मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी

Submitted by मामी on 4 April, 2013 - 00:16

निर्सगाच्या गप्पा (भाग १३) या धाग्यावर दिनेशदा, हीरा, नंदिनी यांनी मुंबईबद्दल काही माहिती दिली. अशी या शहराबद्दलची छान, उपयोगी माहिती एकत्रित असावी म्हणून हा धागा.

कोणाकडे जुने फोटो, जुन्या आठवणी असल्यास सगळ्यांनाच त्यांचा लाभ घेता येईल. एखादी खास वैशिष्ट्यपूर्ण जागा असेल तर इथे नोंदवता येईल. इथे प्रकाशचित्रे टाकताना प्रताधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन टाका.

मुंबईतले सार्वजनिक कार्यक्रम, मुंबईतली खाऊ-पिऊची ठिकाणं यांकरता वेगळे धागे आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातली माहिती योग्य धाग्यांवरच टाकावी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रीकृष्णचा फक्त वडाच... त्या सोबत पाव देत नाहित.

७. शिवाजी मंदिरच्या समोरिल जे.के. सावंत मार्गा वरिल सेनाचा वडापाव
८. स्वामी समर्थांचा मठ असलेल्या वैद्य मार्गावरचा वडापाव
९. पार्कातला महाराजांच्या पुतळ्याच्या उजविकडिल वडापाव आणि भजीपाव

गिरगावातही एक स्पेशल वडापाववाला आहे. लईच चविष्ट!! नीट विचारून लिहिते इथे.
त्याच्याकडच्या वड्यातली भाजी वेगळीच असते. गरम मसाला असतो, पुदिन्याचा स्वाद आणि मधेमधे काजू लागतात.

अगदी अगदी.. मी खाल्लय तो अप्रतिम वडापाव. मुगभाट लेनच्या तोंडावर त्यांच हॉटेल आहे.

त्याच्याकडच्या वड्यातली भाजी वेगळीच असते. गरम मसाला असतो, पुदिन्याचा स्वाद आणि मधेमधे काजू लागतात.>>> मला कसं माहित नाही? Uhoh

अगदी अगदी.. मी खाल्लय तो अप्रतिम वडापाव. मुगभाट लेनच्या तोंडावर त्यांच हॉटेल आहे.>>> काय नाव?

मुगभाटच्या शेवटी एका बाईंची वडापावची गाडी होती. पण तो वडा मला आवडत नसे आणि खूपच फताडा असल्याने पावात मावत नसे.

मला जगन्नाथ शंकरशेट रोडवरचा रुपी बँकेजवळचा शिवसेना शाखेबाहेरचा वडापाव आवडत असे.

बरं बरं Happy

मुंबईतली पहिली पावभाजीची गाडी आमच्या वाडीतल्या एकांची होती. त्यांचा प्रिंटिंग प्रेस होता/आहे आणि रात्री ती गाडी लागत असे. द्रोणात देत असत. ती चेंदामेंदा भाजी बघून पहिल्यांदा खावीशी वाटली नव्हती. पण चव घेतल्यावर अहाहा! अनंतचतुर्दशीला वाडीचा गणपती पोहोचवून परत आल्यावर ती पावभाजी सगळेजण मागवून खात असू. त्यांची गाडी त्यांनी बंद केल्यावर गुलाल वाडीतून पावभाजी मागवत असू. नंतर सगळीकडे पावभाजी बोकाळली आणि हॉटेलांमध्ये मानाचं स्थान मिळवून बसली.

कर्जतचा दगड्याचा वडापाव, लोकल, रेल्वे वाल्यांना प्लॅटफॉर्मवर मिळतो तो दिवाडकरचा नाही . १.५० पैसे प्लेट होता(२ वडे २ पाव) आता माहित नाही. बटाटावडा तोडला नी घास खाल्ला असे कधी झालेच नाही पहिले २ मि. फु फु करावेच लागते. :))

- टिळक नगर, चेंबूर पोलिस स्टेशनच्या बाहेर, ट्रॅफिक आयलंड जवळ. अप्रतिम तिखट्-गोड चटणी आणि वडे (लिहितानाच तोंडाला पाणी सुटलंय)
- ठाण्याला राजधानी

जेम्स बाँड, त्या दगडूचा वडापाव खाल्ला गेल्यावर्षी. माझा घसा कामातून गेला होता, त्यामुळे मी खाणार नव्हते पण तिथल्या वासाने निश्चय ढळला. नाही नाही म्हणताना दोन वडे खाल्ले.
दिवाडकरचा वडा आता बंडल झालाय. त्यामुळे बरेच माहितगार आणि हौशी खादाड ट्रेन कर्जतमधे शिरल्या शिरल्या दगडूकडे धावत जाऊन वडापाव घेऊन येतात.

राज, ठाण्याला राजधानी कुठेसं?

बोरीवली चा बाभई (मंगेच) चा वडापाव. आता त्याने बोरिवली वेस्ट स्टेशन जवळ अनुपम स्टेशनरी च्या समोर ही एक दुकान टाकले आहे.

>>राज, ठाण्याला राजधानी कुठेसं? <<
उप्स, गल्तीसे मिश्टेक होगया. राजधानी नव्हे, राजमाता - नौपाडा. Happy

अगदी अगदी.. मी खाल्लय तो अप्रतिम वडापाव. मुगभाट लेनच्या तोंडावर त्यांच हॉटेल आहे.>>> काय नाव? >>>> आय थिंक बोरकरांचा वडापाव.. खुप अप्रतिम..

