ओळख, नाव, वागणूक इत्यादी आणि मी.

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

हे ही जुनंच लिहिलेलं. अनेकांना लक्षातही असेल. फरक तसा काहीच नाहीये अजूनही पण प्रसंगांचा त्रास स्वत:ला करून घेण्यापेक्षा समोरच्याची समजण्याची कुवत नाही हे मी शिकलेय थोडंफार इतकंच.. Happy
--------------------------------------------------------------------------------------------
"लग्न झाल्यावरही मी नाव बदलणार नाही. आणि ते तुझ्या आइवडिलांना पटवायची जबाबदारी तुझी."
असं स्वच्छपणे त्याला सांगितलं आणि मी निवांत झाले. त्यालाही या गोष्टिचं फारसं काही वाटलं नाही. बायकोने आपलं नाव लावलंच पाहिजे इत्यादी विचार त्याच्या आसपास फिरत नसत सुदैवाने.

लग्नाआधी नी नंतर काही खास शेलक्या प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र यावर.
"तू काय स्वतःला जास्त शहाणी समजतेस?" इति माझेच एक काका
"आमचं आडनाव लावत नाहीस तू?" (हं विचित्रच दिसतेय ही!) हे मनात म्हणणार्‍या त्याच्या एक काकू.
"काय म्हणताय मिसेस अमुक अमुक!" हे मुद्दामून म्हणणारा एक मित्र
इतपत होणारंच हे गृहितच होतं त्यामुळे त्या प्रतिक्रियांवर आम्ही दोघांनीही हसून घेतलं.

दोघंही एका क्षेत्रात काम करत होतो पण वेगवेगळ्या विभागात. आपापल्या बळावर एका स्थानापर्यंत आलो होतो. तो captain of the ship आणि मी एक department head. आपापल्या वर्तुळात आमच्या कामाला महत्व होतं. मग झाली गंमत. आमचं एक प्रोजेक्ट खूप म्हणजे खूपच मोठं झालं आणि त्याबरोबर त्याचं नावही. आता त्याच्याकडे खूप लोक आदराने पहायला लागले. त्याच्याशी आपली ओळख आहे हे कॉलरी ताठ करत दाखवू लागले.

त्याच प्रोजेक्टमधले एकजण एकदिवस मला येऊन म्हणू लागले की
"आता तरी निदान सरांसाठी तरी नाव बदला!"
म्हणजे मला आजपर्यंत याच्या नावाची लाज वाटत होती नी आता लाज वाटायची गरज नाही म्हणून मी आता नाव बदललं पाहिजे?
माझं नाव ते माझं मी ठरवीन ना तुमचा काय संबंध?
मला आणि माझ्या नवर्‍याला, घरच्यांना काही प्रॉब्लेम नाहीये तर तुम्ही कोण टिकोजीराव मला नाव बदलायला सांगणारे?
असे खूप सारे व्हि.ओ. माझ्या डोक्यात. आणि मी वळून दुसर्‍या व्यक्तीशी बोलू लागले.

हळूहळू लक्षात येऊ लागलं की माझं नाव बदललेलं नसणं हेच नाही तर मला माझं माझं काही अस्तित्व असणं हेच लोकांना खुपतंय.

माझ्या स्वतःच्या नाटकासंबंधात माझी मुलाखत घेतली गेली आणि मुलाखतीत छापलं काय गेलं की माझा नवरा मोठा दिग्दर्शक असला तरी मला किती सपोर्ट करतो. माझे सासूसासरे कसे मला साथ देतात इत्यादी. ते खरं आहे हो पण त्याच्या मुलाखतीत नाही कधी विचारत बायकोचं योगदान वगैरे.

एकदा एका छोट्या गावात गेलो होतो. कुठल्यातरी विषयावर गप्पा चालू होत्या. एका मुद्द्यावर माझं आणि नवर्‍याचं म्हणणं वेगळं होतं. आम्ही एकमेकांचा मुद्दा समजून घेत होतो पण बरोबरच्या एका काकांना मात्र त्याचा त्रास व्हायला लागला. आम्ही दोघांनी नंतर बोलू म्हणून विषय थांबवला तरी ते काका नंतर मला खिजगणतीतही धरेनात. माझ्याशी बोलेहीनात. 'बिचारा एवढा मोठा दिग्दर्शक आणि त्याची बायको ही अशी!' असं त्यांच्या तोंडावर लिहिलेलं मात्र दिसू लागलं. चिडचिड झालीच आणि परिणामी मी जेवायचंच टाळलं.

