माझ्या आतली धारावी शोधून पहाताना.

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

ज्यु.कॉलेजमधे असताना पहिल्यांदा धारावी मधे गेले होते. लेदरच्या वस्तू तिथे खूप छान आणि स्वस्त मिळतात हे ज्ञान नुकतंच झालं होतं. इरॉसच्या बाजूच्या क्रॉसमैदानाबाहेर एक जण लेदरच्या ऍक्सेसरीज घेऊन बसायचा. त्याच्या कडच्या देखण्या हॅन्डबॅग्जमधली एक चामड्याच्या बारिक पट्ट्या चटईसारख्या विणून केलेली मोठी गोल झोला स्टाईल बॅग खूपच आवडली होती पण किंमत तेव्हाच्या दोन महिन्यांच्या पॉकेटमनीइतकी होती.
म्हणून मग धारावी.
अर्थातच तोपर्यंत घरुन कोणकोणत्या गोष्टी करायला परवानगी मिळते हे ठाऊक झालेलं असल्याने मी धारावीला जाणार आहे हे घरच्यांच्या कोणाच्या कानावर मी घालायची शक्यताच नव्हती.
शिवाय धारावी तशी अनोळखी नव्हतीच. दादरहून पार्ल्याला येताना तेव्हा माहिमचा बायपास नसल्याने सायनवरुनच यायला लागायचे आणि मग तो तीव्र गंध नाकात शिरला की गाडीच्या काचा वर करायची धांदल उडायची. इतक्या तीव्र घाण वासात माणसं चोविस तास कशी राहू शकतात याचं कुतुहल वाटायचं.मग खूप नंतर तो वास तिथे चालणा-या टॅनिंगचा हे कळलं होतं पण त्यावेळचा तो विशिष्ट वास धाराविचा म्हणजेच झोपडपट्टीचा म्हणून नाकात बसलेला.
बंद काचांमधूनही धारावी दिसायचीच.
माहिमच्या कचरा डेपो आणि डंपिंग ग्राऊंडवर कचरा गोळा करणारी मुलं दिसायची. ती आपापसात सतत मारामा-या करत असायची. ती धारावीची हे माहित होतं. दुसरी कुठली असूच शकत नव्हती. आमच्या इथे अंगण झाडायला येणा-या तेलुगू लक्ष्मीअम्माचा मुलगा धारावीत भंगाराचं काम करतो आणि खूप पैसे मिळवतो असं ती अभिमानानं सांगायची. माझी आजी तिला आमचे जुने टिशर्ट्स वगैरे द्यायची. मग गाडीच्या बंद काचांमधून धाराविची ती मुलं पहात असताना त्यातला कोणता लक्ष्मीअम्माचा ते ओळखण्याचा अजूचा आणि माझा खेळ असायचा. ज्याच्या अंगावर आपला जुना टिशर्ट दिसेल तो तिचा मुलगा असलं काहीतरी. अर्थातच तो कधी ओळखता आला नव्हता कारण त्या मुलांच्या अंगावरच्या कपड्यांचा रंगच कधी दिसला नव्हता.
धारावीची मुलं लोकल ट्रेन्समधेही भेटायची. ट्रेनमधे विकायला येणारे चिप्स, सळया वगैरे खायचं नसतं कारण ते धारावीत बनवलेलं असतं, रस्त्यांवरच्या छोट्या दुकानांमधले च्युईंगगम्स गोळ्या मागायच्या नाहित कारण ते धारावीत बनतं याची दहशत मनात नक्की कधीपासूनची ते आठवत नाही पण आठवत नव्हतं तेव्हांपासूनच धारावीला असं अंगाबाहेर ठेवायला आम्ही शिकलो होतो. कुणीच मुद्दामहून शिकवलं नव्हतं. पण आम्हा सगळ्याच मध्यमवर्गिय मुंबईकरांच्या ते जणू जन्मत:च रक्तात भिनल्यासारखं.

