अप्रसिद्ध मंदिरे : गणपती मंदीर, नाणेली, ता. कुडाळ - एक फोटोफीचर - नीधप

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 04:13

पावसाळा संपतानाचं वातावरण. जिकडे तिकडे हिरवं गार. आम्ही मस्तपैकी तळकोकणातल्या वाड्यावस्त्यांमधून फिरतोय. कामासाठीच पण आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर की कामाचा ताण तसा वाटतच नाही.

रोज रात्री नकाशा समोर ठेवायचा. एक दिशा, एक रस्ता पकडायचा आणि त्या भागातली सगळी बारीक सारीक गावं, सगळ्या वाड्यावस्त्यांसकट दुसर्‍या दिवशी फिरायची, बघायची, फोटु मारायचे. असं करता करता एक दिवशी संध्याकाळच्या सुमारास नाणेली गावात पोचलो. हि वाडी, ती वाडी असं करत करत एका ठिकाणी एक गंजकी पाटी पाह्यली गणपतिमंदिराची. पाटी बाण दाखवत होती त्या दिशेला एक पायवाटेसारखी वाट. निघालो. बरीच वळणं घेत शेवटी येऊन पोचलो ते एका अप्रतिम शांत, सुंदर अश्या जुन्या मंदीरापाशी

देवाकडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या बाजूने मंदिराकडे वाट येते. तिथून येऊन देवळाला सामोरे गेलो. हे असे
01_0.jpg

देऊळ नक्कीच बरंच जुनं होतं. सुंदर तर होतंच. देवळात कोणी चिटपाखरूही नाही. गाभार्‍यात एक छोटासा बल्ब लटकत होता. लोड शेडींगची वेळ संपली होती त्यामुळे तो उजळून निघाला.अंधार पडायला लागला होता. हे देऊळ पाह्यला परत यायचं असं ठरवून आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी सकाळचेच आलो देवळात. आत्ताही देवळात कोणीही नव्हतं.
हा देवळाचा मंडप.
02.jpg

हा त्याचा डावा खण
03.jpg

हा उजवा खण
04.jpg

एकेक खांब जांभ्याच्या सुबक गोल चिर्‍याचा. आत्ता उखडलेली दिसत असली तरी शेणाने सारवली जात असलेली जमीन. उजव्या खणाच्या पलिकडे चिर्‍यांनी बांधून काढलेली छोटीशी विहीर.

एका बाजूने या देवळाचा पूर्ण फोटो काढायला पॅनोरमा प्रकरण वापरावे लागले.
05.jpg

देवळाचे सगळ्या बाजूंनी निरीक्षण करत, फोटो काढत फिरता फिरता काही गावकरी मंडळी देवळात येऊन गेली. गुरवाने येऊन पूजा केली बाप्पाची. सुंदर काळ्या कातळात कोरलेली गणपतीची मूर्ती. देवळाच्या बांधकामातला साधेपणा मूर्तीत अजिब्बात नव्हता. दोन वेगळ्या काळात किंवा वेगळ्या शैलीत केले गेले असण्याची शक्यता नक्कीच वाटत होती. देवाच्या डोक्यातच प्रकाश पडावा अशी इच्छा असल्यासारखा बल्ब बरोबर देवाच्या डोक्याशी टांगत होता त्यामुळे आमच्या फोटुमधे जरा जास्तच उजेड पडला. Happy
06.jpg

देऊळ कधीचं, किती वर्षं जुनं असं एकदोघांना विचारलं तर त्यांनी केवळ स्मितहास्यानेच उत्तर दिलं. गुरवनानांना विचारलं तर 'जुना आसां.' असं उत्तर मिळालं. मग दोन बाइकवीर आले. गावातलेच असावेत असं वाटत होतं. थाटमाटावरून गावच्या राजकारणात प्रवेश करत होत्साते वाटत होते. त्यांना देऊळ किती जुनं असं विचारलं असतं तर नक्की 'पांडवकालीन' असं उत्तर मिळालं असतं.

