विषय क्र.१- 'दिल्से वासेपूर'

Submitted by ट्यागो on 14 August, 2012 - 17:11

’दूध का कर्ज’ नामक चित्रपट आम्ही थेटरात पाहिलेला पहिला. पहिला म्हणजे अगदी आयुष्यात पहिल्यांदाच. मामासोबत. त्यातला तो ’महान’ सीन चालू असताना अख्खं टॉकीज शिट्ट्या न् गोधंळानं हैदोसलं होतं. पाच-सहा वर्षांचं वय ते, तेव्हा काय कळतंय तसलं काही? पण पब्लिकचा जामच राग आलेला. "हे असले कसले लोक? शांतपणे पहावं की उगीच कशाला बोंबलतायत" असं मामाला विचारायला गेलो तर त्याचा जबडा ’आ’ झालेला. त्याच्या डोळ्यातली हावरी चमक काही वर्षांनी जेव्हा आमच्या डोळ्यांत आली तेव्हा कुठे त्या ’सीन’चे माहात्म्य कळले!

त्यानंतर मग बरेच पिक्चर पहात गेलो. घरच्यांच्या कृपेमुळे ’शोले’ वगैरे रेडिओमुळे आधीच तोंडपाठ झालेला. मग काही वर्षांनी टीव्हीवर त्याचे दर्शन झालेच. त्यावेळी दूरदर्शन दोन चॅनल घेऊन आलेला जवळपास प्रत्येकाच्या घरात. बातम्या, ठराविक वेळेचे कार्यक्रम, गाण्यांचे कार्यक्रम, मालिका, सगळं टाईमटेबल कसं तोंडपाठ. तेव्हा पिक्चरला पण चार-पाच फॅमिल्या एकत्र जायच्या. महाराष्ट्रात अलका कुबलने माहेरच्या साडीतून आणलेला पूर आमच्या गल्लीनं महीनाभर तरी अनुभवला.

मित्रामित्रांत गाण्यांच्या भेंड्या हा आवडीचा खेळ. आमिरचं ’आज ना छोडेंगे तुझे.. दम दमा दम’ कितीही दम लागला तरी बोंबलायचोच. तो ’दिलवाले’ तर कहरच. महाराष्ट्रातल्या कुठल्याही वडापवाल्याकडे, रिक्षावाल्याकडे हि दिलवालेची कॅसेट असतेच. शिवाय ’आशिकी’ अन् ’अल्ताफ़ राजा’ ह्या त्यांच्या खास आवडी. या गाण्यांमधे हाईट म्हणजे ’बेवफ़ा’ चित्रपटातली गाणी. त्यातलं ’आज ही हमने बदले है कपडे, आज ही हम नहाये हुए है’ हे ऑलटाईम फ़ेवरेट! नाहीतरी नव्वदनंतर आलेले बरेचसे डब्बापट संगीतातही बकवासच. पण आमचं लहाणपण मात्र व्यवस्थित गेलं त्याच गाण्यांवर. आजही कधी समवयस्क मित्र जमलो की निव्वळ भंपक गाण्यांच्या भेंड्या जवळपास चार-पाच तास खेळतो ते ह्याच देणगीमुळे! कधी-कधी वाटतं इतका कचरा कसा काय डोक्यात मावू शकतो? पण ज्या जाणिवेनं चांगल्याची आवड वाढत गेली, त्याच नावडीमुळे हा कचराही तसाच असावा.

असंच ९८ च्या सुरवातीलाच ’दिल से’ वरचा लेख वाचलेला पेपरात. हळूहळू गाणीही हिट होत होती. एवढं असुनही पिक्चर आला कधी न गेला कधी कळलं नाही. आमच्याकडच्या एकमेव ’नीलकमल’ थेटरात त्याचा शो झालाच नाही. पिक्चरची गाणी तर तोंडात फ़िट्ट बसलेली. भंगार पिक्चरेय वगैरे रिव्ह्यूज व्हाया माउथ पब्लिसिटी ते पेपर (वृत्तपत्र हो) आमच्या पर्यंत आलेले. त्यामुळे बघायची वगैरे जी हौस होती ती पुरती शमलेली. त्याच दरम्यान मधेच एकदा केबलवाल्यानं रात्रीचा लावला तो पिक्चर. मी अखंड पाहिला तेव्हा मध्यरात्रीपर्यंत जागून. एकही सीन न दवडता. बस्सं; अख्खं बालपण-लहानपण संपलं तिथं. ’सुख हे दु:खातच भेटतं’ वगैरे अर्थाचं काहीतरी डायरीत लिहलेलं आठवतंय तेव्हाचं.

