Whats app... सुविचारांचा महापूर

Submitted by फूल on 12 June, 2017 - 21:04

पूर्वी कसं होतं नं कि महात्मा गांधी, वीर सावरकर, विनोबा भावे, स्वामी विवेकानंद यांसारखे थोर विचारवंत, ज्ञानेश्वर, तुकारामांसारखे संत होते... त्यांनी लिहायचं, आपण जमेल तेवढं झेपेल तेवढं वाचायचं... आणि वाचल्यावर त्यांच्या चरणांचं फक्त तीर्थच प्यावं अशी केवळ आशा बाळगायची...

पण आता काही तसं राहिलं नाही... “थोबाडपुस्तक” आणि “काय आहे” यांसारख्या तंत्र क्रांतीमुळे आता घरोघरी पावसाळ्यात कुत्राच्या छत्र्या उगवतात तसे लेखक-कवी-विचारवंत-समाज प्रबोधक-प्रवचनकार उगवलेत... त्यांना सतत काही ना काही होत असतं... कधी सुविचार होतात, कधी कविता होतात, कधी समाज प्रबोधन करणारे लेख होतात, कधी काहीच नाही झालं तर मग शुभेच्छा होतात.... असं काहीही त्यांना झालं रे झालं की लग्गेच ते भ्रमणध्वनी हातात घेतात, दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी टकटक संदेश टंकलिखित करतात आणि send…

कलेला कुठलंहि बंधन असू नये असं म्हणतात... तद्वत या कलेलाहि व्याकरण, शुद्धलेखन अश्या तुच्छ गोष्टींचं बंधन नसतं... आपण लिहिलेल्या विचारातली सुसंगती तर जाउच दे पण मुळात दोन वाक्यांचा अर्था-अर्थी काही सबंध आहे का हा अतिशय साधा, अगदी अतिसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्यानेहि करण्याजोगा विचार या संदेशांमध्ये केलेला आढळत नाही... उचलली जीभ लावली टाळ्याला... आला विचार फेकला आंतरजालावर... वा वा म्हणणारे यांच्यासारखेच हुजरे मुजरे करून तोच संदेश पुढे धाडायाला तय्यार बसलेलेच असतात... याचं त्याला आणि गाढव ओझ्याला... आता उदाहरणच द्यायचं झालं तर...

“प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल... एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल...”

फक्त भगवंत आणि कुटुंब... समाज, गुरुजन, मित्र-मैत्रिणी ह्या बाकी घटकांचा विचार करायची गरज नाही... मग एखादा अनाथ असेल तर... त्याने फक्त भगवंताला आनंदी करायचं... पण मेसेज इथेच संपत नाही... गडबड करायची नाही, एवढ्यात पाणी ओतायचं नाही... अजून मेसेज होतोय...

“जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकळु द्या, चिंताना वाफ होउन उडुन जाउ द्या, दु:खाना विरघळुन जाउ द्या, चुकाना गाळुन घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या.”

हा मेसेज वाचून माझी मैत्रीण म्हणाली, “माझा थोडा problem आहे... ही रेसिपी जशीच्या तशी मला नाही वापरता येणार कारण मी डीप डीप चा चहा पिते... मग अहंकाराला कधी उकळू?” मी म्हटलं, “अहंकाराला न उकळल्याची चूक गाळून घे म्हणजे झालं..” आणि हो खाली शुभ सकाळ! म्हणजे किती समर्पक मेसेज आहे... सकाळी प्रात:विधी म्हणून ज्या ज्या गोष्टी होतात त्यात हा पण एक मेसेज झाला... आता पाणी ओतायला हरकत नाही...

या मेसेजला एकच माणूस वा म्हणाला आणि तो म्हणजे माझा नवरा... मी मराठी लेखिका असल्याने मराठीत मी त्याला काहीही पाठवलं की तो कौतुक करतो... त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालंय.. हा मेसेज त्याला पाठवल्यावर त्याला वाटलं की तो मीच लिहिलाय... आणि उगाच वाद नकोत म्हणून तो लग्गेच कौतुक करून मोकळा झाला... परवा तर वाणसामानाची यादी मराठीत लिहून पाठवली तर त्यालाही तेच... वा वा... उभं दिसलं की कविता आणि आडवा दिसला की लेख असं मानणारा आहे तो.. त्यामुळे उभी यादी त्याला कविता वाटली पटकन... असो थोडं विषयांतर झालं... पण हा लेखही मी whats app वर टाकणार आहेच त्यामुळे थोडं विषयांतर चालेल... आणि तसंही whats app वर म्हटलंच आहे की, (हे मी दासबोधात सांगितलंच आहे किंवा भगवद्गीतेत सांगितलंच आहे अश्या अर्थी म्हणतेय हं...)
एक पेन चुक करू शकतं.
पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण
तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो.
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल.

