आत्ताच बघून आलोय....देऊळ

Submitted by संदीप आहेर on 4 November, 2011 - 07:53

सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं पिवळं सोनं ....... पाणी नसेल तरी बहारदार तोर्‍यात हलणारं ते पिवळ गवत नि ती ऐन दुपारची वेळ ....... उन्हं किती कडक याचं चित्रण एकदम झकास (जी मुलं नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीतच गावी जातात ना त्यांना नेहमी ही उन्हं, ते पिवळ गवत नि उजाड डोंगर याचीच सवय होऊन जाते.... नि काहींना ते मनापासून आवडू लागतं........गिरीश कुलकर्णीना ही सवय नि ती आवड असावी... म्हणूनच ही पिवळाई
डोळे थंड करणारी हिरवाई हून अधिकच मनाला भावते)

माळरानात हरवलेली गाई शोधणारा केशा ......... माळरानाच्या पाठी पुरातत्व विभागाचे चाललेले खोदकाम......नि पुन्हा माळरानात हरवलेली गाई शोधणारा केशा ...... सापडते एकदाची पण आणखीही काही सापडतं .... नि सुरु होते कथा. पहिल्या दोनच मिनिटात आपणही कथेबरोबर प्रवाही होऊन जातो. वेग येउ पाह्तो. नंतर गाव कसं असतं ह्याचं खास शैलीतील चित्रण. प्रत्येक फ्रेम खूपच सुंदर. तसा केशा हा पिक्चरचा हिरो पण कथा हाच प्राण असणार्‍या जातकुळीतील हा सिनेमा मात्र प्रत्येक नि प्रत्येकच व्यक्तिरेखा फुलवतो.

केशाला जे सापडतं नि त्यातून गावात सुरु होणारी धावपळ (धावपळीचं नि त्या पुर्वीचं) भन्नाट चित्रण. गावातील प्रतिष्ठीत राजकारणी भाउ नि त्यांची बायको (नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी) त्याचं घरं ... त्यांचा पुतण्या ... त्याचे मित्र .....सरपंच तिचं घर....केशाचं नि त्याच्या होणार्‍या बायकोचं बाजुबाजुला असणारं घर... केशाची आई.. सगळ्यांचेच बारीक पैलु आपल्या समोर लेखक नि दिग्दर्शक मोठ्या खुबीने सादर करतात. (यासाठी का होईना पण हा सिनेमा बघाच एकदा. कारण ती खरीखुरी गोधडी...कापडं.....चहाची टपरी....कानावर असणारं ते चायना प्रोडक्ट ह्या प्रकारे अगदी खरं गावं क्वचितच तुम्हांला इतर सिनेमात दिसेल)

कथा अगदीच वन लाईन स्टोरी असल्यामुळे ती सांगणं टाळतोय. पण ह्या वन लाईनला पटकथा छान फुलवली आहे. मध्यांतरा पर्यंत कथा चांगलीच पकड घेते. एक जबरदस्त वातावरणनिर्मिती होते. ........... आज केवळ गावातचं नाही तर शहरातही वाढते आध्यात्मिक प्रस्थ त्यातून होणारी समाजाची फरफट हा चिंतेचाच विषय............ आता काय पुढे .... त्यात जरा कमी पडते. वेग मंदावतो. जे चालू आहे ते फक्त केशाला योग्य वाटतयं बाकी कुणालाच नाही. यातच मग आपला थोडा का होईना अपेक्षाभंग होतो.

कलाकार : अभिनय कुणीच केला नाही.....सगळेच अक्षरशः व्यक्तिरेखा जगलेत.

गाणी : अगदी योग्य नि फक्त योग्य वेळीच वाजत राहतात बैकग्राऊंडला.

विशेष उल्लेखनिय : दिग्दर्शन

(आणि हो ... संपूर्ण चित्रपटात व्हिलन नाही...... ऐव्हढी ती संपूर्ण गावात माणसं पण त्यांना चांगल वाईट दाखविण्या ऐवजी लेखक प्रत्येकातील स्वभावाचे एक एक पैलु अलगद आपल्यासमोर मांडतो.
लार्जर दैन लाईफ ची सवय लागलेल्या आपणा सर्वाना ह्या गोष्टी पचायला सोप्या जातात. त्यातच दिग्दर्शकाचं यश सामावलं आहे)

विषय: 
Groups audience: 

जे चालू आहे ते फक्त केशाला योग्य वाटतयं बाकी कुणालाच नाही.
केशाला योग्य की अयोग्य???

छान आहे परिक्षण. नेमके अगदी.

आपण जे लिहिलंय ते परिक्षण आहे का? की लोकच त्याला परिक्षण ठरवतायत??

जे काही असेल ते मला आवडले. हे वाचून चित्रपट बघावासा वाटतोय...

संदिप, मलाही आवडलं लिखाण. तसंही तु त्याला परिक्षण म्हणाला नाहीएस. आणि परिक्षणापेक्षाही हे जास्त काय वाटतं? सिनेमा पाहुन आल्यावर आणि त्यातही जर तो आवडला असेल तर, जे भरभरुन वाटतं ना,....ते मित्रांशी शेअर केल्यासारखं वाटलं. आणि तुझं लिखाण वाचुन अजुनच नक्की केलं सिनेमा पहायचं.

