उपवास विचार

Submitted by अर्चना दातार on 12 June, 2011 - 03:50

आपल्या नित्याच्या जीवनात निरनिराळ्या व्रतोत्सवांच्या निमित्याने निरनिराळे उपवास केले जातात. उपवास हे अनेकवेळा व्यक्तिगत पातळीवर आणि काहीवेळा सामजिक पातळीवरही केले जातात. उपवास हे एक साधे आणि सर्वसामान्याना करता येण्यासारखे व्रत आहे. उपवासचा सर्व् सामान्य अर्थ म्हणजे काही काळ अन्न , पाणी वर्ज्य करून राहणे होय. आरोग्याच्या दृष्टीने उपवास म्हणजे लंघन होय. उपवास हि धार्मिक आचरणातील एक शिस्त आहे. तन- मनाची शुद्धी आणि धार्मिक आचरण या दृष्टीकोनातून उपवास केला जातो. उपवास विचार फार प्राचीन काळापासून केला गेला आहे.
पापकर्मापासून निवृत्त झलेल्या माणसाचा सद्गुगुणांसह वास म्हणजे उपवास. यात सर्व भोग( खानपानदि) वर्ज्य करावयाचे असतात. सर्सामान्यपणे उपवासाचा अर्थ मित आहार घेणे असाच करतात. उपवास हा पापक्षालनाचा एक मार्ग आहे. उपनिषद काळात जाणत्या लोकांना उपवासाचे महत्व ज्ञात होते. बृहद अरण्यात परमेश्वराजवळ जाण्याचे जे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यात उपवासाचाही निर्देश आहे. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप व उपवास हे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आहेत असे शास्त्र सांगते. तपाच्या विविध प्रकारात उपवास हा मुख्य व श्रेष्ठ आहे. महाभारताच्या अनुशासन पर्वात निरनिराळ्या प्रकारचे उपवास व त्यांची निरनिराळी फळे यांचे वर्णन केले आहे. या सर्व फळांचे तात्पर्य स्वर्गप्राप्ती हेच आहे. शास्त्राप्रमाणे नक्तभोजन, भात वगळून हविष्यान्न, फळे, तीळ, दूध, पाणी, तूप, पंचगव्य व वायू भक्षण करून केलेला उपवास प्रशस्त होय. उपवास काळात अंजन, गंध, पुष्प, माला अलंकार, तांबुल, दिवसा निद्रा, अति जलपान या गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत.
काही कारणाने व्रती मनुष्यास उपवास करणे शक्य नसेल तर त्याचा प्रतिनधि उपवास करू शकतो. पती, पत्नी एकमेकांचे व्रत घेऊ शकतात.
उपवास करण्याचा मुख्याविधी म्हणजे उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री भोजन करून नये. भोजन करणे आवश्यक असल्यास पहिल्या प्रहरात अल्प आहार घ्यावा व दुसर्‍या दिवशी पूर्ण उपवास करावा.
उपवासाची दुसरी शास्त्रीय भूमीका म्हणजे साप्ताहिक , पाक्षिक, मासिक, षण्मास आणि वार्षिक अशी पाच मुख्य चक्रे मानवी जीवनास नियंत्रित करतात. त्यापेकी प्रत्येक चक्रातील एक दिवस उपवासासाठी निवडावा.
साप्ताहिक उपवास म्हणून एखादा वार, पाक्षिक उपवासासाठी एकादशी किंवा प्रदोष, मासिक उपवासासाठी संकष्टी किंवा शिवरात्र किंवा प्रदोष, षण्मास उपवासासाठी कर्क, मकर संक्रमण असा पर्वकाळ आणि वार्षिक उपवासाला महाशिवरात्री, जन्माष्टमी असे दिवस निवडावेत.
