बालगंधर्व

Submitted by चीकू on 7 May, 2011 - 09:18

कोणी हा चित्रपट बघितला आहे का? सुबोध भावे च्या सकाळ मधील लेखनामुळे खूप उत्सुकता वाढली आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बालगंधर्व'

'बालगंधर्व' काळाबद्दल आज आपली पीढी फक्त ऐकून आहे. तेही गेल्या पीढीकडून. त्या पीढीनेही त्यांच्या आधीच्या पीढीकडून 'बालगंधर्वांबद्दल' केवळ ऐकलेलं. तरीही सुमारे शंभर वर्षांनीही हे नाव अजूनही आपल्याला भुरळ घालतं.
स्वातंत्र्यपूर्व काळी जेव्हा स्त्रीया रंगमंचावर काम करत नसत, त्याकाळी 'स्त्रीपार्टी'चे काम अर्थातच पुरुषच करत. त्यातलेच एक नारायणराव राजहंस. पण इतकीच त्यांची ओळख राहिली नाही, हे आपलं भाग्य. इश्वरदत्त देणगी असलेला गोड गळा, परिश्रम घ्यायची तयारी, अंगात असलेली विनम्रता आणि नाटकाचे वेड ह्या गोष्टींनी नारायणरावांनी रंगमंचावर साक्षात स्वर्गलोक उभा केला.

'किर्लोस्कर नाटक मंडळी'त त्यांची गायनकला बहरली. त्यांनी केलेल्या स्त्री भूमिकांनी लोकांना मोहवून टाकलं. एखाद्या स्त्रीला जमणार नाहीत असे शालीन, पण लाडिक आविर्भाव ते असे साकारत की खरी स्त्रीदेखील अचंबित होई. त्यांच्या बोलण्याच्या लकबी, त्यांच्या दागिने, त्यांचे शालू- सगळे 'प्रमाण' समजले जाई. स्त्रीया त्यांची 'कॉपी' करायचा प्रयत्न करीत, तर पुरुष आपल्या पत्नीला 'तसे' वागा-बोलायचा आग्रह करीत. संगीत मानापमान, स्वयंवर, शाकुंतल, शारदा, सौभद्र, द्रौपदी, एकच प्याला, कान्होपात्रा- कित्येक नाटकं आणि त्यातल्या अजरामर भूमिका. सामान्य लोकांनीच नव्हे, तर त्याकाळच्या राजेमहाराजांनीही बालगंधर्वांवर अलोट प्रेम केले. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात केली. मात्र नारायणरावांच्या अंगच्या विनयाने, त्यांनी कधीही एक पैदेखील आपल्या वैयक्तिक जीवनासाठी वापरली नाही. जे जे मिळाले, ते ते सर्व कलेसाठी अर्पण केले.

नारायणराव अंतर्बाह्य नाटकवेडे होते. रसिक प्रेक्षकांसाठी काय वाट्टेल ते करायची त्यांची तयारी होती. नाटक हे नेत्रसुखदही असले पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. म्हणूनच उंची साड्या, खरे दागिने, अत्तरं ह्यावर हे मनसोक्त खर्च करत. ह्यातले स्वतःसाठी काहीही नसे, जे असे ते भामिनी, रुक्मिणी, द्रौपदीसाठी. अस्सल कलाकार असल्यामुळे व्यवहार त्यांना कधी समजला नाही आणि जमलाही नाही. ह्या त्यांच्या स्वभावामुळे अनेकांनी त्यांचा गैरफायदा घेतला, अनेक जण सोडून गेले आणि अनेक लोकांनी अर्ध्यावरच साथ दिली. बोलपटाचा जमाना आल्यावर नाटकांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. नाटकगृहे ओस पडली. एकेक सहकारीही साथ सोडून निघून गेले. बालगंधर्वांनीही बोलपट करायचा प्रयत्न केला, पण ते नीर्जीव माध्यम त्यांना त्यात पैसा असूनही कधी मानवले नाही. अत्यंत वैभवशाली, संपन्न, जीवाभावाच्या लोकांनी गजबजलेलं आयुष्य ते अत्यंत भणंग, एकाकी आयुष्य- ह्या दोन्ही अवस्था त्यांच्या वाट्याला आला. त्यांचा शेवट अनेक अर्थांनी चटका लावून गेला.

