अंतराय

Submitted by मोहना on 6 February, 2013 - 06:50

शमिकाने समोरच्या बाकड्यावर पाय ताणून आजूबाजूला नजर फिरवली. रेल्वेने थोडासा वेग घेतला होता. आखूड ब्लाऊज, खोचलेला पदर आणि अंबाड्यावर लाल पिवळी फुलं घातलेल्या दोनचारजणी शांतपणे खिडकीबाहेर बघत होत्या. खिडकीची जागा असूनही ती जरा बाजूलाच बसली होती. कितव्यांदा कोण जाणे पण पुन्हा एकदा तिने बसलेल्या जागेवरची धूळ झटकल्यासारखं केलं. दीड दोन तासात रेल्वे तिला आणि रतनला त्या आडगावात नेऊन सोडणार होती.
"आईच्या नोकरीने कुठे कुठे फिरवलं आम्हाला." ती तिच्याएवढ्याच फॅशनेबल मैत्रिणीला उत्साहाने सांगत होती.
"केवढं बदललं आहे नाही सर्व?बावीस वर्षांनी चाललोय आपण त्यामुळे वाटतंय मला, की खराच आहे हा बदल?"
रतन मनापासून हसली.
"अग तू नाहीस का या बावीस वर्षात बदललीस? मग आम्हीही बदललो तर नवल का वाटतंय तुला?"
"खरं आहे तुझं." शमिकानं विषयच थांबवला. आपण उगाचच धाडस करतोय का सांगोल्याला जायचं हे तिचं तिलाही ठरवता येईना. ती ऑस्ट्रेलियाहून तीन आठवड्यांसाठी सोलापूरला येते काय आणि अचानक बाजारात रतनची गाठ पडते काय, सगळीच अपूर्वाई.

रतननेच तिला ओळखलं. बघता बघता आठवतील त्या मैत्रिणींचे फोन नंबर शोधून त्या रात्र जागवायला एकत्र जमल्याही. सगळ्यांच्या आयुष्यांची बेरीज वजाबाकी झाली. घरातल्या मंडळीची, भावंडांची चौकशी झाली. तिच्या ऑस्ट्रेलियन दिनक्रमाबद्दल तर सर्वांनाच कोण उत्सुकता. त्यांच्या कंपूतली परदेशात स्थायिक झालेली ती एकटीच. नकळत गप्पांचा ओघ तिच्याभोवती केंद्रित झाला. पण नोकरीच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात गेलेल्या शमिकाकडे सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं. पुन्हा तसं ऐकून बरंच माहीत होतं की सर्वांना परदेशातल्या जीवनशैलीबद्दल.

बोलण्याच्या ओघात सांगोल्याचा विषय आला तेव्हा मात्र शमिकाला उत्साहाचं भरतं आलं. शाळेतली आणि कॉलेजमधली काही वर्षे रतन आणि ती सांगोल्याला एकत्र होत्या. एकदम दोघींनी कधी तरी सांगोल्याला जायचं ठरवूनही टाकलं. हॉटेलमध्ये उतरायचं की एखाद्या मैत्रिणीकडे ते मात्र ठरता ठरेना. शेवटी दोघींचीही चांगली मैत्रीण असलेल्या नीनाकडे उतरायचं पक्कं झालं.
शमिका काही दिवस त्या बेतातच मग्न होती. शाळेतलं आणि त्यानंतर कॉलेजमधलं उत्साही वातावरण नजरेसमोरून हटता हटेना शमिकाच्या. तासांना दांडी मारून खाल्लेले बटाटेवडे, मैत्रिणींना टाकलेले खवचट फिशपॉड, चारीठाव केलेली भटकंती, वादावादी, भांडणं एक ना अनेक. कधी एकदा सांगोला गाठतोय असं होऊन गेलं तिला. बावीस वर्षांनी ती पुन्हा त्या गावाला चालली होती. अस्वस्थ, अस्थिर, उत्सुक.

