४ ते ५ ताजे मध्यम आकाराचे घट्ट बांगडे. (शिळे बांगडे निस्तेज असतात आणि मऊ पडलेले असतात. )
अर्धा नारळ खवून
१५ सुक्या बेडगी मिरच्या
सुपारीइतकी चिंच
लहान चमचा धणे
५-६ मिरीचे दाणे
एक कांदा - मध्यम आकारात
पाव चमचा हळद
८-१० तिरफळे (बिया काढून)
फोडणीसाठी खोबरेल तेल
बांगड्याच्या तुकड्यांना लावण्यासाठी तिखट आणि हळद - २ ते ३ चमचे प्रत्येकी. (आवडीनुसार - कसे कमी, जास्त तिखट हवे त्यानुसार)
१. बांगडे विकत घेतानाच कोळिणीला साफ करुन देण्यास सांगावे, त्या बांगड्यांचा डोळ्यांचा भाग, पोटातली घाण, कल्ले, शेपटी वगैरे साफ करुन देतील. घरी आणून साफ केल्यास हे सर्व भाग काढून टाकावे.
२. बांगड्यांचे आकारानुसार २ वा ३ तुकडे करुन थोडा वेळ बांगड्यांना मीठ किंवा चिंचेचा कोळ लावून ठेवावा, अंदाजे १५ ते २० मिनिटे, नंतर हे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत. मीठ वा कोळ लावून ठेवल्याने माशांचा वास जायला मदत होते. धुवून झाल्यावर तुकड्यांना तिखट, हळद लावून ठेवावे.
३. कांदा चिरावा, चिरलेला कांदा वाटणात वापरायचा आहे. त्यातलाच थोडासा फोडणीसाठी.
४. वाटणासाठी खवलेला नारळ, बेडगी मिरच्या, कांदा, चिंच, हळद, मिरी आणि धणे हे एकत्र करुन मिक्सरमधून काढून घ्यावे. अगदी गंधगोळी असे वाटायचे नाही आणि वाटणात खूप पाणीही वापरायचे नाही.
५. गॅसवर लंगडी तापत ठेवून त्यात २ टेबलस्पून खोबरेल तेल घालून, ते तापले की बारीक चिरलेल्या कांद्याची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंगाचा झाल्यावर त्यावर बांगड्याचे तुकडे घालून, त्यावर वाटण घालावे. किंचित पाणी घालावे - सगळे ढवळता येईल इतपत. खूप पाणी नको.
६. ह्यातच आता तिरफळे ठेचून घालावी व चवीपुरते मीठ.
७. १० एक मिनिटे वा उकळी येईपर्यंत शिजवावे.



