कसं होतं ना, बर्याच वेळा आपली अवस्था 'देता किती घेशील दो कराने' अशी होवून जाते. म्हणजे बघा ना, मी म्हणतो मी लताबाईंच्या आवाजाचा भक्त आहे, तेवढ्यात मला जाणवतं की अरे याला बाळासाहेबांचं संगीत आहे जी आपल्यासाठी नेहमीच एक पर्वणी वाटत आलेली आहे, त्या संगीतात रमतोय न रमतोय तोवर लक्षात येतं की अरे हे आपल्या आवडत्या कविचे शब्द आहेत. आपण नकळत त्या शब्दात गुरफटायला लागतो आणि तेवढ्यात डोळ्यासमोर उभा राहतो तो जिवंत, नैसर्गिक अभिनयाचा मुर्तीमंत आविष्कार साक्षात स्मिता पाटील, जरा कुठे स्मिताच्या डोळ्यात हरवून जायला बघावं तर मागे स्क्रीनवरची लिंगोबाची हिरवीगार झाडी, निसर्गाचं ते मनोहारी, नयनरम्य दृष्य खुणावू लागते. अरे माझी झोळी एवढी मोठी नाहीये रे परमेश्वरा. तू देता है तो छप्पर फाडके देता है ये तो सुना था, पण सगळ्या जाणिवांना भेदूनही असं काही हवंहवंसं देवून जातोस हे पहिल्यांदाच अनुभवतोय. मग अलगद मन हळू हळु मागे जायला लागतं. 'जैत रे जैत' बद्दल संबंधित दिग्गज कलावंतांकडून ऐकलेल्या, वाचलेल्या अनेक गोष्टी डोळ्यासमोर फेर धरायला लागतात.
चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी या चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेबद्दल सांगताना सांगितलं होतं...
काही दिवसांनी बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘तुम्ही गो. नी. दांडेकरांची ‘जैत रे जैत’ ही कादंबरी वाचली आहे काय? नसल्यास जरूर वाचा. त्या कथानकात संगीताला उत्तम वाव मिळेल असं मला वाटतं. हवं तर आपण अप्पासाहेब दांडेकरांशी बोलू या.’
जब्बारसाहेबांनी कादंबरी वाचली. त्यांना ती आवडलीही कारण त्या कथेत चित्रपटाच्या दृष्टीने प्रचंड असं रॉ मटेरीयल होतं. पण डॉक्टरांना ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती. जब्बारसाहेब हे मुळचे नाटकवाले, त्यामुळे 'जैत रे जैत' ही चित्रपटरुपात आणताना कथानकाचा मुळ फॉर्म बदलायचा असं त्यांनी ठरवलं. त्या आधी डॉक्टरांनी घाशीराम कोतवाल, तीन पैशाचा तमाशा यासारखी संगीतिका म्हणता येतील अशी नाटके केलेली होती. तो अनुभव लक्षात घेवुन, कदाचित त्यामुळेच 'जैत रे जैत' या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. ‘जैत रे जैत’ ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला. मंगेशकर कुटुंबियांनाही ही कल्पना आवडली आणि सर्वानुमते पटकथेवर काम करायला सुरुवात झाली.
चित्रपट जर संगीतिकेच्या रुपात बनवायचा असेल तर त्यात मोठ्या संख्येने गाणी असणं हे अत्यावष्यक होतं. बरीच नावे चाळून झाल्यावर शेवटी गीतलेखनासाठी निसर्गकवि ना. धों. महानोर यांचं नाव पक्कं झालं. एकेक गाण्यावर विचार सुरु झाला. या प्रक्रियेवर बोलताना एका ठिकाणी जब्बारसाहेबांनी सांगितलं होतं...
