पर्यटकांचे निषेधार्ह वर्तन

Submitted by बेफ़िकीर on 27 March, 2014 - 11:40

नुकताच अंदमानला जाऊन आलो. आठवडाभर अनेक समुद्र किनारे पाहण्याचे शेड्यूल होते मात्र पहिल्याच दिवशी पहिलेच ठिकाण जे होते ते स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेथे ठेवण्यात आले होते ते सेल्यूलर जेल!

ह्या कारागृहाची रचना, अंगावर येणारी भीषणता, स्वातंत्र्यपूर्व काळात तेथे असू शकणारी सुविधांची दयनीय अवस्था जिची आपण कल्पना करू शकतो, अंदमानची दमट हवा, कैद्यांना मिळणार्‍या अस्वच्छ व जेमतेम सोयी, कमालीच्या शारीरिक यातना असलेल्या शिक्षा, मार्गदर्शकाने केलेले काटा आणणारे वर्णन, फाशी घर, रक्तबंबाऴ होईपर्यंत चाबूक मारण्यासाठी असलेला चौथरा, खूप वजनाचे लोखंड अडकवून मग कामे करवून घेतली जात असणे, कामात चूक झाल्यास होणारे अपरिमित हाल, तीन तीन दिवस उपाशी ठेवणे, पोत्याच्या कापडाचे कपडे (ज्याने घामोळे व्हावे हाच हेतू) ह्या आणि अश्या सर्वच्या सर्व बाबी मन विषण्ण करतातच. कोणत्याही सहृदय माणसाला स्वतःच्या आरामात जगण्याची लाज वाटू लागेल अशी त्या कारागृहाची भीषणता आहे. काही छायाचित्रे देत आहे ज्यावरून (जे अजून तेथे गेले नसतील त्यांना) कल्पना येऊ शकेल की माणूसच माणसाला किती यातना देत होता.

तरीही, थोडेसे वर्णन करणे आवश्यक वाटत आहे.

१. सावरकरांना खास अश्या ठिकाणची कोठडी दिली होती जेथून त्यांना फाशीच्या कैद्यांना फाशी दिलेली बघता येईलच असे नव्हे तर त्यांना मुद्दाम ती बघायला लावली जायची.

२. सात विंग्जपैकी एका विंगचे कैदी दुसर्‍या विंगशी काहीही संपर्क ठेवू शकायचे काहीत, किंबहुना ते एकमेकांना दिसूही शकायचे नाहीत.

३. जनावरांनाही काढता येणार नाही इतके तेल एका कैद्याला एका दिवसात काढायला लावायची शिक्षा असे.

४. ते काम कैद्याने केले नाही तर त्याच्या चुकीच्या प्रमाणावर अवलंबून तीन प्रकारच्या बेड्या असत त्या घातल्या जात. पहिल्या सोप्या प्रकारात दोन्ही हात व दोन्ही पाय वजनाने जखडले असले तरीही निदान मुक्तपणे हालवता यायचे. दुसर्‍या स्टेजला पाय हालवता यायचे पण हात आखडले जायचे. तिसर्‍या स्टेजमध्ये पायही आखडले जायचे. त्याच अवस्थेत काम करावे लागायचे.

५. कामात कमी पडलेला कैदी किंवा चुकीचा वागलेला कोणी कैदी असला तर त्याला एका चौथर्‍यावर बांधून चाबकाचे फटके मारले जायचे. फटके मारणारा माणूस भारतीयच असायचा व त्याच्यावर हे बंधन असायचे की कैद्याच्या पाठीतून रक्त यायलाच हवे, रक्त आले नाही तर त्या फटके मारणार्‍यालाच फटके देऊन त्याचे रक्त काढले जायचे.