आता सिनेमाच्या टीमबद्दल-

तो 'गंधर्व काळ' उभा करणे म्हणजे चेष्टा नव्हे. त्यासाठी भक्कम निर्मात्याची आवश्यकता असणार होती. नितीन चंद्रकांत देसाईंमुळे आज हा चित्रपट इतका भव्य झाला आहे. चित्रपटात अनेक नाटकांचे अनेक सीन्स आहेत. आणि प्रत्येक नाटकाला, सीनला त्यांनी वेगळा पडदा, वेगळी बॅकग्राऊंड दाखवली आहे. राजांचे महाल, कपडे कशातही तडजोड नाही. निर्मिती मूल्य उच्च आहे.

'नटरंग' नंतर रवी जाधवांनी शिवधनुष्य पेललं आहे. जुना काळ मस्त कॅप्चर केला आहे. त्या काळचे राहणीमान, नाटकाचे वातावरण अगदी हुबेहूब उभं केलं आहे. डीटेलिंग भारी.

आनंद भाटेंनी क मा ल केली आहे. त्याकाळी पल्लेदार ताना घेत. नाटकं 'वन्स मोअर' घेत रात्र रात्र चालत. आनंद भाटे बालगंधर्व शैलीची पुरेपूर अनुभूती देतात. पदं ऐकताना अंगावर रोमांच उठतात. ह्या पदांबरोबरच दोनतीन नवी गाणीही आहेत. त्यातलं कौशल इनामदारने संगीतबद्ध केलेलं बेला शेंडेनं गायलेलं 'पावणा' उच्च! इतकी क्लॅरिटी आवाजात की बस्स!

जबरदस्त छायाचित्रण. महेश लिमयेंनी कॅमेरा लीलया हाताळला आहे. कंदिलाचा प्रकाश एरवी किती येतो- तेवढ्या प्रकाशातच शूटींग केले असूनही, ते काळपट वाटत नाही. दोन ठिकाणी बालगंधर्वांचे प्रोफाईल्स, सिलहूट्स, सूर्याच्या कवडशांबरोबरचा खेळ- अप्रतिम. शेवटचा सीन- बुडणार्‍या सूर्यासोबत मांडलेले मनोगत- शहारा आणते.

अभिराम भडकमकरांचे संवाद उत्कृष्ठ! संपूर्ण गंधर्व काळ- वैभव ते विपन्नावस्था, त्याकाळची सामाजिक परिस्थिती, पती-पत्नी-आई ह्यांच्यामधले, मित्रांमधले संवाद, बालगंधर्वांनी शेवटी घेतलेली विरक्ती- अतिशय चपखलपणे मांडलेत. 'बांगड्या भरलेला पुरुष नामर्द समजला जातो, पण मी बांगड्या भरूनच माझं कर्ज फेडून दाखवेन' सारखे संवाद आपल्याला भारून टाकतात.

आणि सुबोध!! केवळ सुंदर. ही भूमिका तो जगलाय. तेच सौंदर्य, तीच शालीनता, तीच विनम्रता आणि शेवटी आलेली हतबलता. अत्यंत समर्थ अभिनय. नाटकात काम करताना बालगंधर्वांच्या लकबी, बोलायची ढब त्याने पुरेपूर उचलली आहे. नाटकेतर जीवनात असलेले नेहेमीचे नारायणरावही अत्यंत समर्थ. त्यांच्या पडत्या काळातला अभिनय केवळ उच्च. त्यांनी अभिनय केलेले शेवटचे नाटक, त्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे नीट संवाद न बोलता येणे, त्यामुळे घुसमट होणे, रसिकांना आपण न्याय देऊ शकत नाहीयोत ही जाणीव- केवळ चेहर्‍यामधून त्याने काय काय उभे केले आहे! हॅट्स ऑफ!

ह्याखेरिज- कितेक मान्यवर अभिनेते केवळ चार-पाच, तर काही केवळ एक-दोन सीनपुरते येऊन गेले आहेत. 'बालगंधर्व' हे नावच इतकं आदरणीय आहे की त्या नावासाठी एक सीनचे कामदेखील आगळंच समाधान देऊन गेलं असेल त्यांना.

बारिकशी खोट म्हणजे खुद्द बालगंधर्वांच्या साड्या! नीता लुल्ला कॉस्च्युम डिझायनर आहे. मला त्यातलं काहीच कळत नाही. सिनेमात त्यांच्या साड्यांना खडे, जर्दोजी काम वगैरे आहे. हे त्या काळी होतं का ह्याची कल्पना नाही, पण त्याकाळी शालू, अस्सल सोन्याची जर असलेल्या पैठण्या वगैरे वापरत. इतकी भडक वेशभूषा होती का, ह्याबद्दल कल्पना नाही. मात्र ती रूचली नाही फारशी. असो.

