सुटका

Submitted by आतिवास on 28 October, 2015 - 06:58

सकाळी आश्विन दचकून जागा झाला असं म्हणता येणार नाही.

रात्रभर त्याचा डोळ्याला डोळा लागलाच नव्हता. झोप नव्हती, तर जाग येण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो?
पण अशा प्रसंगी कोणाच्याही मनात यावी तशी स्वाभाविक शंका आश्विनच्या मनात आली – तो जागा आहे? की स्वप्नात आहे?

पण त्याला एकदम जाणवतं की नाही, हे स्वप्न नाही.
दु:खाचे ते सगळे क्षण आश्विनला आठवतात.

तो मुकाट्याने उठतो. सवयीने आंघोळ उरकतो. तो तयार होतो तेव्हा रोजच्याप्रमाणे सकाळचे साडेसहा वाजलेले असतात.

“कपभर दूध घे बेटा. दोन बिस्कीटं पण खाऊन घे. कालपासून पोटात काही नाही तुझ्या, उपाशीच आहेस तू. जेवायला आजही किती वाजतील सांगता येत नाही ....” आईचा स्वर आर्जवी आणि मायेचा आहे.

पण आश्विनला तिच्या बोलण्याची तिडीक येते. संतापाची कळ पार मस्तकात पोचते. सगळं माहिती असून आई आत्ता खाण्याचा विचार तरी कसा करू शकते असा प्रश्न आश्विनला पडतो. आईला ताडताड बोलावं अशी अनावर उर्मी त्याच्या मनात दाटते. पण तो काही बोलत नाही. स्वत:च्या संतापावर तो मौनाच आवरण टाकतो. तो आईची नजर टाळत मान हलवतो. आईला त्याचा नकार स्पष्ट कळतो.

आई काहीतरी बोलण्याच्या विचारात आहे. पण आश्विनच्या चेह-याकडे पाहून ती गप्प होते. आश्विन दाराकडे वळतो तेव्हा न राहवून ती पुन्हा म्हणते, “मी येते तिकडे साडेनऊपर्यंत. शारदाबाई येऊन गेल्या कामाच्या की लगेच निघते. उशीर नाही व्हायचा मला. राजेश किती वाजता पोचेल काही माहिती आहे का तुला?”

“नाही माहिती मला. कळेल आता गेलो की, “ आश्विन तुटकपणे बोलतो. आईच्या बोलण्याचा अर्थ त्याला कळत नाही.

“आता हिला चिंता पडलीय ती कामाची बाई वेळेत येईल की नाही त्याची ....” आश्विन स्वत:शी कडवटपणे बोलतो.

शंतनुच्या घरी इतक्या भल्या सकाळी जाण्याची आश्विनची ही काही पहिली वेळ नाही. पण आजची गोष्ट वेगळी आहे. आजवर लाखो वेळा चाललेली ही वाट. जवळजवळ रोज एकदा तरी शंतनूकडे त्याची फेरी ठरलेली. आधी चालत, मग अनेक वर्ष सायकलवर आणि अगदी आत्ता आता बाईकवर. कधी त्याच्या घराकडून शंतनूच्या घराकडे जायचं तर कधी परत यायचं – नेहमीचा पायाखालचा रस्ता – इतका सवयीचा की डोळे मिटून खड्डे कसे चुकवायचे ते सांगता येईल आश्विनला. पण आज मात्र त्याला अडखळल्यासारखं वाटतंय. घरातून बाहेर तर पडला तो पण त्याला शंतनूच्या घरी जावसं वाटत नाहीय आज. त्याच्या पायातली ताकद जणू संपलीय सगळी.

अगदी खेळघरापासून ते थेट बारावीपर्यंत आश्विन आणि शंतनू ही जोडगोळी आसपासच्या सगळ्यांना माहिती. अगदी चार महिन्यापूर्वी दोघांना वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला - तोवर सगळ्या गोष्टी त्यांनी एकत्रच केलेल्या. आताही कॉलेज वेगळे असले तरी रोज संध्याकाळची – अन तेही जमले नाही तर रात्री दहा अगदी अकराची - त्यांची भेट ठरलेली. शिवाय एस. एम. एस., मेल, फेसबुक गुगल प्लस ... हे सगळ असायचंच सारखं. कोठेही असले तरी शंतनू आणि आश्विन असे सोबतच असायचे एकमेकांच्या कायम. शंतनूला माहिती नाही असं आश्विनच्या आयुष्यात काही नव्हतं आणि शंतनू आपल्यापासून काही लपवून ठेवत नाही याची आश्विनला खात्री होती.

