बाबू बैन्ड बाजा

Submitted by संदीप आहेर on 14 April, 2012 - 05:21

बाबू बैन्ड बाजा

पहिलाच सीन प्रेतयात्रा ... विर्दभातील प्रथेनुसार वाजवत नेतात. वाजवणारे दोघे बाप नि मुलगा....प्रेत स्मशानात पोहचतं..... मुलगा वडिलांना विचारतो..... मी जाऊ का? कोठे जातो तर थेट शाळेत. ह्यांच नाव बाब्या ....... ज्याच्या वडिलांना वाटतं की यानेही त्यांच्यासाऱखंच वा़जंत्री व्हावं.......एक बाई घरोघरी फिरुन वापरलेल्या जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी विकतेय....... ही बाब्याची आई......तीला वाटतं याने खूप शिकून मास्तर व्हावं. आजी जी दिवसभर बसून झाडू बनवते ती याने शाळेत जावं विचारांची.

पण विचार आणि परिस्थिती यात ताळमेळ कसा बसणार. दोन वेळ जेवायला महाग. त्यात ज्या लाडक्या पोराच्या नावाने बाबू बैन्ड बाजा चालू केलेला त्या बैन्ड ची सर्व बासनं (वाद्य) सावकाराकडे गहान. मग त्या बापालाही वाटतं की पोराने लवकरच दोन पॅसे कमवायला सुरुवात केलेलीच बरी. पण बाब्याची आई मात्र बाब्याला मास्तर करण्यासाठी झपाटून काम काम नि काम करत राहते.

बाब्याला शाळेचा ड्रेस ह्या ना पुढच्या मजुरीवर घ्यायचाच हा आईचा आट्टहास तर बाप त्याला बैन्डची शान म्हणून झगमगित ड्रेस शिवायच्या विवंचनेत..... इथं ड्रेसच्या कपड्याची पंचाईत. तिथं निरागस बाब्या दप्तर हरवतो....... झालं ...... वह्या पुस्तकं सगळचं गेलं...... (दप्तर हरवल्या नंतर ......... आता बाप कुत्र्यासारखं तुडवणार ....... ह्या संवादात बाब्याचे हावभाव अप्रतिम!!! .... ती भिती तो निरागसपणा)

कशीबशी (शाळेच्या ड्रेसच्या) चड्डी ची सोय होते. त्यात आता वह्या ...पुस्तक .....द्प्तर. आई आगतिक होऊन जाते पण बाब्या शाळेत गेलाच पाहिजे म्हणून जिद्दीने काम करतच राह्ते.

काय होतं मिळत का बाब्या दप्तर ?
आता परिस्थिती बदलणार म्हणता विचित्र वळणं येतात का, कशी?
बालभारतीच्या तिसरीच्या पुस्तकांची किंमत किती मोठी आहे?......... हे अनुभवायचं असेल तर हा सिनेमा बघाचं.
कलाकार तर आहेतच सिनेमा मध्ये पण दारिद्र्य ह्या घटकानेही मोठा रोल साकारला आहे.

वेशभुषा अप्रतिम ........ पटकथा त्यातील धक्के तीची गुंफन अतिसुरेख........पटकथा खरचंच खूप छान फुलवली आहे. गाव त्यातील माणसं राजकारणी मास्तर मान्यवर नि जातपात सगळचं परिणाम कारक रित्या चित्रित झालं आहे.........ईतर पात्र नि त्याचा परिणाम याचाही ताळमेळ छानच..... सर्वच कलाकारांनी सुंदर अभिनय केला आहे. बोहरीण बनून पाटी डोक्यावर बैलेन्स करत चालणं, वाद्य वाजवतानाचं एकंदर शरिराची हालचाल नि भाव आतिशय मेहनत लागली असणार ह्या सगळ्यासाठी. मला मात्र बाब्या आवडला.

आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तिथंच ह्या सारख्या घटना वारंवार घडताहेत हे मात्र जिव्हारी लागतयं.