शब्दाचं वजन माहीत असणारा गुलज़ार, संगीताचं प्रचंड ज्ञान असणारा इतकंच नव्हे प्रत्येक गायकाची योग्य लायकी ओळखून असणारा रेहमान. सोनू निगम असो वा सपना अवस्थी किंवा उदित नारायण; हे लोक लायकीचं कुठे गायले असतील तर इथंच! मणिरत्नम बद्दल तर बोलायलाच नको. ’ईशा देओल’ सारखी डंब बाई ’युवा’ चित्रपटात चक्क गोड-गोड दिसते ते मणिरत्नममुळे. याच खुबीचा वापर त्याने ’दिल से’ त केलाय. प्रिती झिंटा कमालीची सुंदर दिसते इथे; अगदी साखरच. शारुकने आयुष्यात कधी उत्कृष्ट अभिनय केला असेल तर इथेच! खरेतर मणिरत्नमचा नेहमीचाच फंडा, मोठे इश्यु घेऊन त्यात एखादी प्रेमकहानी फुलवायची. मग तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचं अन् इश्यूज गेले तेल लावत! खरंतर चुकीचं काहीच नाही त्यात; कारण तो तरी कुठला अंतर्यामी जो असल्या इश्यूजवर सोल्युशन्स शोधणार?

दिल-से पाहून संपला पण ’आवडता चित्रपट’ अन ’आवडतं गाणं’ हे दोन पुरस्कार घेऊन गेली कित्येक वर्षे माझ्यासोबत आहे. ’ऐ अजनबी’ फ़ार आवडीचं. लिहावं तर गुलजारनंच. ती प्रेयसी आहे पण तरीही ’अजनबी-अनोळखी’ ही फ़ारच विलक्षण उपमा वाटली मला त्यावेळी. त्या गाण्याच्या पुढच्या लाईनीही अफ़ाटच पण असो. मराठीच्या रांगडेपणातून हिंदी-उर्दूचा रोमँटिक भाव व्यवस्थित नाही मांडता यायचा. ते गाणं अखंडपणे चित्रपटात दाखवणं मणिरत्नमला शक्यच झालं नाही कि काय असं वाटत राहतं अन मग ते तसंच तुकड्या-तुकड्यांत चित्रपटभर भेटत राहतं! दुसरं आवडलेलं ’दिलसे-रे’ गाणं, त्याची सिनेमॅटोग्रॅफी, रेहमानचा आवाज.. हय हय हय..

चित्रपटाची सुरुवात एकदम झक्कास होते. जाळ्यांवर लटकणारा, थंडीनं कुडकुडणारा बल्ब, चेकपोस्ट एवढ्या माफ़क चित्रांमधून सगळं हवामान, स्थळ-काळ सगळंच आपल्यासमोर उभं ठाकतं. मग शाहरुखचं स्वत:शीच स्टेशनवर बडबडणं, "भाईसाब, सिगारेट है क्या" म्हणून विचारणं. मनिषाची एन्ट्री. एकदम ’वो मासूम चेहरा’ टाईप! अख्ख्या चित्रपटात बाई ह्याच मासूम चेहर्‍यानं वावरतात. त्या चेहर्‍यामागचं भयाण वास्तव दिग्दर्शक जेव्हा आपल्यासमोर आणतो तेव्हा आपण हबकूनच जातो!

दिलसेत काय न् किती गोष्टी आठवायच्या? गाडी निघून जाताना शाहरुख प्लॅटफॉर्मवर उभा दोन्ही हातांत चहाचे ग्लास घेऊन. त्यात टिपकणारं पावसाचं पन्हाळ पाणी, त्याचं ’ओय’ करून ओरडणं, तिचं वळून पाहणं. चित्रपटात किती वेळा ओरडतो शाहरुख ’ओय’ करून.. दरवेळी कळ उठत जाते.. खोलवर.. केवढा रोमँटीकपणा! किती भिनवायचा? अन तोही अशा दृष्यांमधून? चित्रपटात विशेष लक्षात राहण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत पण शेवटाची १०-१५ मिनटे अप्रतिम! शेवटचा एक डायलॉग "जरुरी नही की तुम एक बेहतर समाज मे पैदा हो, जरुरी ये है की दुसरोंको तुम एक बेहतर समाज दे के बिदा लो!" पुढे चित्रपट संपतो, दोघांची मरणमिठी.. एक जोरदार स्फ़ोट, सोनू निगमचा आवाज अन गुलजारच्या ओळीं.. ’मुझे मौत की गोद मे सोने दे..’

