मागे वळून बघताना-एक प्रकट स्वगत

Submitted by रेव्यु on 14 April, 2011 - 21:32

२००५ च्या ऑगस्ट मध्ये उत्तर भारतातील एकवीस वर्षांच्या वास्तव्यानंतर घरी परततांना मनात आलेल्या भावना ,आलेले विचार पत्ररूपात मी शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रिय मुलीनो,
एका सुंदर पर्वाची इती---माझा मुजरा
आज शेवटी सगळे सामान पुण्याला गेलें. नवीन नोकरी मिळाली पुण्यात.पण ही नुसतीच नोकरीनिमित्त बदली नाही अथवा स्थलांतर नाही्ये. एका सुंदर कालखंडाची इतिश्री ,२० वर्षाच्या प्रवासास नव्हे,अखंड स्वप्नास पडलेला खंड आहे. हा काल आपल्या सर्व स्वप्नांचा,बाल्यसुलभ कुतुहलाचा,सकाळच्या कुसुमदलावरील दवागत तजेला असलेल्या क्षणांचा,एका फुलावरून दुसर्‍या फुलावर बागडणार्‍या रंगिबेरंगी फुलपाखरासम चैतन्याचा साक्षिदार आहे.ही वर्षे जन्मभर आपल्या मनाचा एक सुगंधी कप्पा बनून राहणार आहेत -नव्हे बनली आहेत.

ऑगस्टच्या दमट आणि जीवघेण्या उकाड्यात आपण २० वर्षापूर्वी आलो अन आज तितक्याच उकाड्यात पण आल्हाददायक आठवणी घेऊन परत जातोय-हा एक सुखद संयोग म्हणायचा.It was really worth it!! Happy

ही वीस वर्षे कशाची द्योतक आहेत्?त्यांचे आपल्या जीवनात काय स्थान आहे? निसर्गाशी कसं हित गुज करायचं,शुभ्र चांदण्यात डोंगर माथ्यावर तार्‍यांशी कसा संवाद साधायचा,कुमाऊं अन शिवालिकच्या त्या धिप्पाड पर्वत श्रेणीशी कशी दोस्ती करायची,त्यांच्या नि:स्तब्धतेतही गाणी कशी ऐकायची हे या वर्षांनी आपल्याला शिकवले.कडाक्याच्या हिवाळ्यात माध्यान्ही ऊन अंगावर घेत सूर्यनारायणाचे आभार कसे मानायचे अन "धूप सेंकना" ला तुमच्या आईला साथ देणार्‍या निट्टिंग च्या सुयांच्या स्रुजनशीलतेची अनेक रंगीत रूपे तुमच्या अंगाखांद्यावर कशी खेळवायची.आपल्या देशाच्या कान्याकोपर्‍यातून पोटापाण्यासाठी आलेल्या मित्रांचे जिवलग अन मग जन्मजन्मांतराचे साथी इथेच झाले.सहिष्णुता म्हणजे ही मैत्री हे नंतर कळले.त्यांच्याबरोबर गायलेली त्यांची अन आपली-शेवटी सर्वांची गाणी झाली.आपली लावणी अन त्यांचा गिद्दा ,मणी मामींनी शिकवलेले भरत नाट्यम अन गुहा आंटीचे रोबिंद्र शोंगीत एका कंठात अन सगळ्यांच्या घरात नांदू लागले.इडली सांभार्,अन पुरण पोळी सर्व डब्यात नांदू लागले.शेकोटीभोवती एकत्र बसून शन्करन्,डे,जयरामन्,गिल अन पाटणकर अंताक्षरी गाऊ लागले सर्व भाषात.आपले अरुणकाका आजारी पडले ना तेंव्हा सात दिवस चौदा प्रकारचे डबे अन नाश्ते प्रेमाने पोहोचले होते पी जी आय मध्ये चंदिगढ्ला.
मला जर
"आंचल से तुझे मैं लेके चलू एक ऐसे गगन के तले
जहाँ गम भी न हो ,आँसू भी न हो,बस प्यार ही प्यार पले"
अशी भूमी कुठे आहे जर विचारले तर मी म्हणेन
"हमिनस्तो हमिनस्तो हमी नस्त"(खुस्रू साहेब क्षमस्व!!
Happy
तुम्हा दोघीना अशा वातावरणात बाल्य्,कौमार्य अन तरुणावस्थेत पदार्पण करताना पाहिले.पंजाब,हिमाचल अन काश्मिरी नजाकत ,सौंदर्य द्रुष्टी अन मराठी संस्कार यांचा हा एक मोहक संगम होता.या वळणांवर तुम्ही सहिष्णुता,सर्व संस्कृतींचा आदर अन उदार भाव,अन पहाडी निसर्ग प्रेम शिकलात्-नकळत.गाण्यातून्,नृत्यातून,नाटकातून कलागुणांतून हा अविष्कार झाला ,आमच्या वरील प्रेम व्यक्त झाले.
याच कालात हिला आपल्या उर्वरित आयुष्याचे ध्येय दृष्टिहिन मुलांसाठी सदोदित काही करण्याच्या आकांक्षेने प्रेरित होण्यात अन त्याचा पाठपुरावा करण्यात सापडले.
याच कालावधीत थोरलीचा विवाह झाला.तिची अन आमची स्वप्ने साकार झाली.
व्यावसाईक दृष्ट्या माझी उत्तरोत्तर प्रगतीच झाली.मराठी माणसाची प्रामाणिकपणाची मूल्ये जोपासली अन त्यांचे चीज झाले.मित्रांकडून्,सहकार्‍यांकडून्,विदेशी दोस्तांकडून्,--अमेरिकन्,जपानी,फ्रेंच --खूप शिकलो अन सारे कुटुंब एका प्रकारे वैश्वीक झाले.
याच वर्षात एक आणखी अनुभुती झाली की स्वांत सुखाय लिहू शकतो.देवाची ही देणगी अशीच एका निसर्ग रम्य पहाटे माझ्या पदरात पडली.
आता हे मित्र,हा निसर्ग,हे मोहक क्षण हातातून निसटून कालाच्या पसार्‍यात विलीन होताहेत.