सिनेमाच्या बाहेरचं..........
मी व माझा मित्र दोघांनीच सिनेमा पाहिला आहे?........बिग सिनेमा....... तिकिट मागितल्यावर पोरगा फोन करायला गेला..... मला वाटलं ऊशिर झाला कि काय ३.१० झाले होते....... पण त्याने तिकिट दिल्या ....... आम्ही स्क्रिन शोधली .....आत गेलो फक्त दोघेच होतो......... कोणी़ फिरकलं नाही!

तीन राष्ट्रीय पारितोषिकं, इंदिरा गांधी ऑवार्ड, पुणे ईन्टरनैशनल फिल्म फेस्टिवल सगळीकडे गॉरव झालेला सिनेमा फक्त नि फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतोय सिनेमा , बघायला हवा .
तीन राष्ट्रीय पारितोषिकं, इंदिरा गांधी ऑवार्ड, पुणे ईन्टरनैशनल फिल्म फेस्टिवल सगळीकडे गॉरव झालेला सिनेमा फक्त नि फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं. >>> हे चित्र जर बदललं नाही तर मराठी सिनेमा परत डब्ब्यात जायला वेळ लागणार नाही , आपण कुठे जाहीरातबाजी मध्ये कमी पडतोय का ?

संदिप, चांगले परीक्षण! आवश्यक तेवढीच माहिती दिलेली आहे आणि तरीही कथानकाची ओळख व्यवस्थित होते. चित्रपट नक्कीच पाहावासा वाटत आहे.

फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं>>> का पब्लिक जात नाही हे कळणे अवघड आहे. कथा किंवा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, पण चित्रपट नीट बनवलेला नसेल तर समजू शकतो. पण चित्रपटही जर चांगला असेल तर लोक का बघत नाहीत हे कळत नाही.

श्री बरोबर सहमत...
बोलणार्याची करवंद खपतात त्यातला प्रकार दिस्तोय....जमलं तर नक्की बघायला आवडेल.....

परीक्षणाची पद्धत आवड्ली

छान परीक्षण.

या चित्रपटाची फारशी जाहिरात झालेली नाही. शिवाय मराठी प्रेक्षक लगेच चित्रपटगृहात गर्दी करत नाही. परीक्षणं वाचून, ओळखीच्यांपैकी कोणीतरी आवडल्याचं सांगितल्यावर ते आरामात चित्रपट बघायला जातात. हे असं आरामशीर वागणं निर्मात्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, आणि चित्रपट एकदोन आठवड्यांत पडतो. कितीही उत्तम असला तरी. चांगले चित्रपट तयार करणार्‍यांच्या पाठीशी उभं राहणं, हे प्रेक्षकांचं कर्तव्य आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात गेले, तरच चांगले चित्रपट जास्त प्रमाणात तयार होऊ शकतील.

मटामधे पण चांगलं परीक्षण आले आहे या चित्रपटाबद्दल ! तुम्हीही छान लिहिलंय परीक्षण , संदिप ! बघू कधी बघायला मिळतो हा चित्रपट !

वरती चिनूक्सचा पोस्टला अनुमोदन ! आपल्याकडून एक किंचितसा प्रयत्न म्हणून आम्ही पुण्यात असताना चांगले मराठी चित्रपट सिनेमाघरांत आणि हिंदी(बघायचेच असतील तर ! ) घरी सीडी आणून असे ठरवून केले होते. खरंच त्रास होतो चांगल्या मराठी चित्रपटांना कमी प्रे़क्षक असं चित्रं पाहिलं की Sad

मराठी प्रेक्षक लगेच चित्रपटगृहात गर्दी करत नाही. परीक्षणं वाचून, ओळखीच्यांपैकी कोणीतरी आवडल्याचं सांगितल्यावर ते आरामात चित्रपट बघायला जातात.
>> हे असे ते हिंदी चित्रपटाबाबत करत नाहीत... असे का?

हा चित्रपट बघायचाय..

