखाशी भांडतो आम्ही'

sukhanshi-bhandto-aamhi-poster_1360573518_1.jpg

सदाशिव विठ्ठल नाशिककर (चिन्मय मांडलेकर)या शेतकी महाविद्यालयातील अतिशय हुशार कविमनाच्या प्राध्यापकाची मनोव्यथा…. मनोविकार जडलाय त्याला पण त्याच्या खुळ्या ठरलेल्या आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या विचारांमध्ये प्रेक्षक कसा गुरफटत जातो हे कळतच नाही … दुसर्या बाजूने या वेड्याचा उपचार करणारा डॉक्टर श्रीधर (डॉ.गिरीश ओक) द्विधा मनःस्थितीतला, स्वतःला काय हवं ते विसरून प्रतिष्ठा, ऐश्वर्य हेच सुख समजून त्यांचाच शोध घेत मिळेल तो रस्ता पत्करत धावणारा आणि त्याची अति महात्वाकांक्षी पत्नी मिता (रेखा बडे) हिच्या सुखाच्या लग्जरिअस कल्पना …. या जुगलबंदीतून प्रेक्षक स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत राहतो ….

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गरीब माणसाच्या प्रामाणिक नौकरीतून मिळणाऱ्या पगारातही होणारे भ्रष्टाचार, अन्याय … मन म्हणेल तसे वागायची मुभा नाही, मन् मारून जगायचे लोकांच्या खोट्या प्रतिष्ठा या सर्वात हा प्रामाणिक आणि पापभिरू 'सदा' गुंतत जातो त्याच्या मनाचा कोंडमारा होतो आणि 'मन' हेच त्याचे सर्वात मोठे वैरी होऊन बसते … त्यातून त्याला वेगवेगळे भास होऊ लागतात आणि मग त्याच्या हाताने त्याच्या बायकोची अन मुलाची हत्या घडून येते स्वतः आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतांना पकडला जातो आणि ७ वर्षांची शिक्षा भोगून परत येउन मान्सोपचाराकडे उपचारार्थ दाखल होतो …

सदाचे मन सदाशी बोलत असतं … आणि आपण आपल्याच मनाचं का ऐकत नाही हा प्रश्न सदाला छळून असतो … म्हणजे मनाचच ऐकायला पाहिजे पण व्यावहारिक जगात जगतांना आपण आपल्या मनाचं ऐकत नाही किंवा त्याला दूर लोटूनच जगलं पाहिजे तरच इथे मनुष्य जगू शकतो किंवा टिकू शकतो हे सदाला कळतंय पण सदाच मन ऐकत नाहीये आणि म्हणून सदा स्वतःच्याच मनाचा वैरी झालाय….

कारण मनामुळे तो इतर लोकांसारखे व्यावहारिक जगणे जगू शकत नाही त्याला भावना सतावतात, त्याला दुख होतं,आनंद होतो पण व्यावहारिक जगात जगाला वाटेल तस जगाव लागतं, त्याला इतरांसारखे मनाला समजावता येत नाही स्वतःच्या अखत्यारीत बांधून ठेवता येत नाही ….या सगळ्या नुसत्या कल्पना बघतांना सुद्धा आपल्याकरवी राहून राहून लेखकाला नकळत दाद दिली जाते ...

शहाण्यानसारखे जगणारे डॉ श्री त्यांची पत्नी आणि मुलगा आणि मानसिक रोगी किंवा वेडा ठरलेला सदा यांच्यातले संवाद दिलखेचकच नाही तर हृदय ढवळून टाकणारे आणि सगळी वैचारिक गात्रे जागृत करणारी आहेत …

श्री आणि सदाच्या मधला ड्रिंक घेताना आणि आईची आठवण एक विनोदी सीन पण बुद्धिशाली लिखाणाचा अन सुंदर अभिनयाची परिसीमा गाठणारा नमुना आहे ….