इतकेऽऽऽ लिहिले, तरी अजून काहीतरी सुटले आहे असे वाटतेय. चुभूदेघे.

एक उच्च सिनेमा. नक्की नक्की पहा. मुळीच चुकवू नका.

कारण-

जसा जन्मतो तेज घेऊन तारा! जसा मोर घेऊन येतो पिसारा!

तसा येई घेऊन कंठात गाणे! असा बालगंधर्व आता न होणे!

रतीसारखे जया रुपलावण्य लाभे!कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे!

सुधेसारखा साद,स्वर्गीय गाणे!असा बालगंधर्व आता न होणे!

पौर्णिमा, मला पण कपड्यांबाबत थोडी शंका आली होती. (फोटो बघून).
पुष्पपराग सुंगधित हे गाणे आहे का ? यात बागेश्री मधे एक वर्जित स्वर लावून, ते गात असत.
त्यांनी बाई सुंदराबांईकडून एक लावणी शिकून घेतली होती ( नेसली पितांबर जरी) आणि त्यावर वद जाऊ कुणाला शरण, हे पद बांधले होते. तो प्रसंग आहे का ?
गौहर जान मूळे, अनेक जण दुखावले गेले. तो प्रसंग आहे का ?

दिनेश, लावणी शिकून घेण्याचा प्रसंग नाहीये, पण गौहरजानच्या आश्रयाला ते राहायला गेले, हे पसंत न पडण्याचे, किंवा तिने त्यांच्या भूमिका केल्या हे पसंत न पडण्याचे किंवा त्यांना गायला लावण्याचे प्रसंग घेतले आहेत. ते संसार सोडून तिच्याकडे निघून जातात हा प्रसंग फार खुबीने चित्रित केला आहे. रवी जाधवांना त्यासाठी संपूर्ण मार्क.

गौहरबाईचे काम बाजीराव मस्तानी मालिकेत काम करणार्‍या 'प्रचिती म्हात्रे'ने केले आहे. सुंदर दिसते ती. पण तिच्या तोंडचे डायलॉग जरा मजेशीर आहेत Happy

आज सकाळी एफेम १००.७ वर कौशलची मुलाखत होती. त्यात नाटकातील गाण्यांचा विषय आला तेव्हा तो म्हणाला की गाणी आहेत तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, बालगंधर्वांच्या ताजमहालाला आपली वीट जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न केले आहे तरीही मुळ गाणी गायचा वेळ तेव्हाच्या रितीप्रमाणे जास्त होता आणि बालगंधर्व ह्या चित्रपटात फक्त त्यांचे नाटक दाखवत नसुन त्यांचा आयुष्यपट दाखवत असल्याने गाण्यांमध्ये आवश्यक तो बदल केलाय. त्याने 'नाही मी बोलत नाथा' ह्या गाण्याचे उदाहरण दिलेय. मानापमानात हे गाणे थोडे शृंगारिक, लाडिकपणे येते. पण चित्रपटात मात्र मानापमानाचा पहिला प्रयोग ज्या दिवशी होता त्या दिवशीच बालगंधर्वांच्या मुलीचे निधन झाले, पण तरीही ते खेळासाठी उभे राहिले हा प्रसंग आहे. चित्रपटातले 'नाही मी बोलत नाथा' त्यामुळे दुं:खाची किनार असलेले असे आहे.

बालगंधर्व मीही पाहणार आहे.

http://www.dnaindia.com/entertainment/review_bal-gandharva-is-an-awkward...
हा रिव्ह्यु तितकासा चांगला नाहिये. त्यांनी लिहीलेले खरे असले, तर सिनेमात बर्‍याच त्रुटी आहेत असे म्हणायला हवे. असो.

वरील तुम्ही सर्वांनी लिहीलेले वाचून मी तरी पहायचे ठरवले आहे. Happy

आभार पौर्णिमा.
बालगंधर्वांची कन्या एकदा दूरदर्शनवर दिसली होती. त्यांच्या गायनाची आणखी एक खासियत सांगतात कि कितीही अनवट सूरावट असो, ती गळ्यातून काढताना त्यांना चेहरा वेडावाकडा करावा लागत नसे कि मान तिरपी करावी लागत नसे.
हाच कित्ता पुढे जयमालाबाईंनी गिरवला. आनंदला पण तसे करावे लागत नाही.
बाळ कोल्हटकर पण आधी त्यांच्याच कंपनीत मॅनेजर म्हणून नोकरीला होते.