हे असं अनेकदा होतं. मी प्रवासात जीन्स वापरते यापासून माझा माझा वेगळा मोबाइल आहे ज्याच्यावर मी माझ्या माझ्या कामाच्या लोकांशी बोलत असते ते मी माझं मत मांडते, कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरादाखल नवर्‍याकडे न पहाता जे मला पटतं ते उत्तर देते यापर्यंत कुठलंही कारण माझ्या नवर्‍याला बिचारा ठरवण्यासाठी पुरेसं असतं. असं होऊ नये म्हणून मग मला आदर्श पतिव्रता पत्नी सारखं वागावं लागतं. सिंदूर, बांगड्या आणि साडीचीच कमी असते. स्वतःचं मत/ स्वतःचं आयुष्य नसलेली, नवर्‍याच्या पावलात स्वर्ग बिर्ग शोधणारी कंटाळवाणी बायको मिळाली असती तर माझा नवरा या लोकांना बिचारा वाटला नसता हे माझ्यासाठी आणि माझ्या नवर्‍यासाठीही अचाट आणि अतर्क्य असतं.

महाजालावर देखील असे महाभाग भेटतात अधूनमधून की ज्यांना माझं वेगळं अस्तित्व सहन होत नाही. मग सगळा सारासार विचार बाजूला ठेवून 'यशस्वी माणसाशी लग्न करून स्वतःचं नाव मोठं करू पहाणारी' अशी विशेषणं लावली जातात. यावर हसावं की रडावं तेच कळत नाही. अश्यांची नी त्यांच्या मध्ययुगीन मानसिकतेची कीव मात्र येतेच येते.

इतर ठिकाणीच कशाला आमच्या क्षेत्रातल्या अनेकांना, अगदी जे मला आधीपासून ओळखत होते त्यांना सुद्धा माझी ओळख करून देताना वेशसंकल्पक(costume designer) पेक्षा अमुकतमुक ची बायको हे जास्त सोयीचं वाटतं. एक वेशसंकल्पक म्हणून मी जोवर माहित असते अनेकांना तोवरचं काहींचं वागणं आणि नवर्‍याची ओळख कळल्यावरचं वागणं यात जमिनअस्मानाचा फरक असतो.

अश्या वेळांना नाव आडनाव न बदलण्याचा निर्णय किती योग्य होता ते अजून अजून पटत जातं. निदान नवर्‍याचा संदर्भ कळेपर्यंत तरी लोक माझ्याशी माझ्या माझ्यापुरते वागतात.

आणि मग कधीतरी एखादं असं प्रोजेक्ट होतं जिथे सगळ्यांना माझ्या नवर्‍याचा संदर्भ माहित असतो. त्याच्याबद्दल आदर पण असतो. त्याचवेळेला माझ्या कामाबद्दलही आदर असतो. माझ्याशी वागणं हे माझ्या माझ्यापुरतं असतं. मी तिथे नीरजा असते. एक व्यावसायिक असते, नंतर एक मैत्रिण होते. मला नीरजाप्रमाणेच वागता येतं. कुठलाच आविर्भाव मिरवण्याची गरज नसते. अश्या ठिकाणी काम केल्याची मजा वेगळीच असते. पुढचे अनेक कंटाळवाणे प्रसंग पचवण्यासाठी इथे ताकद मिळते.

आम्ही दोघं दोन वेगळी माणसं आहोत ज्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे आणि तरीही अनेक बाबतीत मतभेदही आहेत पण या मतभेदांमुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडत नाही. आम्ही एकमेकांमुळे वाढत असतो. दुर्दैवाने हे समजण्याची कुवत किंवा मानसिकता ५% च लोकांकडे असते. बाकी सगळे मध्ययुगातच अडकलेले

इरावतीबाईंनी (इरावती कर्वे) पन्नासेक वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखातल्याप्रमाणे अजूनही नात्यातल्या पुरूषमंडळींच्या विशेषतः नवर्‍याच्या संदर्भानेच केवळ बाईकडे बघण्याची, तिला ओळखण्याची सवय आणि गरज सुटत नाही. इरावतीबाईंच्यासारखी मोठी व्यक्तीही यातून गेलीये मग माझी काय कथा असं मनाशी म्हणत मी अनेक ठिकाणी खोटी खोटी वागत जाते.

- नी

प्रकार: 
शब्दखुणा: 

धन्स सिंडरेला! तिथल्या प्रतिक्रिया वाचून माणसे इथून तिथुन सारखीच असतात हे पुन्हा एकदा जाणवले.