गाडी कुरकूर करत थांबली ती विचारांची साखळी खेचत. आता नीनाचे विचार डोकावायला लागले मनात. शांत, भोळसटपणाकडे झुकणार्‍या नीनाच्या आणि तिच्या मैत्रीबद्दल सगळेच चेष्टा करायचे. एवढी अबोल, म्हटलं तर अलिप्त वाटणारी नीना धर्माच्या बाहेर लग्न करण्याचं धाडस करेल अशी पुसट शंकासुद्धा तिच्या मनात कधी डोकावली नव्हती. नीनानं लग्न केलं तेव्हा ती ऑस्ट्रेलियात होती. तिच्या आईनं ही बातमी सांगितल्यावर शमिकाला धक्का बसला होता. मनात येऊनही नीनाला पत्र पाठवणं, फोन करणं राहूनच गेलं होतं. आता मात्र मधली सगळी वर्ष पुसून काढायची होती. कसं असेल तिचं घर, नवरा आणि घरातली सगळी मंडळी? ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून कुणाकडे जाऊन राहायची सवयच मोडली होती. त्यातून भारतातल्या लोकांचा एकदम अंगावर येणारा जिव्हाळा फारच अवघडून टाकणारा वाटे तिला. आपल्याच देशाबद्दलचे विचार फारच बदलल्याचे तिला दरवेळेस भारतात आल्यावर जाणवायचं. नाही म्हटलं तरी दोन्ही देशामध्ये तुलना व्हायचीच आणि पश्चिमेचं पाणी अंगावर घेणार्‍या पुण्यामुंबईच्या वेगाचं दरवेळेस नवल वाटायचं. एकाचवेळी असंख्य विचार फुगडी घालत होते. पण नजर गाडीतल्या त्या बायकांवर खिळली होती. त्यांची साधीशी हालचाल, वागणं, बोलणं सगळ्या बारीकसारीक गोष्टी तिच्या मनात नोंदल्या जात होत्या. एकाएकी तिला फारच अस्वस्थ व्हायला झालं. सगळे बदल पुण्या-मुंबईतच. कधी या लोकांना सुधारणांचं वारं लागणार कुणास ठाऊक? पण असं म्हणणं म्हणजे अन्यायच की या बायकांवर. ती स्वत:लाच पटवत राहिली. सुधारणाच वारं अंगाला लागलं नसलं तरी हे बदल माहितीचे असावेत यांना, नाही तर तिच्या शर्ट आणि जीन्सकडे त्यांनी टवकारून पाहिलं असतं हे शमिकाने ताडलं. पण आता या क्षणी रेल्वेतून उतरावं, सांगोल्याला जाऊच नये असं फार तीव्रतेने वाटलं तिला. त्याच तंद्रीत तिने तोंड उघडं टाकून घोरत पडलेल्या रतनला जोराजोरात हालवलं. ती गडबडून उठली.
"परत जाऊया सोलापूरला."
"तुला वेड तर नाही ना लागलं? नीना न्यायला येणार आहे स्टेशनवर." एकदम जागी झालेली रतन भडकलीच.
"घर मोठं आहे म्हणत होती. तू गेली आहेस कधी?" तिच्या मनात दडून राहिलेल्या शंकांना अचानक तिने वाट मोकळी करून दिली, तरीही शमिकाला स्वच्छता, बाथरूम, घरातली माणसं याबद्दल फटकन विचारता येईना.
"मी नाही गेले कधी तिच्याकडे, म्हणजे कधी गेले तर संध्याकाळी परतच येते. एकदम तिच्या घराबद्दल का वाटते आहे उत्सुकता तुला?"
"भेटतेस सगळ्यांना?" रतनचा प्रश्न न ऐकल्यागत शमिकाने विचारलं.
"नाही गं. कामासाठी येते ना. ठरवते दरवेळेस पण नाही होत भेटणं कुणाला. आपल्या वर्गातली मुलं दिसतात बर्‍यांचदा, पण मुली तर लग्नं होऊन बाहेरगावीच असणार."

