डॉन

Submitted by Mandar Katre on 7 October, 2012 - 01:45

डॉन

दुबईच्या आलिशान हॉटेलच्या स्विमिंग पुलाच्या कठड्या वर बसून सिगारेट चे झुरके घेत तो बसला होता .संध्याकाळचा लालभडक सूर्य जसजसा अस्ताला जात होता ,तसतसा त्याला आपला २५ वर्षापूर्वीचा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर दिसू लागला .....

हैदराबाद मधल्या झोपडपट्टीतील ती छोटीशी खोली .पप्पा आणि मम्मी दिवसभर कामाच्या शोधात दिवसभर वणवण भटकत होते ,घरात दोन वेळच्या जेवणाची सुद्धा मुश्कील होती .तो आणि छोटी बहिण सुरीली तिथेच मातीच्या ढिगार्यात खेळत होते .तेवढ्यात तिथे एक गाडी आली .गाडीतून ३-४ माणसे उतरली आणि त्यातल्या एका गॉगलवाल्याने त्याला एक चॉकलेट दिले .दिवसभर भुकेला असल्याने त्याने पटकन ते खाल्लेही .सुरीलीलाही एक चॉकलेट देवून ते सगळे गाडीत बसले ..............एवढेच ! त्यापुढचे काहीच आठवेना ! त्यानंतर त्याला जाग आली तेव्हा तो एका मोठ्या बंद खोलीत होता. आजूबाजूला त्याच्याच वयाची १५-२० मुले .

बराच वेळ तो तसाच बसून होता,हळूहळू इतर मुलेही गाढ झोपेतून जागी व्हावीत तशी जागी झाली .कुणालाच कळत नव्हते काय चाललेय? सगळी रडारड सुरु झाली.पप्पा-मम्मी कुठे आहेत? सुरीली कुठाय? मी इकडे कसा आलो? माझे घर कुठे आहे? इत्यादी अनेक प्रश्न त्याच्या कोवळ्या मनात गर्दी करू लागले .मग त्याने इतर मुलांशी बोलायचा प्रयत्न केला,पण त्यांच्या भाषा निराळ्या होत्या .कोणी तेलगु,कुणी कन्नड ,कुणी केरळी,तर कुणी हिंदी,त्याला तर फक्त तेलगु येत होती.पण मग इतरांशी तोडक्या-मोडक्या हिंदीत संभाषण सुरु झाले.कुणालाच कळत नव्हते आपण इथे कसे आणि का आलो?पण गॉगलवाला आणि इतर चार माणसे ,गाडी-चॉकलेटची गोष्ट मात्र सगळ्याच मुलांची सारखी होती................

थोड्या वेळाने खोलीचे दार उघडले .आणि तो गॉगलवाला आणि बाकीची चारजण आत आले .गॉगलवाल्याचे नाव लाल्या होते,हे त्यांच्या बोलण्यावरून समजले .मुले रडू लागली तशी लाल्या सगळ्यांना दटावून म्हणाला ,”ए रोनेका नही, अब आजके बाद अपने मा-बाप को भूल जाव .घर वापस नही भेजुंगा किसीको.आजसे आपुन सब लोग दुसरी जगह जानेवाला है...उधर खाना-पिना अच्छा मिलेगा,कपडा भी मिलेगा और पैसा भी .मगर घर नही वापस जानेका...किसीने भागनेकी कोशिश की तो जानसे मार दुंगा! समझा क्या?”लाल्याने सगळ्यांना धमकावून गप्प केलं आणि सर्वाना खायला पण दिलं. लाल्या मग दुसर्या साथीदाराला म्हणाला,”इन सबकी फोटो खिन्चो,और बबलू भाय को बोलना पासपोर्ट का काम जल्दी से जल्दी होना मंगता है”.

असेच २०-२५ दिवस गेले .अन एका दिवशी भल्या पहाटे सगळ्यांना उठवून जबरदस्तीने आंघोळ घालून नवीन कपडे घालण्यात आले. आणि मोठ्या बस मध्ये कोंबून विमानतळावर नेण्यात आले. सोबत लाल्या आणि बबलू होताच. विमानतळावरील अधिकाऱ्यांना बबलूने पैशाने भरलेले एक जाडजूड पाकीट दिले आणि मग हे सगळी वरात दुबईच्या विमानात स्थानापन्न झाली.गेल्या १५-२० दिवसापासून नक्की काय चाललेय हे त्या कोवळ्या मुलांपैकी कुणालाही कळत नव्हते.फक्त आपण आपले घर,आई-बाबा यांच्यापासून दूर कुठेतरी चाललोय ,एवढेच कळत होते.घराची आणि मित्रांची आठवण येवून सारखे रडायला यायचे,पण लाल्याने दिलेला दम आठवून मुले कशीतरी गप्प बसायची. “तो” मात्र सुरुवातीपासून सतर्क होता .मुले पळवणार्या टोळी बद्दल त्याने आई-बाबांच्या बोलण्यात मागे कधी तरी काहीतरी ऐकल्याचे त्याला अंधुकसे आठवत होते .आपल अपहरण होत आहे ,हे जाणवत होते,पण त्याच्या हातात करण्यासारखे काहीच नव्हते .लाल्या आणि बबलू बद्दल प्रचंड राग मात्र त्याच्या मनात धुमसत होता.विमानात बसायला मिळाले म्हणून काही मुले खुश होती ,पण तो मात्र उदास अन दु:खी होता .दुबईच्या विमानतळावर विमान उतरले ,आणि त्याने लाल्या,बबलू आणि इतर मुलांसोबत दुबईत पहिले पाउल टाकले .पुन्हा कधीही न परतण्यासाठी!