छान लिहिले आहेस पूनम.

सुबोध, सिनेमॅटोग्राफी आणि कलादिग्दर्शन या तीन गोष्टी 'बालगंधर्व' चित्रपटात प्रचंड प्रभावीपणे आल्या आहेत आणि संपूर्ण चित्रपट या तीन बिंदूंवर तोलला जातो.
बालगंधर्व या 'लिजन्ड'बद्दल आजवर फक्त ऐकून होतो त्याची एक झलक या चित्रपटातून मिळाली. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्याचे त्यासाठी मनःपूर्वक आभार. विशेष म्हणजे माझ्या मुलीही सोबत होत्या त्याही कंटाळल्या नाहीत. बालगंधर्वांच्या व्यक्तिमत्वाने त्याही इम्प्रेस्ड झाल्या. माझ्या मते हे चित्रपटाचं मोठंच यश.
आणि तरीही शंभर टक्के समाधान झालं नाहीये, अजूनही खूप काही कळायचं जाणून घ्यायचं राहीलय अशी चुटपूट थिएटरबाहेर पडताना मनात येत रहाते. दोन तासांतच सिनेमा बसवायचा अट्टाहास का? काही प्रसंग अजून खुलवता आले असते (उदा. पहिल्याच दृष्यांमधे लो.टिळक 'अरे, हा तर बालगंधर्व' उद्गारतात, नारायणाने नाटकातून आपली गायनकला सादर करावी असा त्यांना आग्रह होतो आणि त्यानंतर बालगंधर्वांची थेट स्टेजवर 'विथ ऑल हिज ग्लोरी' एन्ट्री होते ते खटकलं. अ‍ॅब्रप्ट वाटलं. इतकं कुलीन, शालीन रुप, सोज्वळतेचा मूर्तिमंत आविष्कार असलेला वावर हे काही एका रात्रीत घडलेलं नसणार. त्यासाठी कुठून प्रेरणा मिळाली, कुणाचं बघितलं होतं त्यांनी इतकं देखणं चालणं-बोलणं? हे कळायला हवं होतं, निदान एखादया प्रसंगातून दाखवायला हवं होतं म्हणजे बालनारायणाचं 'बालगंधर्व' रुपातलं ट्रान्झिशन तुटक वाटलं नसतं. शिवाय अगदी पहिल्या एन्ट्री पासून ते शेवटपर्यंत त्यांच्या रुपात, अभिनयात काहीच इम्प्रोव्हायझेशन होत गेलं नाही का? ते पहिल्या स्त्री भूमिकेपासूनच इतके परफेक्ट होते का? - हे मला माहीत नाहीये. कळून घ्यावसं आता निश्चित वाटत आहे.
बालगंधर्व आणि गोहरजानच्या संबंधांबाबतही अधिक जाणून घ्यावसं वाटतय. ऐन तारुण्यातही त्यांना कधी त्यांच्या भोवती असणार्‍या रुपसंपन्न, धनीक स्त्रियांचा मोह पडला नव्हता असं बालगंधर्वांची पत्नी म्हणते. असं असताना ते नेमकं काय होतं जे त्यांना वृद्ध्त्वात गोहरच्या सहवासात मिळालं? तिच्यासंदर्भातल्या, तिने त्यांना आप्तजनांपासून तोडलं या वावड्या खर्‍या की तिने त्यांना वृद्धत्वात, आजारपणात, एकाकी, निर्धन अवस्थेतही सांभाळलं या कहाण्या खर्‍या? हेही जाणून घ्यावसं आता वाटत आहे. असो.

चित्रपटाला मधूनच डॉक्युमेन्टरी रुप येतं. पण ठीक आहे. बायोपिकमधे ते बरेचदा नाही टाळता येत. सुबोधची डिक्शन मात्र अनेकदा बालगंधर्वांची न वाटता सुबोध भावेची वाटते. हा दोष टाळता येण्यासारखा होता.