तीन राष्ट्रीय पारितोषिकं, इंदिरा गांधी ऑवार्ड, पुणे ईन्टरनैशनल फिल्म फेस्टिवल सगळीकडे गॉरव झालेला सिनेमा फक्त नि फक्त स्टार व्हल्यु नसल्याने रिकामं थियटर ..........हे ही जिव्हारी लागतयं. >> खरय !

जितकी नटरंग, बाल गंधर्व, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय... याचित्रपटांची जाहीरात झाली...... तशी या चित्रपटाची झालीच नाही..बहुतेक वलयंकित कलाकर नसल्याने हात आखडता सुध्दा घेतला असेल जाहिरातदारांनी Sad

जितकी नटरंग, बाल गंधर्व, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय... याचित्रपटांची जाहीरात झाली...... तशी या चित्रपटाची झालीच नाही..बहुतेक वलयंकित कलाकर नसल्याने हात आखडता सुध्दा घेतला असेल जाहिरातदारांनी <<<
यात जाहिरातदारांचा काही संबंध नाही.

निर्माता आणि/ किंवा वितरक यांनी योग्य प्रकारे मार्केटिंग हाताळले नाहीये हेच दिसतेय. मुळात गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पारितोषिकांमधे वर्णी लागलेला चित्रपट हा आणि पुढच्या वर्षीची बक्षिसे जाहीर झाल्यावर रिलिज होतोय हेच जिव्हारी लागण्यासारखं आहे. पण रिलीज झालाय हे काय कमी आहे असं म्हणावं अशीही परिस्थिती आहे. मी जास्त बोलणं योग्य नाही या विषयात पण चित्रपटाचे काम सुरू होते तेव्हाच निर्मात्याने मार्केटिंगचा विचार, आखणी आणि त्यानुसार बांधणी करायला सुरूवात करावी लागते. ते राहतं मग चित्रपट बनेपर्यंत पैसे संपलेले असतात, वितरक (जो गेल्या ४-५ वर्षातच मराठीत परत दिसू लागलाय) फिल्म विकत घेतोच असे नाही स्टार व्हॅल्यू नसेल तर.. असे अनेक घोळ सुरू होतात.
इथे हेच कारण असेल असं नाही पण बर्‍याच चित्रपटांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम दिसतो.

नुकतेच लागलेले - बोकड, चिरगुट, थोडी खट्टी थोडी हट्टी, दुभंग (याचा म्हणे २३ वा आठवडा चालू आहे!), तीन बायका..., कशाला उद्याची बात, हायकमांड, उचला रे उचला, संभा, सतरंगी रे (हा रिलीज झाला होता का?) ई. यापैकी कोणत्याही चित्रपटाला माझ्या कोणीही ओळखीचे जाउन आलेत असे ऐकले नाही.

स्वतःबद्दल बोलायचे तर - मी सहसा किमान एक दोघांकडून चांगला आहे असे ऐकले तरच जातो (मराठी व हिन्दी दोन्हीला). ते या कोणत्याच पिक्चर बद्दल ऐकलेले नाही. म्हणजे चांगले नसतील असे नाही पण "माउथ टू माउथ पब्लिसिटी" जशी देऊळ ला मिळाली तशी मिळालेली नाही.

<हे असे ते हिंदी चित्रपटाबाबत करत नाहीत... असे का?>

कारण मुळात प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. कॉलेजची मुलं, तरुण नवीन चित्रपट लागला की शुक्रवार-रविवार हिंदी चित्रपटांना गर्दी करतात, आणि पहिल्या तीन दिवसांतच चित्रपट हिट होतो.
'मसाला', किंवा 'बाबू बँड बाजा', किंवा 'तुकाराम' या चित्रपटांना अशी पहिल्या तीन दिवसांत अशी गर्दी होणार नाही.

आता या आठवड्यापासून जून महिन्यापर्यंत दर शुक्रवारी किमान ४-५ मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एका शुक्रवारी १००-१५० रुपये (प्रत्येकी) देऊन एक चित्रपट बघितला, की त्या महिन्यात प्रेक्षक दुसरा चित्रपट बघण्याची शक्यता फार कमी.