त्यामुळे मी हा लेख पेनाने लिहिलाय असं समजूया... कारण पेन्सिलीने लिहिला जरी असता तरी माझा खोडरबर सध्या माझ्या मुलीला सांभाळण्यात व्यस्त आहे त्यामुळे मी लिहिलेलं तो खोडू शकला नसता... पेन्सिल आणि खोडरबराच्या मिलनातून दोन वर्षांपूर्वीच एक permanent marker जन्माला आलाय आणि तो सध्या आमच्या नव्या घराच्या भिंतींवर न खोडता येण्यासारख्या चुका करतोय... असो पुन्हा विषयांतर झालं पण मी लेख whats app वर post करणार आहे त्यामुळे असं विषयांतर करणं मला भाग आहे.
तर मी काय म्हणत होते की whats app वरचे मेसेजेस...

"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो..!"

“का?” माझ्या एका खूप लांबच्या पण केवळ whats app मुळे खूपच जवळ आलेल्या ताईने हा मेसेज पाठवताक्षणी मी तिला विचारलं... “पण का?”

"कारण जन्म थेंबासारखा नाही तर कसा असणार? या अनंत विश्वाच्या महासागरात आपण एका थेंबासारखेच आहोत गं... आणि आपल्या आयुष्याच्या ओळी छेदतायत एकमेकांना आणि त्या तश्या छेदल्या की प्रेमाचे त्रिकोण जन्माला येतात आणि वर्तुळ... अगं म्हणजे...सगळंच समजावून सांगता येत नाही काही गोष्टी आपल्या आपण समजून घ्यायच्या असतात..."

ती अजूनही पुढे टाईप करत राहिली असती पण तिचा मुलगा जो त्याच ग्रूप वर आहे त्याने लिहिलं... "आई घरातल्या सगळ्या थेंबांना भुका लागल्यात आणि आता तू नाही वाढलंस तर घरात भलते त्रिकोण तयार होतील..."

“प्रेम त्रिकोणासारखं असतं असं का वाटलं असेल लिहिणाऱ्याला?”, हा प्रश्न मी नवर्याला विचारला. तो अतिशय विचार केल्यासारखं दाखवून म्हणाला “त्याला त्याच्या बायकोने तसं लिहायला सांगितलं असेल... मग तो तरी काय करेल बिचारा...” पण मी काही यावर वाद घातला नाही कारण मला whats app वरचाच अजून एक मेसेज आठवला...

एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "परिवार"; तो ठिक असेल तर सातही वार 'सुखाचे' जातील !!

आठवा वार जर परिवार असू शकतो तर मग दिवार, दुश्वार, आवार, उमेदवार का असू नये... यात पण वार आहे की... नमुन्यादाखल लिहायचं झालंच तर...

"एका आठवड्याचे 'सात' वार असतात.'आठवा' वार आहे "दिवार"; नात्यांमध्ये हा आठवा वार उभा राहिला नाही तर सातही वार 'सुखाचे' जातील !!"

एकदा का बादरायणी संबंधच जोडायचा म्हटला की साहित्य कशाशी खातात हे माहित नसलं तरी काही फारसा फरक पडत नाही....

कोणाला आपलसं बनवायचे असेल,
तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही.
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर
मुखाने करा, मनाने नाही,
लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते,
असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो.

पण मला जायचंच नाहीये सूईतून... असं मी म्हणू शकले नाही कारण मला पुन्हा पुन्हा आठवा वार (परिवार) आठवत राहतो... हे असे मेसेजेस पाठवणाऱ्या त्या आठव्या वारातल्याच (परिवारातल्या) ताई, माई, अक्का असतात... त्यांना भलते सलते प्रश्न विचारले तर माझे आयुष्यातले सगळेच वार दु:श्वार होतील...