६. तूर्त सर्व बाजूंनी भिंती बांधलेल्या असल्या तरी तेव्हाच फाशी घर एका बाजूने व वरच्या बाजूने खुले होते. फाशीची शिक्षा झाल्या झाल्या सेंट्रल टॉवरवरील घड्याळात मोठे टोल दिले जायचे, ज्यायोगे समुद्रात कित्येक मैलांवर असलेल्या बेटांवरील नागरिकांनाही समजायचे की आत्ताच कोणालातरी फाशी दिली गेली. ते टोल वाजले की अर्थातच कारागृहातील कैदी भीषण ओरडू लागायचे कारण त्यांना आपलाही अंत दिसू लागायचा.

त्या कारागृहात सायंकाळी दोन वेळा एक लाईट व साऊंड शो होतो, पहिला हिंदीमधून व दुसरा इंग्लिशमधून! त्यातूनही बरीच माहिती मिळते त्या हालअपेष्टांची! कैद्यांना दोनच भांडी दिली जायची. एक मातीचे व एक लोखंडाचे! एक भांडे अन्नपाण्यासाठी व एक नैसर्गीक विधींसाठी! दररोज येणारा भंगी दोन तीन दिवस आला नाही तर कोठडीत तसेच घाणीत बसून राहावे लागायचे. शौचास व बाथरूमला जाण्याच्या वेळा ठराविक होत्या, त्याच पाळाव्या लागत. पाणीही मोजून मिळे!

स्वातंत्रवीर सावरकर ह्या सर्वातून स्वतःही गेलेले होते. ६९३ कैद्यांना सामावू शकणारे हे राक्षसी कारागृह 'काळ्या पाण्याच्या' शिक्षेच्या भीषणतेची दु:खद आठवण देऊन मनात कालवाकालव करते. लाईट आणि साऊंड शो पाहून बाहेर पडणारे अनेक चेहरे खर्रकन उतरल्यासारखे असतात.

कर्नल की कॅप्टन डेव्हिड बेरी नावाचा एक कारागृह प्रमुख अत्यंत क्रूर होता व त्याच्यासाठी एक खास खुर्ची केलेली असावी. ह्या डेव्हिडने छद्मीपणाने सावरकरांना सांगितले की होते पन्नास वर्षे झाली की तुम्हाला सोडतीलच. त्यावर सावरकरांनी विचारले होते की तुम्हाला कशावरून असे वाटते की तुमचे सरकार येथे इतकी वर्षे टिकेल?

अविश्वसनीय अश्या हा हालअपेष्टांची वर्णने ऐकताना, वाचताना आपण गंभीर होत जातो आणि त्या गांभीर्यावर नादानपणाचे, पोरकटपणाचे, घृणास्पद, लज्जास्पद ओरखडे उठतात ते आलेल्या कित्येक पर्यटकांमुळे! खासकरून महाराष्ट्राबाहेरचे पर्यटक आणि हनीमून कपल्स तसेच तरुण मुलांची टोळकी ह्या सर्वांचे वर्तन असे असते की त्यांनाच तेथे चाबकाचे फटके द्यावेत.

कर्नल डेव्हिडच्या त्या खुर्चीवर थाटात बसून स्वतःचे फोटो काढून घेतले जातात. हाल सहन करून घाण्याभोवती फिरणार्‍या कैद्याच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून एखादी नववधू हासत हासत उभी राहते आणि तिची मोहक छबी तिचा हबी कॅमेर्‍यात टिपतो. सावरकरांच्या कोठडीच्या उंबर्‍यावर तीनतीनदा डोके घासून आत पाऊल टाकणारे आपल्यासारखे अनेक असूनही त्या उंबर्‍याचे महत्वच न समजलेले अनेक जण आत जाऊन सावरकरांची माहिती देणार्‍या फलकाशेजारी उभे राहून फोटो काढून घेतात.

हास्यविनोद, टवाळक्या चाललेल्याच असतात.

पुढील संपूर्ण ट्रीपमधील सर्वच मनोरंजक उपक्रमांवर ह्या कारागृह भेटीच्या पहिल्याच कार्यक्रमाचे अंशतः तरी सावट भरून राहते. पण ते काहींसाठीच! बाकीच्यांना प्रत्यक्ष कारागृह हाही एक पिकनिक स्पॉट वाटतो.