पण आता ते सगळं अचानक संपलं! आता शंतनू सोबत गप्पा मारता येणार नाहीत; फालतू विनोद सांगून हसता येणार नाही; विनाकारण राग काढता येणार नाही; त्याच्याबरोबर मजेत घालवायचे दिवस संपले – त्याच्या खांद्यावर डोक ठेवून रडताही नाही येणार आता कधी.

हे सगळं करायला शंतनू राहिलेलाच नाही आता या जगात.
तो अपघात जीवघेणा ठरला ख-या अर्थाने.

आश्विनला शंतनूची ती शेवटची नजर आठवते. तो काय सांगत होता आश्विनला? शंतनूच्या डोक्यात त्या क्षणी नेमकं काय असेल? त्याची सगळी स्वप्नं, सगळे विचार,सगळ्या भावना, सगळे अनुभव ... त्यांचं काय झालं? शरीर जातं तेव्हा तेही निघून जातात का? पण कुठे जातात?

हॉस्पिटलायाझेशन, पोलीस चौकशी, कोमातला शंतनूचा शांत वाटणारा चेहरा – असं वाटतं होतं की तो फक्त झोपला आहे, एक हाक मारली की जागा होईल! तो ‘लाईफ सेविंग औषधांचा मारा’; वेंटीलेटर जोडतानाची अदम्य आशा; आणि शेवटी मागे उरलेलं शंतनूचं निष्प्राण शरीर! सगळं जग दोन दिवसांत उलटंपालटं होऊन गेलंय!

‘असं होणं शक्य नाही. मला फक्त वाईट स्वप्न पडतंय ...” आश्विन स्वत:ला सांगायचा प्रयत्न करतो. पण त्या प्रयत्नातला फोलपणा जाणवून त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. तो पाय ओढत चालत राहतो.

त्याला सगळं आठवतंय .. अगदी आत्ता घडत असल्यासारखं! रविवारची सकाळची वेळ . शंतनू आश्विनची नवी कोरी बाईक चालवत होता; आश्विन त्याच्या पाठीशी बसून त्याला कॉलेजमधला कालचा कसला तरी विनोद सांगत होता आणि दोघेही खळाळून हसत होते. आश्विनला स्पष्ट दिसते समोरून येणारी लाल रंगाची ती मारुती कार; त्याचा रोखलेला श्वास ... तिथपासून ते डॉक्टरांनी केलेली शंतनूच्या मृत्युची निर्दयी घोषणा ...........

आश्विन पुन्हापुन्हा विचार करतोय .. त्याने काहीतरी वेगळं केलं असतं तर शंतनूचा जीव वाचला असता का? कोणत्या कुमुहूर्तावर त्याला ही नवी बाईक घ्यायची इच्छा झाली? कशाला तो नेमका त्याच वेळी विनोदी बोलत होता? आश्विनला साध खरचटलंही नाही आणि शंतनू मात्र गेला जग सोडून.

आशा निराशेचे ते अठ्ठेचाळीस तास आश्विनला चांगलेच आठवतात.

“कुठं आहेस तू, शंतनू? “ आश्विन आकाशाकडे पहात विचारतो. रस्त्यातून जाणारा पेपरवाला त्याच्याकडं नवलाने पाहतो आणि काही न बोलता पुढे जातो. शाळेत जाणारी मुलं थबकून त्याच्याकडे पाहतात आणि आपापसात खोडसाळपणे हसतात. आश्विनला त्या कशाचीच दखल नाही. तो विचारात आहे – मृत्युनंतर जीवन असतं का? शंतनू ते मला सांगेल का? त्याला तिथं काय दिसत असेल? त्याला दु:ख झालं असेल का खूप मरताना? मी त्याला मिस करतोय हे त्याला कळत असेल का? एकदा तरी परत भेटावा शंतनू असं त्याला फार वाटतंय.

आश्विन शंतनूच्या घरी पोचतो. दार उघडंच आहे.
“ये” शंतनूचे बाबा म्हणतात. एका रात्रीत ते खूप म्हातारे झाले आहेत असं आश्विनला वाटतं.