" त्या नंतर महानोर आणि बाळासाहेबांसोबत बैठका सुरू झाल्या. ‘प्रभुकुंज’मधल्या छोटय़ाशा खोलीत बाळासाहेब हार्मोनिअम घेऊन बसायचे. महानोर झराझरा गाणी लिहून द्यायचे. बाळासाहेब गाण्याच्या ओळीवर विचार करत डोळे मिटून बसलेयत.. मधूनच त्यांची बोटं हार्मोनिअमवर फिरतायत आणि एकेक चाल ते गुणगुणतायत.. अधूनमधून दीदी, उषाताई याही लक्षपूर्वक ऐकतायत.. चहाचे कप, खाण्याचे पदार्थ यांच्या साथीनं तासनतास कसे निघून जातायत हे कळत नाही. मधूनच बाळासाहेबांनी दुसऱ्या एखाद्या अल्बमसाठी केलेल्या चाली ऐकविल्या की मला हेवा वाटायचा आणि ती चाल आपल्याला वापरता येईल का, असं मी विचारायचो. पण बाळासाहेबांचं उत्तर असे, ‘नाही नाही, तुम्हाला या चालींवर मी तुम्हाला डल्ला मारू देणार नाही.’ तरीदेखील एक चाल मी अक्षरश: ‘ढापली’च. दीदींसाठी केलेल्या ‘मी रात टाकली’ या गाण्यात एक कोरसचा तुकडा आहे, ‘हिरव्या पानात, हिरव्या पानात..’ ही चाल बाळासाहेबांनी दुसऱ्या एका अल्बमसाठी राखून ठेवली होती, पण ती या गाण्यात वापरावी असा हट्टच मी धरला. अखेर ते राजी झाले. "
'मी रात टाकली' हे गाणं जर नीट ऐकलं असेल तर त्या कोरसची जादु तुम्हालाही नक्कीच जाणवली असेल. हे गाणं ऐकता ऐकता आपण नकळत त्या सुरात, स्मिताच्या त्या गावरान रुपात स्वतःला हरवत जातो आणि मग त्यातल्या एका एका शब्दाची ताकद आपल्याला कळायला लागते. इथे तर पं. हृदयनाथजींच्या हाताशी महानोरांसारखा शब्दप्रभूच होता. काही म्हणा, पण काही काही योग असे जुळूनच यावे लागतात आणि ते जेव्हा जुळून येतात तेव्हा इतिहास घडतो. 'जैत रे जैत' च्या गाण्यांनी असाच इतिहास घडवला. गोनिदांनी जेव्हा ही कादंबरी लिहीली तेव्हा त्यांना वाटले तरी असेल का? की ही कादंबरी पुढची कित्येक दशके चित्रपटाच्या माध्यमातुन रसिकांना विलक्षण आनंद आणि तृप्ततेची जाणिव देत राहणार आहे.
मुळात हा चित्रपट म्हणजे एक छान प्रेमकथा आहे. त्याबरोबरच ती एक सुडकथाही आहे, त्याबरोबरच ती एक सामान्य माणसाच्या जिद्दीचीही कथा आहे. राणीमाशीला नमस्कार केल्यानंतरही ती नाग्याचा डोळा फोडते म्हणून राणीमाशीला उध्वस्त करायच्या जिद्दीने पेटलेला नाग्या, लहानपणी वडीलांनी केवळ पुण्यवंतालाच राणीमाशीचे दर्शन घडते असे सांगितल्यावर 'मला पुण्येवंत व्हायचय' या इच्छेन पछाडलेला नाग्या !
तसेच लग्न करीन तर स्वतःला आवडलेल्या पुरुषाशीच म्हणून जिद्द करणार्या, त्यासाठी ठरलेल्या नवर्याला सोडून येणार्या, राणीमाशीने डोळा फोडल्यावरही कुरुप झालेल्या नाग्यासाठी आपले सर्वस्व शेवटी प्राणही पणाला लावणार्या चिंधीची कथा आहे ! तसं बघायला गेलं तर 'जैत रे जैत' ही केवळ 'नाग्या आणि चिंधी'ची कथा नाहीये, तसं तर ती केवळ लिंगोबाच्या डोंगराच्या कुशीत राहणार्या आदिवासी पाड्याचीही कथा नाहीये आणि तसं पाहायला गेलं तर ती लिंगोबाच्या डोंगरावर सापडणार्या प्रत्येक दगडाचीही कथा आहे. Line between the scenes हा प्रकार डॉक्टरांनी खुप समर्थपणे हाताळलेला दिसून येतो या चित्रपटात.
'नाग्या' हा लाक्षणिक अर्थाने चित्रपटाचा नायक आहे. पण नाग्याचं पात्र म्हणजे केवळ सुडाने पछाडलेला एक नायक एवढ्याच भावनेपुरतं मर्यादित नाहीये.
मुळात नाग्याच्या मनाची, त्याच्या विचारांची जडणघडण पाहिली तर तो केवळ आपण वर्षानुवर्षे जिची पुजा करत आलोय, जिचा आदर करत आलोय त्याच राणीमाशीने आपला डोळा फोडला म्हणून तिचा सुड घ्यायला निघतो, त्यासाठी प्राणांची बाजी लावतो हे अजिबातच पटत नाही. "मला पुण्येवंत व्हायचय' या भावनेने पछाडलेला असतानाही आपल्या पाड्यावर पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार उंदीर पकडून खायची, उंदीर हेच आपलं अन्न मानायची विचित्र परंपरा तो नाकारतो. त्यासाठी सगळ्या पाड्याचा विरोधही सहन करतो. तो नाग्या असल्या सुडाच्या भ्रामक कल्पनेच्या आहारी जाईलच कसा. इथे राणीमाशी हे परंपरेने लादल्या गेलेल्या जाचक रिती-रिवाजांचे, समाजाच्या मुर्ख अंधश्रद्धांचे प्रतीक आहे. भोळेभाबडे 'ठाकर' राणीमाशीला मनापासुन मानतात. तिला डिवचल्यास आपल्यावर लिंगोबाचा कोप होइल या भीतीने कोणीही राणीमाशीच्या पोळ्याला धक्का लावायला जात नाही. पण 'नाग्या' राणीमाशीचं हे पोळंच (पर्यायाने चुकीच्या रुढी-परंपरा) उध्वस्त करायचं ठरवतो. इथे जब्बारसाहेबांनी 'नाग्या'ला दिलेली भुमिकाही त्याच्या विचारसरणीचंच प्रतिक आहे. नाग्या पाड्याचा 'ढोलिया' आहे. पाड्यासाठी तो 'देवाचा माणुस' आहे.