खरंच असे चित्रपट आम्हाला बघायला मिळत नाहीत याचे वाईट वाटते.
स्टार व्हॅल्यू म्हणजे तरी काय हो ? तेच तेच चेहरे सर्वच सिनेमात दिसणे. त्यांच्या
संवादफेकित शहरीपणा डोकावणे, याचा पण कंटाळा आलाय.

स्टार व्हॅल्यू म्हणजे तरी काय हो ? <<<
स्टार असल्याने बॉक्स ऑफिसवर, राइटसमधे इत्यादी ठिकाणी आकड्यात दिसणारी व्हॅल्यू. या रिटर्न्सच्या गणितांकडे पाहून बजेटस बदलू शकतात, अद्ययावत तंत्रज्ञान वापरता येऊ शकते.
आणि माफ करा पण हा पण एक बिझनेस आहे. इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे नफा हे या उद्योगाचेही उद्दीष्ट आहे हे नाकारता येणार नाही.

छान लिहिलं आहे.

आपल्या मायबोलीच्या यंदाच्या दिवाळी अंकात या चित्रपटातील बाबुच्या आईचं काम करणार्‍या अभिनेत्रीची - मिताली जगतापची मायबोलीकर आनंदयात्री आणि जिप्सीने घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, ती सर्वांनी अवश्य वाचा.

तेच तेच चेहरे सर्वच सिनेमात दिसणे. त्यांच्या
संवादफेकित शहरीपणा डोकावणे, याचा पण कंटाळा आलाय
.>>>>>>>>

असं वाटणार्‍या सर्वांनी हा सिनेमा नक्की पहा.
घरातील असतील नसतील तेव्हढे पूर्ण दागिने घालून स्वंयपाकघरात मिरवणार्‍या हिरवणी ऐवजी
साध्या कपड्यात वावरणारी नि कंदिल लावून भाकरी थापणारी अस्सल बाई.
(गरीब म्हणुन अगदिच फाटके कपडे नाहीत गरीबी आपोआप जाणवेल कि मुद्दा स्पष्ट होईल या साठी दिग्दर्शकाला पूर्ण मार्क) ह्या साठी पुन्हा ....... हा सिनेमा नक्की पहा.

तेच तेच चेहरे सर्वच सिनेमात दिसणे. त्यांच्या
संवादफेकित शहरीपणा डोकावणे, याचा पण कंटाळा आलाय
.>>>>>>>>
यामुळेच कदाचित गाभ्रीचा पाऊस मध्ये उत्तम अभिनय केलेल्या सोनाली कुलकर्णी पेक्क्षा मिताली जगताप अधिक विश्वासार्ह होत असावी.

अतिशय सुरेख चित्रपट! एकूणएक गोष्ट- कथा, संवाद, वातावरणनिर्मिती, कलाकार, संगीत- अतिशय चपखल. कथा तर उच्च आहेच, पण त्याहीपेक्षा अव्वल आहे सर्वच पात्रांचा अभिनय. मिताली जगताप अफाट! भाकरी थापताना, नवजात बाळाला मालिश करताना, डोक्यावरची पाटी सांभाळताना- वाटत नाही, हा अभिनय आहे, इतकी सहज. शिवाय बाबूसाठी नवीन पुस्तकं आणल्यावर तिला झालेला आनंद आणि तिची बदललेली देहबोली- सुंदर!
गरीब परिस्थितीत असलेल्या लोकांचं चित्रण असूनही, चित्रपटभर उगाचच खिन्नता, उदासीनता नाहीये. ती येते फक्त शेवटी. काही काही प्रसंग अतिशय गोड- मिताली आणि बाबूचा सीन ज्यात आई बाबूला चड्डीला नाडी लावून देते, नवीन वही करून देते- हृदयस्पशी! उषा नाईकांचं सुखद दर्शन होतं. वर्‍हाडी बोली तर किती गोड! 'तुह्यंवालं दप्तर भेटलं?' 'दादास सांजू नको' फार गोड लागतं कानाला!
लिहावं तितकं कमी आहे! मस्ट सी आहे हा चित्रपट. काल रविवारी संध्याकाळी 'विकी डोनर', 'हाऊसफुल २' हे चित्रपट हाऊसफुल असताना ह्याही चित्रपटाला बर्‍यापैकी प्रेक्षक होते हीदेखील समाधानाची गोष्ट वाटली.

