झपाटलेला वाडा-२

Submitted by सचिन७३८ on 28 October, 2011 - 23:46

असे कसे काय? ह्याचे नवल करीतच तो वाड्याच्या दारापाशी आला. स्वत:जवळच्या चावीने त्याने दाराचे कुलूप उघडले. दार ढकलून तो आत जाऊ लागला. तर दार लोटलेच जाईना. जणू कोणीतरी त्यास आतील बाजूने ओढून धरले असावे. अर्चित दार ढकलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण त्यास यश येत नव्हते. आणि जवळपास दहा मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर ते दार एकदमच आतील बाजूस लोटले गेले. दार लोटतांना अर्चितने जोर लावल्यामुळे तो वाड्यात धडपडतच आत शिरला. "खो, खो" आतील कोंदट वातावरणामुळे अर्चितला खोकला आला. त्यातही शांत वातावरणात त्याच्या खोकल्याचा आवाज कितीतरी वेळ घुमत होता.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अर्चित जाधव, वय वर्षे २६.
आई वडिलांचा एकुलता एक मुलगा.
अर्चितला जवळचे कोणीही नातेवाईक नव्हते, फक्त एक सोडून.
विश्वास घोटेवार, अर्चितचे मामा.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गेल्या तीन पिढ्यांपासून घोटेवार कुटूंबीय ह्या वाड्यात रहात होते. वाड्यामागे त्यांच्या मालकीची दहा एकर शेतजमीन होती. वाड्याचे नाव जरी 'श्रीपाद' असले तरी सर्व गांवकरी त्यास घोटेवारांचा वाडा म्हणूनच संबोधित. गेल्या तीन पिढ्यांपासून घोटेवार कुटूंबीय त्या वाड्यात एकत्र रहात असले तरी कधी आपापसात भाऊबंदकी, भांडण-तंटे झालेले नव्हते. सर्व कुटूंबीय एकोप्याने रहात असे. पण घोटेवारांच्या घरात 'ती' आल्यापासून मात्र सर्वच बदलले. होय तीच 'ती'. तिचे नाव अरुणा. विश्वास घोटेवारांची सून. ती कोण? कुठली? तिचे आई-बाप कोण? कोणासच माहित नाही.

विश्वास घोटेवारांचा एकुलता एक मुलगा सुनील. वय वर्षे २२. तो दोन वर्षांचा असतानाच त्याचे मातृछत्र हरपले होते. म्हणूनच कि काय विश्वास घोटेवारांनी त्यास कशाचीही उणीव भासू दिली नाही. लहानपणापासूनच त्याला भटकंतीचा नाद होता. विशेषत: गावाच्या वेशीबाहेरील नदीत त्यास पोहणे फार आवडे. जसजसे त्याचे वय वाढू लागले, तसा त्याचा पोहण्याचा नाद फारच वाढला. तो आता पट्टीचा पोहणारा झाला. त्यातच नदीकाठी त्याला एके दिवशी अरुणा भेटली. केव्हा भेटली? कशी भेटली? गूढच. पण अरुणाने सुनीलवर आपली छाप पाडली होती हे खरे. आता सुनील पोहण्याच्या निमित्ताने अरुणाला भेटण्यास जाऊ लागला. सुरुवातीस दोघे फक्त एकमेकांस भेटत. कालांतराने त्याचे प्रेमात रुपांतर झाले. तिचे आई-बाप कोण हे कधी सुनीलला विचारावेसे वाटलेच नाही. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. विश्वास घोटेवारांना सुनीलच्या प्रेमप्रकरणाची काहीच कल्पना नव्हती. आणि एके दिवशी असाच पोहायला जातो असे सांगून सुनील जो गेला तो संध्याकाळी घरी आलाच नाही.