ती गप्प झाली. रतननेही पुन्हा डोळे मिटून घेतले. सांगोल्याला यायचा उत्साह नष्ट होतो आहे असं वाटत होतं. तेवढ्यात रेल्वेचा वेग कमी होत फलाट दिसायलाही लागला.
"ती बघ नीना!" रतन एकदम ओरडली. अंगात वीज संचारल्यागत आता तिनेही खिडकीतून डोकावायचा प्रयत्न केला.
तरीही गाडी थांबल्यावर ती तशी सावकाशच उतरली. पुढे झेपावत रतनने नीनाच्या मुलीला कौतुकाने जवळ घेतलं. शमिका मात्र अवघडून उभी होती.
"शिष्ट कुठली." तिचा हात आनंदाने हातात घेत नीना पुटपुटली.
"चल गं, काहीतरीच काय बोलतेस? मी आहे तशीच आहे."
"म्हणजे शिष्ट म्हणायचं आहे तिला." रतनही नीनाच्या बोलण्यात सामील झाली.
रिक्शात बसल्या बसल्या बाहेर डोकावत कॉलेजच्या दिवसातल्या खुणा तपासणं सुरू झालं तिचं.
"गावाबाहेर आहे का गं हे रेल्वे स्टेशन? काहीच कसं ओळखीचं वाटत नाही?"
नीना मुलीला सांभाळत हसली.
"हा भाग मलाही आत्ताच कळतोय. आपण कॉलेजात असताना जंगल असणार गं. आणि शमे, तू प्रयत्नसुद्धा नको करू काही आठवण्याचा, सांगोला फार बदललं आहे."
"माझ्या सगळं लक्षात आहे पण . पाच वर्ष काढली आहेत ना. काय धम्माल करायचो नाही आपण?"
जुन्या आठवणीत घर कधी आलं तेही तिला कळलं नाही. रतनने उत्साहाने घरातल्या प्रत्येकाची ओळख करून घेतली. गरम वाफाळलेला चहा घेत शमिका थोडी अवघडल्यासारखी बसली, गर्दीत श्वास कोंडल्यासारखी. छोटं घर आणि भरपूर माणसं हे समीकरण ती कधीच विसरली होती. रतन गप्पामध्ये रमलेली बघितल्यावर ती उठली.
स्वयंपाकघरात दाराला टेकून बराच वेळ ती नीनाच्या हालचाली निरखत राहिली.
"कोण मुलं आहेत गं इथे आपल्या वर्गातली?"
"खूप आहेत."
"नावं सांग ना. भेटेन तरी कुणाला ना कुणाला."
"उद्या जा सावकाश. आज गप्पा मारू रात्रभर तिघींजणी."
नीनाने म्हटल्याप्रमाणे खरंच रात्रभर तिघींच्या गप्पा रंगल्या. रतनने नीनाच्या लग्नाबद्दल विचारलंच.
"तू धाडसी नीना. नोकरीसुद्धा नव्हती ना शशांकला तुम्ही लग्न केलंत तेव्हा?"
क्षणभर नीना गप्प राहिली. शमिकाला राहवलं नाही.
"आम्ही सहज विचारतोय गं. तुझ्या मनात नसेल तर राहू दे."
"नाही, तसं काही नाही. पंधरा वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षांनंतर लग्नानंतर पहिल्यांदाच हा विषय निघतोय. त्यामुळे जरा अडखळल्यासारखं झालं."
"तुला माहीत आहे ना सांगोल्याला मी बहिणीकडे राहायची. इतकी कटकट, सूचना, त्यातून सुटका म्हणूनच शशांकच्या मैत्रीकडे पाहायची. त्या मैत्रीवरूनही संशय घ्यायला लागली बहीण. त्यामुळे माझं त्याच्याबरोबर बाहेर राहणं आणखीनंच वाढलं. ताईने गावालाच पाठवलं परत. कोंडल्यासारखं झालं होतं आयुष्य. एक दिवस शशांक गाडी घेऊन आला आणि मागचा पुढचा विचार न करता आले मी निघून."
"त्या वेळेस नोकरीही नव्हती ना शशांकला?" रतनने शक्य तितक्या हळुवार स्वरात पुन्हा तोच प्रश्न विचारला.
"हो. फार कठीण होती सुरुवातीची वर्ष. नोकरी नाही. एकत्र कुटुंब, चालीरीती वेगळ्या..." बराचवेळ नीना तिच्या बदललेल्या आयुष्याबद्दल बोलत राहिली.
"पण माहेरी जातेस ना आता?" शमिकाने विचारलं.
"नाही. ते दु:ख मात्र आता शेवटपर्यंत राहणार सोबतीला. एकदा आई आली होती भेटायला. बाबांनी बजावलं होतं भेटायला जायचं नाही म्हणून. ती धाडस करुन चोरुन तरीही अधूनमधून यायची. पण मग मीच मना केलं तिला. तिची कुंचबणा नाही पाहवली. एका गावात राहून त्यानंतर बारा वर्ष भेटलो्च नाही गं आम्ही."
नीनाचे डोळे तुडुंब भरून आले. दोघी संकोचून गेल्या. रतनने पुढे होऊन पटकन नीनाला कुशीत घेतलं तसं नीनाने स्वत:ला मोकळं केलं. हुंदक्यांनी गदगदलेल्या नीनाकडे शमिका भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली.
"तुझी आई हल्लीच गेली ना? मग तेव्हा तरी गेली असशील."
"आई ताईकडेच राहायची. आई गेल्याचं कळवलंही नाही मला. कुणाकडून तरी समजलं तशी घाईघाईने शेवटचं दर्शन घ्यायला गेले होते. घरातले सगळे दार लावून एका खोलीत बसून राहिले. नमस्कार केला नी गेले तशी परत आले."
"तुला कधी वाटत नाही का गं की आपण केवढी मोठी चूक करून बसलो म्हणून."
"सुरुवातीला वाटायचं. पण ताईलाच जबाबदार धरते मी. जरा तिने समज दाखवली असती तर...मी सुद्धा तुमच्याएवढीच शिकले पण काही केलं नाही त्या शिक्षणाचं एवढी खंत मात्र वाटते. पण जाऊ दे. तुमच्याबद्दल ऐकू दे मला आता." नीनाने विषयाला खीळ घातल्यासारखं बोलणं थांबवलं. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही."