मध्यंतरी लग्नानंतर बर्‍याच वर्षांनी मी नाव बदलले. आमचे जॉईंट अकाउंटवरचे नाव बदलायला क्रेडिट युनियन मधे गेले. हे अकाउंटही जवळजवळ लग्नाइतकेच जुने. तिथल्या माणसाला कामाचे स्वरुप सांगितल्यावर तो म्हणाला- 'Congratulations! so finally you guys got married!' Proud

याहूच्या द्व्यावरच्या प्रतिक्रिया वाचून खरेच आश्चर्य वाटले... जेव्हढ्या वाचल्या तेव्हढ्यात नाव न बदललेल्यांची उदाहरणे अगदीच मोजकी.

सध्या नुकतेच घर बदलले. जिथे तिथे, मिस्झ ऑप्शन घेण्यासाठी स्पेशल फोन करावा लागला. एका ठिकाणी नवर्‍याचे नाव बदलून पत्र आले. पण आता सगळे पुन्हा नीट सेट झाले आहे.

एका सहकार्‍याने विचारले, की भारतात नावे बदलत नाहीत का? (... माझ्या बायकोने कसे माझे आडनाव लावले आहे. बराच त्रास झाला बदलाबदलीत तरी.) त्याच्या जुन्या कंपनीतल्या भारतीय मुलीनेही नव्हते बदलले वगैरे.

अरे बापरे, नी च्या एका मतावर काही लोक इतके तावातावाने का लिहितायत? (अगदी स्वतःचं नाव बदलल्यासारखं?:P )

ते तिचं वैयक्तिक मत/ अनुभव तर आहेच, पण आमच्या पिढीतल्या काही टक्के मुलींचा का असेना पण अगदी प्रातिनिधिक अनुभव आहे.
माझ्या या वाक्याने परत एकदा तीच खडाजंगी होईल पण तरीही लिहितिये - की मुलांना/ पुरुषांना अनेक शतके सामाजिक वर्चस्वाच्या स्थानावर रहायची सवय असल्याने आणि कधीही असा identity crisis येत नसल्याने त्याची बोच त्यांना तेवढी कळेल अशी माझी अपेक्षा नाही.

प्रत्येक वेळी - विशेषतः नवरा आपल्याच क्षेत्रातला असला की - जेव्हा असे अनुभव येतात ना तेव्हा कितीही कोडगे झाले असलो, लोकांच्या अशा मताला फाट्यावर मारायची सवय केली असली, तरीही त्याचा थोडासा त्रास होतोच. शिवाय अशी स्वतःची ओळख जपायची धडपड केली की नवर्‍याशी स्पर्धा करतेय, किंवा नवर्‍याच्या यशापेक्षा हिला स्वतःचा अहं जास्त महत्वाचा वाटतो इ. इ. प्रतिक्रिया तर अगदी ठरलेल्या. बर्‍याच वेळा त्या स्पष्ट बोलून न दाखवता वागण्यातून,नजरेतून, तिरकस बोलून आपल्यापर्यंत पोचवल्या जातात. आणि मी हे ग्रामीण भागाविषयी बोलत नाही तर अगदी पूर्णपणे शहरी समाजाबद्दल बोलतेय. हे फक्त एरवी घरीदारीच नाही तर प्रत्येक व्यवहारामधे संबंधित लोकांचे आगाऊ प्रश्न, भोचक सल्ले (कितीही चांगल्या उद्देशाने दिलेले असले तरीही..) यांनाही तोंड द्यावे लागते.

जेव्हा स्वतःच्या क्षेत्रातही लोक अमक्यातमक्याची बायको अशी (आणि एवढीच) ओळख करून देतात आणि मग कधीतरी बोलण्याच्या शेवटी ही पण हे अमकंतमकं करते बरंका असं शेपूट जोडलं जातं तेव्हा मस्तकात काय तिडीक जाते ते पुरुषांना कधीच कळणार नाही... म्हणजे या क्षेत्रात आम्ही इतके वर्षं जे काही केलं त्याच्यापेक्षा आम्ही कुणाची बायको हे जास्त महत्वाचं? मला माझ्या नवर्‍याच्या यशाचा अभिमान इतर कुणापेक्षाही जास्तच असला, त्याची बायको असल्याचाही कितीही अभिमान असला तरीसुद्धा माझ्या प्रोफेशनमधे मी त्याची बायको ही अशी ओळख मलाही कधीही मान्य होण्यासारखी नाही. ते माझ्या ओळखीचं 'परिशिष्ट' असू शकतं फार तर फार!!