“अरे, आश्विन, तू आहेस होय? फार लवकर आलास तू ” राघव, शंतनूच्या बहिणीचा – रचनाचा – नवरा म्हणतो. एका रिकाम्या खुर्चीकडे हात दाखवत तो आश्विनला बसायला खुणावतो.

“रचना, आश्विन आलाय, त्याच्यासाठी पण चहा आण,” काकांच्या या बोलण्यावर आश्विनला एकदम धक्का बसतो. तिकडे शंतनूच शरीर हॉस्पिटलमध्ये पडलंय अद्याप, राजेशभय्या सौदीहून आला की स्मशानात जायचंय. काहीच न घडल्यागत काका चहाचा विचार तरी कसा करताहेत? शंतनू मेला आहे हे विसरून गेले की काय सगळे अशी शंका आश्विनला भेडसावते. कदाचित आपल्याला वाईट स्वप्न पडलंय फक्त अशी वेडी आशाही त्याच्या मनात उमलते. त्याला वाटत शंतनू येईलच आतमधून आणि चहा पिऊन ते दोघे बाहेर पडतील पार्कमध्ये त्यांच्या धावण्याच्या व्यायामासाठी. पण समोर शंतनूचा मोठा फोटो आहे, त्यावरचा हार ताजा आहे ... ते पाहून आश्विनचा चेहरा काळवंडतो. तो एक उसासा सोडतो आणि डोळे मिटतो.

काकू बाहेर येतात. त्यांचे डोळे लाल आहेत आणि सुजलेले आहेत. त्या आश्विनकडे पहायचं टाळतात. त्या बसतात. सगळे शांत आहेत. कोणीच काही बोलत नाही. कोणी कोणाकडे पाहतही नाही. ते जणू एकमेकाना ओळखत नाहीत असे त्रयस्थासारखे बसलेत. एवढ्या सगळ्या लोकांचे उसासे खोलीभर पसरत पसरत आकाशाला स्पर्श करताहेत असं आश्विनला वाटतं.

राघव ‘टाईम्स ऑफ इंडिया’ उचलून कोणत्यातरी क्रिकेट सामन्याची बातमी वाचायला लागतो. आश्विन पुन्हा एकदा हादरतो. आत्ता याला पेपर वाचायला काय सुचतंय? शंतनू आवडत नव्हता का यांना कोणालाच?

“राजेशभय्या कधी पोचतोय?” शांतता असह्य होऊन आश्विन नकळत विचारतो. त्या प्रश्नाची निरर्थकता प्रश्न विचारता क्षणीच त्याच्या ध्यानात येते.

“अरे, त्या ज्वालामुखीच्या भानगडीमुळे सगळी विमानं उशीरा येताहेत. कधी पोचेल राजेश माहिती नाही. दहापर्यंत वाट बघू त्याच्या निरोपाची – मग ठरवू अंत्यविधी कधी करायचा ते” एक नातेवाईक सांगतात. मग जमलेले अनेक लोक बोलायला लागतात. इतके लोक आहेत भोवताली याची आश्विनला पहिल्यांदाच जाणीव होते. कोणीतरी पोलीस रिपोर्टबद्दल बोलतं, कोणी स्मशान परवान्याबाबत बोलतं, कोणीतरी भटजींना सांगितलं का असं विचारतं .....

रचना चहाचे कप घेऊन येते. ती आश्विनकडे पाहून हसते. इतकं दु:खाचं हसू आजवर आश्विनने पाहिलं नाही. त्याला कळत नाही काय करायचं ते. तो मान खाली घालून स्वत:चे तळहात पहायला लागतो. शंतनूची ताई त्याचीही ताई होती आजवर ...पण अचानक तो धागा तुटल्यासारखं आश्विनला वाटतं. आपण जिवंत आहोत आणि शंतनू मात्र गेला म्हणून ताई आपल्याला दोष देत असेल .... असही त्याला वाटतं. तो परत नजर वर करतो तोवर रचना आतल्या खोलीत गेलेली असते.

काका चहाचा एक घोट घेतात आणि कप खाली ठेवतात. “रचना, चहात माझ्या दूध कमी पडलंय, जरा दूध आण” ते सांगतात. ते रागावलेले नाहीत पण त्यांचा स्वर अगदी अनोळखी वाटतो. त्यांच असं बोलण ऐकलं नव्हतं त्यानं कधी.