"तू केदारच्या घरी जाणार असशील ना?" अचानक नीनाने शमिकाला विचारलं.
"अर्थात. भावासारखाच होता तो मला."
"बघवत नाही त्याचा भितींवर लावलेला फोटो."
"आपल्या ग्रुपमध्ये तुमची मैत्री जास्त."
रतनला एकदम हसू फुटलं.
"काय हुकूमशाही चालायची तुझ्यावर केदारची. आठवतंय? रक्षाबंधनाच्या दिवशी राखी घेऊन आला होता स्वत:च. आम्ही होतो ना तिथेच सगळ्याजणी." शमिका मनासमोर तो प्रसंग नाचायला लागला. अगदी आताच घडल्यासारखा.

तिच्या घरी त्या सर्व जणी जमल्या होत्या. तावातावाने एखाद्याला मित्र तर मित्र म्हणा ना, भाऊ मानायची कसली नाटकं. वगैरे बोलणं चाललं होतं. अशा वादविवादात शमिकाचा नेहमीचा पुढाकार. तेवढ्यात केदार टपकला तो राखी घेऊनच. शमिकाच्या पुढ्यात त्याने राखी धरल्यावर सगळ्या हसायला लागल्या.
"शमिका, केदार तुझा मित्र आहे ना? मग राखी नको बांधू." तिच्यावर हल्लाच चढवला प्रत्येकीने. शमिका गांगरली, केदारला आपलं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करत राहीली. पण शेवटी केदारच्या हट्टापुढे तिने हात टेकले. तो खर्‍या अर्थी तिचा भाऊ झाला. ती एकाएकी उदास झाली.

सांगोला सोडून दोन वर्ष झाली असतील तेव्हा. अधूममधून तो सोलापूरला आला की भेट होत होती. एकमेकांना पत्र तर सारखी पाठवत होते दोघं. आणि अचानक त्या बातमीने सारं बदललं. मित्रांबरोबर फिरायला गेलेला केदार परत आलाच नव्हता. गाडीला झालेल्या अपघातात एका श्वासातलं अंतर संपलं होतं. तिला समजल्यावर मिळेल ती गाडी पकडून ती धावली होती सांगोल्याला पोचण्यासाठी. उद्धस्त घरट्यात पाय ठेवण्याचं बळ मिळवणं फार कठीण गेलं होतं. तुषारच्या, केदारच्या भावाच्या खांद्यावर मान टाकत तिने दु:खाला वाट मोकळी करून दिली.

त्यानंतर या गावात ती परतली नव्हती. पण केदारच्या घराचा तीही एक भाग बनून गेली होती हे तिला कधीच विसरता आलं नाही. ती मग आवर्जून त्याच्या बहिणीच्या लग्नाला हजर राहिली. अधूनमधून पत्र लिहीत गेली. ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर हळूहळू सगळं मागे पडत गेलं.