दुव्याबद्दल धन्यवाद सिंडी.
वरदा- पूर्ण पूर्ण अनुमोदन

लेख छानच आहे नीरजा. Happy
आधीही हे लिहीले होते बहुतेक.
मी लग्नानंतर नाव बदलले नाही, बदलणारही नाही.
घराच्या कागदपत्रांपासून, मुलीच्या पासपोर्टापर्यंत सगळीकडे डीफॉल्ट माझे नाव बदलण्यात आले आहे परस्पर, कागदोपत्री अर्जात माझे स्वतःचे नाव असून सुद्धा.
उदाहरणे:
१. मुलीच्या पारपत्र अर्जात सगळी कागदपत्रे माझ्या नावाने असूनसुद्धा, पासपोर्ट हाती आला तेव्हा त्यात परस्पर Mrs ___ (सासरचे आडनाव) असे लिहून आले. (शासनाच्या forwardthinking आणि तत्पर सेवेने गहिवरून आले.)
२.घराचे अ‍ॅग्रीमेंट दोघांच्या (वेगवेगळ्या)नावे असून सुद्धा, बिल्डरने परस्पर पाटीवर माझे नाव Mrs ___ (सासरचे आडनाव) असे टाकले. नवर्‍याने खडसावल्यावरचे उत्तर 'ऐसा कोई करता है क्या.' ते बदलून घ्यायला जामच पिडावे लागले.
३.LIC कागदपत्रांची तीच कथा

कधी मला (आम्हाला) लढायची उर्जा असते, कधी नसते.
परस्पर कागदोपत्री नाव बदलायचे हक्क या लोकांना कोण देते हे मला अजूनही कळलेले नाही. वरून यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवा.

अजून आपण नातेवाईक/ informal टोमणे वगैरेंबाबत बोलतच नाही आहोत. माझ्या बिचार्‍या न-केलेल्या नामांतराबाबतची आस्था एकंदरित आम्ही दोघं सोडुन सर्वांना आहे.
आता लेक दोघांची वेगळी नावे व्यवस्थित सांगते तेव्हा पाहुण्यांना चर्चा करण्यास वाव मिळतो. राष्ट्राची उन्नती होते. Happy

<<परस्पर कागदोपत्री नाव बदलायचे हक्क या लोकांना कोण देते हे मला अजूनही कळलेले नाही. वरून यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवा.>>

रैना, हे असले किस्से तर अनेक घडलेत. पण जितकेवेळा असे अनुभव येतात तसा माझा यापुढेही कधी नाव न बदलायचा निर्णय आणखीच ठाम होतो.
माझ्या व्यवसायाचा एकच फायदा की 'आपली परंपरा, संस्कृती' हा मुद्दा तरी मला ऐकवण्याच्या भानगडीत फारसं कुणी पडत नाही Happy

http://www.maayboli.com/node/14801

संयुक्ताच्या सर्व्हे मध्ये नाव बदललेल्यांची आकडेवारी इथे आहे.
सिंडीने दिलेल्या दुव्यावरील आकडेवारीशी ताडुन पहायची इच्छा असल्यास. Happy

कोण शोभा? आमच्याकडे कुणि शोभा नाही. त्यांचे ह्रुदय पुनः स्थिर झाल्यावर त्यांनी विचारले >>> झक्की सकाळी सकाळी ह्या वाक्याने खदखदून हसवलेत.

रैना, बाप रे!! फारच कृतीशील लोक भेटलेत की तुला.

मी पण नाव बदलले नाहीये आणि सुदैवाने इतक्या वर्षात जगातल्या कोणीही "असे का" ? हे विचारले नाहिये. अगदी भारतातल्या बिल्डरने पण कागदावर नाही बदलले. हुश्श!!!

माझ्या नावची गंमतच आहे! अजून पासपोर्टवर माहेरचं नाव आहे. मुख्य ओळखपत्र तेच असल्यामुळे अजूनतरी नाव बदललं नाही. पण मधे भारतवारीत निवडणूक ओळखपत्र करताना सासरचं आडनाव लावलं. (मला आडनाव बदललं तरी चालणार आहे.) मग नव्या नावाने सही केली. मग बँकेच्या कुठल्याश्या फॉर्मवर पण नवीन नावाने सही केली. परत इथे आल्यावर काही कागदपत्रं सह्या करून पाठवायची होती, पण मधे ६-७ महिने गेल्यामुळे मी भारतात असताना काय सही केलिये हेच आठवेना.

"आपण जोवर नाव बदलत नाही तोवर तरी सही नको होती बदलायला" असं नंतर वाटत होतं. पण तेव्हा सही नव्या नावाने करण्यामागे बहुतेक तसंच काहीतरी कारण झालं होतं. शिवाय ते निवडणुकीचं सरकारी काम. नावाचा घोळ नको म्हणून केलं असावं.