आश्विनचं डोकं गरगरायला लागतं. त्याची स्वत:ची आई इतक्या उत्साहाने सकाळी चहा आणि बिस्किटांबद्दल बोलत होती तेव्हा त्याला राग आला होता. पण तरी तो समजू शकला होता तिला. तिचा स्वत:चा मुलगा वाचला होता म्हणून ती स्वत:ला नशीबवान समजत असेल तर ते स्वाभाविक आहे एका अर्थी. पण शंतनू तर गेलाय. मग त्याचे आई-बाबा, राघव, जमलेले नातेवाईक .... या सगळ्यांवर शंतनूच्या मरणाचा काही परिणामच झालेला दिसत नाहीये.

आश्विनला त्या सगळ्यांच्या वागण्याचा अर्थ लागत नाही. तो भिरीभिरी सगळीकडे पाहतो आहे.

“देवाच्या मनात जे होतं ते झालं, काय करणार आपण? परमेश्वरालाही कोवळे निरागस जीव जास्त आवडतात अस दिसतंय. त्याच्या इच्छेपुढे आपलं काय चालणार? नशीब वाईट म्हणायचं आपलं! शरीरधर्म कोणाला चुकलाय या जगात? आता हेच बघा ना. काकूंना आहे मधुमेह – उपाशी पोटी किती वेळ बसणार त्या? काकांचं प्रेशरही वाढलं असणार – गोळी घ्यायला हवी – ती पण उपाशी पोटी घेऊन नाही चालणार. राजेशचा निरोप येईपर्यंत त्या दोघांनी थोड खाऊन घेतलेलं बरं ......” कोणीतरी नातलग बोलत होते. इतर लोक सहमतीच्या माना डोलवत होते.

घरात आता गर्दी आहे भरपूर. “हाच का तो शंतनूचा मित्र?” कोणीतरी कुजबुजतं .. पण ते आश्विनला ऐकू येतं आणि तो कानकोंडा होतो.

आश्विनला काही सुचत नाही. “मी अगदी नालायक आहे ... माझा सगळ्यात जवळचा दोस्त मरण पावलाय .. त्याची मी या सगळ्यांना आठवणही करून देऊ शकत नाही. त्याला जाऊन अजून काही तास झाले नाहीत तोवर हे सगळे त्याला विसरले आहेत ......” आश्विनच्या मनात विचारांची वादळं आहेत.

आश्विनला वाटतं – शंतनू ऐवजी मी मेलो असतो तर काय झाल असत? शंतनूला काय दिसलं असतं? त्याला काय वाटलं असतं हे सगळं असं पाहताना?

कदाचित माणसांच्या भूमिका बदलल्या असत्या – पण चित्र कमी- अधिक हेच असलं असतं याची आश्विनला खात्री आहे मनातून. म्हणजे कदाचित त्याच्या बाबांनी चहात आणखी साखर मागितली असती आणि कमलाबाई काम आटोपून गेल्यावर काकू आश्विनच्या घरी गेल्या असत्या. ते पाहून शंतनूला काय वाटलं असतं? काय म्हणाला असता तो? कसं निभावलं असतं त्याने हे माझ्याविना? मला जे वाटतंय ते आणि तसंच शंतनूला वाटलं असतं का?

आश्विनला तिथून पळून जावसं वाटतं. शंतनूशी संबधित जे लोक आहेत त्यांच्याशी काही संबंध नको, लांब जावं त्यांच्यापासून अशी भावना त्याच्या मनात येते. त्याला जोरात ओरडावंसं वाटतं त्या सगळ्यांवर शंतनूला विसरल्याबद्दल. त्याला खूप रडू येतंय. त्याला हे सगळं विसरून शांत झोपावं वाटतंय. आपल्या वेदनेच ओझं कोणाच्या तरी खांद्यावर टाकावंसं वाटतंय त्याला – पण समोरचे सगळे त्याला परके वाटतात. त्याला समोर असणा-या सगळ्या वस्तू तोडून मोडून टाकाव्यात असं वाटतंय ... त्याला चार हात करायची खुमखुमी आहे .. पण कोणाशी लढाई करायची .. तो एकटाच तर आहे तिथं. त्याला वाटतं स्वत:वरच जीवघेणे वार करावेत, सूड घ्यावा शंतनूच्या मरणाचा.

आश्विन भलताच हिंसक होतोय .. त्याला भीती वाटतेय खूप .. त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे .... पण आधार तर फक्त शंतनूचाच आणि तोच तर आता नाही ....

