क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले

Submitted by राजे on 3 January, 2011 - 03:34

सामान्यतः समाजातील बहुतांशी लोक कालचक्राप्रमाणे वाहत जातात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात कि त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. आणि यातच त्यांचे युग प्रवर्तकत्व सामावलेले असते.
महात्मा जोतीराव फुले
भारताचा इतिहास हा जेवढा पुरुषांच्या उज्वल आणि दैदिप्यमान कारकिर्दीने भरून आणि भारून गेला आहे तेवढाच स्त्रियांच्या सामर्थ्यवान कामगिरीने भारतीय इतिहासाची अनेक सुवर्णपाने रेखाटली आहेत. परंतू आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांच्या कामगिरीला योग्य तो सन्मान अजून मिळालेला नाही. आज भारत २१ व्या शतकात मार्गक्रमण करत आहे. गेल्या दीडशे वर्षात भारताने कमालीची शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती केली आहे. परंतु या शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विचाराचे स्मरण आपण कितपत करतो ? विकासाच्या आणि प्रगतीच्या गप्पा मारताना आपण या महामानवांच्या विचाराकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष करतो.
भारतातील धर्मव्यवस्थेने स्त्रियांना आणि शूद्रांना शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात प्रगतीची दारे बंद करून टाकली होती. समाजातील दारिद्र्य, दुखः, अज्ञान, अंधश्रद्धा यांचे मुळ शिक्षणाचा अभाव हे आहे. जर शिक्षणच घेतले नाही तर समाज सर्वांगीण प्रगती करू शकत नाही हे वास्तव आहे. आणि हे वास्तव फुले दाम्पत्याच्या लक्षात आले. तथाकथित उच्च ब्राम्हणी व्यवस्थेने समाजावर जो अन्याय चालवला होता, त्याच्या विरोधात फुले दाम्पत्याने बंड पुकारले. महात्मा फुलेंनी सावित्रीमाईच्या साथीने १ जानेवारी १८४८ रोजी देशातील मुलींची पहिली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरु केली. आणि इथूनच स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खऱ्या अर्थाने मोकळा झाला. म्हणजेच फुले दाम्पत्य भारतातील सर्व स्त्रियांचे खरेखुरे मुक्तिदाते आहेत.
३ जानेवारी हा सावित्रीमाईंचा जन्मदिन. या दिवशी सावित्री माईंच्या मानवतावादी कार्याचे स्मरण करून, ते कार्य आणि त्यांचा विचार समाजात कसा पुढे नेता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. सावित्रीमाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव, ता. खंडाळा येथील खंडोजी नेवसे-पाटील यांच्या घरी झाला. १८४० साली त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील कटगुण, ता. खटाव येथील जोतीराव फुले यांच्याशी झाला. लग्न झाले तेव्हा साहजिकच सावित्रीमाई निरक्षर होत्या. परंतु जोतीरावानी जिद्दीने सावित्रीमाईना लिहायला-वाचायला शिकवले आणि आपल्या सामाजिक कार्यात सहभागी करून घेतले. तिथून पुढे या माउलीने अजिबात मागे वळून पहिले नाही. जोतीरावांच्या मृत्युनंतर ही हे मानवतावादी कार्य चालू ठेवून सत्यशोधक समाजाच्या कार्यात स्वताला झोकून दिले.