काय आवडलं चित्रपटात तर खूप काही. संपूर्ण चित्रपटात एक उदास, दु:खी स्वर आहे. जो आपल्यातल्या आतल्या सुराला भिडतो, छेडतो. एक प्रेमभावना एक रोमँटिजम आहे ज्याची पुसटशी जाणीव कुठल्यानकुठल्या टप्प्यावर होतच असते. एक असफल प्रेमकहाणी जी असफल असल्यानेच उदात्त वगैरे होते ह्या भावनेला बळकटी! चित्रपट बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल पण जे घडतंय ते बघण्यात आनंद. दुखरा आनंद!

तर दिलसे असा मोठा बदल घेऊन आलेला आयुष्यात तेव्हा. अर्थात हे तेव्हा पटकन नव्हतं उमजलं, पण काहीतरी बदललं गेल्याची भावना पुसटशी का होईना आली होतीच. चित्रपट सपशेल आपटला वगैरे वाचून, ऐकून वाईटही वाटलेलं तेव्हा पण खरेतर आता अजिबात खंत नाही.

त्यानंतर बरेच चित्रपट पाहिले, नानाविध भाषांमधले. बरेचसे आवडले. बरेचसे नावडले. काही पुन्हा-पुन्हा पाहिले, काही आजही पुन्हा-पुन्हा पाहतो. आवडत्या चित्रपटंची यादी मात्र फार मोठी नाही. अगदी आकड्यांच्या भाषेत सांगायचेच तर जवळपास ४०-४५ असावेत. त्यातले १४-१५ बॉलीवूडपट अन् त्यातही एखादा मराठी 'लिमिटेड माणूसकी' म्हणून! आमचं बॉलीवूड ज्ञान तसं अगाधच. ९० ते २०१० पर्यंतचे असंख्य चित्रपट पाहीलेत, पण त्यातही आम्हाला आवडले ते 'गुंडा','इस रात कि सुबह नही', 'दिल-से', 'ब्लु अंब्रेला', 'देव-डी', 'गुलाल' हे ऑफबिट सिनेमेच! जुन्यातलेही असेच वेगळ्या वाटेवरले 'खामोशी', 'प्यासा', 'साहिब बिबी और गुलाम', 'कागज के फ़ूल', 'शोले' 'मुगल-ए-आझम', 'तेरे मेरे सपने', 'तीसरी कसम' अन् 'गाईड'!
यातले सगळेच चित्रपट मी केव्हाही, कितीही वेळ पाहू शकतो (अपवाद-कागज के फ़ूल चा, त्यासाठी तो मूड असावा लागतो) म्हटलं तर या सगळ्या चित्रपटांवर एक एक लेखही होऊ शकेल. पण असो!
पण या सार्‍यात अगदी काल-परवाच आणखी एक बॉलीवुडपट शामिल झाला तो म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपूर'!

इथून फार दूरवर, उत्तरेकडे एक गाव आहे. प्रसिध्द-बिसिद्ध नसलेलं. 'वासेपुर!' त्याच गावची कहाणी, त्याच रंगात, त्याच ढंगात. अगदी जश्शीच्या तश्शी! प्रत्येक बघणार्‍याला-ऐकणार्‍याला झेपेलच अशी नाही. नाही आवडली तर चूक तुमची नाही. एका ठराविक साच्यातलं जगणं जगणार्‍या माणसांकडून ती अपेक्षाही नाही. आपल्या सो कॉल्ड सभ्य समाजात तिचे स्वागत होईल ही आशाही नाही. जगण्याचे जे जे हजारो पदर असतात त्यातल्याच काही काळ्या छटा लेवून नटणारी ही कहाणी. ती सुफळ संपूर्ण नाही. अर्धवट आहेच, पण फक्त कहाणीच, जगणं नाही! त्यात सगळेच नायक, सगळेच खलनायक. त्यांच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या. निराळ्या ह्या अर्थानं की आम्ही कधी त्या पाहिल्याच नाहीत. हे असंही जगणं असू शकतं हे आम्हा ठाऊकंच नाही. असो. कहाणी अशीये की ती एकाच धाग्यात गोवलीय, तो म्हणजे बदला- रिव्हेंज. मारधाडीचं एक सत्र जे संपता संपत नाही. आग धगधगते, पेटते, उफाळते, विझते, राख होत येत पुन्हा पेटत जाते. ते अग्निकुंड, जळत राहणारे सदैव. वारसाहक्काने लाभणारे . परिणामांचा विचार, सदसद्-विवेकबुद्धी वगैरेंना इथे थारा नाही. माणुसकी, लोकशाही, सिस्टिम वगैरे फक्त पुस्तकांपुरते. पण मेख अशी की एकमेकांवर कुरघोडी करत असूनही अन् तथाकथित सुसंस्कृत समाजव्यवस्थेपेक्षा अगदी रानवट स्थिती असूनही ढोंग दिसत नाही. जो तो आपल्या मस्तीत 'तेरी कह के लूंगा' मोड मधे! चित्रपटात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कुणाच्याच जगण्यात ढोंग नाही. मस्ती आहे, बेअकलीपणा आहे, उतावळेपणा आहे, पशुता आहे, रासवट रानटीपणा आहे. पण स्वतःला जे हवंय ते करायचंय. त्यापाठी स्वःताचीच जोपासलेली काही गृहीतकं आहेत, गणितं आहेत. नियम आहेत. पण स्वतःपुरतेच!