आश्विन डोळे मिटून घेतो .. त्याला वाटतं – ‘आता माझेही डोळे कधीच उघडले नाहीत तर किती बरं होईल’ ...त्यालाही मरायचं आहे शंतनूसारखंच!

पण ते शक्य नाही - हेही आश्विनला उमगतं. शंतनूच्या नसण्याची वेदना त्याला पुन्हा एकदा वेढून टाकते. शंतनू पुन्हा कधीही भेटणार नाही हे स्वीकारणं त्याला जड जातंय. आपण उध्वस्त झालो आहोत आणि त्यातून उभं राहायचं बळ आपल्यात नाही याची त्याला जाणीव होते. आश्विनला एकदम असहाय्य आणि अगतिक वाटतं.

आणि अचानक त्या क्षणी आश्विनला काहीतरी समजल्यासारखं वाटतं ... नातेसंबंधांची व्यर्थता; भावनांची निरर्थकता; यशाचं क्षणजीवित्व; धाग्यांचा उथळपणा .... हे त्याला आतून उमजतं ...मनुष्य हा स्वार्थी जीव आहे हे सत्य त्याच्या समोर येतं.

त्या क्षणात आश्विन मोठा होतो, तो प्रगल्भ होतो, तो क्षण त्याचं जीवन बदलवून टाकतो.

“हे सगळं एक नाटक आहे ...प्रत्येकानंं आपापली भूमिका करायची आणि पडद्याआड जायचं ... दुसरं कोणीतरी येतं समोर ... आणि चालू राहतं सगळं विनातक्रार, विनाव्यवधान! कोणावाचून कोणाचं काही अडत नाही; कोणतही दु:ख, कोणतीही वेदना, कोणतीही भावना ...सगळं आपल्यापुरतं असतं – तेही क्षणभंगूर.. टिकत काहीच नाही अखेर. जीवनाच चक्र फक्त शाश्वत आहे तसं बघायला गेलं तर ..."

आश्विनच्या घशाशी हुंदका दाटून येतो. त्याच्या डोळ्यात तरारलेल्या पाण्याने सभोवताल नाहीसं होतं क्षणभर ...त्याचे हातपाय कापतात ... त्याच्याभोवती एक अफाट पोकळी आहे आणि त्यात एकटाच आहे तो ....

“आश्विन, चहा थंड होतोय तुझा....” काकूंचा स्वर वेदनेने भरलाय. असा थंड चहा शंतनूला लागायचा आणि आश्विन त्याबद्दल त्याला नेहमी रागवायचा ... आणि आज आश्विन शंतनूसारखा थंडगार चहा का पितोय?

आश्विन पुन्हा एकदा काकूंची नजर टाळतोय .. त्यांना काय उत्तर द्यायचं त्याला कळत नाही.

“शंतनू, लेका तू नशीबवान आहेस. आपलं कोणी नसतं, आपण एकटेच असतो हे कळण्याच्या आधीच तू गेलास. एकटं यायचं आणि एकटं जायचं ही या जगाची रीत आहे ... दरम्यान एकटं जगायचंही असतं ... हे सगळं लक्षात येण्यापूर्वी तू गेलास निघून ... तुला हे दु:ख भोगावं लागलं नाही यातच मला आनंद आहे. वास्तवाची झळ तुला लागली नाही हे किती बरं झालं .....” आश्विन मनातल्या मनात शंतनूशी बोलतोय.

त्याला खूप एकाकी वाटतंय ...पण त्याला पर्याय नाही हेही त्याला समजलंय.
आश्विनला जगावं लागणार या साक्षात्कारासोबत.

शंतनू सुटला.
आश्विनची मात्र सुटका नाही.
**
(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कितपत योग्य माहित नाही. पण पटल नाही. अंत्यविधी व्हायच्या आधी सगळ इतकं नॉर्मल असेल हे पटत नाही. कदाचित मला अनुभव नाही म्हणून असेल. पण आवडत्या माणसाच्या जाण्याचे दुख निदान काही महिने तरी राहत असेल.

परत वाचली. मृत्यूचा योग असल्यावर रोजच्यापेक्षा वेगळ्या गोष्टी केल्या जातात, मरण बोलावतं. यात अश्विन चा दोष नाही.
(कथा प्रभावी पण कल्पना करायला भयंकर आहे.)

