उन्हाळ्याची सुट्टी

Submitted by विद्या भुतकर on 29 March, 2017 - 23:51

गेल्या काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या वाढत्या त्रासाबद्दल आणि योग्य ती काळजी घेण्याबद्दल अनेक मेसेज वाचले. त्यावरून डोक्यात उन्हाळयाच्या सुट्टीचे विचार मनात यायला लागले. खरंतर पाऊस, पहिला पाऊस, पावसातलं प्रेम, हरवलेला पाऊस, डोळ्यातला पाऊस आणि त्यावर अनेक कवितांचा पाऊस दरवर्षी नेमाने येतो. आता इतकी सवय झाली आहे की लोकांच्या पोस्ट वाचून पावसाचा अंदाज येतो इकडे मला अमेरिकेत राहूनही. Happy असो.

तर मुद्दा असा की पावसाबद्दल जितकं लिहिलंय मी स्वतः तितकं कधी उन्हाळ्याबद्दल लिहिलं नाहीये, किंबहुना अजिबातच नाही. म्हणून म्हटलं या सर्व आठवणींची एक पोस्ट लिहावीच. एक गोष्ट स्पष्ट करायची आहे, ती म्हणजे या पोस्ट मध्ये 'गेले ते दिवस' असा सूर नसून 'आठवणी मांडण्याचा' विचार आहे. मला वाटते की प्रत्येक ऋतूची वेगळी एक गमंत असते ती प्रत्येकजण अनुभवत असतो. त्यासाठी लहानपणच हवे असे नाही. आताही ती येतेच, कधी मुलांचे पोहणे पाहण्यात, त्यांच्यासाठी आईस्क्रीम बनवण्यात किंवा त्यांच्या सुट्ट्या ते कसे घालवतात हे पाहण्यात. असो.

तर मला आठवणारा उन्हाळा म्हणजे परीक्षा संपल्यावरचा. तोवर परीक्षेच्या विचारांनी म्हणा किंवा अजून काय पण त्या परीक्षा संपली की उन्हाळा हे गणित डोक्यात एकदम पक्कं. तर शेवटचा पेपर टाकून घरी आलो की फार भारी फीलिंग असायचं. एकदम मोकळं मोकळं. काय करू काय नको असं व्हायचं. एकदा दोनदा तर आईने पापडाचे पीठ मळून ठेवलेलं होतं. आम्ही घरी आलो की लाटायला घेण्यासाठी. इतक्या वर्षात अजूनही माझी चिडचिड विसरले नाहीये त्यावर. दोन मोठी आकर्षणं असायची, टीव्ही आणि दुसरं पुस्तकं. टीव्हीवर फक्त दूरदर्शन त्यामुळे मर्यादितच पर्याय असायचे. पण त्यापेक्षा बरेच दिवस अभ्यासामुळे शेजारी पडूनही वाचता ना आलेलं पुस्तक बिनधास्त वाचायचं असायचं. तो त्या पहिल्या दिवसाचा उत्साह म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात होती माझ्यासाठी.

पुढे मग रोज सकाळी लायब्ररीमध्ये जाऊन दोन तरी पुस्तकं घेऊन यायची. जेवण झालं कि दुपारी वाचत बसायची हे ठरलेलं. सायकलवरून जाताना डोक्यावर तापलेलं ऊन असायचं. घरात आल्याआल्या डोळ्यासमोर अंधारीच यायची. लायब्ररीयन माझी चांगली मैत्रीणच झाली होती. वेगवेगळ्या वयात वाचलेली निरनिराळी पुस्तकं आजही आठवणीत आहेत. दुपारी घरी अनेकदा आई हाक मारायची आणि ओरडायची की उत्तर देत का नाहीस म्हणून आणि मी चिडायचे की मला ऐकूच आली नाही. इतकी त्या वाचनात गुंग असायचे. अनेकदा भाऊ-बहीण, चुलत/आते भाऊ-बहीण यांच्या सोबत खेळायचं सोडून बसायचे. स्वामी, श्रीमान योगी,पुलं, गंगाधर गाडगीळ यांची पुस्तके आणि बरेच काही वाचल्यावर, त्यात काय वाचलं हे मैत्रिणीला रोज सांगण्याची आठवणही आहे एक. त्या छोट्याशा गावातल्या लायब्ररीने खूप काही दिलं. आजही ते सोबत आहे आणि राहील.