दोन भागांत दाखवलेल्या ह्या कहाणीत बघण्यासारखं बरंचसं आहे. मोस्टली अ‍ॅक्टींग. नवाजुद्दीन सिद्दीकी नावाचं बॉलीवुडला पडलेलं स्वप्न ही फार मोठी देणगी आहे या चित्रपटाची. उसकी शोलोंसे भरी आँखे देख बच्चन न याद आये तो पैसा फुकट! हि इज अवर जनरेशन्स 'अँग्री यंग मॅन'! त्याचं लहान मुलासारखं रडणं, हसणं, नशेत धुंद असणं, सुरुवातीचा भित्रेपणा-कमकुवतपणा जाऊन बेरड होणं, त्याच्यातली पशूता, जरब, हातवारे, बॉडी लँग्वेज सगळं सगळं अप्रतिम! माणूस म्हणून ज्या ज्या भल्याबुर्‍या गोष्टी असतात प्रत्येकात त्याचं पडद्यावर असं चित्ररूप पाहणं अन् तेही इतक्या अँगल्सनी.. वाह!
बाकी इतर सगळ्यांचाच अभिनय सरस, सहज. तो इतका सहज आहे की त्यामागचे कष्ट कळायला आपल्याकडे वेळ नसतो. त्यानंतर उल्लेख करावा तर रिचा चढ्ढाचा! बाई गाता गाता अशा हळूच रडतात कि आसवंही अ‍ॅक्टींग करून जातात. चित्रपटात दुसरी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे संगीत! ह्या खानवलकर बाई म्हणजे अगदी अफाट सुसाट आहेत . अप्रतिम अन् वेगळं संगीत. जणू काही उत्तरेत एखाद्या खेडेगावात ठर्र्याच्या ठेल्यावर ठेका धरतोयसं वाटणारं. महेंद्र कपूरच्या आवाजाशी मिळता-जुळता आवाज घेऊन एखादं दर्दभरं गीत वाजवणं अन् तेही तसल्याच दर्दभर्‍या सिच्युएशनला. हॅट्स ऑफ! अजून कैक प्रकार आहेत सांगण्यासारखे. पण ते आपले आपण तपासावे, जपावे!

आणखी महत्त्वाचं वाटतं ते म्हणजे कथा मांडणी, ती सांगायची पध्दत. ती जगावेगळी नाही. तिच्यात घटनांची गर्दी, घाई नाही. पाडावर एखादा म्हातारा त्याच्या गतवैभवी तारुण्यात नव्याने मागे जात ती हळूवारपणे आपल्यासमोर मांडत जातो. अगदी जशीच्या तशी. कुठलेच मौखिक, भाषिक अलंकार न वापरता. कुठेकुठे थोडासा फिल्मीपणा आहे सुद्धा. पण तोही वरण-भातासोबत लोणच्यासारखा. शिव्या आहेत (नक्की किती हे मोजले नाही IMDB सारखे) पण जाणवत नाहीत. त्या शिव्यांपलिकडल्या भाव-भावना, आशय अगदी लख्खपणे समोर येतो. त्या शिव्या ऐकताना हसू येत नाही की कसेसेच होत नाही. खरेतर छोट्या छोट्या बर्‍याच चुका आहेत चित्रपटात पण संपुर्ण चित्रपट एक मोठा इम्पॅक्ट घडवून आणतो मनावर.

बाकी दोन भागांच्या या चित्रपटात दुसरा भाग काहीच्या काही महान होऊन गेलाय. कारणं बरीच असतील पण चित्रपट संपतो अन् उरते नवाजुद्दिनची ती भेदक नजर.. सतत.. नजरेसमोरच!
अनुराग कश्यपचं 'हिंसाप्रेम' ठळकपणे दिसतं इथं ही एक लख्ख करून जाणारी गोष्ट!
चित्रपट ’पैसा-वसूल’ माझ्यासाठी तरी. बाकी थेटरातल्या ८०% रिकाम्या खुर्च्या पाहून का कुणास ठाऊक मला तरी फारच आनंद झाला!

