'माहोल'

Submitted by कविता केयुर on 20 March, 2017 - 03:58

'माहोल'

परवाच 'दिवेलागण' या कविता संग्रहातील आरती प्रभूंची कविता ऐकली सलील कुलकर्णीच्या आवाजातील," कधी माझी कधी त्याची हि साउली , रेंगाळे माझिया चोरट्या पाउली".

यातीलच एक कडवं आहे,
" कधी त्याच्या पायी माझा उठे ठसा , कधी मला त्याच्या प्राणाचा आरसा,
चारी डोळ्यातून दोघेही जगतो, दारी तोही कधी पणती लावतो , कधी माझी कधी त्याची हि साउली "....

तो चालला आणि माझ्या पायाचा ठसा उमटला, त्याची सावली पण माझ्यात अडकली .. इतकं मिसळून जाणं म्हणजे प्रेम. अवलंबून असणं म्हणजे प्रेम, एकमेकांच्यात समरसून पुढे जाणं म्हणजे प्रेम ... या ओळी फक्त प्रियकर प्रेयसी बद्दल नाहीत तर प्रत्येकाने ऐकताना, आपला अर्थ आपण शोधायचाय... कोणाला 'आपला मुलगा आणि आपण' हे नातं सुद्धा सापडेल कदाचित या ओळीत...

"कविता ऐकताना प्रत्येकालाच आपला अर्थ सापडतो, शोधावा लागतो"... अजूनही हाच संदर्भ कुठंतरी डोक्यात रुतला होता ..

जसा 'माहोल' आहे तशी गाणी ऐकावी, असं मला नेहमी वाटतं. कधी तो माहोल मनाचा तर कधी आजूबाजूच्या वातावरणाचा, हाच काय तो फरक. आज एकंदरीत दोन्हीही माहोल जमून आले होते ... रात्रीची वेळ, कोपऱ्यात तेवणाऱ्या मेणबत्त्यांचा मंद उजेड, ती हवीहवीशी वाटणारी शांतता, बाहेर सुटलेला गार वारा, मोगऱ्याचा दरवळणारा सुवास .. आणि झोपाळ्यात बसून, आरामात डोळे मिटून, आवडीच्या गाण्यांच्या मैफिलीत रमलेली मी.... फक्त मी आणि माझी गाणी.

'फिर वही शाम वही गम वही तनहाई हें , दिल को समझाने तेरी याद चाली आई हें , फिर वही शाम' .... तलत मेहमूद यांचा आवाज आणि मदन मोहनजींचे शब्द. ' जाने अब तुझसे मुलाकात कभी हो के न हो , जो अधुरी रही वो बात कभी हो के न हो ' .... आयुष्यात निसटून गेलेल्या त्या क्षणांत, ती 'अधुरी' गोष्ट आज परत नव्याने दिसू लागली. आता परत कधीच भेट होणार नाही आणि मनातलं तुझ्याशी बोलताही येणार नाही.....

' आए तुम याद मुझे , गाने लगी हर धडकन '... साहिरजींचे शब्द आणि किशोरजींचा आवाज...

आठवणी ... नेहमीच हुरहूर लावणाऱ्या. दिवसा पुसट होऊन संध्याकाळी गहिऱ्या होणाऱ्या. 'जब में रातोमें तारे गिनता हूँ , और तेरे कदमों कि आहट सुनता हूँ , लगे मुझे हर तारा, तेरा हि दर्पण '...... आजही तुझाच भास होतोय , त्या प्रत्येक ताऱ्यात मला फक्त तूच दिसते आहेस ....

'किसका रस्ता देखे , ए दिल ए सौदाई , मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई'... त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला पाहून नकळत बाहेर पडणारा हळवेपणा ... तू परत फिरून येणार नाही तरीही पाहिलेली तुझी वाट . कित्येक दिवस सूर्यास्ताच्या वेळी , क्षितिजाकडे पाहून तुला घातलेली साद ... मीलों हें खामोशी बरसों हें तनहाई...

'बिती ना बिताई रैना , बिऱहा कि जाई रैना , भिगी हुई अखियोंने लाख बुझाई रैना '.. गुलजारजींचे शब्द आणि लताजींचा आवाज. ' भुले हुए नामोंसे कोई तो बुलाए ' हि आर्तता खरंच आठवण करून देते 'तुझी' .. आजही त्या नावाने , त्या आवाजाने कोणीतरी हाक मारावी असं वाटतं. 'चाँद कि बिंदीवाली बिंदीवाली रतिया '... पाहून फक्त तू आठवतेस ....

'कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ कि दुल्हन बदन चुराए , चुपके से आए ... मेरे खयालों के आंगन में कोई सपनों के दीप जलाये'... दिवसांना सुख दुःखाचे सोयर सुतक नसते. आपल्या आयुष्यातुन जाणाऱ्या कोणासाठीच ते थांबत नाहीत. विस्मरणात गेलेल्या आठवणी मग कित्येकदा डोळ्यातून बाहेर पडतात... " भर आई बैठे बैठे जब युं ही आँखे"... आपल्या मनातील ती सल फक्त आपल्यालाच ठाऊक असते ... "दिल जाने मेरे सारे भेद ये गेहेरे' ... हे सार काही आत कुठंतरी लपवून ठेवावंसं वाटतं...

'आपकी याद आती रही, रातभर ... चश्म-ए-नम , मुस्कुराती रही रातभर'.... किती आठवू आणि किती विसरू तुला.. प्रत्येक आठवणीत तू नव्याने भेटत राहतेस ....

'तुझसे नाराज नही जिंदगी हैरान हूँ मैं , हैरान हूँ मैं '... हेच आहे वास्तव, जे स्वीकाराव लागत. ' जीने के लिए , सोचा हि नहीं , दर्द संभालने होंगे , मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे'....

आणि तरी सुद्धा, कितीही उदास वाटलं तरी मनांत एक आशा नक्कीच असते "जब भी ये दिल उदास होता हें , जाने कौन आसपास होता हें '..... ती नाही तरीही ती आहे .. तिचा भास आहे .. ती इथेच आहे.

' दिवेलागण ' मधील कवितेचा संदर्भ डोक्यात होताच, प्रत्येकाला कवितेत आपापला अर्थ शोधायचा असतो.. मलाही आज , या माझ्या मैफिलीत तो सापडला ... वेगळा तरीही माझा ..

आज, या प्रत्येक गाण्यात मला आई दिसली .... आणि अजून एकदा, मी तिला खूप miss केलं ....

- कविता

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख लिहिलय.
शेवटचं वाक्य तर मनाला भिडून गेलं अगदी.

<<परवाच 'दिवेलागण' या कविता संग्रहातील आरती प्रभूंची कविता ऐकली सलील कुलकर्णीच्या आवाजातील," कधी माझी कधी त्याची हि साउली , रेंगाळे माझिया चोरट्या पाउली".>>> ह्याची लिन्क देउ शकाल का ?