रंगमुद्रा - माधव वझे. (राजहंस प्रकाशन - सप्टेंबर २००८)

Submitted by Chitra Rajendra... on 9 October, 2012 - 00:05

रंगमुद्रा - माधव वझे.....

कोणताही कलाकार सर्वप्रथम भेटतो त्याच्या कलाविष्कारातून. तो आविष्कार आवडला की त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आपण प्रयत्न करतो. यथावकाश त्या कलाकाराच्या प्रेमात पडतो. आणि मग एक वेळ अशी येते की त्याच्या वैयक्तिकतेत शिरण्याचा मोह होतो, त्याचं खाजगी आयुष्य कसं आहे ह्याविषयी कुतूहल जागं होतं. ह्या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम प्रसारमाध्यमं इमानेइतबारे करत असतात. वृत्तपत्रांचे रकाने, पुरवण्या भरत असतात, दूरदरर्शनचे टीआरपी वाढतात, टाईम-स्लॉट कामी येतात. हल्ली तर फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कमुळे कलाकारांच्या ‘फ्रेण्ड्स-लिस्ट्स’ भरलेल्या असतात. आणि कित्येकदा आपली ‘फ्रेण्डशिप’ रिक्वेस्टदेखील अ‍ॅक्सेप्ट होत नाही.

जातिवंत कलाकार मात्र जाणीवपूर्वक ह्या सार्‍या झगमगाटापासून दूर असतात. त्यांच्या कलेवरील निष्ठेमुळे ते त्यांच्या कलाविष्कारात, तो जास्ती जास्त चांगला कसा होईल ह्यात मग्न असतात.

नाट्य-अभिनय हेच आपले जीवितध्येय मानलेल्या अशा १५ कलावंतांविषयी जाणून घेण्याची संधी मिळते ‘रंगमुद्रा’ ह्या पुस्तकामुळे. माधव वझे ह्यांनी ‘साप्ताहिक सकाळ’च्या दिवाळी अंकासाठी घेतलेल्या मुलाखती एकत्रितपणे वाचायला मिळतात.
गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शहा, बी. व्ही. कारंथ, सत्यदेव दुबे ह्यासारख्यांचा कला-प्रवास कसा झाला? हे समजून घेण्यासाठी ‘रंगमुद्रा’.

कोणाचेही चरित्र/आत्मचरित्र वाचताना त्याच्या सत्यतेविषयी मनात साशंकता निर्माण होऊ शकते, त्या कलाकाराच्या लिखाणात एकांगीपणा जाणवू शकतो. पण निव्वळ त्यांच्या कलेच्या संदर्भातील ह्या मुलाखती वाचताना मनात शंका निर्माण होण्याला फारसा वाव मिळतोच असं नाही. कारण त्यात मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात बोलता झालेला कलाकार आपल्याला भेटतो. प्रश्न-उत्तर अशा फॉर्ममधील हे सगळे लेख असल्याने कलाकाराबरोबर मुलाखतकाराचीदेखील ओळख होते.

शाळकरी वयात पारायणे केलेल्या ‘श्यामची आई’ पुस्तकातील ‘श्याम’ म्हणजे माधव वझे म्हणजे एक बालकलाकार’ एवढीच ओळख आजवर मनात कायम होती. ‘तो’ श्याम जेवढा आवडला होता तितकाच ह्या पुस्तकातून भेटलेला त्यांच्यातील मुलाखतकारसुध्दा आवडला. मुलाखतींचे काम एक प्रोजेक्ट म्हणून करायचे ठरवल्यावर त्यांनी सर्वांत आधी स्वत:ला विचारले, ‘तयार आहेस?’ आणि जेव्हा ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळाले तेव्हा पुढच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. प्रत्येक कलाकारासाठी ४०-५०-६० प्रश्नांची प्रश्नावली तयार केली. प्रश्नावली तयार करण्यासाठी आधी मनात प्रश्न निर्माण होणे आवश्यक! प्रत्येक कलाकाराविषयी, त्याच्या कलाप्रकाराविषयी, त्याच्या कलाविष्काराविषयी पुरेसा अभ्यास असेल तरच हे शक्य. तर असे अभ्यासू वृत्तीचे माधव वझे ह्यात भेटतात.