बाकी नटमंडळींविषयी- अभिजीत केळकरचं काम प्रशंसनीय. विभावरी देशपांडेला आता त्याच त्याच साचेबद्ध भूमिकेत पहायला प्रचंड बोर होतय आणि तिचं यातलं कामही आवडलं नाही.

कॉस्चुम्सबद्दल- नीता लुल्ला नाव ऐकूनच काय दिसणार आहे याची जाणीव होती आणि अपेक्षाभंग झाला नाही. बालगंधर्वांच्या अंगावर झरदोसी काठाच्या सिफॉनच्या साड्या आणि कुंदन ज्वेलरी पाहून क्लेष झाले. सोन्याचे दागिने आणि काही शालू, शेले ऑथेन्टिक वाटले. अर्थात जे काही घातलय त्यात सुबोध फार म्हणजे फारच गोड' दिसतो. त्याची देहबोली अप्रतिम. अतिशय समजून, मेहनतीनं काम केलय त्याने.
मेकप अत्यंत सटल, सुंदर. फुल मार्क्स टू विक्रम गायकवाड.

ता.क.- बालगंधर्वांच्या स्वतःच्या आवाजातील नाट्यपदांचं ध्वनीमुद्रण उपलब्ध आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटात एकही पद त्यांच्या मुळ आवाजात का घेतलं गेलं नाही (निदान शेवटी तरी जेव्हा त्यांची मुळ छायाचित्रं दाखवली गेली) काही कळालं नाही.

मला बायस्ड वाटला तो रिव्ह्यू रैना. त्याचं पहिलंच वाक्य- बालगंधर्व महाराष्ट्राबाहेर कोणाला माहितही नाहीत- असं आहे Happy सिनेमात पदं खूपच कमी आहेत, पण सगळी घातली असती, तर लांबी वाढली असती. ती वाढली असती, तरीही बोललं गेलं असतं. तसं पाहिलं, तर त्रुटी प्रत्येक गोष्टीत काढता येतील. असो.

तू पाहणारच आहेस. तुला कसा वाटला ते अवश्य सांग.

बालगंधर्वांचा स्वतःचा असा अमराठी चाहतावर्ग होता. त्यात मारवाडी आणि पारसी लोक होते. हे लोक मराठी नाटके पहायला येत असत.
बालगंधर्वांच्या काळाच्या आसपास गुजराथी रंगभूमीवर पण एक स्त्रीपार्टी नट. "सुंदरी" या नावाने कार्यरत होता. त्याच्या जीवनावर पण एक नाटक येऊन गेले होते. त्याचीही शोकांतिकाच झाली होती.

चित्रपट आवडला. सुबोध भावे, विक्रम गायकवाड आणि महेश लिमये अफलातून आहेत..
पण चित्रपट एका प्रसंगातून दुसर्‍यात उडी मारत होता, ते टाळता आलं असतं कदाचित. चित्रपट अडीच तासांचा झाला तरी हरकत नव्हती. बालगंधर्व, बखलेबुवा, गणपतराव बोदस, गडकरीमास्तर यांना पदद्यावर बघून भरून आलं होतं.. किती मोठी माणसं होती ही सगळी..
पण पंजाबी पद्धतीचा नमस्कार खटकला. आणि चित्रपटावर एवढा खर्च केला, तर नीता लुल्लांना 'देवदास'च्या वेळच्या उरलेल्या साड्या का वापरायला लागल्या, ते कळलं नाही.

मला आवडला सिनेमा. सुबोध भावे प्रचंड सुंदर दिसला आणि वावरला आहे. प्रत्येक ठिकाणी संवादांपेक्षा देहबोलीतून त्याने जे उभे केलेय, दाखवलेय- त्याला तोड नाही. आनंद भाटे अप्रतिम गायले आहेत. सगळी पदं नितांतसुंदर झाली आहेत आणि ऐकताना खरेच रोमांच उभे राहतात. 'नाही मी बोलत..' हे आणि त्यावेळचा प्रसंग तर केवळ अप्रतिम. ते कव्वालीसदृश गाणे मात्र खटकले. (किंवा ते पडद्यावर वेगळ्या पद्धतीने दाखवायला हवे होते- असे वाटले. कसे, ते मला नीट सांगता येणार नाही.) सुबोधनंतर नाव घ्यायचे, तर किशोर कदम या गुणी अभिनेत्याने उभे केलेले गणपतराव! गडकरी, सयाजीमहाराज, शाहूमहाराज पडद्यावर वावरताना बघून मलाही भरून आलं. शेवटच्या टायटल्ससोबतची बालगंधर्वांची छायाचित्रे बघून नि:शब्द व्हायला झाले. गौहरजानच्या संदर्भात मात्र शर्मिला म्हणते आहे, तसंच वाटलं. ती एकतर अचानक येते, हे एक ठीक आहे, पण त्यापुढचं सारंच संदर्भ किंवा दरम्यानचे काळ-प्रसंग गाळून पुढे जातं- ते फारसं झेपलं नाही. त्या प्रचीती म्हात्रेचं कामही आवडलं नाही. शेवटच्या (टायटल्ससोबतच्या) गाण्याऐवजी बालगंधर्वांच्या आवाजातलं एखादं नाट्यपद, गाणं घ्यायला हवं होतं- यालाही अनुमोदन.