शेवटी फोन करून सासर्‍यांना विचारलं की काय सही आहे फॉर्मवर..तेव्हा इकडे तशी सही केली!

वरदा, रैना असंख्य मोदक. पितृसत्तक कल्पना इतक्या मुरल्या आहेत की अनेक स्त्रियांनासुधा नाव बदलण्यामधे काही वावगे आहे असे वाटत नाही.
नी हा लेख पुन्ह पुन्हा छापत रहा. अजुन पाच वर्शाने पण ह्यावर हेच वाद होतील Sad

सावित्रीबाई जो. फुले यानी नवर्‍याचेच आडनाव लावले. पण त्या ओळखल्या जातात, त्यांच्याच कर्तूर्त्वामुळे. नाव बदलने, न बदलणे, हा फक्त एक चॉइस प्रत्येक स्त्रीला असावा, हे मान्य. त्यने फारसा फरक पडत नसावा असे वाटते... नवर्‍याचे नाव लावले म्हणून बाईचे कर्तूत्व वाढले असे लोकानी म्हणू नये म्हनून जुनेच नाव कायम ठेवणे...... याच्या उलटही होऊ शकते. Happy .. बापाच्या आडनावावर मुलीने नाव मिळवले असे म्हणू नयेत म्हणून स्वतःचे लग्नानंतरचेच आडनाव कायम ठेवणे.... आठवते का असे उदाहरण ? ( आशा भोसले.. Happy ) ... एकंदर आपल्या कर्तूत्वाचे क्रेडिट नवरा किंवा वडील याना जाऊ न देणे, एवढाच 'नाम'मात्र या वादाचा उद्देश असतो की काय?

जामोप्या,
<<एकंदर आपल्या कर्तूत्वाचे क्रेडिट नवरा किंवा वडील याना जाऊ न देणे, एवढाच 'नाम'मात्र या वादाचा उद्देश असतो की काय?>>
हो, जे कर्तृत्व स्वतःचे असते त्याचे श्रेय नवरा किंवा वडील यांना गेलेच पाहिजे का? स्वतःचे श्रेय स्वतः घेताना त्यात आणखी कुणाचा अनादर होतो असं काही मला वाटत नाही. आणि नवर्‍याचे किंवा वडलांचे नाव लावून 'कर्तृत्व वाढते' हा समज अत्यंत अवास्तव आहे. स्त्री-पुरुष दोघांच्याही बाबतीत. घरच्यांनी पाठिंबा देणं/ मदत करणं यामुळे गोष्टी सोप्या होणं आणि नावामुळे काही मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत

प्रश्न असा आहे, की जेव्हा तुमच्या लहानपणापासून एका नावाची ओळख लावून तुम्ही मोठे होता ती जर तुम्हाला बदलायची नसेल (किंवा असेलही) तर त्याबाबत लोकांनी इतकी उठाठेव का करावी? आणि ९०% वेळा स्त्रियांची कौटुंबिक ओळख ही व्यावसायिक अस्तित्वाचा अविभाज्य भाग का असावी/ बनवावी?

वरदा नी अनुल्लेख करा रे. नाचरा सारखे लोक तुमच्या सारखे भेटले की स्व्तःच्या पुरुषत्वा बद्दल इनसिक्युअर होतात ईलाज नाही.

पेशवा, इनसिक्युरिटीबद्दल अनुमोदन. पण मुद्दाम वैयक्तिक उणीदुणी काढून उचकवायचा प्रयत्न यात जास्त वाटला. म्हणून त्याला उत्तर दिलं.
आणि कुणी माज म्हणा किंवा आणखी काही... पण कुणीही उठावं आणी माझ्या कामाविषयी बोलावं आणि मी ते ऐकून घ्यावं इतकी लेचीपेची करीअर नाहीय माझी - आणि नीरजाचीही

आमेन!!

<<एकंदर आपल्या कर्तूत्वाचे क्रेडिट नवरा किंवा वडील याना जाऊ न देणे, एवढाच 'नाम'मात्र या वादाचा उद्देश असतो की काय?>>
तुम्ही तुमच्या कर्तुत्वाचे (?) क्रेडीट बायको किंवा आई किंवा आणि कोणाला जाऊ द्याल का ?

झक्की,
<<कुणाचे लग्न कुणाशी झाले याच्या उठाठेवी कशाला? तुम्ही ज्याच्याशी/जिच्याशी बोलत असाल, त्याच्याशी/तिच्याशी बोला, त्यांच्या नवरा/बायको चा काही संबंध असेल, जर एखादा/एखादीला वाटलेच तर ते सांगतील, नाहीतर काय फरक पडतो?>> अगदी अगदी...