हे आणि असे अनेक बोधपर मेसेजेस whats app आणि facebook वर फिरतायत... सगळीकडे शुभेच्छा, सुविचार, सदिच्छा, उत्सव, समारंभांचा आनंदकल्लोळ सुरू आहे... पण यातलं काहीच आत झिरपत नाही... सुखावून जात नाही... भारावून टाकत नाही... विचार करायला लावत नाही... अंतर्मुख करत नाही... कुठलीही सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करत नाही.... सगळं पोकळ, कोरडं, रखरखीत, रूक्ष, फार वरवरचं वाटत राहतं... असं का?

गेल्या वर्षीच्याच दिवाळीची गोष्ट... घरात बाळाला बरं नव्हतं... साधा सर्दी ताप... पण तिच्या आयुष्यातला पहिला वाहिलाच.... त्यामुळे आमचाही अनुभव पहिलाच... मग त्यामागोमाग होणारी जागरणं, बाळाची चिड-चीड, रडा-रड असं सगळंच ४-५ दिवस चालू होतं... शिवाय दूर परदेशात येउन राहिलेलो... त्यामुळे आपण साजरी केली तर दिवाळी नाही तर रोजच्यासारखाच दिवस... पहिली अंघोळ दूरच राहिली... पण दोन दिवस माझी अंघोळही झाली नव्हती... दिवसभर रडून गोंधळ घालून संध्याकाळी बाळ झोपलं होतं... मीहि बाळाबरोबर थकून झोपले... नवरा ऑफिसातून आला तर सगळ्या घरात अंधार आणि त्याने लाईट लावला..... नवऱ्याच्या चाहुलीने मीही उठले... बाळ थकून गाढ झोपलं होतं...

फोन हातात घेतला आणि मेसेजेस बघत बाहेरच्या खोलीत आले... भांडी घासायची बाकी होती, कपडे धुवायचे बाकी होते, तीन चार दिवसात घराला अगदी अवकळा आली होती... खिडकीत कंदील नव्हता, दारात रांगोळी नव्हती, पणती नव्हती, घरात पक्वान्न नव्हती... फोनवर मात्र शुभेच्छा ओसंडून वहात होत्या... whats app वर ४०-४५ आणि फेसबुक वर शे-दोनशे मेसेजेस येउन गेलेले... मला ते पाठवणाऱ्यांची नावंही आठवत नाहीत... २४० शुभेच्छा म्हणूया हवं तर... एखाद्या माणसाला २४० शुभेच्छा मिळाल्यावर त्याने किती खूष असायला हवं? पण मी खूष नव्हते... भकास, अवकळा आलेल्या घराकडे आणि हाततल्या फोनकडे आळीपाळीने बघितलं आणि नकळत डोळे पाणावले... नवऱ्याने समजून डोक्यावरून हात फिरवला आणि हलकेच थोपटलं... स्वत: हात पाय धूवून आला आणि मलाही तोंड धुवायला सांगितलं... मग देवाजवळ गेलो, त्यानेच दिवा लावला... आणि निरांजनाच्या प्रकाशात प्रसन्न हासत मला म्हणाला... “Happy Diwali!” अमंगळाचा नाश व्हायला तेवढे दोनच शब्द पुरेसे होते...

सुविचार, बोधवचनं त्यांच्या आचरणकर्त्याकडून ऐकली की ती सुसंगत वाटतात, आत भिडतात, नकळत झिरपतात आणि आपल्याही आचरणात येतात, शुभेच्छा खरोखरी जिव्हाळ्याच्या माणसाकडून मिळालेल्या अधिक जवळच्या वाटतात... असे सुविचार आणि अश्या सदिच्छा clear chat केल्यावरही आयुष्यभर लक्षात राहतात...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक व्हाट्सअप यायच्या आधि अंगारकि संकष्टिच्या शुभेच्छा हि कोणि दिल्या नव्हत्या>> ह्यावरून आठवलं. माझ्या मित्राच्या कंपनीत आजकाल नियमित पगार होत नाहीत. अक्षरशः अचानक कोणत्याही एके दिवशी बँकेत पगार जमा होतो. सर्व कामगारांचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे. ज्या दिवशी बँकेत पगार जमा होतो, त्यादिवशी सर्व एकमेकांना 'पगार दिनाच्या शुभेच्छा!!!' पाठवतात. Rofl

