बेबी नंदा

Submitted by अदित्य श्रीपद on 26 March, 2017 - 12:37

काल म्हणजे २५ मार्च ला बेबी नंदा जाऊन ३ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मागेच लिहिलेला लेख परत टाकत आहे.

बेबी नंदा

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ओळखलत का हा फोटो कुणाचा आहे ? हि आहे बेबी नंदा. बेबी नंदा हे नाव ऐकलं तर कदाचित काही जुन्या माणसांचेच डोळे स्मृतीच्या कवडशांनी चमकू लागतील. बाकीच्यांना ती नंदा म्हणूनच माहित. मास्टर विनायक ह्या मराठीतल्या अत्यंत नावाजलेल्या अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याची ती मुलगी.त्यांच्याच अनेक चित्रपटात ती बाल कलाकार-बेबी नंदा म्हणून चमकल्यामुळे त्याकाळी ती ह्या नावानेच प्रसिद्ध झाली. माझे आई बाबा नेहमी तिला बेबी नंदा म्हणत.त्यामुळे मला सुद्धा तिचा उल्लेख करताना बेबी नंदा म्हणायचीच सवय पडली. इतकी कि कुणी नंदा म्हटले तर तो नक्की कुणाबद्दल बोलतो आहे, ह्याचा मला संभ्रम पडे. (तीच गोष्ट बेबी शकुंतलाची. खरतर हि अत्यंत सौन्दर्यवती मराठी अभिनेत्री पण तिने लवकर लग्न करून चित्रसंन्यास घेतला. ती बहुधा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. रामशास्त्री मधली तिची लहानपणच्या रामशास्त्र्याच्या बायकोची भूमिका आणि ‘दोन घडीचा डाव’ हे गीत इतके गाजले कि नंतर तिचा उल्लेख कायम बेबी शकुंतला असाच होत राहिला)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