आजच्या काळातल्या विभक्त कुटुंबाच उदाहरण दाखवलेले श्री चे कुटुंब त्यांची स्वप्न त्यांच्या महत्वाकांक्षा एका उंचीपर्यंत पोचताच मुलाने दूर विदेशात जाउन सेटल होण्याचा घेतलेला निर्णय आणि याबरोबरच सुखाच्या बेगडी कल्पना गळून पडलेली मुसमुसनारी आई आणि ........आणि आपणही आपले गाव सोडतांना आपल्या तरुणपणी असेच वागलो होतो हे आठवून हिरमुसलेला बाबा…. त्या आधी खुळ्या सदाने त्याच्या पद्धतीने सांगितलेले सुखाचे तत्वज्ञान …… काही भाग मनाला भिडणारे आणि नाटकाला उंचीवर घेऊन जाणारे आहेत …

खरा वेडा कोण आणि खरा शहाणा कोण … या प्रश्नांच्या मध्ये कोंडी झालेला प्रेक्षक या नाटकातून त्याच्या आयुष्यातले लहान लहान सुख सुद्धा किती महत्वाचे आहेत आणि ते आपण सुखामागे धावतांना, पडतांना आणि परत उठून पळतांना तसेच ताटकळत सोडून देत असतो हा हिशोब स्वतःच्याही नकळत हे नाटक बघतांना लावत असतो ….ते पूर्णपणे हिरावून जाण्या आधी बदल करता येतील का याचा शोध घेत बसतो … खरतर हीच या नाटकाची मिळवती बाजू आहे ….

या व्यतिरिक्त गुरु ठाकूर ह्यांचे वजनदार शब्द सुरेश वाडकर ह्यांच्या अप्रतिम सुराने नाटकात सुरुवातीपासूनच पोषक अशी वातावरण निर्मिती होते …. तसेच पौर्णिमा हिरे यांनी कमळाबाईंच्या भूमिकेत धमाल केली आहे… विनोद निर्माण करत गंभीर झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न या पात्राने केला आहे .…विजया महाजन यांनी प्रधान मेडम तर अभय फडके याने श्री चा मुलगा म्हणून अक्षय ची भूमिका यथार्थ पार पाडली आहे ….

एकंदरीत …. एखादी सुंदर, बुद्धीला खाद्य देणारी आणि वैचारिक भूक शमवणारी तरीही पूर्ण मनोरंजक पैसा वसूल कलाकृती पहायची असेल तर 'सुखांशी भांडतो आम्ही' एकदा बघायलाच हवा ….

Mrunmayee
६/०७/२०१३

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत सुंदर नाटक आहे हे. अप्रतिम देहबोली आणि कसलेल्या अभिनयाच्या जोरावर चिन्मय मांडलेकरने जे काही उभं केलं आहे, त्याला तोड नाही. त्याच्यासमोर इतर कुठचाही अभिनेता दबला झाकला गेला असता, पण गिरीश ओकांच्या जबरदस्त आणि अनुभवी वावराने त्याच्याशी स्पर्धा आणि साथ- दोन्ही केली आहे.

किंचित मेलोड्रामा, आणि क्वचित लाऊड होत असलं तरी हे मनस्वी नाटक अत्यंत अविस्मरणीय अनुभव आपल्याला देतं. शीर्षकगीताच्या निमित्ताने अनेक गोष्टी अनेक दिवस मनात रुंजी घालत राहतात. बघावंच असं हे नाटक आहे खरोखर.

खरोखर मस्तच नाटक आहे. पण त्याचे सगळे श्रेय चिन्मय मांडलेकर आणि गिरीश ओक यांच्या अभिनयाला. त्यांच्या जागी इतर कुणी असते तर हे नाटक तेवढेच आवडले असते का हा विचार नाटक संपल्यावर मनात आला.

+1 a must c in current list.
ideas of luxury has to be revised after watching this.