काय आहे ना, प्रश्न कायद्याचा नाहीये. भारतीय कायदा बायकोचं आडनाव बदलायला सांगतच नाही.. आपली सामाजिक मानसिकता ही खरी ग्यानबाची मेख आहे.
मुळात मुलीचं स्वतंत्र अस्तित्व/ स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचे स्वतंत्र विचार असणं हेच बर्‍याच जणांना मनापासून पटत नाही. या स्वतंत्र विचारांचा सरळ सरळ संबंध मुलीची सासरच्या लोकांत/ नवर्‍यात असलेली involvement कमी असणं, अत्यंत अहंकारी व्यक्तिमत्व असणं, करिअरपुढे घरादाराला कमी किंमत देणं, असा लावला जातो. मग मुलीची नोकरी/ करिअरही त्याच चष्म्यातून पाहिलं जातं. आणखीही असे अनेक पदर असतात. नाव न बदलणं हा या सगळ्याचा कळस अशा अर्थाने सहसा पाहिला जातो.
एखाद्या अर्धशहरी किंवा ग्रामीण भागात लोकांची अशी प्रतिक्रिया येणंही एका प्रमाणात समजू शकतं (तरीही जेव्हा लोक तोंडावर ऐकवतात ना की तुम्ही मुली नोकर्‍या करून होतकरू मुलांच्या पोटावर पाय आणता - मुलींची नोकरी म्हणजे हौशीची, मुलांना संसार चालवायचे असतात त्यामुळे शिकलेल्या मुलींनी इतकंच वाटले तर घरी शिकवण्या घ्याव्यात, इ. इ. तेव्हा काय वाटतं ते व्यक्त करण्याच्या पलिकडे आहे..) पण जेव्हा शहरात आपल्या व्यावसायिक आयुष्यात, बँक, सरकारी ऑफिसेस, इतर आर्थिक व्यवहारात या अशा पदोपदी रोज ठेचा लागतात ना तेव्हा कितीही निबरपणा अंगात बाणवला तरी तो कमीच पडतो. कुठल्याही व्यवहारात नियमानुसार नवरा-बायकोचं नाव एक नसेल तर अडचण नसते. ती असते टेबलाच्या पलिकडे बसणार्‍या माणसाची. मग तुमचं लग्न खरंच झालंय का? इथपासून नाव बदलण्याचे आगाऊ सल्ले, नाहीतर रैना म्हणते तशी स्वतःच नाव बदलून द्यायची कृतीशीलता अशा कितीकिती गोष्टींना तोंड द्यावं लागतं. प्रत्येक वेळी शांतपणे पण अत्यंत ठामपणे कायदा दाखवत याचा सामना करायला लागतो...
आणि हे कशासाठी? तर स्वतःला आपण जन्मापासून ज्या नावाने ओळखतो तेवढं नाव तसंच राहून दिल्याबद्द्ल... प्रत्येक वेळी आपण कशा 'ऑड वूमन आऊट' आहोत हे सगळे जण दाखवून द्यायची जिवापाड धडपड करत असतात

या अशा अनुभवांना ज्यांना तोंड द्यावं लागत नाही त्यांना इथे 'परोपदेशे पांडित्य' करायला काय जातं?

मला खरंतर अशा वादात पडायला आवडत नाही. शेवटी हे सगळे वैयक्तिक choices असतात. राजीखुषीने नाव बदलेल्या मुली कमी स्वतंत्र असतात असंही मला म्हणायचं नाहीये... पण एखाद्याने अगदी मनापासून स्वतःचे मत, उद्वेग व्यक्त केला तर इतक्या बालिशपणे/ खोडसाळपणे तर्कटी वाद घातलेच पाहिजेत का?

<<मायबोलीवर एव्हढ्या चर्चा येतात, त्यात निदान काही लोक तरी बरे मुद्दे मांडतात, तर त्याचा सारंश काढून तो बा. फ. बंद करावा. म्हणजे वैयक्तिक कुचाळक्या, त्याच त्याच मुद्द्यावरून उगाच लहान मुलांसारखे 'होच मुळी, नाहीच मुळी' करत कशाला बसायचे?>> हे मात्र मस्तच पटलं Happy

नी, हा तुझा लेख आधी वाचला होताच. त्यावेळची चर्चा ही आठवतेय.. अगं आम्ही घरावर सरि-विना अशीच पाटी लावली तरी सगळ्यांच्या भुवया वर झाल्या...

