खरा भारत हा खेड्यांमध्ये वसला आहे, असं आपण कायम ऐकत असतो, वाचत असतो. मात्र या खर्या भारताकडे अजून सरकारचंच पुरेसं लक्ष गेलेलं नाही, तर बड्या कंपन्यांना तरी हा भारत कसा माहीत असणार? भारतातल्या शहरांबाहेर राहणार्या अवाढव्य लोकसंख्येपर्यंत पोहोचायचं कसं, हा प्रश्न त्यामुळे मोठ्या कंपन्यांना कायमच भेडसावत आलेला आहे. कारण या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी जी सखोल माहिती हवी, तीच मुळात उपलब्ध नाही. ही माहिती मिळवणं हे भारतासारख्या खंडप्राय देशात महाकठीण.