"तुषारला बोलले आहे मी तू येणार आहेस ते." तिच्या मनातलं ओळखल्यासारखं नीना म्हणाली.
"कधी येणार आहे तो? नाही तर मीच सकाळी जाऊन भेटून येईन म्हणत होते."
"रात्रीच चक्कर टाकेन म्हणाला होता. नऊ वाजले आहेत ना, येईल कदाचित अजूनही."
तिचे कान तुषारच्या पायरवाची चाहूल घेत राहिले. तुषार आलाच नाही. थोडासा अस्वस्थपणा आला शमिकाला. केदार असता तर झालं असतं असं? रात्र रात्र जागवून मांडलेला गप्पांचा अड्डा तिच्याडोळ्यासमोर नाचायला लागला. एकत्र केलेला अभ्यास, एकांकिकांचा सराव, शाळांच्या सहली, रुसवेफुगवे, सगळं आजूबाजूला ठाशीवपणे उभं राहिलं. एकमेकांची घरं अगदी जवळ. सारखं भेटणं चालू असायचं. दोघांसाठी एकमेकांची घरं स्वत:चीच झाल्यासारखी होती. केदारची शांत स्वभावाची आई फार आवडायची तिला. त्याही मुलीसारखं कौतुक करायच्या. मैत्रिणीसारखी वाटणारी आई फिरतीच्या निमित्तानं वरचेवर बाहेर, त्यातून भावंडांच्या उणीवेची भर पडायची. वडील तर तिला आठवतही नव्हते. यातून केदारचं घर म्हणजे विसावा होता तिच्यासाठी. तिचा बराचवेळ केदारच्याच घरी जायचा. आज तुषार आला नाही म्हटल्यावर क्षणभर तिला केदारच्या मैत्रीत ती उगाचच घरादाराला तर गुंतवत नव्हती ना असा प्रश्न पडला. एक माणूस जीवनाचा खेळ अर्ध्यावर सोडून गेला तर सगळी नातीच बदलावीत?

सकाळी भराभर सगळं आटपून दाराच्या चौकटीत ती उभी राहिली. शक्य तितक्या दूरवरचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत. जुन्या दिवसांचा लवलेश शोधूनही सापडत नव्हता. ती तशीच नजर खोळंबून उभी होती. वाहत्या रस्त्यावर ओळखीचा चेहरा धुंडाळण्याचा खेळ तिला मनातून हवाहवासा वाटला तरी हाती काही लागत नाही म्हटल्यावर ती वैतागल्यासारखी झाली. या छोट्याशा गावात भेटीच्या वेळा ठरवूनच यायला हवं होतं. सगळ्यांच्य व्यस्त आयुष्यात आपल्याला वेळ झाला म्हणून डोकावलं की हे असं होणारच. मनातले विचार चेहर्‍यावर उतरल्यासारखं तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. तेवढ्यात पायवाटेवरून भरभर चालत येणारी चाल ओळखीची वाटल्यावर ती टक लावून पाहत राहिली. केदार? छातीत धस्स झालं. कितीदा तरी कुठून तरी अचानक तो समोर उभा ठाकेल असं वाटायचं तिला. इतक्या वर्षात तो या जगात नाही हे सत्य तिने पूर्णत: स्वीकारलं होतंच कुठे?