तर हे आमच चित्रपट वेड! कुणी लावलं, कधी, कसं याला काही अर्थ नाही. ते लागलं, ते आम्ही पोसलं, वाढवलं. त्यातून काय मिळालं काय नाही याचाही लेखाजोखा नाही! जे पहावंसं वाटलं ते पुन्हा-पुन्हा पाहिलं, जे नाही ते एकदातरी पूर्ण पाहून शिव्यांच्या लाखोलीसोबत वाहवलं. आवड जपली, जोपासली, जोपासणाराय!
बाकी पुढच्या चित्रपटांसाठी गुलजारच्याच भाषेत 'खामोशी'तून,
"ख्वाब चुन रही है रात, बेकरार है
तुम्हारा.. इंतजार है!"

_________________________________________________________________________

*** या आणि आजवर प्रकाशित केलेल्या प्रत्येक शब्दाच्या शुध्दलेखनासाठी मदत करणारे 'भरत मयेकर' यांचे मनापासून आभार!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर सुरुवात व विषयापर्यंत अतिशय नैसर्गिक संक्रमण.
दिलसेवासेपूर या दोन्ही विषयांना अभ्यासपूर्ण न्याय दिला आहे. भाषाशैलीही अप्रतिम. कोठेही तोल ढळत नाही. 'विशेष' या विशेषणास सर्वार्थाने पात्र लेख.
हार्दिक शुभेच्छा.

मस्त मस्त लिहीलयस ट्यागो! मी खरं माझ्या किंडल वर वाचत होतो पण लेख वाचून झाल्यावर प्रतिक्रिया द्यायला मुद्दाम कंप्युटर सुरु केला. मजा आली वाचायला. Happy

पुर्वी खुपच हरखून, समरसून(?) सिनेमे पाहायचो त्याची आठवण झाली. काही सिनेमे चालो किंवा न चालो पण ते आपल्याला नक्की "भिडायचे" हे तुझ्या दिल से मधल्या बारकाव्यांचे निरिक्षण वाचून अगदी प्रकर्षाने आठवले.
काही वर्षांनी एर्व्ही कधीच न दिसलेला सिनेमा मधला पडदा कधी दिसायला लागला ते कळलच नाही.

पुर्वी खरच एखादा भिडणारा सिनेमा पाहिला की त्यात असलेल्या मूड प्रमाणे पुढचे काही दिवस अगदी त्याच मूड मध्ये जायचे. त्यात चुकून माकून परिक्षेचा काळ असला की लफडं झालच म्हणून समजा (एकदा लफडं झाल्यावर पुढच्या परिक्षेच्या हंगामात सिनेमा पाहू नये हे कळायला नको का खरं? पण नाही)
आता गमतीशीर किंवा काहीच्या काही वाटेल पण तेव्हा खरच तो मूड झटकायला फार अवघड जायचं.

बाकी, "आजही हमने बदले है कपडे, आजही...." ते बेवफा सनम मधलं ना? नुसतं बेवफा म्हंटलास त्यामुळे पटकन लक्षात नाही आलं. मी अजूनही तो सिनेमा बघितलेला नाही पण गाणी अजूनही डोक्यात फिट्ट आहेत. जबरी हिट झाली होती त्यातली गाणी.

दिलवाले च्या गाण्यांबद्दल +१००! त्यातले "सातों जनम मै तेरे, मै साथ रहुंगा यार" हे गाणं खरं तसं बरं होतं पण ते जे लक्षात राहिलं ते रिक्षावाल्यांच्या जरा "फास्ट" सेटिंग असलेल्या डग्गा टेपांमुळे! कुमार सानूचा नाकातला आवाज अन मागे नदिम श्रवण चे म्युजिक हे कॉम्बिनेशन कदाचित आपल्या सारख्या प्रेक्षकांपेक्षा महाराष्ट्रातल्या रिक्षावाल्यांनी एकदम प्रसिद्धिच्या टाप वर नेऊन ठेवले असं मला नेहमीच वाटतं.

जुन्या आठवणींची, जाणीवांची परत आठवण करुन दिलीस त्या करता धन्यवाद! Happy

छान लिहीलय ट्यागो Happy

'दिलसे' बरोबर खुप आठवणी जोडलेल्या आहेत.....

वासेपूर पाहिला नाही त्यामुळे माहित नाही...