लेदरच्या वस्तू विकत घेण्यासाठी मग त्यादिवशी अख्खी दुपार धारावीत घालवली. भरपूर खरेदी झाली. चर्चगेटच्या त्या एका पर्सच्या किंमतीत इथे पर्स,सॅन्डल्स,वॉलेट,बेल्ट इतकी खरेदी झाली.अजूसाठी एक लेदर जॅकेट घ्यायचा विचार केलेला पण घासाघिसीची कमाल मर्यादा गाठूनही किंमत जास्त होती आणि तितके पैसे उरले नव्हते.
मग त्या टपरी दुकानातला एक छोटा मुलगा म्हणाला दिदि थोडा और अंदर चलो. उधर आधे दाम मे मिलेगा. खरेदीच्या नादात आजूबाजूला काही पाहिलच नव्हतं. त्याच्या सोबत थोडं आतपर्यन्त चालून गेले आणि सगळी धारावी संपूर्ण बकालपणासह अंगावर चालून आली. असुरक्षिततेच्या एका लाटेसह. मग वाटेतले वेडेवाकडे पत्रे,काचा ओलांडत ज्या वेगाने मी बाहेर पडले होते तो वेग अजून पावलांना जाणवतो.

झोपडपट्ट्या तशा मुंबईत काही कमी नव्हत्या. बांद्र्याचा फ़्लायओव्हर झाला नव्हता तेव्हा कलानगरचा झोपडपट्टयांचा समुद्र टाळून पुढे सरकताच यायचं नाही. बोरिवली नॅशनल पार्क बाहेर किंवा लांब कशाला तेव्हा जवळच्या एअरपोर्टपाशीही काही कमी झोपड्या नव्हत्या. शिवाय कुठे सोलापूर वगैरेजवळच्या दुष्काळामुळे मुंबईत जगायला आलेल्यांची पालं जोगेश्वरी किंवा अंधेरी फ़्लायओव्हरपाशी पडायची. त्याही झोपड्याच होत्या. पण धारावी जशी सतत भेटत गेली तसं इतर कोणीच नाही.

कॉलेजच्या लास्ट इयरला असताना एका प्रोजेक्टच्या निमित्ताने धारावीत पहिल्यांदा आत पाऊल ठेवलं. तिथल्या कुंभारवाड्यातली सुबक देखण्या पणत्यांनी भरुन गेलेली गोल वर्तुळं, रंगिबेरंगी पतंगांच्या माळा, लालभडक सुकवत टाकलेल्या मिर्च्यांच्या आणि पिवळ्याधमक गोल पापडांच्या रांगा यांचे आम्ही घेतलेले फोटोग्राफ्स इतके देखणे होते की आमच्या प्रोजेक्टला पहिलं बक्षिस मिळालं.
त्या प्रोजेक्टच्या वेळी दिल्लीहून शिकायला आलेली एक मैत्रिण हमारे यहां शहर के बिच नही रहति इतनी गंदगी म्हणत नाक मुरडताना पाहिली तेव्हां पहिल्यांदाच प्रचंड राग आला. म्हणजे गंदगी आहे हे माहितेय. पण तु कशाला बोलून दाखवतेस आणि वर नाक मुरडतेस आमच्या शहराला. जा दिल्लीतच जाऊन कर तुझा प्रोजेक्ट असं तेव्हाचं फ़िलिंग लख्ख आठवतय.
अजूचं लग्न झाल्यावर प्राचीला घेऊन मी एकदा परत लेदरच्या वस्तूंसाठी तिथे गेले तेव्हा आता सायन स्टेशनबाहेरच त्या लोकांनी आपली दुकानं आणलेली पाहिली. धाराविच्या आतपर्यन्त जायची गरज नव्हती. दुकानात चिक्कार फ़ॉरेनर्स होते. मधल्या काळात धारावी आणि धारावीत येणारी माणसं बरीच बदललेली दिसली. प्राची इंदोरची होती. धारावी बाहेरुनच बघूनही ती खूपच थक्क झाल्यासारखी दिसली पण तशी ती सेंटॉरच्या लॉबीतल्या शॉप्सना बघूनही झाली होती. मुंबईबाहेरुन आलेल्या कोणाचीही ती टिपिकल प्रतिक्रिया तोपर्यन्त ओळखिची झाली होती.
नंतरच्या काळात कधी माझ्यासोबत सुट्टीत कोणी परदेशी मित्रमैत्रिणी यायचे तेव्हा धारावीत गेले होते काही निमित्तांनी. एथनिक फोटोसाठी हमखास कुंभारवाड्यात नेलं की तिथली सुरेख भांडी भुरळ घालायचीच.