"रात्रीच यायचं होतं पण आलोच अकरा वाजता. होतो पण आई म्हणाली आता उद्या सकाळी जा लवकर. कशी आहेस? चल आता आमच्याकडे." घाईघाईत खुलासा करणार्‍या तुषारकडे ती पाहत राहिली. बावीस वर्षात कुणामध्ये काहीच कसा फरक नाही पडला? नीना, रतन आणि आता तुषार. सगळी आहेत तशीच वाटतात. तुषारकडे बघता बघता ती रतन आणि नीनाला विसरलीच. कुणालाही काहीही न सांगता पटकन इथून तुषारबरोबर निघावं असं तीव्रतेने वाटलं तिला. कधी एकदा केदारच्या घरी पोचतोय असं झालं होतं का? तिने स्वत:लाच प्रश्न केला. नीना म्हणत होती तो भितींवर टांगलेला त्याचा फोटो पाहायला की केदारची मैत्री ती विसरू शकलेली नाही हे दाखवायचा वेडा प्रयत्न करायला? आज इतक्या वर्षात खरंच तिने कित्येकदा मनातल्या मनात गप्पा नव्हत्या मारल्या त्याच्याशी? जसं केदारचं घर कर्त्या सवरत्या मुलाला मुकलं होतं तसं तिने नव्हता का तिचा परममित्र गमावला? त्या घराचं दु:ख सर्वांनी गृहीत धरलं; पण तिच्या चिघळत्या जखमेवर कोण मारणार फुंकर? तिला एकदम आठवलं तो गेल्यानंतर त्यांच्याच मित्रमंडळीपैकी एकाला पाठवलेलं भलंमोठं पत्र, भावनेनं ओथंबलेलं आणि नंतर आलेला त्याचा फोन...
"त्याच्या आठवणी शब्दांत मांडून छोटं करतो आपण त्याला. शब्दांचा असा खेळ निरर्थक आहे. तो बाहेरगावी गेलाय असंच समजतो मी. तूही तेच करावं हे सांगण्यासाठी केला फोन."
भावना व्यक्त करणं म्हणजे खेळ? शब्दांत मांडल्या म्हणून त्या खोट्या? काय करायला हवं होतं मी म्हणजे कळेल या माझ्या मित्राला की केदारचं असं अचानक जाणं स्वीकारणं जमलेलं नाही मला अजून. प्रत्यक्षात शांततेचा बुरखा पांघरुन ती फक्त हुंकार देत राहिली. त्यानंतर कितीतरी दिवस आतल्या आत मिटून गेल्यासारखी वावरत राहिली. नंतर तिचं तिलाच वाटून गेलं, आपल्याला कुठे सिद्ध करायची त्याची आणि आपली मैत्री? स्वत:च्या मनाची समजूत पटल्यावर ती शांत झाली.

केदार गेल्याचं कळल्यावर फार एकटं पडल्यासारखं वाटायचं तिला बरेच दिवस. दोन दिवस पत्रांचा गठ्ठा उलगडून बसली होती ती.
’तुझं आणि माझं नातं काय आहे कुणास ठाऊक; पण मागच्या जन्मात बहीण असावीस बहुधा माझी तू... काय दादागिरी करतेस गं....’
’तुझ्याशी गप्पा मारताना मी स्वत:शीच बोलतो असं वाटतं मला.’
’तू माझ्या आयुष्यात आलीस ती मैत्रीण म्हणून. हळूहळू भाऊ, बहीण अशी सगळी नाती मला तुझ्यातच सापडली.’
पत्र वाचताना ती हमसून हमसून रडली होती. त्यानं तिला जेवढं समजून घेतलं होतं तेवढी ती मात्र त्याच्या आयुष्यात मुसंडी मारून शिरू शकली नव्हती या दु:खाने वेडंपिसं व्हायला झालं तिला. नको होतंस असं तडकाफडकी जायला तू. अरे, लक्षात आलं असतं माझ्या की मी स्वत:भोवतीच गिरक्या मारतेय. पण सवडच नाही दिलीस तू मला.
तुषारला पाहिल्यावर मनातल्या विचारांबरोबर कुठल्या कुठे भरकटली ती. नीनाच्या घरातल्या माणसांबरोबर तुषार इकडचं तिकडचं बोलत होता. हरवल्या नजरेने तुषारकडे बघताना तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं. अरे, मी सुद्धा तुमच्या घरातलीच आहे. सगळे बारीकसारीक, छोटे मोठे प्रश्न ठाऊक आहेत मला तुमच्या घरातले. पण मनातले तरंग बाहेर उमटू न देण्याची खबरदारी घेत शमिका तुषार बरोबर निघाली.