मस्त लिहिलंय..
..त्रास म्हणजे अनेक ग्रुप्स असतात, आणि प्रत्येक ग्रुप मधे किमान एक तरी सखाराम गटणे असतोच..
काही उदाहरणं:-
"विचार केल्याशिवाय विचार तयार होत नाही. आणि विचार मांडल्याशिवाय मतं तयार होत नाहीत. आपण मानवी अस्तित्ववादाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येतं की मानवी आयुष्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीच्या विचारांचं रुपांतर शेवटी मतामध्ये होणं हेच आहे"
"आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखते आले तर, आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही"
"स्वभाव हा कोकणातल्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो, तेवढीच चव झोपडीत पण देतो"
Happy

छान अन नेमक लिहिलय... Happy

अवांतरः
पण मला मात्र या लेखातिल हेच्च नेमके वाक्य सापडले....
>>>>> वा वा म्हणणारे यांच्यासारखेच हुजरे मुजरे करून तोच संदेश पुढे धाडायाला तय्यार बसलेलेच असतात... <<<<
हिजरे-गिजरे गाजताहेत सध्या माबोवर, आता काय हुजरे मुजरे पण गाजणार काय? Wink

खूप हसले!
गुड मॉर्निंग मेसेज फुलापानांच्या फोटोवर टाकून पाठवतात आणि ते आपोआप डाउनलोड होतात. म्हणजे डाउनलोड बंद करू शकतो मान्य आहे. पण मग जे हवे तेही होत नाहीत. या सगळ्या फोटोजचा फार व्याप होतो नंतर. मला असं वाटतं की सगळ्यांनी आपापले फोटो शुभेच्छा आपापल्या फेबुवर टाकाव्यात. ज्यांना हवं असेल ते तिथे येऊन घेतील. व्हॅट्सऍप पेक्षा फेबु मला बरं वाटतं. कारण तिथे जायचं किनई किंवा मी टाकलेलं बघायचं की नाही (इतराना) हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे.

>>>स्वभाव हा कोकणातल्या हापूस आंब्यासारखा पाहिजे, जो राजवाड्यात जेवढी चव देतो, तेवढीच चव झोपडीत पण देतो"
काही आहे हे.
फणस पण देतो की.
भेंडी, टोमॅटो, लसूण, आलं सगळेच या सुविचारात बसतायत.

एक असलाच ज्ञानोपदेशी मेसेज एखाद्या वर्षापूर्वी फिरत होता, त्यातिल एक ओळ वाचून जाम गहिवरुनच आलं बघा.
मेसेज नक्की काय आठवत नाही पण ती ओळ लक्षात आहे:

प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही.

>>>. प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही. <<<<< Lol
प्लंबर अन डोळ्यातले पाणी (आसू).... अगागागा.... (खर तर अरारारा म्हणणार होतो Wink नाही म्हणले.)

फणस पण देतो की. भेंडी, टोमॅटो, लसूण, आलं सगळेच या सुविचारात बसतायत.>>> असं काही नाही हां.... त्या मेसेज मधे आंब्याचा इमोजी पण होता (मुळात तो लिंबाचा आहे तरी असो!) या लिस्ट मधलं एक टॉमेटो सोडलं तर बाकी फणस, लसूण, भेंडी यांचा इमोजी आहे का तुमच्या व्हॉट्स अप मधे !!! Wink

प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही. >> हाहाहा
ह्या अशा सुविचारांचा एक धागा काढा.. एकदम स्ट्रेसबस्टर धागा होईल!

छान लिहलयस! अगदी मनातली व्यथा, त्यातहि व्हॉटसअ‍ॅप वर जेवढे जोक येतात त्यातले ९० % तरी स्त्रियावर असतात, म्हणजे त्या कशा भाण्ड्कुदळ आहेत, कमी अक्कल असलेल्या आहेत, लग्न करुन पुरुषाची कशी वाट लाग्ते टाइप,

भारी लिहिलय.. माझा वैयक्तिक वैताग इतक्या समर्पक शब्दांत जाहीर केल्याबद्दल तुला हजार गावं इनाम, फुला >>> +१. पर्फेक्ट!

Lol अगदी मार्मिक.

>> विश्वासु मिञ असावा.
>> प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही.

फर्फेक्ट !!

मजेदार लिहीले आहे. आवडला लेख Happy

एखादा पकाऊ मेसेज आपण काही ग्रूप्स मधे हसत पाठवावा, आणि त्याला "कित्ती छान!", "खरंय!!!" टाइप प्रतिक्रिया याव्यात, हा ही एक सॉलिड अनुभव असतो.