मास्टर विनायक आणि त्यांची हंस पिक्चर्स( आधीची ‘नवयुग पिक्चर्स’) हि त्यांच्या काळातली अत्यंत नावाजलेली नावं.’ब्रह्मचारी’, ‘डॉ.कोटणीसांची अमर कहाणी’, ‘माया मच्छिंद्र’ असे अनेक गाजलेले सिनेमे त्यांच्या नावावर आहेत. ते दिनानाथ मंगेशकरांचे स्नेही होते. मंगेशकरांच्या मृत्यू नंतर त्यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या मंगेशकर कुटुंबाला साह्य केले आणि १३ वर्षांच्या लताला सुरुवातीच्या काळात जम बसवायला मदत केली. त्यांच्याकडेच लताने ‘पहिली मंगळागौर’ ह्या चित्रपटात काम केले होते. ह्याच चित्रपटात बेबी नंदा लताच्या लहान बहिणीची भुमिका करीत होती. लताचे पहिले वहिले फिल्मी गीत ‘नटली चैत्राची नवलाई’ ह्याच सिनेमातले, ते बर्यापैकी गाजलेही पण १३ वर्षांच्या लताचा आवाज अजून खूपच कोवळा होता आणि त्याला ‘लतापण’ यायला अजून बराच वेळ आणि तयारी हवी होती. असो... तर मराठी मास्तर विनायकांच्या नंतर त्यांच्या ह्या मुलीने अखिल भारतीय कीर्ती मिळवली. तिच्या काळात नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, नूतन अशा एका पेक्षा एक सुंदर, आणि अभिनय कुशल अभिनेत्रींची चलती होती पण त्यात सुद्धा तिने स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले एव्हढेच नाही तर तिची कारकीर्द हि खूप मोठी(१९४८ ते १९८३) आणि नि:संशय यशस्वी कारकीर्द होती. १९४८ ते १९५६ ह्या काळात तिने बालभूमिकाच केल्या त्यासुद्धा मराठीतून. १९५६ साली तिचे मामा, ख्यातनाम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते वी. शांताराम ह्यांनी तिला ‘तुफान और दिया’ ह्या हिंदी सिनेमात संधी दिली. आई वारल्या नंतर अनाथ झालेल्या भावा बहिणींची हि कहाणी. त्यातली तिची लहान, अश्राप, ‘परिस्थितीशी झगडणाऱ्या भावावर’ खूप प्रेम करणाऱ्या लहान बहिणीची चटका लावणारी भूमिका इतकी हृदयस्पर्शी होती कि आज हा पिक्चर तिच्यासाठी आणि गाजलेल्या गाण्यांसाठीच ओळखला जातो. तिला तिच्या ह्या पहिल्याच मोठ्या भुमिके साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे फिल्म फेअर पारीतोषिक हि मिळाले. ह्यानंतर आलेल्या ‘भाभी’, ‘ काला बाजार’, छोटी बहन’ मध्य परत तिने लहान बहिणीच्याच भूमिका केल्या आणि हे सगळे चित्रपट लई म्हणजे लैच चालले. नुसते चालले नाही तर नंदाच्या भूमिकाही तुफान गाजल्या. काल परवा आलेली बेबी नंदा, बलराज सहानी, रेहमान, देवानंद अशा मातब्बर माणसांसमोर उभी राहायला कचरत तर नव्हतीच उलट ही कोल्हापूरची पोरगी त्यांच्यापुढे चांगली शड्डू ठोकून उभी राहत होती आणि कधी मधी अभिनय करताना त्यांनाच धोबी पछाडही घालत होती.(तुफान और दिया मधला राजेंद्र कुमार म्हणजे तिच्या पुढे पाला पाचोळा – तसा तो कुणापुढेही, कुणा पुढे का? असाही पाला पाचोळाच...पण ते एक असो) आता ती कायम लहान बहिणीच्याच भूमिकाच करणार कि काय! अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्यातून बाहेर पडणे सोपे नव्हते.१९६० साली आलेल्या कानून मध्य तिने राजेन्द्रकुमारच्या प्रेयसी कम वाग्दत्त वधूचे काम मस्त केले होते. दिसली हि छान होती पण छोट्या बहिणीच्या प्रतिमेचा पगडा अजून इतका होता कि तिची फारशी दाखल घेतली गेली नाही. कानून खूप चालला पण तो नाना पळशीकर, ओमप्रकाश, अशोककुमार ह्यांचे अभिनय, स्टोरीचे वेगळेपण, एकही गाणे नसणे अशा अभिनव गोष्टी आणि दिग्दर्शनामुळे. अशात १९६१ साली आलेल्या ‘हम दोनो’ मध्ये तिने देवानंदच्या बायकोची भूमिका केली. साधना जरी नायिका असली तरी नंदाची भूमिका अगदीच दुय्यम नव्हती आणि मुख्य म्हणजे ती बहिण नव्हती. साधना हि माझी अत्यंत आवडती नायिका पण हम दोनो मध्ये ललिता पवार नंतर ज्याच्या अभिनयाने आपण भारावून जातो अशी नंदाच होती. (देव आनंदवर आम्ही कधीहि तो छान अभिनय करतो म्हणून प्रेम केले नाही – नाहीतर त्याच्यावर प्रेम करणे अशक्यच होते. आणि त्यानेही कधी आमचा विश्वासघात केला नाही. आयुष्यभर त्याने कधीच अभिनय केला नाही. तो देव आनंदच राहिला...ते हि एक असो) आता ती अत्यंत सुंदर, मोहक दिसू लागली होती. लहान बहिणीचे निष्पाप कोवळेपण हळू हळू लोप पावत चालले होते.पण ती कधी हि मादक, उत्तान भासली नाही. नूतन, साधना, नंदा आणि हॉलीवूडची ऑड्री हेपबर्न ह्या अशा नायिका होत्या ज्या कधीही मादक उत्तान भासल्या नाहित. म्हणूनच कि काय त्या लोकांच्या(पक्षी माझ्या) मनात आजही घर करून आहेत.
१९५९ साली आलेल्या ‘बरखा’ ह्या सिनेमातले ‘ एक रात मे दो दो चांद खिले ‘ ह्या मुकेश आणि लताने गायलेल्या, राजेंद्रकृष्णाने लिहिलेल्या आणि चित्रगुप्तने संगीत दिलेल्या गाण्यात ती अशी दिसली कि त्याकाळी प्रत्येकाला आपली प्रेयसी किंवा बायको असावी तर अशीच असावी असे नक्की वाटले असणार. हे गीत श्रवणीय तर आहेच पण प्रेक्षणीयही आहे. त्यातले तिचे विभ्रम, संकोच, लज्जा केवळ अप्रतिम! ते कशाला बघाच, खाली लिंक दिलेली आहे.
https://www.youtube.com/watch?v=m2-Dg3DrHx4
ह्या गाण्यात नायक अनंत कुमार- म्हणजे राम मराठे ह्यांचा भाऊ अनंत मराठे, तिच्या डोक्यावरचा पदर नीट करताना (काढताना नाही) किंचित ढळतो तेव्हा ती ज्या निगुतीने तो सावरून घेते ते पाहिलत- आजतर नायिकाच फक्त ब्लाउज आणि मोठाला परकर – त्याला म्हणे घागरा म्हणतात घालून बोडक्या डोक्याने प्रेमाची आवस मागत फिरते. काळाचा महिमा अन काय!
१९६५ साली आलेला ‘तीन देवीया’ हा तिचा आणि देवानंदचा तिसरा सिनेमा. ह्यात ती इतकी लोभस आणि सुंदर दिसली, कि मला तर खूप टेन्शन आलं होतं कि देवानंद तिला सोडून त्या भंगार सिमी किंवा कल्पनाशी (खरेतर सिमी गरेवालचा उल्लेख करताना सिम्मी निम्मी असे लिहिणार होतो पण निम्मी हि ह्या चित्रपटात नव्हती आणि ती खूप चांगली नायिका होती, वाक्यात पंच यावा म्हणून असा अन्याय करणे बरे नव्हे...) तर लग्न करणार नाहीना? पण देवानंदने माझी निराशा केली नाही. (म्हणूनच तर तो देवानंद आहे.) ह्या पिक्चर मधली त्यांची हि दोन गाणी बघाच ...