व्युत्पत्तीशास्त्रदृष्ट्या् उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसने असा आहे. एकाद्या पुण्य दिवशी देवाच्या , गुरूच्या, सत्पुरुषाच्या सान्निध्यात बसणे याचा अर्थ उपवास असा आहे. हा उपवास अधिक चांगला व्हावा, त्यात आलस्य, निद्रा, पित्तविकार उद्भवू नयेत म्हणून कमी अन्न भक्षण करणे आवश्यक असते. अश्यावेळी कडक उपवासाचा पर्याय म्हणून आहार बदलासाठी हविष्य अन्नाची यादी सांगितली आहे. खरेतर चांगल्या उपवासासाठी दिवसभर काही न खाता, नुसते पाणी पिउन राहिले पाहिजे. त्यामुळे पोटातील अवयवांना विश्रांती मिळून माणूस दुप्पट कार्यक्षमतेने काम करतो.
प्रत्येकाने शरीर प्रकृतिनुसार द्रव्योपवास ( दूध, ताक, सरबत) करावा किंवा फळे, भाजलेले पदार्थ- लाह्या, सातूचे पीठ, थोडे दाणे-गुळ, राजगिरा, कंदमुळे असा हलका आहार घ्यावा.
उपवास म्हणजे हलका आहार आणि पोटाला विश्रांती हे सुत्र ध्यानात ठेवावे. या दिवशी मित आहाराबरोबर काही काळ ध्यानधारणा , जप, स्तोत्रपठन अवश्य करावे, थोडावेळ मौन पाळावे. म्हणजे तनमनाची शुद्धि होते. शास्त्रोक्त पद्ध्तीने केलेल्या उपवासामुळे मनातील विकार शांत होऊन देहाभोवति असणारे वासनादेह, मनोदेह आणि कारणदेह इत्यादी देहातहि शुद्धी प्राप्त होऊन वृत्ती स्थिर होतात. उपवासाच्या दिवशी मनावर धार्मिक संस्कार तर होतोच परंतु त्या दिवशी ब्रम्हचार्यपालन उक्त असल्यामुळे आपोआपच कामवासना नियंत्रित होते. गृहस्थाला आठवड्यातून एक दिवसापेक्षा जास्त दिवस उपवास करता येत नाही.
अलीकडे उपवास म्हणजे अन्नग्रहण न करणे किंवा फराळाचे खाणे असा अर्थ घेतला जातो. उपवास म्हणजे केवळ अन्नातील बदल असे समजून या दिवशी उपवासाचे विविध तळलेले पदार्थ, भरपुर चहा- कॉफी पिणे किंवा साबुदाणा , बटाटे आणि दाणे घालून केलेल्या विविध पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवासाचा हेतू अजिबात साध्य होत नाही. उलटपक्षी शरीरावर विपरीत परिणाम होतो.
काहीवेळा धार्मिक भावनेचा अतिरेक म्हणून शरीराला कष्ट होतील असे कडक उपवास केले जातात अन्न ग्रहणाशिवाय अनेक दिवस राहतात. उपवास करण्याचा प्रयत्नात उपासमार होणार नाही याची पण काळजी घेणे आवश्यक आहे. उपवासाच्या अतिरेकाचे परिणाम पित्तप्रकोप किंवा पित्तभ्रम असे होऊ शकतात आपल्या धर्माप्रमाणे जैन धर्मात उपवासाचे विशेश महत्व संतितले आहे. यात अखंड ४२ दिवस उपवास सांगितले आहे. इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मातही दीर्घकाळ उपवासाचे महत्व सांगितले आहे. पापक्षालन किंवा प्रायचित्त म्हणून उपवासाचे व्रत सौम अथवा कडक पाळण्याची प्रथा आहे.
ज्याला उपवास करणे शक्य नाही त्याने त्या दिवशी एका ब्राह्मणाला भोजन द्यावे किंवा भाताच्या( शिधा) दुप्पट किमतीचे द्रव्य द्यावे किंवा वृद्धाश्रम, बालग्राम, अनाथाश्रम अश्या संस्थेत अन्नदान करावे. त्यांच्या चेहर्यावरी तृप्तिचा आनंद निश्चितच पुण्यदायक ठरेल. देवीचा जप एक हजार संख्यने करावा किंवा 12 वेळा प्राणायाम करावा. हे सर्व यथाशक्ती करावे असाही पर्याय शास्त्रात आहे.
उपवास हे एक व्रत आहे. व्रत म्हणजे बंधन आलेच. मनावर ताबा ठेवणे आले. उपवास हि संयमाची सुरवात आहे. संयमामुळे विवेकबुद्धी जागृत राहण्यास मदत होते. संयमी माणुस समाधानी असतो, तो आयुष्यात सहसा अयशस्वी होत नाही. त्यामुळे लहानपणापासून शास्त्रोक्त उपवासाची सुरवात केल्यास थोडा काळ का होईना मनाला संयमित ठेवण्याची सवय लागते.