मनिमाऊ ला अनुमोदन. खरच आवडले लिहिलेले. काल टिव्हि वर ह्या चित्रपटा सम्बन्धि काहि वाद पाहिला. खरच काहि अक्षेपार्ह आहे का?

चित्रपट जमलाय यात शंकाच नाही...
मला तर बघताना वळूचा सिक्वेल बघत असल्याचेच वाटत होते..खरंतर तसेच करायला हरकत नव्हती...कारण कुसवड्यात आठ-दहा वर्षांनी गेलो असतो तर जसे दिसले असते थेट तस्सेच शहरीकरणाचे वारे लागलेले गाव कुलकर्णीद्वयांनी उभे केले आहे..त्यातली अगदी फ्रेम न फ्रेम खरी वाटते...
फक्त - दिलीप प्रभावळकरांकडून निराशा झाली..प्रोमो बघताना असे वाटत होते की नाना आणि त्यांची अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळेल...पण तसे काहीच होत नाही..या जोडीभोवतीच चित्रपट फिरवून अगदी टिपीकल मार्गाने जाण्याचे दिग्दर्शकाने टाळले असावे पण त्यामुळे एक चांगला कलाकार वाया गेल्याचे वाईट वाटले...
झाले ते चांगले का वाईट याचा कोणताही निवाडा न करत चित्रपट ते प्रेक्षकांवरच सोपवतो हा मला आवडलेला भाग. त्या दृष्टीने नाना आणि प्रभावळकरांचा एकच प्रसंग बरेच काही सांगून जातो.

गिरीश कुलकर्णीनी चित्रपट व्यापून टाकलाय! खूप खूप अभिनंदन! केशा फारच आवडला.
प्रभावळकरांबद्दल अनुमोदन! विभावरी देशपांडेलाही फारसा वाव नाहिये. घरी आल्यावर तिची व्यक्तिरेखा आठवावी लागली.

दोन वर्षापूर्वीच BLOG ह्या प्रकाराशी ओळख झाली, आपणही काही लिहावं असं वाटतं होतं पण राहून गेलं. माबोकर होऊनही दिड वर्ष होत आलयं नुसता ROM. म्हटलं बास आता काही तरी लिहायचं....

(तसं शेअर मार्केट वर लिहण्यासाठी धडपड चालली आहे. पण ते थेट पॅसा या अतिमहाग गोष्टीशी संबधित असल्याने काहीही चुक होणं परवडण्यासारखं नाही, RnD चालू आहे पूर्ण होताच, तीही रिक्क्षा फिरविण्यात येईल) .

सिनेमाची तशी जुनीच आवड आता जरा सवड काढली ... लिहायला. हो मला परिक्षणच लिहाचय!, मी तसा प्रयत्न जरुर करणार आहे, पण वर जे लिखाण आहे ते ......शुक्रवार, तारिख ४ नोव्हेंबर, वेळ १२.३०, सिगंल स्क्रिन सिनेमागृह .........देऊळ.......... चित्रपट पाहिला, आणि जे मनात जसं आलं ते तसं लिहलं.

http://cinemavishwa.blogspot.com/

फक्त - दिलीप प्रभावळकरांकडून निराशा झाली..प्रोमो बघताना असे वाटत होते की नाना आणि त्यांची अभिनयाची जुगलबंदी पहायला मिळेल...पण तसे काहीच होत नाही..>>>
खुप सारे अनुमोदन. Happy

बाकी चित्रपट जबरदस्त आहे. Happy

चांगले लिहीलेय.. पहिला भाग प्रचंड छान जमलाय.पण त्यामुळेच दुसर्‍या भागात मध्येमध्ये पकड निसटल्यासारखी वाटली.. थोडा संथही झालाय.. एकदा तरी बघायलाच हवाय. ओव्हरऑल चांगला जमलाय.
अभिनयाच्या बाबतीत सगळेच ग्रेट.. अगदी टीव्ही/सीरीयल्स मध्ये गुंतलेली केशाची म्हातारी आई मस्त.. खरोखरीचे खेडेगाव उभे केलेय.. व्यक्तीरेखा, त्यांच्या लकबी,बोलण्याच्या पद्धती सकट.

अजुन एक, दिलीप प्रभावळ्कर त्यांच्या मुला/नातवंडासोबत वेबकॅम वापरुन बोलताना दाखवलेत, पण आधी गावात लाइट्,रस्ते, हॉस्पिटल नसणे असे उल्लेख आलेत.. या पार्श्वभुमीवर वेबकॅम वै पटत नाही. अर्थात हा काही तितका महत्वाचा तपशील नाहीये.

फारच छान आहे, सगळ्यांचे अभिनय अगदीच नैसर्गिक आहेत... सगळ्यांच दिसणही नैसर्गिकच वाटत होत. कुठेच कोणाचेच उगाचच वाकडे तिकडे हावभाव नाहीत ... कुठेच कोणाचाच भडक मेकअप नाही.. सरपंच तर चक्क पॉण्ड्सची पावडर लावताना दाखवली... एकदम टिपीकल गावच्या स्टाईलमध्ये .... Happy

केशा तर फारच छान ...
शर्वरी पिल्ले,विभावरी देशपांडेला खरच फारसा वाव नाही.... पण जे काही त्यांनी केलय ते उत्तमच...
सोनाली कुलकर्णी, अतिशा नाईकच थोडा भाव खाऊन गेलाय्त... मस्तच .... Happy
आजकाल बहुतेक गावांची अशीच वाटचाल चालु आहे... Sad