पण नाग्या आपल्या ढोलाचा वापर जुनाट रुढी-परंपरांच्या विरुद्ध यल्गार पुकारण्यासाठी करतो. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या आपल्या पाड्यावरील अडाणी, अंधश्रद्ध लोकांना जागे करण्यासाठी करतो. गंमत म्हणजे हे सगळे करत असताना तो कुठेही समाज सुधारकाच्या, क्रांतिकारकांच्या भुमिकेत दिसत नाही. कारण आपण काहीतरी वेगळं करतोय ही भावनाच मुळी नाग्याच्या वर्तणुकीतही जाणवत नाही, ते त्याच्या गावीही नाहीये आणि पहिल्या वेळी चित्रपट पाहताना आपल्यालाही हे सहजपणे लक्षात येत नाही. हे यश गोनिदांच्या समर्थ लेखणीचं म्हणायचं की डॉक्टर जब्बार पटेलांच्या दिग्दर्शन कौशल्याचं म्हणायचं ?
'नाग्या'नंतर दुसरं महत्त्वाचं पात्र आहे, ते म्हणजे 'चिंधी'चं.
मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली
लताबाई बेधुंद करत गात असतात. आपल्या डोळ्यासमोर असते चिंधी. मुक्त आणि मनस्वी स्त्रीचा एक मुर्तीमंत आविष्कार. 'मला आवडेल त्या पुरुषांचीच होणार' अशी ठामपणे सांगणारी चिंधी. आपल्या नवर्याला सोडून आपल्या प्रियकराच्या शोधात निघालीय. आपला भुतकाळ तीने मागेच कुठेतरी सोडून दिलाय. जो कधी आपला वाटलाच नाही, त्या मोडक्या संसाराबद्दलची आसक्ती, लाज कधीच सोडून दिलीय. जुनाट झालेली कात टाकून देवून नागीण जशी नव्या रसरशीतपणाने पुढचे आयुष्य जगायला सिद्ध होते तशी तिने आपली जुनी जिनगानी त्यागून टाकलीय. तिला जगाची फिकर नाही, तथाकथित रुढी परंपराची चाड नाही. या क्षणी ती फक्त एक प्रिया आहे, आपल्या प्रियकराकडे मिलनाची मागणी करणारी एक प्रेमवेडी प्रेयसी. ती बंडखोर आहे, क्वचित उद्धटही आहे पण अविचारी नाही. आपल्याला काय हवय ते तिला पक्कं ठाऊक आहे. ते मिळवण्यासाठी काय करायला हवं हेही तिला पक्कं माहीत आहे. ती ते करतेही. आजच्या युगात सगळीकडे स्त्री-मुक्तीच्या संकल्पनेला बळकटी लाभत असताना, त्या काळी १९७७ साली म्हणजे जवळ जवळ ३५ वर्षापुर्वी आलेल्या या चित्रपटातही 'चिंधी' आजच्या स्वतंत्र विचारसरणीच्या, मुक्त स्त्रीचं मुर्तीमंत प्रतीक बनुन डोळ्यात ठसते. पण हे आपल्यासमोर ठसवतानाच जब्बारसाहेब चिंधीचं अजुन एक मोहक रुप आपल्यासमोर आणतात.