मग अनुपम माझ्यासोबत मुंबईला आला तेव्हा त्याने तिथे जाऊन कातडी कमावताना वापरात येणा-या रसायनांच्या आणि डंपिंग ग्राउन्डवरील घातक मेटल, पा-याच्या प्रदुषणावर एक मोठं शूट केलं तेव्हा त्याची एडिटेड प्रिन्ट पहिल्यावर जबर धक्का बसला. ते तिथे होतच आधीपासून! आपली किती सिलेक्टिव्ह साईटींग असते आणि बघायला आवडत नाही ते बघायचं आपण किती बेमालूम टाळतो हे जाणवून बसलेला तो धक्का होता. कॅमेरा काहिच लपवत नाही. लपवलं नव्हतंच. त्याने ही डॉक्यू तिकडे देऊ नये असं पहिल्यांदा तीव्रतेने वाटलं. तसं त्याला सांगितल्यावर तु धारावीच्या मातीची भांडी बनवणा-यांवर पंचवीस मिनिटांची फ़िल्म खर्च केलीस त्यापेक्षा माझी बारा मिनिटांची फ़िल्म जास्त महत्वाची आहे, त्या लोकांसाठी सुद्धा. या आर्ग्युमेन्टवर बोलण्यासारखं काही नव्हतंच आणि ते पटलही होतं. पण अस्वस्थ वाटायचं राहिलं नाही ज्या दिवशी स्क्रिनिंग होतं तेव्हा पाहिलीय मी आधी असं म्हणत त्या सगळ्या ’बाहेरच्या’ लोकांसोबत बसून बघायचंही टाळलं.

त्यानंतर आत्ता स्लमडॉगमधून परत एकदा धारावी दिसली.
अक्षरश: दिसली.
चित्रपटातून धारावी दिसणं खरंतर आता नविन राहिलं नव्हतं. चक्र पासून सलाम बॉम्बे, सत्या अगदी धारावी नावाच्या सिनेमातून सुद्धा माधुरी दिक्षितच्या पलिकडेही ती दिसली होती.

एसडिएम मधेही धारावी या सा-या फ़िल्म्सप्रमाणे स्क्रिप्टचा एक भाग म्हणून दिसली.
पण दिसली ती धारावीतल्या सगळ्या जीर्ण, खडतर, अभावग्रस्त बकालपणासकट संपूर्ण.

डंपिंग ग्राउन्डवरचं त्यांचं जगणं, लोकल ट्रेन्स मधून काहीबाही विकणं, चोरी करणं, टपावरुन प्रवास, उन्हातानात पावसाळ्यात जगण्यासाठी धडपड, हॉटेल कॉल सेन्टरमधल्या फ़ुटकळ नोक-या, एखाद्याला सेवा पुरवण्याची गरज, लहान मुलांना पळवून भिक मागायला तयार करणे, दंगल, जाळपोळ यासकट दाहकपणे धारावी समोर दिसली.

जशी मला आत्तापर्यन्त दिसली होती काचेआडून किंवा कडेकडेने बाहेरून ती आणि जी दिसली नव्हती कारण मी पहायचं टाळलं होतं ती सुद्धा.
फक्त मलाच नाही माझ्याबरोबर सा-या जगालाही दिसली.

तिने मनोरंजन केलं आणि (म्हणूनच) खिन्नही केलं.

मातीचे दिवे आणि रंगित पतंगां पलिकडची धारावी सगळ्या जगाने बघितली म्हणून मला काय वाटलं? आणि काय वाटायला हवं होतं?

सिनेमा पाहून झाल्यावर मी खूप दिवस विचार करायचंच टाळलं.

सिनेमा चांगला आहे. पण अगदी ’पहायलाच हवा’ असं तीव्रतेने दुस-याला सुचवावसं वाटेल इतका काही नाहीये, पाच स्टार जास्तच झाले तीन ठिक आहेत इतपतच सावध प्रतिक्रिया देत गप्प बसले.
पण तरीही कुठेतरी मनातल्या मनात घरातलं दारिद्र्य, कमीपणा घरातच रहायला हवं होतं, ते बाहेरच्यांना मुद्दाम का उघडं करुन दाखवावं ही इन्स्टन्ट मधयमवर्गिय प्रतिक्रिया माझीही होतीच.
पण मग बाहेरच्यांना आत्तापर्यन्त मी सुद्धा धारावी काय कमी दाखवलि होती? जशी आणि जितपत मला दिसली होती, झेपली होती ती धारावी मी माझ्या कुवतीनुसार बाहेरच्यांना नव्हती दाखवली?
धारावी मुंबईच इतकं एक अविभाज्य अंग की मुंबई दाखवताना ती दिसणं अपरिहार्यच हेही माहित होतं.