चांगले परीक्षण, आणि चर्चाही उत्तम.

मी हा सिनेमा पाहिलेला नाही. पाहणारही नाही.
कारण? हा सिनेमा माझ्या शहरात (जळगाव) लागणारच नाही.

मराठी सिनेमा थिएटरमधे फक्त मुंबई आणि पुण्यात दिसतो, ही वस्तुस्थिती आहे. प्रिंट्स कमी निघत असाव्यात, अन्यत्र प्रेक्षक मिळत नसावेत- कारणे काहीही असोत. मी देऊळ. नटरंग, जोगवा, शिवाजीराजे- सगळे गाजलेले मराठी सिनेमे सीडीवर पाहिलेत. 'श्वास' थेटरात आला होता, पण सुवर्णकमळ मिळाल्यानंतर- आठवडाभरासाठी. Happy

-------------------------------------------

अवांतर- प्रतिसाद वाचतांना फारेन्डाकडून (नकळत) झालेली चूक लक्षात आली. जाम हसलो. त्याची परीक्षणं वाचतांना हसतो, तसाच ! Rofl
"म्हणजे चांगले नसतील असे नाही पण "माउथ टू माउथ पब्लिसिटी" जशी देऊळ ला मिळाली तशी मिळालेली नाही."

कालच्या(रविवारच्या) बर्‍याच पेपरात या सिनेमाचं परिक्षण आलं आहे. आणि सर्वांनीच अगदी नावाजला आहे सिनेमा. नक्की बघणार (पुण्याला जाऊन!...कारण ज्ञानेशने दिलेले!)
आमच्या नगरात येईल की नाही माहिती नाही. आणि तो जर चांगला असेल तर १ आठवडा तरी टिकेल की नाही गॅरंटी नाही!

ज्ञानेश, तुमच्याकडे किंवा महाराष्ट्रातल्या इतरही अनेक भागात मराठी सिनेमे येत नाहीत याला वितरकांना/ निर्मात्याला जबाबदार धरता येणार नाही पूर्णपणे.
चित्रपटनिर्मिती व विक्री हा एक व्यवसाय आहे हे लक्षातच येत नाहीये का? आणि व्यवसाय म्हणले की आर्थिक गणिते आलीच. जेव्हा एखाद्या चित्रपटगृहात चित्रपट लागतो तेव्हा चित्रपटगृहाला भाडे/ कमिशन काही द्यावे लागते. तसेच एक प्रिंट तिथे अडकलेली रहाते. मुळात चित्रपटनिर्मितीचा खर्च आणि मग हा सगळा खर्च. बॉक्स ऑफिस कलेक्शन योग्य झाले नाही तर व्यवसाय तोट्यात असतो.
तुमच्या इथल्या प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तरच सिनेमे येतील. श्वास आठवडाभरासाठीच आणि नॅशनल अ‍ॅवॉर्ड मिळाल्यानंतरच लागला यात श्वासच्या वितरणव्यवस्थेचा दोष नाही. जळगावच्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाचे जे गणित आहे त्याचा आहे. हे गणित असेन मनगढन नाही. एक आठवडाभरापेक्षा जास्त काळ तोटा सोसणे शक्य नसते.
श्वासचे निर्माते महाराष्ट्रभर अक्षरशः रिळे डोक्यावर घेऊन फिरले. तेव्हा मराठी सिनेमाला वितरक नव्हते. निर्मात्यालाच करावे चॅनेल्स आणि होर्डींग्जमधून पब्लिसिटी करण्याचे बजेट नसल्याने आमंत्रित शोज आयोजित करून माउथ पब्लिसिटीवर भर दिला म्हणून श्वास जळगाव, लातूर अश्या अनेक ठिकाणी निदान आठवडाभर किंवा नुसते ३-४ विकेंडसचे मॉर्निंग शोज असा तरी लागला. पण त्याहून जास्त घडणे शक्यही नव्हते. कारण गणित नुकसानीत जाणे परवडण्यासारखे नव्हते.
आणि हा सगळा अभ्यास चित्रपट बनत असतानाच केलेला होता. भरपूर डेटा आधीच जमवलेला होता. आधीच नेटवर्क जमवलेलं होतं. हे अनेक निर्माते करत नाहीत आणि चित्रपटाचे मग नुकसान होते.