ती बंडखोर असली तरी तिच्या तना-मनात, गात्रा-गात्रात तिचा साजण भिनलाय. चिंधी पुर्णपणे नाग्यामय झालीय. स्वतःचे असे काही अस्तित्वच उरलेले नाहीये. गंमत बघा स्वतःच्या नवर्याला, स्वतःच्या संसाराला सोडून येण्याची प्रचंड हिंमत असलेली ही भिंगर भिवरी प्रत्यक्षात मात्र आपल्या प्रियकरासाठी सर्वस्व सोडायला निघालीय. जणु काही त्याची सावलीच बनुन गेलीय. चिंधीचं हेही एक वैशिष्ठ्य आहे. प्रत्यक्षात ती अतिशय स्वतंत्र मनोवृत्तीची, बंडखोर स्वभावाची स्त्री आहे. आपल्या विचारांसाठी, आवडी निवडीसाठी सगळ्या जगाशी झुंजण्याची ताकद तिच्यात आहे. पण हि सगळी ताकद, हे सामर्थ्य तिला तिच्या नाग्यावरच्या प्रेमाने दिलेले आहे. त्याच्या प्रेमासाठीच ती एवढी हट्टी, मनमानी करणारी झाली आणि आता त्याच्याच प्रेमामुळे ती स्वतःला विसरून त्याच्यात सामावून जाऊ पाहतेय. कदाचित त्यामुळेच पोटात बाळ असताना देखील ती तशा अवघडलेल्या अवस्थेत नाग्याच्या 'राणीमाशी'वर सुड उगवण्याच्या कार्यात ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहते एवढेच नव्हे तर स्वत: सहभागी देखील होते. नाग्या राणीमाशीचे घर उध्वस्त करण्यासाठी लिंगोबाच्या डोंगरावर चढाई करत असताना त्याला प्रोत्साहन देण्यासाठी डोंगराखाली ढोल वाजवत उभी राहीलेली गरोदरावस्थेत असलेली 'चिंधी' बघणे हा अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव ठरतो. या युद्धात शेवटी राणीमाशीला पळवून लावण्यात यशस्वी तर होतो, पण त्यामुळे संतप्त झालेल्या माश्या घोंगडी पांघरलेल्या नाग्यावर काही असर होत नाही हे पाहताच, समोर येइल त्यावर हल्ला करत सुटतात आणि त्या हल्ल्याला 'चिंधी' बळी पडते. अंगाला असंख्य मधमाश्या डसत असतानाही बेभान होवुन ढोल वाजवणारी चिंधी बघताना अंगावर काटा उभा राहतो. इथे जब्बारजी मानवी आयुष्यातला विचित्र विरोधाभास दाखवतात. नाग्या राणीमाशीचा पराभव करुन तिला पळवून लावण्यात तर यशस्वी होतो पण ते करताना त्याच्या 'राणी'ला मात्र गमावून बसतो. 'जैत रे जैत' नाग्याच्या विजयाची दुदुंभी वाजवतानाच रुढी-परंपरांशी लढताना सर्व सामान्य माणसाला कराव्या लागणार्या बलिदांनावर, तडजोडींवरही भाष्य करुन जातो.
याचबरोबर नाग्याच्या आई वडीलांच्या भुमिकेत असलेले कै. निळुभाऊ आणि सुलभाताई देशपांडे ही दोन पात्रेही तेवढीच महत्वाची. नाग्याच्या जडणघडणीत या दोघांचाही खास करुन त्याच्या बापाचा जास्त मोलाचा वाटा आहे. राणीमाशीच्या रुपातील रुढी-परंपरांची ओळख करुन देतानाच तो नाग्याला 'ती फक्त पुण्यवंतांनाच दिसते' हे सांगत नितीमत्तेचं महत्वही शिकवून जातो. आधी 'चिंधी'चा राग राग करणारी आणि नंतर एक स्त्री म्हणून तिला पाठिंबा देणारी सुलभाताईंची 'सासु'ही अप्रतिमच !
"जैत रे जैत" मधलं अजुन एक तितकंच महत्त्वाचं पात्र म्हणजेच 'सुत्रधार' ! गंमत म्हणजे इथे एक नाही तर दोन-दोन सुत्रधार आहेत श्रीराम रानडे आणि चंद्रकांत काळे या दोन प्रतिभावंतांनी हा सुत्रधार अगदी समर्थपणे उभा केला आहे. (खरेतर या दोघांबरोबर एक स्त्रीदेखील प्रत्येक वेळी दिसत राहते).
चित्रपटाची पुर्ण कथा या सुत्रधारांच्या तोंडुन आलेल्या पार्श्वगीतांतून पुढे सरकत राहते. अगदी प्रत्येक गाण्यातही हे तिघे अधुन मधुन डोकावत राहतात. एक संगीतिका म्हणुनच चित्रपटाची रचना असल्याने गाणी हा चित्रपटाचा प्राण आहे. मुळातच उषाताई आणि हृदयनाथ मंगेशकर यांची निर्मीती असल्याने सुमधुर संगीत हा चित्रपटाचा स्थायीभाव असणे साहजिकच होते. 'जांभुळ पिकल्या झाडाखाली, डोंगर काठाडी ठाकरवाडी, नभ उतरु आलं, आम्ही ठाकर ठाकर, वाडीवरल्या वाटा अशी वेड लावणारी गाणी हृदयनाथजींनी या चित्रपटासाठी ना.धों. महानोरांकडून लिहून घेतली होती. असं म्हणतात की या चित्रपटासाठी ना.धों. नी एकुण एकोणीस गाणी लिहीली होती. त्यापैकी बारा गाणी हृदयनाथजींनी चित्रपटात वापरली. लतादीदी, आशाबाई, उषाताई, रवींद्र साठे यांच्यासारख्या दिग्गजांनी ही गाणी अशा काही पद्धतीने गायली आहेत की आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची गोडी कायम आहे. आजही ही गाणी तितक्याच आवडीने ऐकली, गायली जातात. आजही महाराष्ट्रात होणार्या प्रत्येक मराठी चित्रपट संगीतावर आधारीत कार्यक्रमात 'जैत रे जैत'चे एक का होइना गाणे असतेच असते. हा महानोरांच्या लेखणीचा आणि हृदयनाथजींच्या सुमधुन, अवीट संगीताचा असर तर आहेच, पण त्याच बरोबर ही गाणी गाऊन अजरामर करणार्या गायकांचा देखील आहे.