बाकी, पदांच्या संख्येबद्दल दोन्ही बाजूंनी मतं ऐकली. सगळे लोक एकाच वेळी समाधानी होऊ शकत नाहीत, हे सिनेमाच्या बाबतीतही खरं असतंच. आणि बालगंधर्व महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नव्हते- हे साफ खोटं.

बालगंधर्वांबद्दल फारसं काही कुठे वाचलेलं बघितलेलं नसल्याने प्रचंड उत्सुकता होती. बालगंधर्व माझ्यासमोर पडद्यावर जिवंत झाले, हेच माझ्या दृष्टीने फार मोठे. त्यापुढे तपशीलातल्या आणि तांत्रिक उणीवा मला फारशा जाणवल्या नाहीत, किंवा जाणवूनही त्यांचे फारसे महत्व वाटले नाही. तो वैभवशाली गंधर्वकाळ नक्की काय होता- हे जाणण्यासाठी तरी बघाच सर्वांनी नक्की.

चीकू,
'बालगंधर्व' - नाट्य सृष्टीला पडलेले एक स्वप्नच. कितीही बोलले तरी कमीच पडेल.
सुबोध भावे यांची भूमिका असलेल्या या चित्रपटावर लेख विभागात तात्या अभ्यंकर
यांनी एक सुरेख लेख लिहला आहे. आपण तो जरूर वाचा. आपल्या या धाग्यावरील
प्रतिसाद देखील वाचनीय आहेत.

अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे बालगंधर्वांना १९५५ साली संगीत नाटक अकादमीची अभिनयासाठीची मानवृत्ती मिळाली होती, तसंच त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांना 'पद्मभूषण'ने सन्मानित केलं गेलं होतं. सरकारदरबारी त्यांची उपेक्षा झाली नाही, आणि हे चित्रपटात यायला हवं होतं.

किन्कर,
तात्या अभ्यंकर यांचाही लेख फार आवडला. सगळ्या प्रतिक्रिया वाचून तर चित्रपट पाहायची खूपच इच्छा आहे पण इथे अमेरिकेत असल्यामुळे तो योग कधी येइल ते माहिती नाही. आणि भारतवारी या वर्षी शक्य होणार नाही. इथे मराठी मन्डळे प्रयोग आयोजित करत असतील तर खूप बरे होइल. मोठ्या पडद्यावर चित्रपट बघणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल हे नक्की ! कोणास यासम्बन्धी माहिती असल्यास जरूर कळवावे. पूर्व भागात (न्यू योर्क, न्यू जर्सी, डी. सी., रिचमन्ड ) इथे कुठे चित्रपट दाखवणार असतील तर नक्की जाऊन पाहाणार आहे!

पौर्णिमा, मस्त लिहिलं आहेस. अजुनच बघावासा वाटतोय आता. Happy

असा सिनेमा थिएटर मधेच बघायला हवा. कधी बघायला मिळणार.. Sad

आणि बालगंधर्व महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नव्हते- हे साफ खोटं.>>> हे अगदीच खोट नाही. महाराष्ट्राबाहेर ते लिमिटेड लोकांनाच माहीत होते. लोकमान्यांसारखे ते भारतभर प्रसिद्ध नव्हते.

छान लिहिलं आहात पूनम आणि शर्मिला! चित्रपट बघायची उत्सुकता आहे.

बालगंधर्वांच्या काळाच्या आसपास गुजराथी रंगभूमीवर पण एक स्त्रीपार्टी नट. "सुंदरी" या नावाने कार्यरत होता >>> "जयकिशन सुंदरी" Happy

Pages