मला धारावी चित्रपटातून दिसल्याची लाज वाटली होती कां? नाही.
धारावीतली जगण्याची धडपड लाचार किंवा लाज वाटणारी कधीच नव्हती. गेटवेला परदेशी लोकांसमोर हात पसरुन भिक मागणा-या मुलांना एका रांगेत उभं करुन त्यांचे फोटो काढताना एका परदेशीला पाहून झालेला जिवाचा संताप, वाटलेली शरम आणि घृणा एसेमडि मधल्या धारावीला पाहून नक्कीच वाटली नाही.

झोपडपट्टी, गरिबीच्या दर्शनाने बदनामी झाली असं वाटलं कां?
पण मग गरिबीचे प्रदर्शन काय आत्त्ताच झालेय? संयुक्त राष्ट्रसंघाचे कित्येक अहवाल, भारतातील कुपोषण, बालमृत्यू, रोगराई, दारिद्यरेषेखालची कुटुंबे, भ्रष्टाचार यातून आपली गरिबी जगाला कधीच कळलेली होती.लाज वाटायचीच होती तर तिकडचे मिशनरीज, सेवाभावी संस्था इथे येऊन काम करतात, औषधे अन्न कपडे वाटतात ते घेताना, पहाताना लाज वाटायला हवी होती.
आपले हिंसाचार, पोलिसी अत्याचार, भ्रष्टाचाराने भरलेले देशी सिनेमे परदेशातही दाखवले जातात, ते गाजतात तेव्हाही बदनामी झाली असं वाटायला हवं होतं.

पण मग आत्ताच कां? काय वाटतय मला? आपल्याच शहरातल्या धारावीला आता जगासमोर उघडे केलेले पाहून?

मला माझ्या खूप आत डोकावत त्या धारावीला पाहून मला नक्की काय वाटतय ते शोधायलाच हवं होतं.
आणि ते समजलं. माझ्यापरिने मी ते समजून घेतलं.

माझ्यात काही कॉम्प्लेक्सेस आहेत, काही न्य़ुनगंड आहेत. आणि ते कशामुळे आहेत, माझ्यातल्या कोणत्या उणिवांमुळे आहेत, किंबहुना ते आहेत याचा थांगपत्ताही कोणाला लागू न देता मी आत्तापर्यन्त जगले. तो लागलेला नाही या समजात जगले. तो न्यूनगंड लपवून इतर ब-याच माज करता येण्यासारख्या गोष्टींचा शो ऑफ़ करत सुखाने मस्तीत जगले.
आणि अचानक कोणीतरी त्यावर बोट टेकवलं, माझ्यातला तो आत्तपर्यन्त मी लपवलाय असा वाटलेला कॉम्प्लेक्स अचानक त्याने उघडा पाडला. मी दुखावले. मी संकोचले.
मी हे विसरले की त्या उणिवा होत्याच. माझा एक भाग म्हणूनच होत्या. आहेत.
माज करायचा, शो ऑफ़ करायचा तर त्या उणिवांसकटच करायला हवा नां?
लोकांसमोर इतर गोष्टी मिरवल्या अभिमानाने त्यात ती का लपवायची? माझाच एक भाग असलेली ती उणिव.
माझ्या शहरातली धारावी.
कसली लाज आणि कशाला राग.
तिच्यासकटच मी आहे.
ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.

विषय: 
प्रकार: 

ट्युलिप सुन्दर लेख आहे अंतर्मुख करायला लावणारा

टुलिप खुप सुरेख लेख आहे.
एका देशाच्या उणिवांच प्रदर्शन दुसर्‍या देशातल्या माणसानं प्रसिध्दीसाठी करावं ही चीड आणणारीच गोष्ट नाही का? याबाबतीत "झाकली मुठ सव्वा लाखाची" असं नको पण 'If you have wounded arm, keep it under your sleeve"(आतल्या आत जखमेवर उपचार मात्र चालु असावेत) असं असावं असं मला वाटतं. उणिवेच्या प्रदर्शनापेक्षा ती दुर करण्याचे प्रयत्न जास्त माणुसकीचे नाही का?

ट्युलिप, छान लिहिले आहेस.

मला चित्रपट आवडला. त्यात खोटे काय-काय दाखवले आहे? त्यात पुन्हा तो एक चित्रपट आहे. सत्यकथा आहे असे कोणी म्हंटले आहे? जर चित्रपट इतका झोंबत असेल तर त्यात थोडेतरी सत्य असले पाहिजे. आणि ते सत्य अप्रिय असेल तर बदलायला हवे. त्यापैकी काही भाग तरी तिथे रहाणार्यांच्या हातात नसतो. तुमच्या-आमच्या सारखे त्याबद्दल जास्त काही करु शकतील, करायला पाहिजे.