'मी रात टाकली' या आजही आवडीने ऐकल्या जाणार्या गाण्याची जादु गेली ३५ वर्षे मराठी रसिकांना रिझवीत आलेली आहे. या गाण्यात आपण लताबाईंच्या सुरात गुंतत जात असताना अचानक कानावर कोरसचे सुर घुमायला लागतात. स्पेलबाऊंड म्हणजे नेमके काय असते त्याचा जिवंत अनुभव देणारी ती जाणिव असते. जैत रे जैत हा संपुर्ण चित्रपट पटेलांनी सुत्रधाराच्या नजरेतुन आपल्यासमोर मांडलाय. हे सुत्रधारच आपल्यालाच नाग्या आणि चिंधीची कथा गाण्यांमधुन सांगत जातात. एखाद्या संगीतीकेसारखी ही कथा आपल्यापुढे उलगडत जाते.
या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा अनुभव सांगताना श्री. रवींद्र साठे यांनी सांगितलं होतं ...
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या चालींचं वैशिष्टय़ म्हणजे ती चाल कितीही अवघड वाटली, तरी गाण्याच्या गाभ्याशी किंवा गाण्याच्या भावाशी कधीच हटकून नसते. पण त्यांनी केलेलं प्रत्येक गाणं हटकेच आहे. मी जैत रे जैत या चित्रपटासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा गायलो. मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशीराम कोतवाल या नाटकात गात असू आणि जब्बार पटेल यांनी आमचं नाव पंडितजींना सुचवलं. मी रात टाकली या गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं त्यावेळी माझं वय २७ वर्ष आणि अनुभवही कमीच. पण ते गाणं झाल्यानंतर खुद्द लतादीदींनी सांगितलं की, खूप दिवसांनी एवढा सुरेल कोरस ऐकला. जैत रे जैत या एका चित्रपटातील गाणी ऐकली, तरी पंडित हृदयनाथांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कल्पना येते.
गंमत बघा हे गाणं अजरामर झालं त्यात लताबाईंचा वाटा सिंहाचा होता. पण त्यांना मात्र कौतुक गाण्यातल्या कोरसचं. ही सगळी मोठी माणसं इतकी साधी, विनम्र कशी काय राहू शकतात बुवा?
१९७७ साली आलेला हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता डॉ. जब्बार पटेलांनी. नाग्याच्या भुमिकेतले डॉ. मोहन आगाशे आणि 'चिंधी'ला अजरामर केलेली 'स्मिता' आजही डोळ्यापुढून हटत नाहीत. आजच्या सरकारी अनुदानाच्या मागे लागलेल्या मराठी निर्मात्यांसाठी, मराठी चित्रपटाचं बजेट खुपच कमी असतं हो अशी सतत कुरकुर करत राहणार्या मराठी निर्मात्यांसाठी फारसे बजेट नसताना, कुठल्याही चकचकाटाचा आधार न घेता निर्माण झालेला 'जैत रे जैत' हे उत्कृष्ट चित्रपट कसा असावा? याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण ठरावे. डॉ. पटेलांसारखा दिग्दर्शक कदाचित मराठी चित्रपट सृष्टीला मिळेलही, डॉ. मोहन आगासे, स्मितासारखे कलावंतही मिळतील, त्या तोडीचे संगीत देणारे संगीतकार आणि गायकही मिळतील पण तरीही उगाचच वाटत राहते की 'जैत रे जैत' सारखी कलाकृती आता पुन्हा होणे नाही.
सर्व छायाचित्रे आंतरजालावरुन साभार.
विशाल कुलकर्णी
सुरेख लिहिलं आहे!!!! खरच
सुरेख लिहिलं आहे!!!! खरच मस्त...
@ विशाल छान लिहिले आहे. आवडले
@ विशाल
छान लिहिले आहे. आवडले .:)
मस्त.. वरवरचाळाला लेख ..
मस्त.. वरवरचाळाला लेख .. निवांत वाचीन चवीचवीने.
विशाल.... काहीश्या वेळाने
विशाल....
काहीश्या वेळाने प्रतिक्रिया लिहितोय. क्षमस्व.