कथा प्रभावी पण कल्पना करायला भयंकर आहे >>> +१

आमच्या अगदी समोर राहाणारी मंजूताई गेली तेव्हा तिची धाकटी बहीण- माझी मैत्रिण- आणि इतर चिल्लरपार्टी आमच्याकडे जेवायला आणि एकुणच दिवसभर होती. सुरूवातीचा काही वेळ जरा अवघड गेल्यावर मग सगळे नॉर्मल असल्यासारखं हसाबोलायला लागले याचं खूप आश्चर्य वाटल्याचं आठवतं आहे. अर्थात आम्ही सगळेच खूप लहान होतो तेव्हा. असो, तुमची कथा वाचून हा प्रसंग आणि मंजूताईची आठवण आली.

लाडू, तुमचा आक्षेप मी समजू शकते.
पण दुर्दैवाने मी या गोष्टी पाहिलेल्या आहेत.
माणसं अशी वागतात म्हणजे त्यांना दु:ख झालं नाही असंही नसतं, दु:ख भोगण्याची आणि व्यक्त करण्याची प्रत्येकाची रीत वेगळी असू शकते - इतकंच.

माणसं अशी वागतात म्हणजे त्यांना दु:ख झालं नाही असंही नसतं, दु:ख भोगण्याची आणि व्यक्त करण्याची प्रत्येकाची रीत वेगळी असू शकते - इतकंच.<<<<
अगदी अगदी..! प्रत्येकाची संवेदना वेगळी, स्वभाव वेगळा, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी.

आतिवास, ही कथा आधी वाचलीय मी. कदाचित तुमच्या ब्लॉगवर. खुप सुंदर लिहिता तुम्ही. तुमचा ब्लॉग मी आवर्जुन वाचते. Happy

कथा आवडली. असं होऊ शकतं की नाही हा मुद्दाच वेगळा प्रत्येक माणूस प्रत्येक घर वेगळं असतं.

एक सल्ला - कथेमध्ये दोन वेगवेगळे काळ आले आहे. झाला आणि उठतो. तेवढा जरा बदल करा. उठतो ह्या काळापेक्षा झाला हाच काळ वापरावा हे माझे मत.

कथा चांगली लिहीली आहे. अचानक कुणी - तेही तरूण व्यक्ती गेली तर नॉर्मल इतके लवकर होतील जवळचे हे प
टत नाही.. २-४-८ दिवस, महिना, इ.इ. लागेलच. माझा मामेभाऊ व्यसनाधिन होऊन गेला तरूण वयातच.. तो असाच जाणार हे आईबापांना माहित होते.. तरीही रूटीन मधे यायला काही दिवस जावे लागले. असो.. व्यक्ती व्यक्तींप्रमाणे हे बदलू शकतेच.

<<अश्विनच्या मनात उरलेली एकाकी भावना, दु:ख, अस्वस्थता, घालमेल मनाला भिडते. छान झालीये कथा.>>
+१

आतिवास, आक्षेप नव्हता घ्यायचा मला. माझ्याच मनाला पटल नाही. पण अस होत असेल तर ते भयानक आहे. मी अचानक मोठी झाल्यासारखं वाटतय Sad

हम्म्म.... वीसवर्षांपुर्वी नणदेचा तरुण मुलगा अपघाताने गेला व त्या अॅबनाॅर्मली नाॅर्मल वागताना पाहून मलाच कसंसं होत होतं .... असं वाटलं मुलगा गेल्याच ह्यांना समजलंय की नाही.... ते आठवलं आिण त्याच्या दिवसाला उदकशांत असावी त्या भरजरी साडी नेसल्या होत्या .... इतकं विचित्र वाटत होत... वातावरणाला विसंगत ...

कथा आवडली. प्रत्येकाची दु:खशी रिलेट व्हायची पद्धत वेगळी असते.

डेडबॉडीची वाट पहात बसणारं घर कित्येकदा इतकंच याहून जास्त नॉर्मल वागताना पाहिलंय. मागे काही वर्षांपूर्वी एका मित्राची बॉडी (तो रियाधमध्ये कार अपघातामधेय वारला होता) त्याच्या घरी यायला आठ दिवस लागले होते. तेव्हा ते घर वरवर इतकं नॉर्मल आणि तरीही स्वतःमध्येच गुरफटलेलं होतं, त्याची आठवण की कथा वाचताना नक्कीच झाली. डेडबॉडीसोबत त्याचा लहान भाऊ आणि एक मित्र आले होते. पैकी मित्राला तर नंतर नर्वस ब्रेकडाऊनमुळे अ‍ॅडमिट करावं लागलं होतं.