दुबईत पोहोचल्यावर त्या सर्वाना एक मोठ्या बंगल्यात नेण्यात आले. तिथे सगळे काही होते ,बाहेर प्रचंड उन आणि उष्णता असूनही घरात मात्र थंडगार होते . मुलांना जेवण आणि आईस-क्रीम मिळाले ,सगळ्यांना नवीन कपडेही मिळाले .संध्याकाळी एक अरबी पोशाख केलेली व्यक्ती एका मोठ्या कारमधून आली,आणि सगळ्या मुलांना घेवून लाल्या आणि बबलू त्या व्यक्तीबरोबर गेले. लाल्या मुलांना म्हणाला, ”चलो आज तुम्हारा प्राक्टिस है” एक फार मोठे विस्तीर्ण मैदान होते,मैदान कसले? वाळवंटच तो..........मग उंट आले,आणि “त्या”च्या सकट सगळ्या मुलांना उंटावर बसवण्यात आले. मुलांचे हातपाय आणि पाठीला बेल्ट लावण्यात आले ,आणि मग उंटाना इशारा करताच उंट भरवेगाने धावू लागले.

तो प्रचंड घाबरला, बाकी मुलेही रडू लागली,जशीजशी मुले रडू लागली तसे उंट अधिक जोरात पळू लागले. ”व्वा व्वा बहोत खूब” तो अरब आणि लाल्या आनंदित होवून टाळ्या वाजवू लागले. “त्या’ची पाठ सोलून निघाली,हातपाय प्रचंड दुखू लागले .मरणप्राय वेदना सहन करत तो तसाच उंटावर बसून होता, आपण रडलो,तर उंट आणखी जोरात पळतात,हे त्याच्या लक्षात आले. काही वेळाने उंट थांबले ,आणि मग सर्वाना खाली उतरवण्यात आले. लाल्या म्हणाला, “आजसे यही तुम्हारा काम है बच्चो, उंटकी रेस मी तुम बच्चालोग की बहोत जरुरत रहती है,जितना ज्यादा रोनाधोना और चील्लाना ,उतानाही उंट जोरसे भागेगा,याद रखो,जिसका उंट पहला आयेगा ,उसको इनाम भी मिलेगा “

तो आणि इतर मुले पुन्हा बंगल्यावर आली, सगळेजण श्रम आणि वेदना यामुळे गलितगात्र झालेले होते, जेवणसुद्धा न घेता सगळे तसेच झोपी गेले . सकाळी जाग आली ती लाल्याच्या आवाजाने, “चलो बच्चो,कामपर जाणा है कि नही? चलो चलो जल्दी करो.”मुले तयार होईनात .”हमको नही चाहिये ऐसा काम,मेरा पुरा बदन दुख रहा है”तो म्हणाला .तसा लाल्याने त्याच्या एक सणसणीत कानफटीत लगावली ,तो दाणकन जमिनीवर आपटला.”साला तेरेको हजारो रुपिया खर्च करके लाया वो क्या इधर खाना खिलाने के वास्ते? चुपचाप कामपे चल,नही तो इधर ही गाड दुंगा”

आपल्या असहाय्यतेची जाणीव होवून तो हतबल झाला ,नाईलाजाने सगळी मुले पुन्हा मैदानावर .आज तर भर उन्हात शर्यतीची तयारी होती. ३ तास सतत उन्हात उंटावरून रपेट झाली ,काही मुले तर उंटावर बसल्या बसल्याच बेशुद्ध पडली. मग बंगल्यात आल्यावर त्यांच्यावर डॉक्टरने उपचार केले.दुसर्या दिवशी पुन्हा तोच प्रकार ,आज त्याच्यासोबत आणखीही २-३ जण कामावर जायला तयार नव्हते,मग लाल्या आणि बबलूने त्यांना तुडव-तुडव तुडवले. मग पुन्हा सगळेजण मैदानावर ,आणि पुन्हा शर्यतीचा सराव ,आज तर चांगले ५ तास...............