त्यांना आम्ही काही विचारायला गेलो नाही तरी तेच आले आम्हाला विचारायला.
'काल संध्याकाळी पण गाडी पाह्यली. काय विशेष? कुठून आलात? मुंबईला कुठे असता? काय करता?'
शूटींगच्या तयारीसाठी आलोय कळल्यावर प्रश्नांचा टोन बदलला. संशय कमी झाला.
'हे जुनं झालंय देऊळ. पार मोडायला आलंय. आता जीर्णोद्धार समिती झालीये स्थापन. लवकरच जीर्णोद्धार होणार देवळाचा! मग तेव्हा शूटींग घ्या तुम्ही. एकदम सुंदर असेल देऊळ.'
असा मोलाचा सल्ला देऊन ते बाइकवीर निघून गेले.

जीर्णोद्धार हा शब्द ऐकून जरा काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालं. चिर्‍याचे खांब दिसेनासे होऊन सिमेंटचे खांब येणार. त्याला ठराविक निळे, पिस्ता, गुलाबी, पिवळे ऑइलपेंट फासले जाणार. शेणाच्या जमिनीऐवजी घसरवणार्‍या चकचकीत फरश्या येणार. सिमेंटची स्लॅब येणार. देऊळ वाटावं म्हणून त्याला उगाच बिर्ला टाइपच्या महिरपी येणार आणि कोकणातल्या मंदीर वास्तुकलेचा अजून एक नमुना धारातीर्थी पडणार.
त्यात समितीतल्या कोणीतरी पैसे खाल्ले तर हे सगळंच काम तकलादू होणार आणि २-४ वर्षातच देवळाला पूर्ण अवकळा येणार. वाईट वाटलं खूप.

परत ३-४ महिन्यांनी कामासाठी त्या भागात जाणं झालं तेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार सुरू झाला नसल्याचं कळलं आणि आम्ही थोडं हुश्श केलं. देवळाकडे चक्कर मारली. आज देवळातली वर्दळ वाढलेली होती. पताका होत्या देवळात लावलेल्या.
07.jpg

गावकर्‍यांशी थोडी प्रश्नोत्तरे झाली. 'मायनिंगवाले नाही. शूटींगवाले आसंत' कळल्यावर लोकांना हुश्श झालं. जीर्णोद्धाराचा विषय निघाला. देवळाच्या सद्य वास्तूकलेचे सौंदर्य आम्ही नावाजत होतो. हे सौंदर्य असंच जपून जीर्णोद्धार केला जाऊ शकतो. असे आर्किटेक्ट लोक आहेत असं काय काय आम्ही आपल्या परीने सांगितलं. हसर्‍या आणि कीवयुक्त चेहर्‍यांनी त्यांनी ते ऐकून घेतलं. याहून आम्ही काय करणार होतो कुणास ठाऊक.

पर्वाच मैत्रिणीचा झारापहून फोन आला. नाणेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू होतोय लवकरच. येत्या महिन्याभरात आलात तर बघायला मिळेल पूर्वीचं मंदीर. मग नाही. अशी बातमी तिने दिली. नाणेली गावाशी माझा तसा काहीच संबंध नसतानाही किंचित अस्वस्थ व्हायला झालंच.

जीर्णोद्धार आणि सौंदर्यदृष्टी यांचा एकमेकांशी संबंध का नसतो? चकचकीत ऑइलपेंटस, गुळगुळीत टाइल्स जमिनीला याच गोष्टीत सौंदर्य भरून राह्यलंय हे कुठे शिकवलं जातं? जुन्या प्रकारचं बांधकाम, जुन्या प्रकारचं अमुक तमुक हे काळाबरोबर लयाला जाणार हे मान्यच पण म्हणून कोणी ताजमहाल नव्याने बांधत नाही ना सिमेंट, ऑइलपेंट, टाइल्स लावून जीर्णोद्धाराच्या नावाखाली की कोणी रेम्ब्राँच्या पेंटींगवर परत नवीन पद्धतीने रंग मारत नाही लेटेस्ट स्टाइल म्हणून. आपली देवळं ही जरी जगातली आश्चर्यं किंवा मास्टरपीसेस नसली तरी त्या त्या वास्तूकलेचा नमुना आहेतच ना. त्या सगळ्या खुणा पारच पुसल्या जाऊन हे असं का आणि कसं होतं?