लेखिका- अर्चना दातार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला. मी साप्ताहिक उपवास दर शनिवारी अतिशय श्रध्देने करतो पण तो शास्त्रोक्त कसा करावा हे आज कळले. शनिवार उजविणे म्हणजे काय करायचे याची माहिती मिळेल का?

ज्याला उपवास करणे शक्य नाही त्याने त्या दिवशी एका ब्राह्मणाला भोजन द्यावे किंवा भाताच्या( शिधा) दुप्पट किमतीचे द्रव्य द्यावे किंवा वृद्धाश्रम, बालग्राम, अनाथाश्रम अश्या संस्थेत अन्नदान करावे. त्यांच्या चेहर्यावरी तृप्तिचा आनंद निश्चितच पुण्यदायक ठरेल.
दुसरा कुठला मार्ग नाही का ?

विकास सर नमसकार.
कोण्ते हि व्रत उजविताना त्या देवतेचि यथासांग पुजा करुन दांप्त्य भोजन घालणे.
धन्यवाद.

अर्चनाजी,
माझ्या उपवासाबाबतीत २ दिवसांपुर्वीच घडलेला दुर्मीळ किस्सा सांगतो, मी साधारण २-३ वर्षापासुन दर गुरुवारी उपवार करतो, सकाळी बहुतेक करुन शाबुची खिचडी,खीर किंवा कधी-कधी २ केळी यापैकी फक्त एक, दुपारी तेच आणि संध्याकाळी (जास्त घेतल जाणारं) जेवण.
मागच्या गुरुवारी सकाळी फक्त १ आंबा,२ केळी खाल्ली, दुपारी बटाट्याचे वेपर्स (लेज) आणि त्यावर शेंगदाणागुळाची चिक्की खाल्ली, हे उपवासाच्या दिवशी तर पहिल्यांदाच खाल्ल गेलं, मग संध्याकाळी ५ नंतर डोकं घेरी आल्यासारखं,चक्कर आली,भुकही होतीच,घरी पुन्हा उलटी झाली.
असं हे गेल्या २-३ वर्षात प्रथमच घडलं,
हे नेमकं का झालं असेल किंवा हे वेपर्स मुळे झालं असेल अस तुम्हाला वाटतं का ?
आपण नक्की सल्ला द्याल ही अपेक्षा.

अनिल सर,
आपल्याला उन्हाळ्यामुळे दाणे खाल्ल्याने अति पित्त झाले. म्हणुन उपवासाचा त्रास झाला. उपवास झेपत नसेल तर जमेल तेवढा देवीचा जप करावा.

काही कारणाने व्रती मनुष्यास उपवास करणे शक्य नसेल तर त्याचा प्रतिनधि उपवास करू शकतो. पती, पत्नी एकमेकांचे व्रत घेऊ शकतात.>>
खरेतर चांगल्या उपवासासाठी दिवसभर काही न खाता, नुसते पाणी पिउन राहिले पाहिजे. त्यामुळे पोटातील अवयवांना विश्रांती मिळून माणूस दुप्पट कार्यक्षमतेने काम करतो.>>

माझ्या पोटातील अवयवाना विश्रांतीची सक्त गरज आहे. कोणी माझा प्रतिनिधी व्हायला तयार आहे का?.

उपवास झेपत नसेल तर जमेल तेवढा देवीचा जप करावा.

मग उपवासावर लेख लिहायची/ वाचायची गरज काय ? डायरेक्ट देवीच्या जपाचाच बीबी काढायचा ना..