क्रांतीज्योती सावित्रीमाईच विद्येची खरी देवता
विद्येची खरी देवता कोण ? हा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे असे काही जणांना वाटण्याचा संभव आहे. कारण सामान्य बहुजन समाजाच्या मनावर आणि मेंदूवर प्रचलित धर्म व्यवस्थेने आणि तिच्या ठेकेदारांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजवर भारतात धर्म व्यवस्थेचे ठेकेदार जे सांगतील तेच लोकांना सत्य वाटत आले आहे. कारण आपल्या देशात विचार आणि चिकित्सा करायला बंदी आहे ? हे असं का ? ते तसं का ? असले प्रश्न विचारायचे नसतात. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये असही धर्माने सांगून ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस परंपरेच्या नियंत्रणात राहतो. स्वताचा मेंदू वापरत नाही. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण असा प्रश्न त्याला पडत नाही. आणि पडलाच तर कशाला मेलेली मढी उकरून काढताय म्हणून तो दुसर्यानाच दोष देत बसणार. परंतु फुले दाम्पत्याच्या विचाराने जागृत झालेला बहुजन मात्र स्वताचा मेंदू वापरणार आणि विचार ही करणार. त्यामुळे त्याला चिकित्सा ही करावीच लागणार. आणि चिकित्सा क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल धर्म मार्तंड किंवा कुणी इतरांनी त्याला विरोध करायचे कारण नाही.
तर सांगायचा मुद्दा असं कि आजवर चिकित्सा न केल्यामुळेच बहुजन समाज गुलामगिरीत अडकुल पडला आहे. आणि “होय बा!” वृत्तीमुळे तर तो या दलदलीत खोल रुतत चालला आहे. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण होवू शकते याचा थोडा चिकित्सक पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. कारण तमाम बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली ती महात्मा जोतीराव आणि सावित्रीमाई फुले यांनी. पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये काल्पनिक देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. परंतु ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रतिमा मात्र नसतात. आणि अशा शाळा, महाविद्यालये किंवा संस्थामधून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली जाते, मात्र ज्या सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचले त्यांची साधी आठवण ही कोणाला होवू नये ? पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई सर्वश्रुत आहे. परंतु पहिली स्त्री शिक्षिका कशी घडली याचा कितीजण गांभीर्याने विचार करतात ? ज्यांना काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर ठेवावी. त्यांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत किंवा त्यांना श्रद्धेचा जो अधिकार आहे तो आम्हाला नाकारायचा नाही. परंतु ज्या माउलीने आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तीच आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तीच आमची खरी विद्येची देवता आहे. कारण जर सावित्री माई आणि जोतीराव घडले नसते तर कदाचित भारत आजही अशिक्षित असता. या दाम्पत्यानेच शैक्षणिक क्रांती घडवली हे वास्तव आम्हाला नाकारून चालणार नाही.
स्त्रियांचे खरेखुरे मुक्तिदाते
सावित्रीमाईंचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य
Ø १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात पहिली शाळा सुरु केली. या शाळेत एकूण सहा मुली होत्या, ४ ब्राम्हण, १ धनगर आणि १ मराठा.
Ø १५ मे १८४८ रोजी शुद्रती शूद्रांच्या मुलामुलींची पहिली शाळा पुणे येथे सुरु केली. त्यानंतर पुणे परिसरात सुमारे २० शाळा सुरु केल्या.
Ø २८ जानेवारी १८५३ रोजी महात्मा फुलेंच्या साथीने बाल हत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली. तारुण्यात चुकून पाय घसरल्यामुळे, किंवा समाजातील इतर लोकांच्या अत्याचाराला बळी पडल्यामुळे ज्या स्त्रिया गर्भवती राहिल्या आहेत त्यांनी आपल्या इथे येवून मुलांना जन्म द्यावा अशी भूमिका फुले दाम्पत्याने घेतली. त्यामुळे शेकडो निरपराध मुलांचा जीव वाचला.
Ø १८५४ रोजी ४१ कवितांचा काव्य संग्रह प्रकाशित केला.
Ø १८७३ ला काशीबाई या विधवा ब्राम्हण महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करून तिच्या मुलास दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. यशवंताचा स्वताच्या मुलाप्रमाणे सांभाळ करून त्याला डॉक्टर बनवले.
Ø १८७३ ला सत्यशोधक समाजाच्या स्थापनेत सक्रीय सहभाग.
Ø १८७६-७७ ला महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्या काळात त्यांनी ठिकठिकाणी सुमारे २००० मोफत अन्नक्षेत्र केंद्र सुरु केली. आजच्या नाकर्त्या सरकारलाही हे कधी जमले नाही.
Ø ७ नोव्हेंबर १८९२ ला “बावन्नकशी सुबोध रत्नाकर” आणि १८९२ लाच “मातुश्री सावित्रीमाईंची भाषणे” ही पुस्तके प्रकाशित केली.
Ø १८९३ ला सासवड येथे भरलेल्या सत्यशोधक परिषदेच्या सावित्रीमाई अध्यक्षा होत्या.

सावित्री माईंचे परखड विचार
सावित्री माईंनी थोडेच परंतु अत्यंत परखड लेखन केले आहे. अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला करताना सावित्रीमाई लिहितात,
धोंडे मुले देती ! नावासा पावती !!
लग्न का करती ! नारी-नर !!
केशवपन किती हृदयद्रावक असते त्याचे वर्णन करताना त्या लिहितात,
का हो बाबा, मी तुमची लाडकी !
का करिता मला बोडकी ?
१५० वर्षापूर्वीच त्यांनी इंग्रजीचे महत्व ओळखले होते. ते पटवून सांगताना सावित्री माई लिहितात,
इंग्रजी माउली ! इंग्रजी वैखरी !!
शूद्रांना माउली ! मनोभावे !!
इंग्रजी माउली ! तोडते पशुत्व !!
देई मनुष्यत्व ! शुद्रलोका !!
इंग्रजी शिकुनी ! जातीभेद मोड !!
भटजी भारुडा ! ऐकुनिया !!
महाराणी ताराराणीच्या पराक्रमाबद्दल सावित्रीमाई म्हणतात,
ही एकच शूर रणगाजी ! छत्रपती ताराबाई !!
शिवधनु प्रतापी माझी ! वीरांची रण देवाई !!
अशा प्रकारे परखड लेखन करून सावित्री माईंनी आपल्या विचाराने आणि कार्याने बहुजन चळवळीला एक निश्चित दिशा दिली. आज बहुजन समाज आणि विशेषतः सर्व स्त्रिया अनेक क्षेत्रात उज्वल यश संपादन करताहेत त्याचे मुख्य श्रेय फुले दाम्पत्याचे आहे. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत झटणाऱ्या क्रांतीज्यीती ज्ञानाई सावित्री माई फुले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

मुळ लेख ईथे वाचावा.

http://sahyadribana.blogspot.com/2011/01/blog-post_03.html

गुलमोहर: 

>>>>> पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये काल्पनिक देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. <<<<
चला तर, दादोजी झाले, आता शाळां शाळांतील श्रीसरस्वतीदेवीचे पुतळे अन तसबिर्‍या हलविणार तर! Proud व्हेरी गुड्ड.