श्री. आत्माराम भेंडे आणि श्रीमती आशा भेंडे यांची रंगभूमीवरील व चित्रपट-जाहिरातक्षेत्रांतली कारकीर्द तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. उत्तम अभिनेते व दिग्दर्शक म्हणून नावाजले गेलेले श्री. आत्माराम भेंडे यांचं 'आत्मरंग' हे आत्मचरित्र काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी नाव कमावलं. प्रामाणिकपणे नोकरी करून अनेक मानसन्मान मिळवले. बबन प्रभूंसारख्या मनस्वी कलाकाराबरोबर नाटकं गाजवली, आणि त्यांना आधारही दिला. एक सज्जन कलावंत, असा लौकिक मिळवला.
आपल्याला हवं तसं जगणं फारसं सोपं नसतं. सर्वसामान्यांनी एक चाकोरी स्वीकारलेली असते. अमुक इतकं शिक्षण, मग नोकरी, लग्न, दोन मुलं. सामाजिक भान असेल तर थोडंफार घरानोकरीव्यतिरिक्त सामाजिक कार्य. ही चाकोरी मोडून आपल्या आनंदाला प्राधान्य देणारे फार कमी. श्री. चंद्रकांत वानखडे मूळचे विदर्भातले. कॉलेजात असताना जयप्रकाश नारायणांच्या 'तरुण शांती सेने'च्या संपर्कात आले, आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा सापडली. नागपूरला भरलेल्या शांती सेनेच्या शिबिरात आर्थिक क्रांती, संघर्ष, अहिंसा, श्रमदान अशा सर्वस्वी अनोळखी शब्दांनी त्यांना भुरळ घातली.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चित्रकारांच्या प्रतिभेलाही धुमारे फुटले आणि आधुनिक भारतीय चित्रकलेचं दालन समृद्ध झालं. आरा, हुसेन, बाकरे, रझा, सुझा यांनी प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुपाची स्थापना केली. तय्यब मेहता, अकबर पदमसी यांसारखे चित्रकारही नंतर या ग्रुपाचे भाग झाले. मात्र या कलाकारांवर युरोपीय चित्रकलेचा प्रभाव असल्याचे आरोपही केले गेले. असं असलं तरी आधुनिक भारतीय चित्रकलेला जागतिक स्तरावर नेण्यात या चित्रकारांचा फार मोठा वाटा होता, हे नक्की.
विभावरी शिरुरकरांपासून मेघना पेठ्यांपर्यंत असंख्य लेखिकांनी मराठीत भरघोस लेखन केलं असलं तरी इतर भारतीय भाषांमधलं स्त्रीसाहित्य मराठीत फारसं आलेलं नाही. हे ध्यानी घेऊन मनोविकास प्रकाशनानं 'भारतीय लेखिका' ही मालिका प्रसिद्ध केली आहे. या मालिकेअंतर्गत आतापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. अकरा पुस्तकं लवकरच प्रकाशित होतील. सेन्सॉरशिपला धुडकावून लावणार्या या लेखनात लैंगिकता, राजकारण, पर्यावरण, मानवी नातेसंबंध अशा विविध विषयांचा थेट वेध घेतला आहे, जाणार आहे.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं हे रौप्यमहोत्सवी वर्षं. डॉ. सुनंदा अवचट आणि डॉ. अनिल अवचटांनी हे केंद्र सुरू केलं त्याला निमित्त ठरला त्यांच्या एका स्नेह्यांचा व्यसनाधीन मुलगा. दारू, गर्द यांचं विश्व किती भयप्रद आहे, हे या निमित्तानं अवचट दांपत्याच्या ध्यानी आलं. 'गर्द' ही लेखमालिका अनिल अवचटांनी व्यसनाधीनांच्या आयुष्यावर लिहिली, आणि त्यातून जन्म झाला 'मुक्तांगण'चा.
आपल्याकडे मानसिक आजारांबद्दल प्रचंड पूर्वग्रह आहेत. मनोविकारग्रस्त म्हणजे 'वेडे' आणि मनोविकारांवर उपचार करणारे सायकिअॅट्रिस्ट म्हणजे 'वेड्यांचे डॉक्टर', ही समाजाची धारणा आजही टिकून आहे. शरीराचे जसे आजार असतात तसेच मनाचेही असतात आणि योग्य उपचारांनी ते बरे होऊ शकतात, हे लक्षात घेतलं जात नाही. आपल्या एवढ्या मोठ्या देशात आज केवळ सहा हजार मनोविकारतज्ज्ञ आहेत. तेही बहुतांशी शहरी भागांत. प्रचंड लोकसंख्या, डॉक्टरांची अपुरी संख्या यांमुळे फक्त अतितीव्र मानसिक आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्यानं बघितलं जातं. त्यातही उपचारांसाठी उशिरा येणं, अगोदर अन्य उपाय करणं, या पायर्या घेतल्या जातात.
सिनेमाची गोष्ट १८९५ साली सुरू झाली, आणि बघता बघता या हलत्या चित्रांनी जग व्यापलं. टॉलस्टोयनं सिनेमाला 'गतिमानतेचं गूढ ईश्वरी वरदान लाभलेलं एक महान माध्यम' असं म्हटलं होतं. या हलत्या चित्रांनी माणसाला कितीतरी अद्भुत गोष्टी दाखवल्या. माणसाची निरनिराळी रूपं दाखवली. जणू एक नवीन प्रतिसृष्टी निर्माण केली.
एक लाकडी पेटी आणि काही तारा असं रूप असलेलं संतूर हे सुंदर वाद्य म्हणजे वैदिक काळापासून प्रचलित असलेल्या शततंत्री वीणेचं एक सुधारित रूप. हे वाद्य पर्शियातून आपल्याकडे आलं, असंही काहींचं मत आहे. तसं असलं तरी काश्मीरच्या खोर्यांत प्रचलित असलेल्या या संतूरचे सूर गेली अनेक शतकं लोकांना भुरळ घालत आले आहेत.
लक्ष्मीबाई टिळक, आनंदीबाई शिर्के, पार्वतीबाई ठोंबरे, सुनीता देशपांडे, कमल पाध्ये, सुमा करंदीकर, यशोदा पाडगावकर, रागिणी पुंडलिक यांच्या सकस आत्मचरित्रांनी मराठी वाङ्मयात मोलाची भर घातली. कृष्णाबाई नारायण सुर्वे यांचं 'मास्तरांची सावली' हे या समृद्ध परंपरेला अधिक श्रीमंत करणारं आत्मचरित्र.
कोणे एके काळी 'कला' या शब्दाला काही एक अर्थ होता. मान होता. गायन, वादन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला यांना सरकारदरबारी आश्रय होता. कालांतरानं परिस्थिती बदलली. अभिजात कलांना कोणी विचारेनासे झाले. एखाद्या कलेची साधना करणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं, असा विचार केला जाऊ लागला.
त्यातच शिक्षणपद्धती बदलली. मळलेल्या वाटेवरून जाणं श्रेयस्कर ठरू लागलं. चाकोरीबद्ध आयुष्य जगण्यातच धन्यता मानणारा समाज निर्माण झाला आणि कलेचा आनंद घेणं म्हणजे काय, हेच आपण विसरून गेलो. कलेमुळे जीवन समृद्ध होतं, ही कल्पनाच मागे पडली.