त्यातुन पुन्हा चित्रपटातुन एक पॉझिटिव्ह एनर्जी (पात्रांमध्ये) उत्सर्जीत होतांना दिसते. ती घ्या, त्या (आणी इतर अनेक चित्रपट न बनलेल्या) समस्यांवर विचार, आणी जमल्यास कृती करा. पण इतरांना पहायला जरुर सांगा. शक्य आहे की त्यांच्यातील कोणी काही करेल ...
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

छान, अगदी मनापासून लिहिलं आहेस. मुंबई जशी आहे तशी ती मलाही भावते. ठाण्याहुन बहिणीच्या घरुन बांद्र्याला माझ्या अपार्टमेंटवर जाताना असंख्य वेळा धारावी ओलांडुन गेले आहे. कधी मुख्य रस्त्यावर गर्दी म्हणुन रिक्षावाले मधुनच कुठे तरी घुसवायचे. सुरुवातीला जाम भीती आणि घाण वाटायची. एकुणच मुंबईत नव्याने तिथले निरनिराळे वास नको नको होत. पण मग नंतर सवयीचे होउन गेले. आणि आता तर एअरपोर्टमधुन गाडी बाहेर आली नी तो ओळखीचा वास आला की एकदम छान वाटते Happy

जोधा अकबर पण तुझ्या नजरेतून पाहिल्यामूळे जास्त भावला >>> अश्विनीला अनुमोदन Happy

लेख मस्तच...

एअरपोर्टमधुन गाडी बाहेर आली नी तो ओळखीचा वास आला की एकदम छान वाटते स्मित >>> सिंडे.. हे तुझ्या मुंबईवरील निस्सिम प्रेमाची पावती देतं... पण हे खर आहे.. हा वास नाकात घुसला की.. चला घरी आलो, अस वाटतं Happy

चला इथेपण वाद सुरू ,,,मायबोलीवर आल्या सारखं वाटल... Happy

ट्युलिप नेहमीप्रमाणेच वाचावंसं वाटणारं लिहीलंयस. हा मुव्ही बघितल्यावर कुठल्याही विचारी माणसाची जी द्विधा मनस्थिती होते ती अगदी व्यवस्थित मांडलीयस. अगदी असंच होतं बघून. आधी राग मग हा विचार की खरं तर आहे की हे सगळं. याचा राग येणं हा दांभिकपणा आहे. हे आहेच. त्याला आपण इतक्या वर्षात उखडून टाकू शकलो नाही. आता कुणी दाखवलं की शरम, संताप होतोय पण ते आहे हे आपण नाकारू शकत नाही.
शिवाय आपल्या इथल्या पण लोकांनी हे दाखवलंय हे.
मुव्ही ऑस्करला पोचला म्हणून तो इथं तयार होणार्‍या इतरांपेक्षा खूप ग्रेट असं काही वाटलं नाही.
तरीही कुठंतरी हे जाणवत रहातं की फक्त हेच का? बाकी काहीच का नाही?
ठरवून सगळ्या वाईट गोष्टीच का? आणि मग शेवट करायची वेळ आल्यावर आतापर्यंतच्या हिशोबात न बसणारं अतार्किक वळण अगदी बॉलीवुड स्टाईल ने का?
या सगळ्यातून भारताची एक प्रतिमा बाहेरच्या जगाला दिसते हे आपण नाही विसरू शकत.
तुमच्या घराचे जरा फोटो काढू का म्हणत आलेल्या प्रोफेशनल फोटोग्राफरने कोपर्‍यातल्या कोळ्यांच्या जाळ्यांचे, धोब्याला द्यायला काढून ठेवलेल्या बेडवरच्या कपड्यांच्या ढिगांचे, बाल्कनीत पडलेल्या एखाद्या जुन्या तुटक्या चपलेचे, बाथरूमच्या जाळीला अडकलेल्या केसांचे, किचनच्या कोपर्‍यातल्या फाटक्या टेबल पुसायच्या फडक्याचे , कपाटाखालच्या धुळीचे (च फक्त) फोटो काढून खाली सोसायटीच्या नोटिसबोर्डावर लावले तर कसं वाटेल?
पण या निमित्तानं तू जी धारावी मांडलीस ती अप्रतीम. लिहीत जा गं.