"तू चांगलं केलंस शमिका. बाहेर पडलीस या खुराड्यातून. ऑस्ट्रेलिया काय म्हणतंय? किती वर्ष झाली गं तुला तिकडे जाऊन? मी पाठवलं होतं तुला एक पत्र. नंतर नाहीच झालं लिहिणं."
घडाघडा बोलणारा तुषार तिला वेगळाच वाटत होता. तिच्या डोळ्यांसमोर केदारच्या घरी आलं की भेटणारा तुषार आला. अलिप्त, तुटक. आज मात्र भडभडून बोलत होता. केदारसारखा.
तिला एकदम जवळचा वाटला तो. तरीही एक प्रसंग तिच्या नजरेसमोरून हलेना. आईबरोबर सांगोला सोडल्यावर कुठल्या तरी स्पर्धेच्या निमित्ताने ती केदारकडे उतरली होती. सगळ्या मित्रमैत्रिणी निघून गेल्या तरी ती दोघं त्यांच्या घराजवळच्या रस्त्यावरच्या पुलावर गप्पामध्ये रंगून गेली.
"केदार, अकरा वाजून गेले आहेत. आटपा आता." तुषारच्या कठोर आवाजाने तंद्री भंगली. त्याच्या आवाजातल्या धारेने गप्पांच्या गाडीला एकदम खीळ बसली. तिच्याकडे तर त्याने पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. घरात गेल्यावर केदारनेच काहीतरी विनोद केला आणि वातावरण निवळलं. शमिकाच्या मनात मात्र तुषारबद्दल नकळत एक अढी बसली.

केदारच्या जाण्याने तुषारमध्ये काही फरक पडला असेल? विचार करता करताच तिची नजर इकडेतिकडे भिरभिरत होती. नदीचा तो पूल लागला तशी ती खिन्न झाली. या पुलाशी किती तरी आठवणी निगडित होत्या. त्यांच्या कंपूच्या याच पुलावर तास न तास गप्पा रंगायच्या. कंटाळा आला की तिचं आणि केदारचं तर हे हक्काचं ठिकाण होतं. आज मात्र तिला नदीचं पाणीही वेगळं वाटलं. रस्त्यावरची छोटी झाडं केवढी वाढली आहेत असं तिने म्हटल्यावर तुषार गडगडाटी हसला,
"शमिका, तू इथे नाहीस म्हणून झाडांनी वाढायचं नाही का?"
शमिका नुसतीच हसली तरी तिच्या मनात आलंच, काय हरकत आहे असं झालं तर...

घरी पोचल्यावर चप्पल काढतानाच ती काहीतरी शोधत राहिली. कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत केदारच्या फोटोकडे तिने पाहून घेतलं. छातीत एक सूक्ष्म कळ उठली. तिला किती तरी बोलायचं होतं केदारबद्दल. पण मन अस्वस्थ झालं होतं. केदार असताना त्या घराची लेकच असल्यासारखी वावरलेली ती आज गोंधळून उभी होती. अंतर राखून केदारच्या आईशी ती बोलत राहिली. आठवणींची उजळणी झाली. कोण कोण भेटतं, सगळीजणं कशी आहेत असं वरवरचं बोलणं चाललं होतं. क्षणभर तिला वाटून गेलं की नाही म्हटलं तरी जखमेवर खपली धरली आहे. आज आपण येऊन ती खसकन ओढल्यासारखं तर नाही ना होत? काळ काही कुणासाठी थांबत नाही. त्याच्याबद्दलच्या आठवणी त्याच होत्या पण तो गेल्यानंतर दोन तपांचा कालावधी गेला होता. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तिला मात्र केदारच्या आठवणींनी घेरून टाकलं होतं. ती आडून आडून पुन्हा पुन्हा तेच बोलत राहिली. अचानक कुठेतरी एकदम संभाषणाला खीळ बसल्यासारखं वाटलं तिला.