स्पर्धेसाठी शुभेच्छा!!! Happy

सुंदर लिहिले आहेत.....
.
खास करुन "दिलसे" च्या बाबतीत...चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच एवरग्रीन "छैया छैया" गाणे प्रचंड लोकप्रिय झालेले..चालत्या ट्रेन वरुन चित्रण केलेले गाणे आणि त्याचा बाज हे अप्रतिम होते..संगीतजगाला सुखविंदर सिंग नावाचा जबरदस्त आवाजाची ताकत असणारा गायक मिळाला तो याच गाण्यातुन..संपुर्ण गाण्यातुन एक प्रकारचा उत्साह दिसुन येतो.. शाहरुख आणि मलायका चे काँम्बीनेशन ...आयटम साँग म्हणुन हे पहिले गाणे ठरु शकते...मलायका सुध्दा याच गाण्यामुळे पुढे आली... एक सळसळाता उत्साह...जिंदादिल...चित्रिकरण केले... मुळात या गाण्यातुन मणिरत्नम यांना शाहरुख च्या कॅरेक्टर चा उत्साह, हसमुख ,हिंमत आणि त्याचे खुशमिजास व्यक्तिमत्व दाखवायचे होते..जे पुढेच्या चित्रपटात घडणार्‍या वेगवेगळ्या घटनांनी हळुहळु कोमजुन जाते..मनिषा दिसल्यापासुन त्याच्या जीवनात एक एक मोड येत जातात..त्याच्या आयुष्याला वेगळे वळण लागते... .हा एक ट्रॅक होता....
.
परंतु याच गाण्याने संपुर्ण चित्रपटाचा घात केला असे म्हणावे लागेल.. Sad ... या गाण्याच्या चित्रिकरणामुळे ज्या प्रकारे ते दाखवले गेले त्यामुळे लोक एक विशिष्ट मानसिकता घेउनच सिनेमा गृहात गेलेला.. एक हलकाफुलका, प्रणयपट असेल ज्यात थोडेफार अ‍ॅक्शन आणि गंभीरपणा असेल या मानसिकतेने गेल्यामुळे त्यांचा भ्रमनिरस झाला..त्यामुळे एका संवेदनशिल गोष्टीला प्रेक्षक मुकला.. निव्वळ निगेटिव माउथ पब्लिसिटीमुळे या चित्रपटाचे नुकसान झाले.. Sad

यु मेड माय डे. 'दिलसे' मला आवडायचा. थेटरात चारदा पाहिला होता. मणिरत्नमची ट्रायलॉजिच आवडते. रोजा, बॉम्बे, दिलसे. त्यानंतर युवा.

मग तिच्यावरच लक्ष केंद्रित करायचं अन् इश्यूज गेले तेल लावत! खरंतर चुकीचं काहीच नाही त्यात; कारण तो तरी कुठला अंतर्यामी जो असल्या इश्यूजवर सोल्युशन्स शोधणार? >>>> अगदी. अगदी. प्रेमकथा मीट्स डॉक्युमेंटरी हे जॉनर त्यानेच आणलं. लई म्हणजे लई चिडचिड व्हायची त्या प्रकाराने. तरी he weaves dreams आणि तो व्यावसायिक आहे. हे वादातीत आहे. रोमान्स होता त्यात. फ्रेश होता. तडफदार नायक होते. इट्स ऑल अबाऊट लव्हिंग युवर पेरंट्स असल्या फडतुस टॅगलाईन्स नव्हत्या.
गोड चेहर्‍याच्या, निरागस, छोट्या निसर्गरम्य गावातल्या (अंगापिंडाने धडधाकट) नायिका त्याने अक्षरश: चितारल्या. मरतुकड्या बाहुल्यांची फॅशन आली नव्हती. Cinematography आणि संगीत दोन्ही कमालीचे होते. रहमान पाटी टाकायला लागला नंतर नंतर आणि माझे मनच उडाले.

असो..
वासेपूर पहायला हवा. लईच कौतुक सुरु आहे. धास्ती वाटते.

सुरेख लिहिलय. दिलसे पाहिला तेव्हा अजिबातच आवडला नव्हता. रेहेमानची गाणी आवडायला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पिक्चर पहाताना ती पण आवडली नव्हती. नंतर अनेकदा ऐकली अर्थात. पण दिलसे म्हंटलं की अपेक्शाभंग इतकच आठवतं.
त्या पार्श्वभूमी वर हा लेख दिलसे बद्दल फारच वेगळं काहितरी सांगून गेला. Happy
वासेपूर पाहिला नाही अजून. तुम्ही त्याबद्दलही फार समरसून लिहिलं आहे. स्पर्धेसाठी शुभेछा. Happy

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती पाहिलेले आणि भावलेले चित्रपट, त्यातली माणसं, गाणी आणि साराच माहोल मनात खोलवर ठसा उमटवून जातात. अगदी आयुष्यभर राहिल असा..!