विश्वास घोटेवारांचे जणू काळीजच कोणी हिरावून घेतले होते. त्यांचे अन्न-पाण्यावरील वासना उडून गेली. "दोन दिवस झालेत सुनीलला बेपत्ता होऊन" ते मनाशीच विचार करत होते. कोठे असेल माझा पोर? कसा असेल? ह्याच चिंतेने ते रात्री झोपी गेले.

आणि दुसऱ्याच दिवशी अचानक कोणाच्याही ध्यानी-मनी नसतांना सुनील अरुणाशी लग्न करून वाड्यावर हजर झाला. विश्वास घोटेवारांना सुनील परत आलेला पाहून आनंद तर झाला, मात्र कसलीही चौकशी न करता सुनीलने कोणीतरी मुलगी लग्न करून घरी आणल्याचे त्यांना आवडले नाही. तरीसुद्धा त्यांनी तशी नाराजी न दाखवता वधू-वरांचे स्वागत केले.

अरुणास वाड्यात येऊन जवळपास आठवडा उलटून गेला होता. आणि वाड्यातील कामे नित्यनेमाने सुरु होती. सुनील आता पोहण्याच छंद सोडून शेतीकडे जास्त लक्ष देऊ लागला. विश्वास घोटेवारही सुनीलच्या ह्या वागणुकीने सुखावले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

"त्या" दिवशी रात्री; विश्वास घोटेवारांना अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. कोणता आवाज म्हणून ते आपल्या खोलीतून उठून बाहेर आले. आवाज सुनील-अरुणाच्या खोलीतून येत होता. विश्वास घोटेवार त्या खोलीजवळ गेले आणि "तो" आवाज कसला हे ऐकण्यासाठी खोलीच्या दाराला कान लावला. आवाज(?) छ्या! मंत्र. हो, कोणीतरी मंत्रोच्चारण करत असावे. आणि त्यात स्त्री-पुरुष दोघांचेही आवाज एकदमच येत होते. विश्वास घोटेवार एकदम हडबडल्यासारखे मागे सरकले. आणि गडबडीने आपल्या खोलीत जाऊन झोपले.

सकाळी अरुणा त्यांच्या खोलीत दुध घेऊन आली. विश्वास घोटेवार तेव्हा नुकतेच उठले होते. अरुणा आलेली पाहताच त्यांना कालच्या प्रसंगाचे स्मरण झाले आणि तो प्रकार त्यांना अरुणाला विचारावासा वाटला. पण कोणास ठाऊक अरुणाकडे पाहताच त्यांना तिच्या डोळ्यात विचित्र चमक दिसली आणि विश्वास घोटेवारांना तो विषय अरुणासमोर काढू नये असे वाटले.

आता तर "त्या" रात्रीच्या प्रसंगाची पुनरावृत्ती रोजच होऊ लागली. आणि सकाळ होताच अरुणा किंवा सुनील यांना त्याबद्दल विश्वास घोटेवारांना विचारावेसे वाटले कि त्याबद्दल बोलण्यासाठी त्यांची जिभ एकदम अडखळे. जणू कोणा शक्तीने त्यांच्या जिभेवर ताबा ठेवला होता.

क्रमशः

गुलमोहर: 

चला लवकर लिहिलात......छान आहे.................

अहो शेवट घटना तोडुन लिहा.....म्हणजे उत्सुक्ता राहते.... इथे जर तुम्ही ' विश्वास यांनी अरुणाला विचारले असते आणि आणि काही घटना झाली असती तर उत्सुक्ता आली असती... Happy

तशी अजुन ही आहेच Happy

मस्त च ... दोन्ही भाग वाचले..
छान लिहीले आहे.. पुढील भाग लवकर येउ देत..:)

>>>>लेखाच्या सुरुवातीला आधीच्या भागाची लिंक द्या प्लीज. पुढला भाग लवकर टाकावा ही विनंती स्मित>>>>
+१

सचिनराव छान,
सर्वांची उत्सुकता वाढली आहे.
सर्वजण सुट्टी संपवून परत आलेत, तुम्हीही परत या.