नाणेलीच्या मंदिराचा जीर्णोद्धार कसा होणार आहे याबद्दल मला अजूनतरी कल्पना नाही. तोपर्यंत 'सुखद धक्काच द्या हो बाप्पा!' अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे नाही का? Happy

- नीरजा पटवर्धन

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

पॅनोरमावाला फोटो आवडला. जीर्णोद्धारावेळी मंदिरांचे वा जुन्या इमारतींचे सौंदर्य जपले जात नाही, हे दु:खदायक आहे.

काळाचा शाप परवडला पण हा जिर्णोद्धाराचा शाप नको अशीच परिस्थिती आहे बहुतेक मंदिरशिल्पांची आपल्या इथे. कळसाला फासलेला रंग दुरून पाहूनच अशावेळी मंदिरात जायची इच्छाच जाते. अशी आडवाटेवरची देवळं तर राहूदे, कोल्हपूरच्या महालक्ष्मीच्या सुंदर देवळालाही किती ठिकाणी बेरुप रंग फासलाय.
सातार्‍याजवळच्या माहूरच्या देवळाचा जिर्णोद्धार मात्र सुखद धक्का होता. तसाच आनंद दिला मध्यप्रदेशातल्या राजा भोजाच्या अतीप्राचिन मंदिराने. जिर्णोद्धार करुन ते भग्नावस्थेतलं देऊळ पुन्हा उभारलं. मात्र आधुनिकतेचा जराही स्पर्श नाही झालेला. ते देऊळ अर्धवट अवस्थेत जसं मुळात होतं तसंच ठेवलय. काही शिल्प सांधली आहेत, नाक, डोळे घडवलेत पण इतके बेमालूम की त्यावरचा प्राचीनत्वाचा ठसा तसाच कायम.

छान फोटोफिचर केलं आहेस नीधप. आवडलं.

होगं शर्मिला..
कोकणातली देवळं ही मुळात वास्तूकलेच्या संदर्भात बघितलं तर खरं इतकी वेगळी आहेत ना इतर ठिकाणांच्या देवळांपेक्षा. प्रसन्नता, साधेपणा आणि शांतपणा हा मूळ भाव आहे त्यात. पण कशाचा काही विचारच नाही.
अर्थात अर्ध्याहून अधिक जीर्णोद्धार कुणानाकुणाचं राजकीय/सामाजिक महत्व वाढवणे/ कमी करणे यासाठीच होत असतात तेव्हा काय अपेक्षा करणार त्यांच्याकडून..

खूप सुंदर फोटोफीचर.
नीधप, आमच्या गावच्या देवळाच्या जीर्णोद्धारात एक पिढी पुढे सरकली.नोकरी आणि संसारात स्थिरस्थावर झाल्यावर माझ्या वडिलांनी काही गावकर्‍यांच्या सोबत जीर्णोद्धार समिती स्थापन केली. ते स्वप्न साकार होईतो ते रिटायर झाले! तेव्हा पैसे फक्त मुंबईकरच द्यायचे. धंदेवाईक राजकारणी नव्हते तोवर. अजूनही गावचे मुंबईकर शोधून शोधून देवळांचा जीर्णोद्धार करताहेत. आण्यांमध्ये गोळा होणारी वर्गणी आता हजारी झालीय.
मुंबईकरांचा कोकणातल्या गावांशी संबंध उरलाय फक्त देवळे आणि उत्सवांपुरता. त्यामुळे गावासाठी काही करायचं म्हणजे देवळांचा जीर्णोद्धार असंच झालंय.

आता कोकणातही पैसा आलाय त्यामुळे आणि कदाचित पर्यटनामुळे जीर्णोद्धारही धंदेवाईक झाला असेल.

सुंदर फोटोफीचर, नीरजा. जीर्णोध्दार झाल्यावर देवळाचं पुरतं वातावरणच बदलतं. कोंकणातील देवळांमध्ये जे शांत, साधे, स्वच्छ परंतु सौंदर्यपूर्ण वातावरण असते ते पार मनाच्या आंतवर जाते खूप. डोळे आपोआप मिटतात. श्वास संथ होतो. विचार सरतात. माणूस आत्मलीन होतो. बाप्पा करो आणि त्या देवळाच्या जीर्णोध्दारात हे वातावरण असेच जपले जावो.