https://www.youtube.com/watch?v=OaginwwacJI
https://www.youtube.com/watch?v=Df-JCRpAlFM
आजदेखील हि गाणी पहिली कि माझ्या मनात कालवाकालव होते.
१९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ पासून तिची शशी कपूर बरोबर जोडी जमली त्याआधीही त्यांचे दोन चित्रपट, ‘चार दिवारी’ (१९६१) आणि ‘मेहेंदी लगी मेरे हाथ’ (१९६२) आले होते पण ते चालले नाहीत. ‘जब जब फुल खिले’ने इतिहास घडवला. त्यातले ‘ ये समा ..समा है ये प्यारका’ हे गीत इतके गाजले कि आजही नंदा म्हटले कि हे गाणच डोळ्यासमोर येतं. ह्याच साली आलेला मनोजकुमार बरोबरच ‘गुमनाम’ चालला खरं पण कौतुक मात्र हेलन आणि मेहमूदचे जास्ती झाले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire
तिने जितेंद्र, राजेश खन्ना ह्यांच्या बरोबर हि कामं केली आणि त्यांच्याबरोबरचे जवळ जवळ सगळे सिनेमे गाजले. इत्तेफाक मधली तिची भूमिका निगेटिव टच दाखवून गेली. तर १९७० साली आलेल्या ‘नया नशा’ मध्ये तिने अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या स्त्रीची शोकात्म भूमिका उत्तम केली होती. पण चित्रपट फार चालला नाही बहुधा तिच्या प्रतिमेला ती भूमिका शोभली नाही( मला तसे वाटत नाही पण लोकांना तसे वाटले असणार, नाहीतर सिनेमा खूप चांगला होता (...आज सलमान खानचे तद्दन भिकार पिक्चर चालतात आणि असे चांगले चालत नाहीत...लोकांची अभिरुची(हीनता) दुसरं काय! )
१९७० ते १९७४ हा हळू हळू तिचा प्रभाव आणि सौंदर्य उतरत चाललेला काळ होता.’शोर’(पुन्हा मनोज कुमार- हाय रे कर्म) ‘जोरुका गुलाम’ (राजेश खन्ना ) ह्यांचं यश फसवं होत आणि हे तिलाही कळत होत म्हणून तिने नंतर काम करणे जवळ जवळ बंदच केलं.
१९८२ साली तिने ‘प्रेमरोग’ मध्ये केलेली कुलभूषण खरबंदाच्या पत्नीची आणि अकाली विधवा झालेल्या पद्मिनी कोल्हापुरेच्या आईची भूमिका लक्षणीय होती.पोरीच्या काळजीने जीव तुटणाऱ्या आईची तडफड तिने फार उत्तम दाखवली होती.
तिने कधीही लग्न केले नाही. तशा प्रिया राजवंश किंवा आशा पारेख, परवीन भाभी ह्याही अविवाहित राहिल्या पण नंदा बद्दल कधीही, कुठेही, कसल्याही वावड्या उठल्या नाहीत. तिचे नाव कधी कुणाशी वेगळ्या अर्थाने जोडले गेले नाही. सिने जगतात हा एक अपवादात्मकच प्रकार आहे. ती आणि साधना,आशा पारेख,बबिता,सायराबांनू ह्या जिवलग मैत्रिणी. त्यांनी १९९२ मध्ये तिला मनमोहन देसाईशी लग्न करण्याची गळ घातली होती आणि ती तयारही झाली होती म्हणे, पण मनमोहन देसाईने घराच्या गच्ची वरून उडी मारून आत्महत्या केली. (... कि तो अपघात होता कोण जाणे!) आणि मग पुढे तिने कधी हि लग्न केलेच नाही. तीन वर्षांपूर्वी २५ मार्च २०१४ ला ती वारली आणि हिंदी चित्रपट सृष्टीतले खरेखुरे शालीन सोज्वळ सौंदर्य लोप पावले.
असे म्हणतात कि प्रत्येक मुलीच्या मनात स्वप्नाचा एक राजकुमार असतो तसेच मुलाच्याहि मनात एक आदर्श प्रेयसीची प्रतिमा असते. खरं खोटं मला माहित नाही( म्हणजे प्रत्येकाच्या मनात असते कि नाही हे मला माहित नाही ) माझ्या मनातली आदर्श प्रेयसी कधी नंदा तर कधी साधनाचे रूप घेऊन येते. ( बायको! हे वाक्य फार मनावर घेऊ नको. लेखाचा शेवट जरा बरा व्हावा म्हणून लिहिलेलं आहे. अन्यथा तूच माझ्या स्वप्नांची राजकुमारी... नंदा शप्पथ सॉरी, आईशप्पत!)
---आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