संघमित्रा अगदी हेच मला म्हणायचं होतं. इतक्या नेमकेपणानं मांडता आलं नाही Sad .टयुलिप नं तर (कपड्यांच्या) ट्रायल रूम मध्ये स्वतःला सगळ्या कोनांमधुन बघतो तसं आपलेच विचार सगळीकडुन तपासल्यासारखं लिहिलय. तेव्हा परत एकदा लेख खुप आवडलाय , जाणवला आणि पटला.

ट्युलीप अप्रतिम लिहिलं आहेस..
स्वतःमध्ये असलेल्या उणीवां सकट आनंदाने जगणं..... किती छान सांगितलस.. माहित होतं हे आधीच. पण एकदम अवघड प्रश्नाचं सोप्पं उत्तर सांगितलस.
-----------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

संघमित्रा ला अनुमोदन, अगदी हेच होतय भारताच्या बाबतीत.
ट्युलीप, मनाची घालमेल अप्रतिम मांडली आहेस.

संघमित्रा,

अगदी योग्य मुद्दा...

>>तरीही कुठंतरी हे जाणवत रहातं की फक्त हेच का? बाकी काहीच का नाही?
>>ठरवून सगळ्या वाईट गोष्टीच का? आणि मग शेवट करायची वेळ आल्यावर आतापर्यंतच्या हिशोबात >>न बसणारं अतार्किक वळण अगदी बॉलीवुड स्टाईल ने का?
>>या सगळ्यातून भारताची एक प्रतिमा बाहेरच्या जगाला दिसते हे आपण नाही विसरू शकत.
>>तुमच्या घराचे जरा फोटो काढू का म्हणत आलेल्या प्रोफेशनल फोटोग्राफरने कोपर्‍यातल्या कोळ्यांच्या >>जाळ्यांचे, धोब्याला द्यायला काढून ठेवलेल्या बेडवरच्या कपड्यांच्या ढिगांचे, बाल्कनीत पडलेल्या >>एखाद्या जुन्या तुटक्या चपलेचे, बाथरूमच्या जाळीला अडकलेल्या केसांचे, किचनच्या कोपर्‍यातल्या >>फाटक्या टेबल पुसायच्या फडक्याचे , कपाटाखालच्या धुळीचे (च फक्त) फोटो काढून खाली >>सोसायटीच्या नोटिसबोर्डावर लावले तर कसं वाटेल?

ट्युलिपचा लेख चांगला आहे, पण एकच बाजू मांडली आहे, भारताची गरिबी दाखवायला विरोध एवढाच उथळ मुद्दा नाही, चित्रपटात काय दाखवले आहे याला बरेच आयाम आहेत आणि ते दाखवणे हा ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा प्रश्न असला तरी त्याला ऑस्कर मिळाल्यावर जणू भारताचाच विशेष गौरव झाल्याचे जे ढोल मिडिया पिटत आहे आणि त्या तालावर अनेकांना आनंदाने नाचावेसे वाटत आहे ते भारतीयांसाठीतरी मूर्खपणाचे आहे.

केवळ ऑस्कर मिळाल्याने ए आर किंवा गुलजार मोठे झाले नाहीत हे खरे असले तरी भारतीयांना मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराने मात्र आनंद होणे स्वाभाविक आहे. अमेरिकन चित्रपट्सृष्टीतील एक मानाचा पुरस्कार भारतीयाला मिळतो हे अभिमानाचेच आहे.

ट्युलीप,
छान लिहीले आहे.आपल्यातली त्रृटी दुस-याने दाखवून दिल्या तर आपल्याला वाईट वाटायला पाहीजे कि नाही ह्याचे तूझ्यामनातील द्वंद सुरेख उमटले आहे लेखात.
आम्हाला शाळेत संस्कृतमधे 'वयम पंचाधिकम शतम' असा एक धडा होता. त्यात पांडव असं म्हणतात कि आमच्या आमच्यात आम्ही ५ आणि ते १०० आहेत. आम्ही वेगवेगळे आहोत. आमच्यात भांडण आहे. पण जगासमोर बाकी कुणाशीही लढतांना आम्ही १०५ आहोत. 'वयम पंचाधिकम शतम'.
त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःतील दोष, वैगुण्य, त्रृटी, भांडणे हे ठाउक असते, पण आपल्याला त्याचे जगासमोर प्रदर्षन करणे आवडत नाही. आणि त्यातुन त्या दुस-या व्यक्तीने जगासमोर मांडल्या कि आपल्याला त्रास होतो. जगासमोर दुस-या व्यक्तीने ते मुद्दामुन दाखविले आहे, आपली थट्टा उडविण्याकरिता असे आपल्याला वाटते. हे वाटणे चुक कि बरोबर ठाउक नाही.
आता अशेच विषय चित्रपटाकरिता निवडण्यामागे काही ठराविक हेतू ह्या परदेषी, गो-या लोकांचा असतो का, हे देखिल जाणुन घेतले पाहीजे. अशे विषय निवडणे सहेतुक असते का? असेल किंवा नसेलही. Happy