नाक्यावर गेलेला तुषार परत आल्यावर मात्र ती सैलावली.
"चल, अख्खा गाव परत एकदा बघ. मगच कळेल तुला सांगोला किती बदललंय." त्याच्या आपुलकीने ती सुखावली. तुषारचं हे रूप तिला नवीन होतं. त्याने म्हटल्याप्रमाणे खरंच सगळं सांगोला पालथं घालून झालं. तिच्या जुन्या घरावरून चक्कर मारून झाली. खरं तर आत जाऊन डोकावायचं होतं , पण तसं तुषारला सांगणं तिला जमलं नाही. केदारने न सांगताच ओळखलं असतं माझ्या मनातलं. ती स्वत:शीच पुटपुटली. जरा अतीच होते आहे ही तुलना असं तिचं तिलाच वाटून गेलं. तुषार काही तिचा मित्र नव्हता तरी तो भावाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न नव्हता का करत? नाही म्हटलं तरी ती थोडीशी अस्वस्थ होतीच. किती म्हटलं तरी तुषार, केदारची जागा कसा घेऊ शकणार? पण तुषार खरंच त्यांच्या मैत्रीचा साक्षीदार असल्यासारखा प्रत्येक ठिकाणी केदारची जागा घेत होता. त्याच्यासारखेच प्रश्न, त्याच्याचसारखं तिच्या मनातलं ओळखल्यासारखं एकेका ठिकाणी तिला घेऊन जाणं आणि तरीही केदार असता तर....असा आपण विचार करतो आहोत या जाणिवेने ती ओशाळली, पण न राहवून म्हणालीच,
"तू बदललास तुषार."
पुन्हा तो हसला
"त्या वेळेस माझा कंपू वेगळाच होता. मला कल्पना आहे तुला आश्चर्य वाटत असेल मी इतका रस घेऊन तुला नेतोय सगळीकडे, तुझा मनातलं जाणल्यासारख्म. पण त्या वेळेस मी पार गुंतून गेलो होतो त्या सर्वांमध्ये. एकेका प्रसंगात आपल्या वाटणार्‍या माणसांची खरी ओळख समजते. लक्षात येतं आपण चुकीच्या ठिकाणी गुंतलो. एकदा हे लक्षात आलं की त्रास होतो, पण हळूहळू दरी रुंदावते, दूर व्हायला होतं.
ती हसली.
"मग पुन्हा शोध नात्याचा, माणसांचा, मैत्रीचा. हल्ली हल्ली जाणवायला लागलंय की केदारच्या मित्रमैत्रिणींत मी सहज सामावून जातो. तीच जवळची वाटतात मला."
शमिका त्याच्याकडे बघत राहिली. त्या वेळेस केदारचा मोठा भाऊ म्हणून केवढं आकर्षण होतं सगळ्यांना. तो मात्र त्याच्याच तोर्‍यात, तुटक, अलिप्त. त्यांच्या घरी गेलं की कितीदा तरी तो बोलायचाही नाही. आज त्याच्याकडून हे ऐकणं कठीण जात होतंच, पण त्यापेक्षाही ते स्वीकारणं फारच अवघड होतं. तिला वाटलं ओरडून सांगावं त्याला की नको प्रयत्न करू तू केदारची जागा घेण्याचा. तू तसाच राहा. आपल्याच धुंदीत. फार केविलवाणा वाटतोस असा तू. प्रत्यक्षात मात्र ती बोलून गेली,
"केदारच बरोबर आहे असं वाटतंय मला आज."
तुषार एकदम गप्प झाला. सुरुवातीपासूनचा तिच्या मनाला वाटणारं एक विचित्र अवघडलेपण तिला अधिकच घेरुन गेलं.

रात्री आग्रह करूनही ती थांबली नाही. तिला सोडायला आलेल्या तुषारशीही तिला फार बोलावंसं नव्हतंच वाटत. नीनाकडे तिला सोडल्यावर उद्या स्टेशनवर येतो म्हणून त्याने तिचा निरोप घेतला. रात्र जागवून रतन आणि नीना गप्पा मारत राहिल्या. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत राहिल्या; पण झोप येते आहे म्हणत तिने बोलणं टाळलं. स्वत:च्या मनालाच विळखा घातल्यासारखी मुक होऊन गेली.

सकाळी तुषार तसा लवकरच आला. नीनाचा निरोप घेऊन रतन आणि तुषारबरोबर ती स्टेशनवर पोचली.
"आता केव्हा येणार तू? केदार असता तर खूश झाला असता." तुषारच्या डोळ्यात पाणी तरळल्यासारखं वाटलं तिला.
"तुषार, केदार व्हायचा नको रे प्रयत्न करू. तू आहेस तसाच राहा." त्याचे दोन्ही हात हातात घेऊन सांगावंसं वाटत होतं, पण ती फक्त पाणावल्या डोळ्यांनी पाहत राहिली.
"येईन रे, नक्की येईन भारतात आले की...." पुढे काही बोलण्याआधीच रेल्वे आली. गाडीने वेग घेतला तशी ती हात हालवत राहिली. गजातून जाईल तेवढं डोकं बाहेर काढून ती तुषारला डोळे भरून साठवून घेत होती. केदारला तर काळाने हिरावून नेलं होतं, पण केदारने जाताजाता तुषारलाही सोबत नेलं होतं. बावीस वर्ष एकदा तरी सांगोल्याला जायला हवं म्हणणारी शमिका आता पुन्हा कधीही इथे येणार नव्हती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users