लेख पूर्ण वाचल्यावर का कोण जाणे मला असेच वाटत राहिले की हा लेख मायबोलीने जाहीर केली आहे एक स्पर्धा, तर असू दे आपलीही त्या विषयावरील एक प्रवेशिका....अशा भावनेने लिहिलेला नसून जशी 'बाजिंदी चिंधी' नाग्याचा रक्तात भिनली आहे, तितकाच हा चित्रपटही तुझ्या अंगी भिनला आहे.
मी अनेकवेळा पाहिलेला हा चित्रपट. त्यावेळी एकटी स्मिता आणि काही प्रमाणात निळूभाऊ सोडल्यास सारे चेहरे तसे अनोळखीच होते, पण "ग्रीक ऑपेरा" च्या प्रभावाने पछाडलेल्या डॉ.जब्बार पटेल याना कथेपेक्षाही हवी होती ती पार्श्वभूमी.....चित्रीकरणाला पोषक असा भाग सापडला नसता आणि कुठेतरी शहरीपणाचा थोडासा जरी वास आला असता तर 'जैत....' ची भट्टीच बिघडली असती. त्यामुळे कथानक जितके सशक्त, संगीत जितके पूरक तितकेच महत्व लोकेशन्सला देणे गरजेचे होते....जे डॉक्टर आणि त्यांच्या टीमने करून दाखविले [ही गोष्ट 'महानिर्वाण' च्या सतीश आळेकरांनी कोल्हापूरात शाहू स्मारक भवनातील एका गप्पागोष्टीच्या कार्यक्रमात सांगितली. आळेकरदेखील 'जैत...' च्या जडणघडणीतील एक महत्वाचे नाव होते]. सूत्रधारांची ती जोडी तर अफलातूनच....महानोर फार खूष असतील त्यांच्या तोंडून आपल्या कविता/गाणी ऐकताना.
फार सुंदर लेखन झाले आहे....यापूर्वीही तुम्ही 'चिंधी' वर एक स्वतंत्र लेख लिहिला होता, तरीही हा लेख अगदी नव्याने लिहून तुम्ही सादर केला आहे असेच मला शेवटपर्यंत वाटत राहिले.
श्री.अप्पा दांडेकरांच्याच भाषेत म्हणतो....
"रे विशल्या, तुजा जैत झाला....."
विशाल, लय भारी.. चिंधी हे
विशाल, लय भारी..
चिंधी हे माझं देखील अत्यंत आवडतं पात्र आहे. स्मिता पाटीलने अक्षरशः जिवंत केलय चिंधीला. डॉ.मोहन आगाशेचा नाग्यादेखील तितकाच ताकदवान आहे.
अशोककाका, नंदिनी प्रोत्साहन
अशोककाका, नंदिनी प्रोत्साहन आणि कौतुकाबद्दल मनःपूर्वक आभार !
या चित्रपटावर अजुन खुप लिहीता येइल. खासकरुन यातलं प्रत्येक गाणं हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. पण मग त्यात कदाचित मीच वाहावत जाण्याचा धोका होता. म्हणून तो मोह टाळला
विशाल, फारच सुन्दर
विशाल, फारच सुन्दर लिहिलेस.
परिक्शण वाचताना कितितरी जुन्या आठ्वणी जाग्या झाल्या. धन्यवाद!
(No subject)
मस्त लेख विशाल.. वाचताना अनेक
मस्त लेख विशाल.. वाचताना अनेक किस्से, गप्पा परत आठवल्या.
दोन दिवस लिहू का नको या विचारात आहे. पण लिहितेच. एक मजेशीर किस्सा आहे ...मलाही ३-४ वर्षापूर्वीच समजला हा असाच गप्पांच्या ओघात.
शेवटी 'चिंधी' मरते तेव्हा सूत्रधार तिला हातावर उचलून घेऊन नाग्याकडे घेऊन येतो असा प्रसंग चित्रीत करायचा होता. डोक्यावर रणरणत उन, मरून पडलेली चिंधी आणि सुत्रधारानं तिचं प्रेत उचलून घेतलं...
सूत्रधार सेवादलात असतानापासून लहानगी स्मिता त्याच्या परिचयाची. बोली भाषेत 'अंगाखांद्यावर खेळलेली'. त्याच अंदाजानं, माईंड सेटनी सूत्रधारानं तिला उचलली खरी.. पण इथेच अंदाज चुकला.
एकतर चित्रपटाची नायिका म्हणुन आणि वाढत्या वयामुळे 'वजनदार' झालेली स्मिता, त्यात प्रेतासारखा जडशीळपणा आणलेला अभिनयातून... ह्या सगळ्या कारणांनी सूत्रधारानं स्मिताला उचलून पहिलं पाऊल नाग्याच्या दिशेनं टाकलं आणि चक्क पाय लटपटायला लागले... ती अवघी ४ पावलं कॅमे-याच्या दिशेनं तो चालू शकला नाही.