माझ्या सवंगड्याना,माझ्या घरांना,त्या दरी खोर्‍याना,बर्फाच्छादित हिमालयाला,सरोवरांना अन माझे जीवन समृद्ध केलेल्या उत्तर भारताला सलाम्,सलाम ,सलाम
-बाबा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.. Happy

छान Happy

वत्सला,चिनूक्स्,शैलजा,साया,नीधप्,प्राजक्ता,अल्पना,दिमेशदा,रोहित,शशांक,रैना,आनंदयात्री,मुक्ता,डूआय,मवा,रुनी,प्राची,यो रॉक्स्,नताशा,प्रज्ञा
सर्वांचे मनःपूर्वक आभार
रैना:या सर्व स्वर्गीय आनंदाचे धनी आहेत माझे प्रिय मित्र अन कुटुंबिय.आम्ही तिथे गेलो तेंव्हा अम्हाला हिंदी धड येत नव्हते.अनुभव नव्हता एवढ्या दूर यायचा.पण मनात समाधान होते कारण नाविन्य नेहेमीच आकर्षित करायचे अन नवीन शिकायला,पहायला खूप आवडायचे.तुमची पिढी ही खूप हुशार अन स्रुजनशील आहे.बालकाच्या कुतुहलाने जग पहा अन पैला मी पैला मी करा-तेच यशाचे साधन ठरेल. ऑल द बेस्ट Happy

रेव्यू.... सुंदर.
तुमच्या लेखातलं सगळं पोचलच पण तुमच्या एका प्रतिसादातलं अधिकच....
<<बालकाच्या कुतुहलाने जग पहा अन पैला मी पैला मी करा-तेच यशाचे साधन ठरेल>>

आज वाचताना पुनः आठवणी उमाळून आल्या. माझ्या त्या मित्रातील एक तारा अचानक निखळला,अनंतात विलीन झाला. तो भार, ते दु:ख साहवत नाही.

Pages