हा लेख मला एकांगी नाही वाटला, उलट समतोल वाटला.
शेवटी, स्लमडॉग हा काही भारतीय सिनेमा नाहीय. एका ब्रिटिश निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने पाश्च्यात्त्य प्रेक्षक- वर्गासाठी काढलेला तो सिनेमा आहे. तिच्यांत भारतीय अभिनेते आहेत, संगीतकार भारतीय आहे आणि चित्रीकरण मुम्बईच्या धारावींत झालंय एव्हढंच.
पाश्च्यात्त दृष्टिकोनांतून, विकसनशील देशांतल्या, प्रचंड वेगाने फुगत असलेल्या शहरांतल्या झोपडपट्टीच्या सामाजिक, आर्थिक वस्तवावरची ती कॉमेंट्री आहे. पण ती पार्श्वभूमी आणि ते वास्तव रंजक करण्यासाठी एक 'सिंड्रेला' टाईपची परीकथा माध्यम किंवा वाहन म्हणून घेतली आहे. ही गोष्ट धारावींतच कशाला, कोलकत्ता, मेक्सि्को, ब्राझिल किंवा बांगला देश मधे सुद्धा घडलेली दाखवली असती तरी चालले असते. मुद्दा धारावीचा नाहीच आहे. धारावी हे एक उदाहरण आहे किंवा प्रतीक आहे. बकाल वस्तींत राहूनही एक सकारात्मक जीवनशैली अवलंबणार्‍या व्यक्ती आहेत आणि त्या जीवनांत यशस्वीसुद्धा होउ शकतात, हे दिग्दर्शकाला सांगायचे आहे. मला वाटतं की त्या प्रयत्नांत तो बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. माध्यम परीकथेचे असल्याने, स्लमडॉग म्हणजे एक गंभीर सोशल कॉमेंट आहे असे वरकरणी जाणवत नाही. पण भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने तो सिनेमा काढला आहे असं मला तरी वाटलं नाही.
काही वर्षांपूर्वी येऊन गेलेला 'चक्र' सिनेमा जयवंत दळवींच्या त्याच नावाच्या कादंबरीवर काढला होता. त्यांतलं झोपदपट्टी-जीवनाचं चित्रण स्लमडॉगपेक्षा अधिक वास्तववादी आहे, जास्त विदारक आणि ह्रुदयद्रावक आहे. 'चक्र' मुळे भारताची बदनामी झाली असा आक्षेप येऊ शकतो. फक्त तो सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला नाही त्यामुळे असेल कदाचित पण तेंव्हा तशी फारशी वादावादी झाली नव्हती. वासूनाका, चक्र, इ.कादंबर्‍यांच्या भाषेवरून मोहोळ आधीच उठलं होतं आणि शमलंही होतं.
आमची संस्कृती, परंपरा यांच्या नावाने गळे काढणार्‍या लोकांविषयी मी इतकेच म्हणेन की 'वॉटर' सिनेमांत बालविधवांच्या वाटेला आलेल्या जीण्याचं जे दर्शन घडतं तेही आपल्या थोर परंपरेचं आणि महान संस्कृतीचाच एक हिस्सा आहे ना? अशी लाजीरवाणी वास्तवं हरेक देशांत, हरेक समाजांत असतातच. त्यांचं आस्तित्व नाकारून कसं चालेल? अगदी अमेरिकेतल्या नीग्रोंच्या दयनीय जीवनावर कथा-कादंबर्‍या आल्या, चांगले-चांगले चित्रपट आले पण अमेरिकन समाज व्यक्तीस्वातंत्र्याच्याबाबतींत अधिक उदार असल्याने 'हे आमच्या संस्कृतीचं विडंबन आहे किंवा बदनामी आहे' अशी हाकाटी तिकडे झाली नाही. त्यामानाने आपला समाज कितीतरी संकुचित मनोवृत्तीचा असल्यामुळे आपल्याकडे टीकेचे पूर वहातात.
त्यांतून 'सामाजिक दहशतवादा'चे एक नवे भूत हल्ली उभे ठाकले आहे. त्यामुळे, 'घाशीराम कोतवाल' चे प्रयोग होउ देणार नाही, 'सखाराम बाईंडर' चे प्रयोग कसे होतात पाहू अशा गर्जना केल्या जातात, निदर्शनं [काही वेळा हिंसक] होतात. अलीकडच्या अशा प्रकारच्या काही घटना म्हणजे भांडारकर इन्स्टीट्यूटची जाळपोळ, कुमार केतकरांच्या घरावर झालेला हल्ला किंवा आनंद यादवांना त्यांची 'संत-सूर्य' कादंबरी मागे घ्यायला लावणं ... हे सगळं पाहीलं की वाटतं, 'कशाला त्या तालीबान्यांना नाकं मुरडायची? आपला समाजही त्याच वाटेने निघाला आहे.'
ह्या संदर्भांत, मला एक गोष्ट आठवते. एका पार्टींत, एका सदगृहस्थांच्या पँटची झिप चुकून उघडी राहिल्याचं एका पाहुण्याच्या लक्षांत आलं, म्हणून त्याने त्या सदगृहस्थाला एका कोपर्‍यांत घेऊन जाऊन त्याच्या कानांत हळूच ते सांगीतलं. त्यावर ते सदगृहस्थ म्हणाले, " पँट माझी, झिप माझी, तुम्हाला ह्या नसत्या उठाठेवी कशाला? " आपल्या समाजाची मानसिकता ह्यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे स्लमडॉगवर आगपाखड होत असावी!