गाईड आणि काही जबाबदार नागरीक परोपरीने समजावून सांगत असूनही 'आपलाही फोटो आलाच पाहिजे' ह्याची अहमअहमिका लागलेली असते. त्यातही विविध अदा, पोझिशन्स, त्यातच पुन्हा उघडपणे केलेले सहेतूक देहप्रदर्शन, उगीचच केलेली जवळीक!

वाईट वाटते.

काही छायाचित्रे देत आहे. ही छायाचित्रे घ्यायला त्या कारागृहाच्या प्रशासनाची अर्थातच परवानगी आहे.

IMG_0429.JPGIMG_0430.JPGIMG_0432.JPGIMG_0434.JPGIMG_0435.JPGIMG_0440.JPGIMG_0443.JPGIMG_0450.JPGIMG_0451.JPGIMG_0452.JPGIMG_0453.JPGIMG_0454.JPGIMG_0474.JPGIMG_0478.JPG

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> आपले पर्यटक जिकडे जावे तिकडे 'हेच' करतात.

"आपले" आणि अजून बाकीचेही करतात .. मुळात सामाजिक जाणिवा बोथट असणारे किंवा जाणिवाच नसणारे हे असंच वागतात ..

गोष्टीगावचे +१

कधीकधी तर कुठल्याही प्रकारचा वारसा असायची/ तो जपायची आपली सामाजिक लायकी नाही असंच वाटायला लागतं.

Sad

बापरे .. अशी शिक्षा Sad

गोष्टीगावचे , वरदा +१

अश्या गोष्टी करुन वर अभिमानाने सांगायच आम्ही भारतीय आहोत .. जन्मसिद्ध अधिकार आहे आमचा सगळीकडे बेताल, बेशिस्त वर्तन करायचा!! (चॉकलेटच रॅपर गाडीबाहेर फेकुन देणारा नि एक वर्षापासुन अमेरिकेत राहणारा एक भारतीय! .. मला वाटल झक मारली नि ह्याला चॉकलेट खायला दिलं)

बेफी .. अवांतराबद्द्ल क्षमस्व! चुकीच असेल तर काढुन टाकेन

बेफिकिर, खूपच चांगला लेख आणि छायाचित्रं! >.+१ .लेख वाचूनच सुन्न व्हायला झाले तर अशा तीर्थक्षेत्रावर घड्णारा प्रकार चीड आणणाराच आहे.

आम्ही एकदा एका खेड्यातल्या देवळात गेलो होतो. नदीकिनारी, शांत, आजुबाजुला झाडी असे ते सुंदर ठिकाण होते. तेवढ्यात तिथे लहान मुलांच्या शाळेची सहल आली. मुलांच्या चिवचिवाटाने परिसर अधिकच रम्य आणि आनंदी झाला.
खेळुन झाल्यावर मुलांनी डबे उघडले. त्यात भात,आमटी, शेवग्याच्या शेंगा, केळी असे पदार्थ होते. ते खाताना खाली सांडले. परिसर घाण झाला. मुले उठली आणि जागेची साफसफाई न करता बस मध्ये जाउन बसली. त्या नंतर तिथे आम्हाला क्षणभर ही बसवेना. पण कळस म्हणजे त्यांच्या शिक्षकाना ही त्यात काही गैर वाटले नाही. त्यानी मुलाना आपण जागा स्वच्छ करुन जाउया असे सांगितले नाही. खरे तर हे बाळकडू लहानपणीच मिळायला हवे मुलाना. आपल्या नंतर येणा-या लोकाना पण त्या ठिकाणाचा तवढाच आनंद मिळायला हवा हे लहानपणीच बिंबवायला हवे

लेख खरंच सून्न करणारा. (माहीती आणि प्रचिंसाठी विशेष आभार) आणि वर्णन केलेल्या अतिउत्साही फोटोग्राफर्स पर्यटकांचे वर्तन केवळ चीड आणणारे! ऐतिहासिक वास्तू पाहायला जाताना त्या वास्तूविषयी किमान माहीती आणि आदर असणे आवश्यक असते याचे भान खूप कमी जणांना असते. फक्त एखाद्या ठिकाणी "फिरायला" जाणे आणि तेथील आठवणींपेक्षा तेथील भेटींचे "पुरावे" मित्रपरीवारांत मिरवण्यासाठी आणणे याच उदात्त हेतूने काहीजण जातात.