अनेक मुले आजारी पडली,पण कुणाचीही या शर्यतीच्या नरकवासातून सुटका नव्हती.”बच्चा बीमार होगा तो और ज्यादा रोएगा ,सबको ले जाव”लाल्या बबलूला म्हणाला......आणि त्या दिवशी मात्र त्याच्या संयमाचा बांध फुटला , कारणही तसेच घडले ,अतिश्रम,वेदना आणि आजार यामुळे त्यांच्याबरोबर आलेला एक मुलगा उंटावरच बेशुद्ध पडला आणि बेल्ट सैल असल्याने खाली पडला .कोणालाही काही कळायच्या आतच तो मुलगा जग सोडून निघून गेला .प्रचंड दु:ख आणि संतापाने धुमसत “तो” बंगल्यावर आला ,काहीही होवूदे,या नराधमांना शिक्षा ही करायचीच! असे त्याने मनोमन ठरवले............

शेवटी शर्यतीचा दिवस आला .भर उन्हात सुमारे तीन तास शर्यत चालली ,त्याचाच उंट पहिला आला . अरब,बबलू आणि लाल्याने जल्लोष केला .त्याला चक्क १०००/- रुपये इनाम म्हणून दिले .पण तो मनातून आनंदी नव्हता, आपलं हरवलेलं बालपण, मित्र आणि आईबाबा ना हिरावणारी ,बालपण अमानुषपणे कुस्करणारी हीच ती नराधम नीच माणसे आहेत,हे तो विसरला नव्हता.

पुढे मग आणखी शर्यती होऊ लागल्या ,त्याला चांगले कपडे, खाणे-पिणे मिळायचे,इनामही मिळायचे ....दिवस जात होते ,तो शर्यती जिंकत होता..........आणि ती चौकडी त्यांच्या जीवावर लाखो रुपये जिकत होते ....होता होता ६ वर्षाचा काळ लोटला ,तो आता १४ वर्षांचा झाला .एक दिवस त्याने लाल्या आणि बबलूचे बोलणे चोरून ऐकले,”अब ये बच्चे बडे हो गये है,किसी काम के नही.अब दुसरा बच्चा लाना पडेगा.”

त्याने ठरवलेली वेळ जवळ आली होती .इनामाचे जे पैसे मिळायचे ,त्यातून १५-२० हजार रुपये त्याने साठवले होते. दुबईत मुंबईतला एक माणूस त्याच्या चांगल्या ओळखीचा झाला होता ,त्याच्याकडून १५ हजाराला त्याने पिस्तुल विकत घेतले .आणि एका रात्री लाल्या नी बबलू दारू पिवून झोपलेले असताना दोघांचा खात्मा केला .

आता मात्र तो घाबरला ,जायचे तरी कुठे? आणि खून उघडकीला आला तर? इतक्या लहान वयात भोगलेले अपरिमित दु:ख आणि आता तर चक्क खून! त्याचे मन मेले होते ...........

मग मुंबईच्या दोस्ताने त्याला त्यांच्या टोळीत सामील करून घेतले. त्यांची टोळी दुबईतून मुंबईत ड्रग आणि सोने स्मगल करायची .............

हळूहळू आपले बालपण,दु:ख ,संघर्ष सगळे विसरून तो चक्क एक स्मगलर बनला ......................

आणि काही वर्षांनी त्या टोळीचा प्रमुख................................डॉन!

(१९८० ते ९० च्या दशकात भारतातील मुले पळवून उंटाच्या शर्यतीसाठी अरबी देशात नेली जायची ,तिथे त्यांचे अनन्वित हाल व्हायचे ,या सत्य घटनेवर आधारित कथा लिहिण्याचे गेली १० वर्षे मनात घोळत होते. तसा मी नवीनच कथालेखन करीत आहे, त्यामुळे बर्याच चुका आहेत ,वाचकांनी कृपया आपल्या सूचना व अभिप्राय द्यावेत ,ज्यायोगे ही कथा अधिक जिवंत/परिपूर्ण होईल. धन्यवाद...मंदार कात्रे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा .उत्तम.तुम्ही ८० च्या दशकातील एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नाला हात घातलात त्याबद्दल धन्यवाद ,अशा घटनांचे केंद्रस्थान हैदराबाद हेच होते,माझ्या आठवणीप्रमाणे .

बस, एवढच!
एकदा जराशी मोठी झाली ही मुलं की मग दुसर्‍या एका अनैतिक गोष्टींसाठी त्यांचा वापर होत असे.
ते तर अजुनच भयंकर.

सातीजी ते सगळे मांडायचे म्हणजे कादंबरी लिहायला हवी .........बघूया ,विचार आहेच...तुमची सूचना लक्षात ठेवींन .धन्यवाद .

मस्त