बापू करन्दिकर

धारावीच्या कुंभारवाड्यात मी गेलोय २ वेळा.. एकदम सुंदर आहे ते.. मोठ्या कुंड्या घ्यायच्या असतील तर मी तिथे नक्की जातोच.. Happy आता एकदा फोटो काढायला जायला हवे.. Happy

धारावी मुंबईची एक जीवनरेखा आहे हे अनेकांना मुंबईत राहून ठावूक नसते.. Happy अनेक वस्तू स्वस्तात बनवणे, दुरुस्त करणे आणि मुख्य म्हणजे कचरा व्यवस्थापन हा एक धारावीचा मुख्य भाग आहे. मुंबई मधले बहुतेक प्लास्टिक, मेटल, वापरलेल्या काचा धारावीत येतात आणि तिथून हे सर्व महाराष्ट्रासकट देशातील अनेक भागात पुन्हा पुरवले जाते.

खूप खूप छान लेख...
स्लम डॉग नाही पूर्ण पाहु शकले बंद केला...पण तुझ्या नजरेतून धारावी पाहताना तुझी निरिक्षणं/टिपणं आवडली.....
तू धोबी घाट पाहिलास का? त्यावरही तू लिहिलंस तर वाचायला नक्की आवडेल...

वाह !
मागे एक रोमँटिक ललित वाचलेलं. त्याआधी कॉलेजच्या कॅण्टीनच्या झाडाबद्दलचं मनोगत वाचलं होतं. पण धारावीसारखा विषय.... दुसरं कुणी असतं तर ठेवून दिला असता लेख ! पण या लेखात सुरूवातीपासूनच लेखिकेने आपल्या कॅमे-याने धारावी दाखवत नेली आणि कॅमे-याच्या लेन्स पलिकडे ती धारावी जशी लेखिकेच्या मनाला स्पर्शून गेली तशीच वाचकांना. टिपीकल मध्यमवर्गिय प्रतिक्रियांमागचा विचार समजावून घेताना हे चिंतन केवळ लेखिकेचं राहीलंच नाही..

दाद प्रमाणेच मी तुमचाही प्रचंड फॅन झालो आहे. लिहीत रहा. तुमच्यासाठी माबोवर यावंस वाटतं.

बेस्ट. अंतर्मुख करायला लावणारं

माझाच एक भाग असलेली ती उणिव.
माझ्या शहरातली धारावी.
कसली लाज आणि कशाला राग.
तिच्यासकटच मी आहे.
ति आहे आणि तरी इतरही मी आहेच.>>>>>>>> पोचलं, भिडलं. मस्तच

मी हा सिनेमा पाहीला नाही. पुस्तकही वाचले नाही. त्यामुळे त्याबद्दल No Comments

पण हा लेख खूपच आवडला. शेवट सुंदरच!!!

Pages