पुस्तकं यायच्या आधी एकी खास आठवण म्हणजे आजोबांच्या सोबतची सकाळ. आम्ही आवरत असताना दारात कारंजाच्या झाडाखाली खुर्ची घेऊन आजोबा बसायचे. पेपर वाचत बसायचे. आणि दारातून सायकलवरून टोपली घेऊन जाणाऱ्या प्रत्येक माणसाला हाक मारायचे. गावठी आंबे असायचे त्यात. माणूस थांबला की आबा आम्हाला,आईला हाक मारायचे. आम्ही मग आंबा चाखून बघणार. दर वगैरे आबाच ठरवणार. कधी कधी तर आम्हाला न विचारताच घेऊन टाकायचे. मग घरात एखाद्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक डझन आंबे असायचे. लहान असताना आम्ही रोज सकाळी दात घासून एकदम आंबे खायलाच बसायचो. दुपारी जेवणातही आमरस असायचा. अर्थात त्यासाठी खास रसाचे आंबेच लागायचे. नाहीतर मग चाखून खायचे आंबेच जास्त. सुट्टी संपायला येईपर्यंत आंबे खाण्याचा उत्साह पार संपून जायचा.

आंबे सोडले तर दुसरं आकर्षण होतं ते वेगवेगळ्या कलाकुसरीचं. कापडावर धागे विणून पिशवी बनवायची, रेशमी धागे जोडून वर्तुळावर नक्षी करायची असे छोटे मोठे उद्योग आई करायला द्यायची. पण ते पूर्ण कधी केल्याचं आठवत नाहीये. एक मात्र आठवतं ते म्हणजे दारातले चमेलीचे वेल. दोन दारांच्या दोन मजल्यापर्यंत उंच गेलेले वेल होते. सकाळी उठून दार उघडलं की वाऱ्यासोबत त्याचा घमघमाट यायचा. आम्ही बहिणी आवरून फुलं वेचायच्या घाईत असायचो. का तर जास्तीत जास्त ताजी फुले गोळा करून मोठ्यातला मोठा गजरा कोण बनवणार याची स्पर्धाच असायची. बनवलेला गजरा मळून संध्याकाळी गावातच चक्कर व्हायची, कधी काकूंकडे किंवा लायब्ररीत, नाहीतर भाजी आणायला. मोगरा, चमेली आणि त्यांचे सुवास आजही उन्हाळ्याची आठवण ताजी टवटवीत करतात.

दुपारचं जेवण करून आतल्या खोलीतल्या काळ्या फरशीवर पडून टीव्ही बघायला, झोपायला भारी वाटायचं. आजही घरी गेले की त्या खोलीत डाराडूर झोप लागते. संध्याकाळी कधी कधी सायकली घेऊन शाळेच्या ग्राऊंडवर फेरी मारायला जायचो. कधी चालत जायचो. तर कधी दारातच गप्पा मारत बसायचो. संध्याकाळी दुसरं आकर्षण असायचं ते म्हणजे दारातून जाणाऱ्या आईस्क्रीमच्या गाडीचं. आबांना गाडी दिसली की ते थांबवायचेच. नाहीतर आम्ही पोरं होतोच आठवण करून द्यायला. जवळजवळ रोज स्टीलच्या छोट्या वाटीतून आवडत्या चवीचं आईस्क्रीम खायला मिळणं हा त्या काळातला सर्वात मोठा आनंद.

रात्र होईल तसे घरात खूप गरम व्हायला लागायचं. केव्हा एकदा जेवण उरकून बाहेर येऊन बसतोय असं व्हायचं. पंखा कितीही मोठा ठेवला तरी कासावीस व्हायचं. टिव्हीवर जेवताना जे काही पाहिलं तितकंच. मग अंगणात येऊन बसायचो. बरेचदा लाईटही जायचीच. त्यामुळे अंगणात बसून आकाशाकडे पाहायला भारी वाटायचं. तितकं ताऱ्यांनी भरलेलं आकाश पाहून खूप वर्षं झाली. लहान असताना आबा गोष्टी सांगायचे. एकच गोष्ट थोडीफार बदलली तर 'तुम्ही काल असं सांगितलं होतं' म्हणून भांडायचो. उन्हाळ्यांत दारासमोरून उसाचे ट्रक, बैलगाड्या भरभरून जायचे. बैलगाड्या तर आम्ही मोजायचो एका वेळी किती जातात म्हणून. मग मागून एखादा ऊस काढून घ्यायचा. कधी ४-५ काढले तर ते गुऱ्हाळात घेऊन जाऊन रस काढून किटलीतून घेऊन यायचो. जवळच्याच गावात साखर कारखाना असल्याने तिथल्या मळीचा वासही ओळखीचा झाला होता. रात्र चढेल तसा तो वासही वाढायचा.