सुरेख लिहिलस.. अगदी दिलसे! Happy

मस्त मस्त मस्त !!!
दिलसे...गाणी अत्तिशय आवडतात...अजूनही ऐकताना आत काहीतरी तुटल्या-तुटल्यासारखं होतं.

<< जे पहावंसं वाटलं ते पुन्हा-पुन्हा पाहिलं, जे नाही ते एकदातरी पूर्ण पाहून शिव्यांच्या लाखोलीसोबत वाहवलं. आवड जपली, जोपासली, जोपासणाराय! >> +१०००

वासेपूर अजून नाही पाहिला.

सर्वांचे मनापासून आभार! Happy

आता गमतीशीर किंवा काहीच्या काही वाटेल पण तेव्हा खरच तो मूड झटकायला फार अवघड जायचं.>>
वैद्यबुवा, अगदी अगदी!

बाकी ते 'आज ही बदले है कपडे' बद्दल अनुमोदन.
अजून बरीच गाणी अशी आहेत की तद्दन फाल्तु ह्या सदरात मोडतील पण तरी कुठे कानावर पडली की नकळत चेहर्‍यावर हसू फुटतं, गाण्याचा आवाज वाढवला जातो आणि सोबत गुणगुणणं चालू होतं Lol
पि पि पि पिया, जि जि जि जि जिया....
हम तेरे बिन कहीं रह नहीं पाते.....
चाहा तो बहोत ना चाहूं तुझे....
प्रेमी, आशिक, आवारा....

.....ही ह्यातलीच काही उदाहरणे Lol

>>आमचं लहाणपण मात्र व्यवस्थित गेलं त्याच गाण्यांवर.
अगदी अगदी.
त्या वयात ऐकलेले संगीत कसलेही असले तरी कायमचे सोबत रहाते बहुधा.

दिलसे बद्दल सहमत. हुरहुरायला लावणारी गाणी आहेत ती.
लेख आवडला.

सुंदर ! Happy (शेवटचा परिच्छेद खूप आवडला.)

दिल से - पुन्हा एकदा नव्याने पहायचा आहे; शांतपणे, विनाव्यत्यय. तेव्हा सिनेमा-हॉलला जाऊन पाहिला होता, पण मुलगा लहान होता, निम्मं लक्ष त्याच्याकडे द्यावंच लागलं. उरलेल्या पन्नास टक्क्यांतही तेव्हा आवडला होता, पण सिनेमा/पुस्तक यांचा आस्वाद विनाव्यत्यय घेता आला पाहिजे.

यु मेड माय डे >> +१. ('दिल्से वासेपूर' = दोन्ही favorites) परत त्यात 'गुंडा'चा उल्लेख Lol

'दिल्से-वासेपूर' >> ह्यातले - उडव. जास्त चपखल ठरेल टायटल.

आत्तापर्यंतच्या एंट्रीजमध्य सगळ्यात जास्त आवडलेला लेख!
कारण, हे दोन्ही सिनेमे माझेही फेवरीट आहेत
दिल से तर एकदम खास आवडीचा- त्यात अनेक ठिकाणी बॅकग्राऊंडला 'सितारों से आगे जहां और भी है अभी इश्क के इम्तेहां और भी है' हा शेर इतका अफाट वापरला आहे की बस्स.
'मुझे हम दोनों के बीच की ये दूरी बहुत पसंद है' - अशक्य रोमँटीक!

अगदी अगदी आगावा. थेटर मध्ये हा पिक्चर ३ दा बघितला होता.
दिलसे रीलिज झाला त्यावेळेस मटा मध्ये त्याचे परीक्षण आले होते ते पण सही होते त्यात दिग्दर्शकाला काय म्हणायच आहे ते लिहिलं होतं उदा: सतरंगी रे गाणे
According to Arabic literature, there are seven stages of love..