किल्ल्यांच्या भिंतींवर, जवळपासच्या दगडांवर, पायर्‍यांवर मोठमोठी हृदये आणि त्यात आपल्यासह आपल्या (चालू) जोडीदाराचे नाव लिहीणे हा उद्योगही कित्येकांना रोमांचकारी वाटतो, एखादा पराक्रम गाजवल्यासारखा. तेव्हा सहपर्यटकांनी आणि गाईडने स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवत चांगली कानउघाडणी केली पाहीजे. जास्त लोकांनी अशी कानउघाडणी केल्यास असे उद्योग कमी होतील कदाचित.

कुठेतरी एक वाक्य वाचले होते, (आपल्या समजूतीत) संस्कृतीच्या बाबत उदासीन असणारे पाश्चिमात्य आपला ऐतिहासिक वारसा जतन करण्यात पुढे आहेत आणि आपल्या संस्कृतीचा उदोउदो करणारे आपण ऐतिहासिक गोष्टी, ठिकाणे यांबाबत उदासिन आहोत.

चॉकलेटच रॅपर गाडीबाहेर फेकुन देणारा नि एक वर्षापासुन अमेरिकेत राहणारा एक भारतीय!>> हे कित्येकांच्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं की आपसूकच हात खिडकीबाहेर लांबतात.

उत्तम लेख बेफिकीर.
हे पाहून,वाचून स्वतःच्या भौतिकतावादी विचारांची लाज वाटायला लागते. आपल्या आधीच्या पिढीने अपार हालअपेष्टा सोसून आपल्याला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची आज बऱ्याच जणांना फारशी किंमत उरल्याचे दिसत नाही. फुकटात मिळालं म्हणून असेल कदाचित.
सावरकर श्रेष्ठ की गांधी की आंबेडकर की आणखी कोणी असले निरर्थक वाद करणारे/उकरून काढणारे कितीसे लोक त्यांच्या मार्गावर चालतात? खरंच अशा वादांची काही गरज आहे का?
एखाद्या राष्ट्रपुरुषाचे विचार भलेही आपल्याला पटत नसतील, पण म्हणून या साऱ्या राष्ट्रपुरुषांच्याच्या राष्ट्रप्रेमाविषयी शंका घेण्याचं, त्यांच्यात कोण श्रेष्ठ असं सिद्ध करण्याची खरंच काही गरज आहे का?
असो, विषयांतराबद्दल क्षमस्व.
बाकी, प्रत्यक्ष फोटो पाहून "माझी जन्मठेप" वाचताना आलेली अनुभूती आठवली. पुन्हा एकदा अंगावर रोमांच उभे राहिले.
धन्यवाद बेफिजी…

अरे बापरे. अक्षरशः अंगावर काटा आला. ते सगळे (राजकिय) कैदी हे हाल असे काय सोसत असतील देव जाणे. हे सगळ सोसुन जिवंत रहायची / तेथुन बाहेर पडायची इच्छा शिल्लक ठेवणे म्हणजे .... :सलाम:

"स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर" हे नाव आणि त्यामुळे त्यासोबत येणारे नाव "अंदमान" हे बेट अगदी देवस्थान झाले आहे प्रत्येक राष्ट्रभक्तासाठी....मग तो महाराष्ट्राचाच असला पाहिजे असा संकुचित प्रादेशिक वाद घालण्यात अर्थ नसतो. एकदा का ती जागा पवित्र मानली म्हणजे त्याची पवित्रता जपण्याचे कार्य केवळ सरकारी कर्मचार्‍यांचे नसून तिथे जाणार्‍या प्रत्येक पर्यटकाचे नीतिमत्तेच्या नजरेत परम कर्तव्य ठरले पाहिजे. बेफिकीर जी यांचा लेख वाचल्यावर हृदयात वेदना निर्माण होते ती अशासाठी की तिथे गेलेल्या आणि स्वतःला भारतीय म्हणवून घेणार्‍याने ते ठिकाण म्हणजे दंगा करण्यासाठी निर्माण केलेली जागा अशी करून घेतलेली समजूत. कशाच्या तरी मस्तीच्या आधारावर अशी उल्लू समजूत करून घेवून संतापजनक वर्तन करत राहणे हे तेथील रक्षक कर्मचार्‍यांच्या दृष्टीला पडत नसेल असे मानणे फार धार्ष्ट्याचे होईल....पण ते सोईस्कररित्या दुर्लक्ष करत असतील तर ती बाब चिंताजनकच.

तरीही निदान असेही काही पर्यटक असतील जे त्या जागी अशासाठी गेले असतील की त्यांच्या दृष्टीने सावरकरांच्या कोठडीचे दर्शन म्हणजे काशीवृंदावनात जाऊन कृष्णदर्शन झाले. फोटोवरून मात्र परिसर कमालीचा स्वच्छ वाटतो.

मुळात सामाजिक जाणिवा बोथट असणारे किंवा जाणिवाच नसणारे हे असंच वागतात .. >>१००% सहमत! आणि दुर्दैवाने आपल्याकडे शैक्षणिक अभ्यासक्रमात ही जाणीव निर्माण केली जात नाही मग सुजाण नागरिक कसे तयार होणार?

बेफी अंदमानला लोक फिरायला जातात, मजा करायला जातात पण तुम्ही तिथे आपली संवेदनाही सोबत घेऊन गेलात आणि ती तिथे जिवंत सुद्धा ठेवलीत. लेख खूपच सुन्न करणारा आहे.
मी अंदमानला गेले असते तर मला या सर्व गोष्टी इतक्या प्रखरतेने जाणवल्या असत्या की नाही शंका आहे. चुकून कधी गेले तर तुमचा हा लेख आठवेलच मला नक्की.

अजून बरच काही मनात येतय पण इथे उतरवता येत नाहिये. फारच विचारात पडलेय मी.

तुम्ही उल्लेख केलेले लोक जगात कमी नाहीत, रादर जास्तच आहेत. त्यांना एखादी बाग काय किंवा एखाद्या स्वातंत्र्यवीराने हाल अपेष्टा काढलेली जागा काय हो? दोन्ही सारखंच. अंदमानला जाउन आलो सांगायला गर्वाने छात फुगली की झालं.

पण आपण या लोकांपेक्षा वेगळे आहोत याचा अभिमान तुम्ही नक्की बाळगा.

दुर्दैवाने आपल्याकडे शैक्षणिक अभ्यासक्रमात ही जाणीव निर्माण केली जात नाही मग सुजाण नागरिक कसे तयार होणार? >> +१
ही सगळी असंवेदनशील समजली जाणारी तरुण पिढी आहे यांना लहानपणापासून देशाची, त्याच्या भूगोलाची, इतिहासाची माहिती देणं, इतिहासाला, त्यातल्या घटनांना, लोकांना महत्त्व देणं, ते त्यांच्या मनावर बिंबवणं, मुळात 'आपल्या' देशाबद्दल अभिमान, प्रेम, मातृभूमी म्हणून आदर ह्या भावना त्यांच्या जागृत होतील अश्या प्रकारे शिकवणं, आचरण करणं या सगळ्यातच आपण ( समाज म्हणून, पालक म्हणून, शिक्षक म्हणून, शिक्षणपद्धती म्हणून) खूपच कमी पडतोय असं मला वाटतं.

सावरकरांविषयी एक पुस्तक वाचलेले तेव्हा त्यांच्या हाल कष्टांची वर्णनच वाचून काटा उभा राहिला होता.