सरी, त्यावेळेला बरीच मुद्द्यांना धरून चर्चा होती. यावेळेला बरेचसे लोक स्वतःचं घोडं मारलं गेल्यागत तुटून पडतायत... Happy

नी, असं का? यावर कमेंट केली तर अजुन १०० प्रतिसाद येतील आणि कालचा गोंधळ बरा होता म्हणण्याची वेळ येईल... त्यापेक्षा, ignore & kill... खुप दिवसांनी मायबोलीवर आल्यावर हे सगळं पाहुन कळवळले... जुने दिवस, चर्चा आठवुन... Sad

>>>>"एक (गरज) मिळालं की आपल्याकडे नसलेल दुसरं कसं मिळवायच ह्या साठी धडपड करत रहाणं हिच एक माणसाची मुलभूत गरज आहे आणि हा आपला प्राणी स्वभाव आहे"<<<<< - ह्या एका मुद्दयावर खुप काहि मनात येत आहे.

थोड्या दिवसांपूर्वि दिनेशदांचा दार्फुर वरचा लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. तिकड्च्या स्त्रियांचि परवड आधि सुद्धा ऐकली होति. आणि असा सुदान हा एकच देश नाहि. असे किति तरि देश आहेत जिथे स्त्रियांवर अत्याचाराला सीमा नाहि.

स्त्रियांचि स्थिति भारता मध्ये, खास करुन मुम्बई मधे जेवढि चांगलि आहे तेवढि जगामध्ये कुठे हि नाहि. त्यात हि महारास्ट्रियन समाज, उच्च मध्यम वर्ग, ह्यांच्या घरांत स्त्रिया किति तरि पुढारलेल्या आहेत. जे हवे ते स्वातंत्र्य घेउ शकतात. शिक्षण, नोकरी, लग्न, ह्या सर्व बाबतित त्या आपले आपण निर्णय घेउ शकतात.

जगातल्या दुसरया कशाला, ईवन भारतातिल इतर जाति मधल्या बायका आणि त्यांची परिस्थिति ह्या बरोबर आपण तुलना केली तर, नाव बद्लाचा मुद्दा एकदम शुल्लक वाटु लागतो. प्रसन्ना ह्यांचा एक लेख वाचला होता मध्ये, सुख मानण्यावर असतं ह्या वर काहितरी होता. एक मिळालं कि दुसरं हवं. फक्त नाव बद्लायचं स्वातंत्र्य मिळुन भागत नाहि. मग ते लोकांनि बिनाविरोध मान्य करावं हि अपेक्षा येते.

मला एकस्प्रेस होता आलं कि माहिति नाहि, पण तुम्हि सर्व समजुन घ्याल हि विनंति.

खास धन्स सत्यजित, दिनेशदा आणि प्रसन्ना ह्यांना.

लेख छान आहे........पण..........एक प्रश्न पडला..........आपले लग्न झाले आणि आपण कुणाशी केले
हे आडनाव बदलले नाही तर समोरच्याला कसे कळेल........ प्रत्येक जण आपल्याला विचारायला हवा.. ही अपेक्षा आहे ? किंबहुना लग्नच झाले नाही अजुन...हे समोरच्याला कळायला हवे...???? Sad
नाव बदलायला लागते कारण मुलगी दुसर्‍या च्या कुटुंबात गेलेली असते...ती त्या कुटुंबाचा वंश वाढवणार असते...तिची ओळख आणि तिच्या वंशाची ओळख ही त्या दुसर्‍या कुटुंबावरुन असते...उदा. मुलगा अथवा मुलगी झाली आणि शाळेत नाव घातले तर तो काय लावणार..? आपले आडनाव की बाबांचे...? बाबांचे लावले तर या वेगळ्या आडनावाची ही बाई कोण...हा प्रश्न नाही का येनार..लोकांना..?...हे सगळे प्रश्न टाळण्यासाठी समाजाने पुर्वी पासुन ही पध्दत आकारली आहे...तुम्हाला जर आपली वेगळी ओळख कायम ठेवायची असेल तर दोन दोन आडनावे लावु शकतात जसे भक्ती बर्वे - इनामदार..... नवर्‍याचे आडनाव लावल्याने आता मी आपल्या कुटुंबामधील एक आहे...हा एक विश्वास समोरच्यांना मिळतो.. मुलगी आपले २२ - २५ वर्षाचे आयुष्य माहेरी सोडुन उर्वरीत आयुष्य एका अनोळखी माणसाबरोबर घालवणार आहे...त्या मुळे ज्यांच्या कडे जाणार आहे त्यांची मर्जी विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यातीलच एक होणे या प्रर्कियेचा आडनाव बदलने हा एक भाग आहे.........
जसे आपण नविन कंपनी कडे काम करताना जुन्या कंपनीत काय काय करत होतो तसेच करतो का काम.......नाही करत...नव्या कंपनी कडे काम करताना त्याच्या नियमानुसार काम करावे लागते.....यालाच अड्जेस्टमेंट म्हणतात.......आजच्या पिढीत ही कमी प्रमाणात दिसते........काही गमवले तर त्याहुन जास्त कमवता येते........पण आजच्या काळात आपण काहीच गमवणार नाही........नुसतेच कमवणार.....मग बाकी काही असो....अशीच वृती दिसते......दान धर्म करुन पुण्य कमवता येत नाही..... दुसर्‍याच्या आनंदात सहभागी झालात आणि आनंदाला थोडेफार का होइनात कारणीभुत असाल तर पुण्य कमवता येते............