प्रत्येक मुलाखतीच्या सुरुवातीला त्यांनी त्या-त्या कलाकाराशी साधलेल्या संपर्काविषयी, त्याच्या प्रतिसादाविषयी थोडक्यात आणि रंजक माहिती दिली आहे. सर्व कलाकारांनी तयारी करून, मनापासून उत्तरे दिली. बोलण्याच्या ओघात नवीन प्रश्न निर्माण झाले त्याचीही सविस्तर उत्तरे दिली. नासिरुद्दिनने एकामागोमाग एक उत्तरे नीट लक्षात ठेवून दिली. विजया मेहतादेखील ते प्रश्न समोर ठेवून बोलल्या त्यामुळे त्यातील काही प्रश्नांवर केलेली प्रश्नचिन्हे, मारलेल्या फुल्या हे मुलाखतकाराला नजरेस आले.

प्रत्येक कलाकाराने स्वत:ला जाणीवपूर्वक कसे घडवत नेले ह्याच्या बरोबरीने अभिनय कलेविषयी (जसं की रंगमच, रंगमंचावरील एकट्याचा आणि सहकलाकारांबरोबर केलेला वावर, संवादफेक, टायमिंग) सविस्तर माहिती मिळते.

ही साधी माणसं नटनटी म्हणून कसे तयार होत गेले? कुणाच्या बाबतीत हे खूप लहान वयात ठरवून झाले तर कुणाच्या बाबतीत नकळत. सुलभा देशपांडे- कामेरकर भगिनी, गिरीश कर्नाड, भास्कर चंदावरकर ह्यांना पोषक वातावरण घरात मिळाले.
नसिरुद्दिनना- शाळेतील शिक्षक आणि वडिलांचा धाक ह्या विरुध्द गोष्टींनी घडवले. नासिरुद्दिन शहा- शाळेच्या वर्गातील शेवटच्या बाकावरील अबोल मुलगा ‘झिरो’ ते ‘हिरो’.
एकदा ध्येयनिश्चिती झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला समृध्द करत नेणे. (सुहास जोशी- वाचनाचा फायदा आपण साकरणार ती व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी होतो हे लक्षात आले. आणि वाचन वाढवत नेले.) (सुलभा देशपांडे - रंगमचावर वावरताना भूमिकेत समरस होणे आणि रंगमंचीय शिस्तीचे भान राखणे )

पूर्वी दूरदर्शनवर ‘मुखवटे आणि चेहरे’ ह्या नावाचा कार्यक्रम होत असे. तो नव्याने सुरू झाला तेव्हा त्याचं खूप अप्रूप वाटायचं. आता ती नवलाई संपली. पण ‘मुखवटा’ चढवण्यासाठी ‘चेहर्‍या’ने घेतलेली मेहनत ह्या पुस्तकात वाचायला मिळते व कलाकाराला त्याच्या कलेच्या माध्यामातून थेट भेटल्याचे समाधानदेखील...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलं आहेस चित्रा.
>>भेट म्हणून द्यायला चांगलं वाटतं आहे. > लले, मला चालेल हो भेट म्हणून Wink

त्यांचे काही लेख मी वाचले होते. उत्तम लिहितात. हे पुस्तक पण वाचायला हवे.
त्यांनी नंतर काही भुमिका केल्याचे आठवत नाही, गोनिदांच्या, पडघवली कादंबरीवर आधारीत एक हिंदी मालिका
होती, त्यात त्यांची भुमिका होती.

( १९९० /९१ सालची मालिका होती. त्यात ते, सुमन धर्माधिकारी , रोहीणी हत्तंगडी, स्मिता जयकर, विक्रम गोखले, अनंत जोग.. असे बरेच कलाकार होते, असे अंधुक आठवतेय. )