हळूहळू आपल्याला सावरणं सूत्रधाराला अशक्य होतंय हे स्मिताला कळल्यावर तिनं त्या प्रेतावस्थेत डोळा मारून विचारलं 'काय राम्या, काय होतंय?".... आणि त्या क्षणी सूत्रधाराच्या हातातून चिंधी चक्क खाली पडली.
कितीही तालमीत कमावलेलं शरीर असलं तर चित्रपटाच्या नायिकेला, भले ती प्रेतावस्थेत का असेना, कॅमे-यासमोर उचलुन चार पावलं चालणं किती मुश्कील असतं याचा अनुभव सूत्रधारानी म्हणजे माझ्या वडिलांनी 'जैत रे जैत' च्या शूटींग च्या वेळी घेतला. त्यांच्या 'बहुरंगी बहुढंगी' कार्यक्रमात ते मस्त रंगवून हा किस्सा सांगतात. मी लिहायचा प्रयत्न केलाय
पण मिथुन वरचा लेख पाहुन आशा
पण मिथुन वरचा लेख पाहुन आशा सोडली होती! धन्यवाद! (लिहिल्याबद्दल!) >>>>>> हा हा हा हा (प्रचंड हसणारा बाहुला...)
दोन सुत्रधार आहेत. त्यातील
दोन सुत्रधार आहेत. त्यातील तुमचे वडील कोणते रार?
हे कनेक्शन माहीती नव्हतं.
किस्सा मस्त आहे.
बाय द वे, दोनपैकी एक सुत्रधार सिंहासन सिनेमात आहेत.
तेच ते जे की विधानसभेत चौफेर टोलेबाजी करत भाषण करत आहेत.
दोन सुत्रधार आहेत. त्यातील
दोन सुत्रधार आहेत. त्यातील तुमचे वडील कोणते रार?>>>>
'श्री. श्रीराम रानडे' म्हणजे तुमचे वडील का? तसे असेल तर तुम्ही खरोखरच खुप नशीबवान आहात रार
सुत्रधारांपैकी दुसरी व्यक्ती म्हणजे श्री. चंद्रकांत काळे होते. अगदी घाशीराम कोतवालपासुन ही जोडी एकत्र आहे. ग्रेट
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार
सही!
सही!
धन्यवाद नानबा
धन्यवाद नानबा
जबरदस्त! बहुतेकांच्या
जबरदस्त! बहुतेकांच्या जीवाभावाची कलाकृती आणि त्यावर असा सुंदर लेख... हादेखिल आणखी एक योगच की. मराठी साहित्य-कला क्षेत्रातली उत्तम घराणी या चित्रपटात एकवटली आहेत आणि त्या प्रत्येकाने आपापलं काम कसं अगदी चोख पार पाडलंय.
हळवं करून सोडलंस एकदम. शक्य तितक्या सगळ्या कानाकोपर्यांना स्पर्श केला आहेस.
गाण्यांमध्ये कुठेच डावं-उजवं करता येत नाही तरीही 'वाडीवरल्या वाटा' जरा जास्त प्रिय. चिमुकली आणि गोडुली रचना आहे ती. तशीच 'डोंगर काठाडी ठाकरवाडी' पण. तेवढ्याच दोन-चार ओळीत वाडीची अख्खी पार्श्वभूमी कळते. बहुतेक सगळ्या गाण्यांमध्ये कोरसला मुख्य पार्श्वगायकाइतकेच आणि काही ठिकाणी त्याहीपेक्षा जास्त महत्त्व दिले गेले आहे आणि तो कोरस ऐकताना भारावल्यागत होतं. लताबाई म्हणतात ते खरं आहे, कोरस एकदम सुरेल आणि भारदस्त आहे.
मराठीतल्या एका क्लासिकवर क्लासिक लेख.
कादंबरीवर निघालेले अनेक
कादंबरीवर निघालेले अनेक सिनेमे आहेत खरे पण या सिनेमाची कथा ? ज्यांनी कादंबरी वाचलेली नाही त्यांना विचारा...
ते म्हणतील.. दोन ओळीचीही नाही. म्हणूनच सिंहासन पेक्षा हा "सिनेमा" ग्रेट आहे असं माझं मत आहे. नाग्याची जिद्द तो कसा पूर्ण करतो याचा हा सिनेमा. म्हणूनच पटकथा, लोकेशन्स. पार्श्वसंगीत, संवाद (बोलीभाषेचं खोब्र न करता), अभिनय, पात्रांची निवड, गीत - संगीत हे सगळं सगळं जमून आलेला हा सिनेमा म्हणजे डॉ जब्बार पटेलांची एक कलाकृती आहे. काय पाहीलं रे सिनेमात असा प्रश्न विचारल्यावर कथा झटकन सांगता यायची नाही पण काय अनुभवलंस रे असं विचारलं तर......अंगातून एक वीज खेळत जाते.