१. हब - Hub - Attraction
२. उन्स - Uns - Infatuation
३. इश्क़ - Ishq - Love
४. अक़ीदत - Aqeedat - Reverence
५. इबादत - Ibaadat - Worship
६. जूनून - Junoon - Obsession
७. मौत - Maut - Death

सतरंगी रे गाण्याच्या अर्थाकरता ही लिंक बघा

'....वासेपुर' बघायचा आहे अजून पण ऑफ बीट चित्रपटांच्या यादीबाबत मात्र सहमत.
त्यात माझी भर म्हणजे 'हजारों ख्वाईशें ऐसी'!
रात्री बारा ते जवळपास पहाटे तीनपर्यंत एकट्यानेच बसून डीव्हीडीवर पाहिलेला तो सिनेमा आठवतोय. तेव्हापासून के. के. मेननच्या अभिनयाच्या प्रेमात पडलोय.
आणि स्स्.... हाय! ती 'चित्रांगदा सिंग' नावाची जादू Happy

ऑफ बीट सिनेमांच्या माझ्या यादीत 'थोडास रूमानी हो जायें'ही खूप वर आहे.
टिपिकल नाना पाटेकरपेक्षा एक अत्यंत वेगळा नाना त्या सिनेमाने दिलाय!!

मस्त जमलाय लेख!
दिलसे मधली सगळीच गाणी आवडतात.
लेख वाचायला सुरुवात केली तेंव्हा अस वाटलं पुर्वीचा शोले नंतरचा दिलसे कसला भारी होता आणि आता वासेपूर सारखे चित्रपट येतात, पुवीच्या प्रेक्षकांना पण चॉईस होती आताचे प्रेक्षक काहीही पहातात वैगेरे वैगेरे वाचायला लागतय की काय
पण तिन्ही काळातल्या तिन्ही रंगा ढंगाच्या चित्रपटांना सारखे वजन दिल्यामुळे तर जास्तच आवडला Happy

क्या बात है... शाहरुखचा हा चित्रपट पडला तेव्हा एक शाहरुखचा चाहता म्हणून मला खरेच खूप वाईट वाटले होते.. एवढाही वाईट चित्रपट नव्हता असेच वाटत होते.. फक्त त्याच्या ट्रेनवरील छैय्याछैया नृत्याने आणि त्या संगीताच्या जादूने प्रेक्षक जी अपेक्षा घेऊन सिनेमा बघायला गेले होते त्यामुळे अपेक्षाभंग पदरी पडला असावा..
बाकी आपण लेखात उल्लेखलेली ती शाहरुखची आर्त साद .. "ओये...." ती अगदी आपण म्हणालात तशीच काळजात घुसते.. अगदी दिल से..!

@ वासेपूर... गेला महिनाभर लॅपटॉपमध्ये पडलाय माझ्या... अजून बघितला नाही..

तर हे आमच चित्रपट वेड! कुणी लावलं, कधी, कसं याला काही अर्थ नाही. ते लागलं, ते आम्ही पोसलं, वाढवलं. त्यातून काय मिळालं काय नाही याचाही लेखाजोखा नाही! जे पहावंसं वाटलं ते पुन्हा-पुन्हा पाहिलं, जे नाही ते एकदातरी पूर्ण पाहून शिव्यांच्या लाखोलीसोबत वाहवलं. आवड जपली, जोपासली, जोपासणाराय!
बाकी पुढच्या चित्रपटांसाठी गुलजारच्याच भाषेत 'खामोशी'तून,
"ख्वाब चुन रही है रात, बेकरार है
तुम्हारा.. इंतजार है!"<<<

सुंदर लेख

(अवांतर - पण ट्यागो, तुमचा अजून एक लेख यायला हवा असे वाटत आहे, कमी वाचल्यासारखे वाटत आहे)

Happy

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी!

असामी, बदल केलाय.

आगाऊ, त्या संपुर्ण संवादांबद्दल लिहायचं होतंच, पण राहीलंच!

मॅक्स, ह्या नवीन माहीतीबद्दल थँक्स.

बेफिकीर, तसं मलाही वाटतंय.. अर्थात ३१ अगोदर अजुन काही अपुर्ण लेखांपैकी पुर्ण करून लिहता आलेच तर नक्कीच लिहेन.

दिलसे च्या प्रत्येक वाक्याबद्दल- अगदी अगदी. Happy

वासेपुर या एका क्लासिक आणि क्रांतीकारक 'भारतीय' सिनेम्यावर लिहिल्याबद्दल धन्यवाद. एकूण (साडेपाच तासांचा) वासेपूर हा प्रबंधाचा विषय आहे खरंतर.

मस्तच लेख . दिलसे माझा ही एकदम फेवरेट . 'इस रात कि सुबह नही' हा ही पहिल्यांदा बघितलेला तेव्हा खूप आवडला होता. एका रात्रीतली गोष्ट.
दिलसे हा पिक्चर मला का आवडतो याचे उत्तर तुमचा लेख वाचून मिळाले.
वासेपूर आता पहिलाच पाहीजे. स्पर्धे साठी शुभेच्छा.

Pages