आम्ही जेवणानंतर कधी चालत जायचो तर काळ्या कुळकुळीत रस्त्यावरून चप्पल काढून चालायला भारी वाटायचं. जितके जोरात पळत जाऊ तितका जोरात अंगाला वारा लागणार.पण घरी आले की तितकेच जास्त गरमही व्हायचे. थोडी वर्षं आम्ही अंगणात गाद्या टाकून, मछरदाणी लावून झोपायचोही. तेव्हा रात्र वाढेल तसा लागणारा गार वारा कधी झोप घेऊन यायचा कळायचं नाही. जाग यायची तेव्हा उन्हं चढलेली असायची. तर कधी ६-६.३० लाच उजेडामुळे जाग यायची. मग आम्ही घरात जाऊन झोपायचो. Happy कधी कधी मात्र वळवाच्या पावसाने एकदम धावपळ व्हायची आम्ही झोपेतून उठून कसेबसे आत पळत जाऊन गाड्या टाकून पुन्हा झोपून जायचो. एका रात्री बाहेर झोपलेलो असताना, मला काहीतरी अंगावर आहे असे जाणवले म्हणून ओरडले तर एक माणूस माझ्या गळ्यात चाचपत होता. पुढे काय झाले माहित नाही. बहुतेक तो चोर पळून गेला. पण तेव्हापासून बाहेर झोपणे बंदच झाले. अजूनही कधी ते आठवले तर एकदम भीती वाटते. अनेक वर्षात असा वाईट अनुभव पहिल्यांदाच आला होता. आता मात्र रात्री दारांना कुलूप लावून झोपावे लागते आई-दादांना. चोरीचे प्रमाण जास्तच वाढले आहे गावात. असो.

सातवीच्या उन्हाळयात घरी कॅरम आणला. आई दादा दोघेही उत्तम कॅरम खेळायचे. दिवसभर आम्ही शिकायचो आणि भाऊ-बहिणी, घरात येणारे पाहुणे सर्व खेळायचे. रात्री मात्र आई, दादा आणि आम्ही चौघांपैकी दोन असे मिळून डाव मांडला जायचा. तेव्हा मजा यायची खूप. घरात पत्ते तसे कमी खेळले जायचे. दादांना जास्त आवडायचे नाहीत त्यामुळे. कधी कधी सख्खे,चुलत, आते भावंडं मिळून लपाछपी, पळापळी खेळायचो तर कधी उगाच शेतात भटकलोही आहे. अर्थात केवळ खेळच नाही तर अभ्यासही व्हायचा. आजोबा चुलत बहिणीला इंग्रजी किंवा संस्कृत शिकवायचे. मी तिच्याहून एकच वर्षाने लहान. त्यामुळे तिच्यासोबत मलाही बसवायचे. त्यामुळे इंग्रजी आणि संस्कृत सुट्टीमध्ये आणि परत पुढच्या वर्षी असं शिकले आहे. माझी खूप चिडचिड व्हायची सुट्टीत अभ्यास करावा लागतो म्हणून पण तेव्हा जे शिकले त्याने खूप काही मिळालं. मुख्य म्हणजे आजोबांच्या आठवणी. Happy

मे मध्ये निकाल लागायचे, कधी खूष तर कधी नाराज व्हायचे. पण सुट्टीत पुन्हा विसरून जायचे. मेच्या शेवटी मात्र उन्हाने, दमट वातावरणाने आणि मोठ्या सुट्टीचा कंटाळा यायचा. शाळेचे वेध लागायचे. जूनच्या पहिल्या आठवड्यात कधी एकदा शाळा सुरु होते असं व्हायचं. अर्थात अभ्यास, रुटीन यामध्ये यायला मन थोडं त्रास द्यायचं. शाळा सुरु झाली की महिन्याभरात सुट्टीबद्दल विसरूनही जायचे. किती छान होतं ते सारं.

इथे लिहिल्या इतक्या सगळ्या गोष्टी एकाच वर्षातल्या नसून अनेक वर्षांच्या आठवणींचा संग्रह आहे. माझ्या त्या काळातल्या छोट्या जगातल्या मोठया गोष्टी आहेत. आता विचार केला तर वाटतं तेव्हा हे सर्व अनुभवलं यासारखं सुख नाही. आता धावपळीत असा निवांत क्षण मिळत नाही. मुलांना त्यांच्या सुट्टीचा आनंद घेता यावा अशी खूप इच्छा असते, आहे. मागच्या वर्षी त्यांच्या सुट्टीत २ महिने भारतात राहिलो. दोघेही अजून त्या सुट्टीच्या आठवणी काढतात. त्यांनाही माझ्यासारखं काहीतरी आठवणीत ठेवण्यासारखं मिळावं, आमच्याकडून दिलं जावं हीच अपेक्षा आणि प्रयत्न आहे. आज या लिखाणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान वाटलं. आता मी या वर्षीच्या आमच्या सुट्टीची वाट बघतेय.
Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिले आहे!! माझ्यासुद्धा लहानपणीच्या सुट्ट्यांच्या आठवणी मनात तरळून गेल्या Happy

छान लिहिलंय !
आम्ही सुट्ट्या लागलो कि गावाला पळायचो ! असली मजा सगळी गावालाच.. परत मुंबईला येताना आई म्हणायची आता परत रहाटगाडगं सुरु !