उत्तम लेख. आवडला.
पण प्रिया राजवंश, अविवाहीत नव्हती तर ती देव आनंद ची वहिनी होती. चेतन आनंद ( की विजय आनंद?) ची बायको होती, जिचा नंतर संपत्तीकरता खून झाला.

आणी परवीन भाभी नाही, परवीन बाबी. परवीनने महेश भट् शी लग्न केले होते, मायबोलीवरच तिच्या विषयी लेख आहे, जरुर वाचा.

बेबी नंदा नव्हे...बेबी शकुंतला

‘दोन घडीचा डाव...’ या गाण्यातील मुलगी बेबी नंदा तर नक्कीच नाही....

ती बेबी शकुंतला होती...बेबी नंदा नव्हे...

ती (बेबी शकुंतला) ‘दहा वाजता’ चित्रपटांत देखील होती...

@रवींद्र ...अहो मी कुठे ती नंदा होती असे म्हटलंय , ..."(तीच गोष्ट बेबी शकुंतलाची. खरतर हि अत्यंत सौन्दर्यवती मराठी अभिनेत्री पण तिने लवकर लग्न करून चित्रसंन्यास घेतला. ती बहुधा तिच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. रामशास्त्री मधली तिची लहानपणच्या रामशास्त्र्याच्या बायकोची भूमिका आणि ‘दोन घडीचा डाव’ हे गीत इतके गाजले कि नंतर तिचा उल्लेख कायम बेबी शकुंतला असाच होत राहिला)"

लेख छान जमलाय...

बेबी नंदा वरील लेखामधे बेबी शकुंतला चा फोटो बघून मी लगेच प्रतिक्रिया दिली...यात माझीच चूक आहे...

बाकी लेख खूपच छान जमलाय.

नंदा चे तूफान और दिया, छोटी बहन, हम दोनों हे चित्रपट दिसले की बघावेच लागतात...कारण नंदा चा अभिनय...ग्रेट...

तीच गोष्ट बेबी शकुंतला ची...

रामशास्त्री आणि दहा वाजता (गोड गुपित कळलंय मला...), या दोन्ही चित्रपटांत तिच्या वाट्याला एक-एक गीत आलं होतं...अिभनय अप्रतिम होता...दहा वाजता मधील एक गीत होतं ‘चल थरकत मुरकत डौलात रे...’ मला वाटतं धावत्या घोड्याच्या टाचांच्या पार्श्वभूमीवरचं ते पहिलंच गीत असावं...

थोडंसं विषयांतर...

कालच रोनाल्ड कोलमन असलेला 1938 सालचा If I were King बघितला.

त्यात किती म्हणून किती सहज वावरलाय तो...

आवडला लेख .
"इत्तेफाक" मधे तिच्या सोज्वळ प्रतिमेचा छान उपयोग करुन घेतला होता.

शशि कपूर सोबत तिचा प्रेमपत्र ( बहुतेक ) अश्या नावाचा चित्रपट बघितल्याचे आठवतेय. त्यात ३ नायिका होत्या.
आकाशगंगा किंवा लावणी झाली गं रागिणी अश्याच काहितरी नावाचा मराठी चित्रपट तिने काढला होता का ?