आवडली कथा.शेवटी त्याला जे क्षणात उमगल..ते प्रत्येकाला कळायला थोडाफार वेळ लागतो.अंतिम सत्य मात्र तेच >>> एकटं यायचं आणि एकटं जायचं ही या जगाची रीत आहे ... दरम्यान एकटं जगायचंही असतं . + १००

वेल,
सल्ल्यासाठी धन्यवाद.
'काळ' वापरण्यात माझा नेहमी गोंधळ होतो खरा.
ही कथा 'आत्ता' घडते आहे आणि आश्विनला आधीचं आठवतंय असं मला दाखवायचं आहे - ते जमलेलं दिसत नाहीये. Sad

कथा आवडली.

आश्विन स्वतः मोठ्या अपघातातून वाचलाय. त्याच्या मनावरचा आघात, मनातली अपराधी भावना, मित्राच्या मृत्यूचे दु:ख आणि त्याचे अननुभवी वय या सगळ्याचा एकत्रित परीणाम घेवून त्याची प्रतिक्रिया.
शंतनूचा अपघात, त्याला वाचवण्यासाठी धडपड, शेवटी अटळ सत्य पचवत त्याचा मृत्यू पहाणे आणि आता राहिलेल्या कलेवराला निरोप देण्यापूर्वीची प्रतिक्षा. यातल्या प्रतिक्षेच्या टप्प्यावरचा कुटुंबियांचा वावर अगदी नैसर्गिक! अशा दु:खातून सावरायला वेळ लागतोच. दु:ख सतत रडून व्यक्त केले जात नाहिये याचा अर्थ लोकं सावरलेत असा नाही. पण माणूस मनाने /शरीराने थकतो. सुरवातीचा भर ओसरला की इतके बधीर व्हायला होते. जोडीला पुढची निरवानिरव करण्यासाठी यांत्रीकपणे उभे रहावेच लागते. कोसळणे होते ते नंतर! पुढे ही वारंवार दु:खाच्या लाटा येत रहातात, अचानक! ग्रिविंगची प्रोसेस ही खूप मोठी असते.

कथा छान zaliye ..

आजुबाजुला अनेकदा असेच पाहायला मिळते.
आपल्या सारख्या त्रयस्थ माणसाला अस वाटत कि अरे यांना दुःख zalay कि नाही नक्की. यावर बऱ्याचदा आपल्याकडून खाजगीमधे अशी टिप्पणी सुद्धा केली जाते.
मला अस वाटत आपण त्रयस्थ लोकांनी अशा वेळी त्या लोकांना 'अशा' अर्थाने सुद्धा समजून घेतल पाहिजे. दुःख zalele असणे म्हणजे कायम रडत बसणे असे नाही हे आपण समजून घेतले पाहिजे.
कारण आपण यातून उगाच 'यांच्यात काही फारशी attachment नव्हती दिसतय' अस म्हणून जातो. पण ते खुप चुकिच असू शकत.
नाही का.?

दु:ख आणि चहा खाणे पिणे याचा तसा म्हटला तर संबंध काय आहे? गेलेलं माणूस परत येणार नाही. माणसं बातमी ऐकून आहे तशी निघून दूरगाव हून आलेली असतात. काहींना पित्त्,मायग्रेन, अ‍ॅसिडीटी, वेळच्या वेळीचहा कॉफी न झाल्यास डोकेदुखी असे त्रास असतात.बर्‍याच वयस्कांना डायबेटीस बीपी इ. मुळे वेळेवर जेवण किंवा निदान खाणं लागतं.लहान मुलं वगैरे असली तर त्यांच्या कडे लक्ष द्यावंच लागतं.
अशा वेळी सर्वांनी दु:ख झालं म्हणून अन्नपाणी सोडून अंथरुणाला खिळणं अपेक्षित आहे का?
(कथेतल्या मुलाचे विचार त्याचे स्वतःचे आहेत, पण "चहा खाण्ं नीट चालू म्हणजे अ‍ॅटॅचमेंट नाही" किंवा "जितका वेळ अन्नपाण्यावरची वासना गेली तितकं दु:ख जास्त"असं काहीतरी समप्रमाण मांडणारं गणित प्रतीसादांत दिसलं म्हणून लिहावं वाटलं इतकंच.)

Pages