जोगवा........या चित्रपटाला ......सर्वोत्तम संगीत, सर्वोत्तम गायक गायिका, असे राष्ट्रिय पारीतोषिक मिळालीत...
गाणे सगळी कडे गाजलीत........तरी सुध्दा त्या चित्रपटाची अधिकृत गाण्यांची सीडी बाजारात अजुन ही आलेली नाही आहे........... Sad
ही खंत अतुल-अजय यांनी टिव्ही च्या मुलाखतीत बोलुन दाखवली आहे

या वीकांताला हा चित्रपट बघायचाच असं ठरवलेलं पण जवळपासच्या कोणत्याच मल्टिप्लेक्सला नव्हता.. २ आठवड्यातच काढुन टाकला. Sad

पहिल्याच आठवड्यात बघा, म्हणजे चित्रपट कदाचित एखादा आठवडा जास्त चालेल>>> बरोबर आहे. पण एकच वीकांत सिनेमा थियेटरला असतो.. वीकडे मध्ये शोज ची वेळ फक्त पेन्शनर लोकांनाच जमेल अशी असते. असो. पुढच्यावेळी. Happy

वीकडे मध्ये शोज ची वेळ फक्त पेन्शनर लोकांनाच जमेल अशी असते. असो. >>
अनुमोदन चिंगी.
बाकी आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी कधीतरी एखादी नवी क्रांतीकारी वितरणव्यवस्था निघेल..
तिनचार महिन्यातून एकदाच प्रेक्षागृहात जाऊन सिनेमा पाहणे शक्य होते. कधीकधी तेही नाही. गेली ५ तरी वर्षे आणि निदान पुढची ५ हे असेच राहणार.
त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी चित्रपट आणि नाटक बसवणे अशक्य.
पर्याय : ध्वनीचित्रफीत किंवा दूरचित्रवाणी. पैकी दुसरा पर्याय पुन्हा वेळेच्या गणितात बसत नाही.
तात्पर्य पहायची जबरदस्त इच्छा आणि पैसे दोन्ही असले तरी या अडचणी आहेत.
(कोणी या अडचणींची दखल घ्यावी अशी अपेक्षा अजिबात नाही.)

हा धागा वाचल्यापासून आठवायचा प्रयत्न करते आहे..मी गेल्या काही वर्षात प्रेक्षागृहात जाउन पाहिलेले मराठी चित्रपट काही वर्षांपूर्वी 'डोबिंवली फास्ट', 'वळू' आणि आता यावर्षी 'शाळा'. बाकी सगळे ध्वनीचित्रफित विकत घेऊन पाहिले आहेत.

अनास्था, अनास्था याची एक बाजू कदाचित 'सॅचुरेशन' आहे जी मराठीच असे नाही, जगभरातल्या लोकांनी कदाचित जमेस धरलेली नाही. तिन भाषेतील टाईमपास आणि उत्कृष्ट कलाकृती नुसत्या फॉलो करायच्या साध्या प्रेक्षक या नात्याने, त्यात दूरचित्रवाणी, आंतरजाल, रेडियो, नाटक हे माध्यम, जाहिराती इतर न धरता, तर डोक्याची मंडई होते. या वेळेच्या गणितात 'डेली सोप्स', चांगले कार्यक्रम इ.इ टाकले, आणि वाचन हे टाकले तर वेळेचे गणित पूर्ण कोलमडते.
I am increasingly getting saturated as a spectator and a consumer. Uhoh
गेले काही महिने यावर विचार करते आहे. बरेच प्रश्न आहेत.

Pages