आता, हा लेख वाचून वाटले की, काहीं लोकांची अक्कल नेहमीच घाण खाते.... इतक्या संवेदना संपलेल्या व्यक्ती असतात ना इथे, तिथे. Sad

आपण देशासाठी काहीही केले नाही/करावे लागले नाही म्हणून तरी ह्या क्रांतीवीरांना जरासा आदर 'योग्य ठिकाणी, योग्य वेळी' दिला तरी खूप आहे हेच समजेल तर बरे. रोज रोज तर आपण पूजा करत नाही त्यांची घरी(कोणी करत असतीलही) पण त्यांनी जिथे घाम गाळले/रक्त सांडले त्यांचे तिथे तरी नमायला काय हरकत आहे.
पण मुळात आई-वडील, शिक्षक शिकवतील तरच मुलांना कळेल ना. हेच लोकं दुसर्‍या देशात करतील का हे चाळे अश्या ठिकाणी?

छान लेख बेफिकीर. मला याच्या अगदी उलट अनुभव आला जर्मनीत हिटलरने ज्यूंसाठी केलेला डकौचा कॉंन्संट्रेशन कँप बघताना. तिथे तर कुणी गाईडही नव्हता, आपलेआपण वाचायचे अन ऑडिओ गाईड कानात. कॆमेरा, लहान मुले सर्व काही अलाऊड. तरीही सकाळी दहा ते संध्या. सहा कित्येक पर्यटक असूनही इतकी सहानुभूतीपूर्ण समंजस शांतता की जणू काल तिथे ते अराजक घडले आहे! तो ताण असह्य होऊन रूमवर आल्यावर मी ओक्साबोक्शी रडले होते त्या अनाम निरपराध्यांसाठी. 'समज' कमी पडते 'आपल्या'लोकांची , हे तुमच्या लेखातून ठळकपणे जाणवले.

बेफी अंदमानला लोक फिरायला जातात, मजा करायला जातात पण तुम्ही तिथे आपली संवेदनाही सोबत घेऊन गेलात आणि ती तिथे जिवंत सुद्धा ठेवलीत. लेख खूपच सुन्न करणारा आहे.
मी अंदमानला गेले असते तर मला या सर्व गोष्टी इतक्या प्रखरतेने जाणवल्या असत्या की नाही शंका आहे. चुकून कधी गेले तर तुमचा हा लेख आठवेलच मला नक्की. <<< खरं आहे

टुअरवाले
मागणी तसा पुरवठा करतात .त्यांना चाड वगैरे काही नसते .नाहीतर एखादा
टुअरवाला हे प्रकार पाहून जेलची भेट ठेवणारच नाही .गाईड लोकांची अवस्था
मेडिकल सेल्समनकडून शिकलेल्या डॉक्टरपेक्षा वेगळी नसते .

अंदमानच काय पण भारतात बहुतेक ऐतिहासिक ठिकाणी काय वेगळी परीस्थिती आहे ? साधे पुण्यातले सिम्बॉयसिस च्या टेकडीवरचे गोपाळ कृष्ण गोखल्यांचे स्मारक बघा. ४ थी मधे आम्हाला धडा होता त्यांच्यावर, त्यात त्या स्मारकाच फोटो होता. म्हणून तेव्हा उत्साहाने बघायला गेलो तर स्मारकावरच सगळीकडे प्रेमवीरांची नावे कोरलेली. अगादी इंच न इंच व्यापून टाकला होता बदामांनी आणि नावांनी. सगळे गड , कील्ले अशीच परीस्थिती आहे सगळीकडे. सिव्हिक सेन्स नाहीचे आपल्याकडे.

होय आणि राजगडावरची नावे काढायला गेलो तर तिथला केंद्र सरकारचा पुरात्त्व खात्याचा कर्मचारी म्हटतो काही बदल करायचा असेल तर दिल्लीहून परमिशन आणा .आइ लव XXX आणि बदामातला बाण राष्ट्रकुट ,इंग्रज ,पोतृगिजांनी लिहिले नसेल कशावरून ?

Pages