शांता शेळले आणि ना धों महाणोर यांच्या दोन कवितांना एकाच गाण्यात बांधण्याचा प्रयोगही पंडितजींनी यात बेमालूम केलाय. असं बरंच काही या सिनेमात आहे जे पाहणा-यालाच अनुभवता येतं.
सांगण्याचा सिनेमा नाहीच हां..
विशल्या...तुझी निवड ग्रेट आणि लेखही ग्रेट !
जिंकलंस लेका !!
सांगण्याचा सिनेमा नाहीच
सांगण्याचा सिनेमा नाहीच हां..>>>
अगदी मनातलं बोललास किरण ! शब्दात बांधण्याजोगा अनुभ नाहीच्चे हा चित्रपट म्हणजे. खरोखर 'वीज खेळत जाते रे अंगातनं'.
<<हळवं करून सोडलंस एकदम. शक्य तितक्या सगळ्या कानाकोपर्यांना स्पर्श केला आहेस. >>
बर्याच गोष्टी राहीलेल्या आहेत सई, उदा. छायाचित्रण, पार्श्वसंगीत ई. पण त्या सगळ्यांवर लिहायला गेलं तर एक पुस्तकच होइल.
मनःपूर्वक आभार तुम्ही दोघांचेही !!
सो मेनी थॅन्क्स विशल्या......
सो मेनी थॅन्क्स विशल्या......
विशाल, होय ! श्रीराम रानडे
विशाल, होय ! श्रीराम रानडे माझे वडील
चित्रपट फारच सही आहे...पण
चित्रपट फारच सही आहे...पण मोहन आगाशे या रोलसाठी सूट होत नाहीत हे तेव्हाही वाटले होते आणि आत्ताही....
गोरापान, स्थूल अंगाचा, पोट सुटलेला नायक हा ज्या अदिवासी पाड्यात राहतो त्यांच्यापासून खूप वेगळा वाटतो...
स्मिता पाटील जशी अस्सल कातकरी वाटते तितकेच मोहन आगाशे मिसफिट वाटत राहतात.
अमितभौ, आशु मेनी मेनी थँक्स
अमितभौ, आशु मेनी मेनी थँक्स
रार
तुमच्या बाबांना सांगा, त्यांनी आणि जैत रे जैतच्या त्यांच्या इतर सहकार्यांनी माझ्यासारख्या कित्येक वेड्यांना आयुष्यभर पुरेल इतका आनंद दिला आहे. मनःपूर्वक आभार त्यांचे
जैत रे जैत म्हणजे अस्सल मराठी
जैत रे जैत म्हणजे अस्सल मराठी मातीतलं संगीत. ही गाणी ऐकताना कायमच त्यात हरवून गेल्यासारखे वाटते. पहिला परिच्छेद तर एकदम कॉपी-पेस्ट आहे.
उत्तम लेख. खूप खूप धन्यवाद विशालदा.
सागर , अरे ती जैत रे जैत
सागर , अरे ती जैत रे जैत म्हणल्यावर मनात उभी राहणारी पहीली भावना आहे ! 'मी रात टाकली' वर लिहीताना जे पहीले भाव मनात आले, ते तसेच हवे होते मला. त्यामुळे ते तसेच्या तसे कॉपी करुन येथे पेस्ट केले. अर्थात तो लेखही माझाच असल्याने कॉपी पेस्टला काही अडचण नसावी. दुसर्या कुणाचे लेखन असते तर गोष्ट वेगळी होती.:)
खरच खुप सुंदर लिव्हलयस
खरच खुप सुंदर लिव्हलयस रे..:)
जैत रे जैत .. म्हणजे मराठी चित्रपटाच एक सोनेरी पान ...
धन्यवाद ..
विक्या, पार्टी लागु, म्हणजे
विक्या, पार्टी लागु, म्हणजे मी देईन तुला
विशालदा, अरे कॉपी पेस्ट
विशालदा,
अरे कॉपी पेस्ट म्हणजे माझ्या मनातले जसेच्या तसे लिहिलेस असे म्हणतोय मी.
चाफ्या, रोहित धन्स रे
चाफ्या, रोहित धन्स रे
चाफ्या, आधीची पण एक पार्टी पेंडींग आहे तुझ्याकडे
सागर, धन्स आणि गैरसमजाबद्दल क्षमस्व
विशाल खुप सुरेख लिहिलेस !
विशाल खुप सुरेख लिहिलेस !
'जैत रे जैत' हा चित्रपट आणि त्यातली गाणी कित्येक वेळा पाहिली तरी प्रत्येक वेळेस नवीनच वाट्तात, प्रत्येक वेळेस नवीनच अर्थ उलगड्तो, कवितेतीतल दोन शब्दांच्या मधे कसा असलेल्या रिकाम्या जागेतहि अर्थ असतो तसा!
धन्यवाद शितल
धन्यवाद शितल
छान झालाय लेख
छान झालाय लेख
Pages