किती हवेशीर आणि मोकळं वाटतय ना इथे. हायवेलगत असणारे रवळनाथाचे
देऊळ (नेमकी जागा नाही सांगता येणार कारण बसमधूनच बघितलेय) पण असेच आहे.

सुंदर.

फोटो, वर्णन सगळेच सुंदर! योग्य पद्धतीने जीर्णोद्धार व्हायला पाहिजे याचा. लाल फुले वगैरे ठेवलेली मुर्ती मस्तच, समोरून बल्ब असता तर अजून चांगला फोटो आला असता (गुरवांना सांगून पाहिले का?) Happy गणपतीच्या खाली पाणी वगैरे वाहून जावे म्हणून ते दगडी पाट्यासारखे काहीतरी दिसते.

तुळशीवृंदावन नेहमी असते का? एक मोठा उंदीर असतो ना सहसा?

कोंकणामध्ये देवळांच्या जीर्णोद्धारांचा आणि त्यासोबत बटबटीत नामफलक उभारण्याचा सपाटा चालू झाला आहे. देवळाभोवती पेव्हरब्लॉक्स्,घाटी चढताना पायर्‍या न बांधता सरळ स्टीप असे पेवरब्लॉक्स, तळ्यात उतरताना पेव्हरब्लॉक्स अशी सगळी मजा आहे. त्यामुळे देवदर्शन होण्याआधीच शेवाळावर घसरून एकदातरी लोटांगण घडतेच.कदाचित जीर्णोद्धारकर्त्यांचा हाच पवित्र हेतू असावा. नाही तर या धोधो पाऊस पडणार्‍या प्रदेशात त्यांनी पावसाचा विचार करून दुसरे कुठले मटीरिअल वापरले असते.

.

छान लिहिलयस. मला रत्नागिरीजवळच्या सड्ये गावच्या आम्च्या कुलदेवतेचं देउळ आठवलं. तसेच सुंदर खांब आहेत. प्रत्येक खांब एकेका घराण्याचा म्हनजे ह्या खांबाशी भिडे टेकणार आणि त्या खांबाशी देसाई टाईप Happy
कोकणातली देवळ खरच स्पेशल आहेत. अकारण भपका नसलेली...

तुळशीवृंदावन नेहमी असते का? एक मोठा उंदीर असतो ना सहसा?<<<
त्यामुळेच हे देऊळ मूळ गणपतीचंच आहे की कसे याबद्दल मला शंका आहे. तसंही गणपतीच्या मूर्तीची शैली आणि देवळाची शैली का कुणास ठाऊक जुळत नाहीये असंच वाटतंय. पण माझा काही अभ्यास नाही यात त्यामुळे माहित नाही.
चिपळूणचं करंजेश्वरीचं मंदिर पाह्यलंय का? मी लहानपणी गेले होते तेव्हाचं मला काही आठवत नाही. पण ४-५ वर्षांपूर्वी गेले होते तेव्हा पाह्यलं तर एखाद्या सोसायटीच्या आवारात मंदिर बांधतात तसं दिसतंय.

नी, फारच सुरेख फोटोफीचर. जीर्णोद्धार = सगळंच मॉडर्न असा हिशेब असतो.

गणपतीच्या मूर्तीची शैली आणि देवळाची शैली का कुणास ठाऊक जुळत नाहीये असंच वाटतंय >>> हो खरच तसं वाटतय. मूर्ती दक्षिणेच्या स्टाईलची वाटतेय.

वरळीला अ‍ॅनी बेझंट रोडवर ग्लॅक्सोच्या समोरच एक जुनं शंकराचं देऊळ आहे. बाहेर प्रचंड ट्रॅफिक सतत सुरू असतो पण आतमध्ये एकदम कोकणात आल्याचा फील येतो. तिथल्या दीपमाळेच्या चौथर्‍यावर बसून जिवलग मैत्रिणीशी कित्येक गप्पा मारल्या आहेत. आता तिथे जीर्णोध्दाराची पाटी झळकत आहे. Sad

छान!

Pages