आम्ही.... आपण...आपले... हे शब्द जाउन ...........मी ..माझे...माझ्यासाठी........हे शब्द आले.........

जो पर्यंत हे शब्द आपल्या तोंडी असतील तो पर्यंत ..............हे असेच चालणार.............या वर प्रतिक्रिया येतच राहणार.......

स्वता:ची ओळख असावी आणि ती कायमच ठेवावी...........फक्त ती कायम ठेवताना दुसर्‍याची ओळख पुसली जाणार नाही.........याची काळजी घेतलीत तर.......मिळणारा..तो आनंद आणि आदर.....याची कशातही मोजदाद करता येणार नाही.................... शुभेच्छा...............

<<..........एक प्रश्न पडला..........आपले लग्न झाले आणि आपण कुणाशी केले हे आडनाव बदलले नाही तर समोरच्याला कसे कळेल........ प्रत्येक जण आपल्याला विचारायला हवा.. ही अपेक्षा आहे ? किंबहुना लग्नच झाले नाही अजुन...हे समोरच्याला कळायला हवे>>
सुमित , पुरुषाचे लग्न झाले आहे की नाही हे कसे कळते, की तेवढे कळायची गरज नसते? लग्नानंतर ज्या ज्या लोकांशी तुमचे नाते जोडले जाते, त्यांना तर तुमचे नाव काहीही असले तर कळतेच. कामाच्या ठिकाणी अमक्याचे लग्न झाले आहे की नाहे, कुणाशी, इ. अतिरिक्त माहितीची गरज काय असते?
<नाव बदलायला लागते कारण मुलगी दुसर्‍या च्या कुटुंबात गेलेली असते...ती त्या कुटुंबाचा वंश वाढवणार असत>
त्या वंशात येणारी गुणसूत्रे आईवडील दोघांकडून येतात ना, मग तो वंश फक्त बापाचाच कसा काय? आईच्या पोटातच तर मुलाला शरीर मिळते तरीही तो तिचा वंश नाही?

लग्नानंतर नाव/आडनाव न बदलणार्‍यांची संख्या वाढत जावी आणि आडनाव irrelevant होऊन जावे असे मला वाटते. एका लेखकाचे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ असे नाव वाचायला मिळाले.

त्या वंशात येणारी गुणसूत्रे आईवडील दोघांकडून येतात ना, मग तो वंश फक्त बापाचाच कसा काय? आईच्या पोटातच तर मुलाला शरीर मिळते तरीही तो तिचा वंश नाही?>>>>>>>>>>>>>>>>

मयेकर साहेब हिंदु संस्कृती मधे पितृसत्ताक पध्दती आहे ..........मातृसत्ताक पध्दती नाही....

जगात आहे अशा संस्कृत्या आहेत ज्यात मातृसत्ताक पध्दती आहेत...... काही जण लावतात आपल्या आई चे नाव वडलांच्या जागी... जसे... संजय लीला भंसाली.... (आता भंसाली हे त्यांचे वडिलांचे आड्नाव आहे की आईचे हे माहीत नाही...)...हा ही एक प्रकार अस्तिवात आहे.....

बाकी तुम्ही जर पुरुषांनाच जवाबदार ठरवतात वरील पित्तृसत्ताक पध्दती या साठी तर लागेहात "पुरुषांने सुध्दा मंगळसुत्र घालणे बंधनकारक करावे" ही मागणी करु शकतात..
कारण तुमच्या पोस्ट वरुन तरी तसेच दिसते..............(ता. टीप. हा एक फक्त विनोद आहे...याची नोंद समजुतदार लोकांना होईल..)

Pages