प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही. >> कहर आहे हा मेसेज... Lol
बाकी सगळ्यांचेच मनापासून आभार!

लोकाग्रहास्तव हा संपूर्ण मेसेज....

प्लंबर कितीही
एक्सपर्ट असला तरी,
तो डोळ्यांतुन वाहणारे पाणी
बंद नाही करू शकत
त्यासाठी मित्रांचीच गरज असते
जिवनात दोनच मित्र कमवा
एक श्री कृष्णासारखा. ..
जो तुमच्यासाठी युद्ध न करताही
तुम्हाला विजयी करेल
आणि दुसरा कर्णासारखा..
जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युद्ध करेल...

वॉट्स अप ग्रुप च्या पण कॅटेगरीज असतात.
प्रत्येक ग्रुप मधे एकतरी गुड मॉर्निंग चा मॅसेज पाठवणारा अस्तो, एखादा बाप्पाचे फोटो पाठवणारा अस्तो, २/३असे पकाउ मेसेज टाकणारे असत्तातच. आलेल्या मॅसेज मधे काही चुकुन आवडले तर कोणत्या ग्रुप मधे ढकलेले चालतील हे पण ठरलेले अस्ते. उगाच पाणचट जोक्स साठी फ्रेन्ड्स ग्रुप.थोडे चांगले असतील काही एज्युकेशनल टाईप असतील तर सिबलिंग्स्/कझीन्स्चा फॅमिलीग्रुप, त्यातही अजुन सिरीयस असेल /योगा हेल्थ, डायट वैगरे असेल तर सिनीयर सिटीजन सकट्चा फॅमिलीग्रुप.

फा र हसले. Lol
अतिशय समर्पक लिहिले आहे.

मस्त लिहलयं!
प्लंबर कितीही एक्स्पर्ट असला तरी डोळ्यातलं पाणी थांबवू शकत नाही.>>> Rofl

{{{ आणि दुसरा कर्णासारखा..
जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युद्ध करेल... }}}

ही ओळ मात्र नक्कीच डोळ्यातून पाणी येण्यासारखी आहे. कर्णानं युद्ध दोन कारणांकरिता लढलं. एक अर्थातच अर्जुनाशी असलेलं वैर आणि दुसरं म्हणजे दुर्योधनाशी असलेली मैत्री. कवच कुंडलं काढून घेतल्यावर बदल्यात इंद्रानं दिलेलं शक्तीअस्त्र त्यानं अर्जुनाला मारण्याकरिता राखून ठेवलं होतं पण घटोत्कच कौरवसैन्याची अपरिमित हानी करत असलेला पाहून दुर्योधनानं त्याच्या विरुद्धच हे अस्त्र वापरण्याची कर्णाकडे मागणी केली. शत्रूचा द्वेष आणि मित्राचं प्रेम या दोन्हीत मित्रप्रेमाचं पारडं जड ठरलं आणि घटोत्कचाविरुद्ध शक्ती अस्त्र वापरुन कर्ण शेवटी अर्जुनाच्या बाणांनी ठार झाला. तेव्हा या ओळीकरिता मेसेजची प्लंबरवाली ओळ कितीही बिनडोक वाटली तरी माफ करता येईल.

हा घ्या आजचा विचार ☺

सोपं असतं एकमेकांचं आवडणं, निवडणं
पण एकमेकांच्या आवडी निवडी आवडणं सोपं नसतं

सोपं असतं एकमेकांसोबत सप्तपदी चालणं
पण तडजोडीच एक पाऊल उचलणं सोपं नसतं

सोपं असतं एकमेकांची सवय होणं
पण एकमेकांच्या सवयींची सवय होणं सोपं नसतं

सोपं असतं एकमेकांच्या चुका काढणं
पण स्वतःच्या चुका मान्य करणं सोपं नसतं

सोपं असतं एकमेकांना बदलायचा प्रयत्न करणं
पण एकमेकांना स्वीकारणं आहे तसंच सोपं नसतं

सोपं असतं एकमेकांचा विश्वासघात करणं
पण विश्वासाला पात्र ठरणं सोपं नसतं

सोपं असतं तारुण्यातलं दिसणं, चारचौघात मिरवणं
पण वार्धक्यातलं असणं, चार भिंतीतलं सांभाळणं सोपं नसतं
म्हणूनच सोपं नसतं नवरा बायको होणं

Pages