राजधानी नव्हे, राजमाता>> हम्म्!! Happy
राजमातापेक्षा आपटे गाडीवरचा वडापाव आमच्यासाठी पहिल्या नंबरावर. गोखले रोडवरून राम मारुती रोडवर दुचाकी/ चारचाकीने येण्याचा रस्ता आहे तिथे गाडी असते ती.. केंब्रिज आणि वूडलँडच्या गल्लीत.
त्यानंतर दुसर्‍या नंबरावर श्रद्धाचा वडा आणि त्यानंतर गजाननचा वडापाव तो खास त्याच्याकडच्या डाळीच्या चटणीसाठी.

बोरकरांची गाडी होती ना वडापावची? भला मोठा वडा असायचा ना? तोच मला नाही आवडायचा. अगदीच वडापाव खावासा वाटला आणि शिवसेनेची गाडी बंद असेल तर तिथून आणून खायचे.

जवळजवळ ४० वर्षांपूर्वी मुंबईत हिप्पी तळ ठोकून होते. ( बहुतेक क्रॉस मैदानात ) त्यावेळी त्यांचे कार्यक्रम असत.
म्हणजे भजन, नाच वगैरे. हरे रामा हरे कृष्णा ची त्या काळात सुरवात झाली बहुतेक. पण सगळेच हिप्पी काही
भक्ती मार्गी नसत. काही नुसतेच भटकत असत. त्यांच्या भूकेची सोय व्हावी म्हणून पावभाजी निर्माण झाली
असे वाचले होते. कांदा, बटाटा, टोमॅटो एकत्र शिजवून माफक तिखट भाजी करत असत. सोबत पाव लागतच असे त्यांना.
त्यापूर्वी मुंबईत उसळ पाव होता. त्याला थोडीशी गोव्याच्या अळसाण्याच्या भाजीची चव असायची. पण ते कडधान्य नसायचे तर त्याजागी मिश्र कडधान्य असे.

पुढे पावभाजीत कुणीतरी सुकट घालूनही प्रयोग केले, असे आमच्या एक परीचित सांगत असत. सध्याचा मसाला
नंतर प्रचारात आला. हा प्रकार नंतरचाच. अगदी २५ वर्षांपुर्वी पण फार फेमस नव्हता हा प्रकार.

शिवसेनेच्या आधी जनसंघाचा बटाटावडा असायचा. निवडणूकीचे काम केले ( मतदार कार्ड लिहिणे वगैरे ) कि
श्रमपरीहार म्हणून बटाटावडा देत असत. पुढे शिवसेनेच्या गाड्या लागल्या. खरे तर शिवसैनिकांना रोजगार
उपलब्ध व्हावा म्हणून त्या सुरु झाल्या. त्या सोबत पाव फार नंतर आला.

छबिलदासच्या समोरचा श्रीकृष्णचा बटाटावडा मात्र खुप काळापासून आहे. तो किंचीत अळणी असतो. सोबत
तळलेल्या मिरच्या मिठात मिसळून देत असत. पुर्वी तिथे फक्त बटाटावडाच मिळायचा. पाणी प्यायची पण
सोय नव्हती. त्याकाळी समोर फक्त पाणी विकणार्‍या गाड्या असत. मशीन का ठंडा पानी, २५ पैसे.. असे
त्या गाड्यांवर लिहिलेले असायचे. मग काला खट्टा वगैरे विकणार्‍या सरबताच्या गाड्या आल्या.
आता श्रीकृष्णमधेच पाणी मिळते.. सरबतही मिळते. मूगभजी, समोसा, साबुदाणावडा पण मिळतो.
कांदावडा असतो का आता ?

त्या काळात बटाटावड्यासाठी दादरला आणखी दोन ठिकाणे होती. एक शिवाजी मंदीर .. भरपूर तिखट व सोबत लसूण चटणी. आणि दुसरा मामा काणे यांचा बटाटावडा.

बेडेकरांची पण फार चलती होती. दुकानाबाहेरच त्यांच्या मसाल्याचा घमघमाट यायचा. आता गर्दीत हरवल्यासारखे दिसते ते.

मी विचारलं. बोरकरचाच वडापाव. मुगभाट लेनच पण दोन भाऊ आता वेगळे झाले म्हणे. दुसरा भाऊ पेपरवाडीत (की पीपलवाडी?) असतोय, आमच्या ऑफिसात त्याच्याकडून वडापाव आणतात. म्हणजे मी खाल्लेला वडापाव पेपरवाडीचा Wink

पिंपळवाडी गं. म्हणजे मी म्हणते तोच तो. पिंपळवाडीच्या दिंडीपाशीच असायची ती गाडी. पण तेव्हा पुदिना आणि काजू नसायचे. अर्थात इतक्या वर्षांत पाकृमध्ये बदल केले असणारच स्पर्धेत टिकून राहायला Happy

आताचा वडा तू खाऊ शकणार नाहीस Wink
व्यवस्थित मसालेदार असतो. पण चटकदार असतो. आमच्या ऑफिसात आणला की पुडा सोडायच्या आधी महाराजला चहा ठेवायला सांगतात. मसालेदार वडापाव आणि चहा!! अहाहाहाहाहाहा!!!!

मशीन का ठंडा पानी, २५ पैसे.. असे त्या गाड्यांवर लिहिलेले असायचे. >>>> हे आठवलं . मज्जा वाटली .
आता आमचंही " आमच्या काळात / त्या वेळी " अस व्हायला लागल आहे .

बोरीवली चा बाभई (मंगेच) चा वडापाव. आता त्याने बोरिवली वेस्ट स्टेशन जवळ अनुपम स्टेशनरी च्या समोर ही एक दुकान टाकले आहे.>>खर्रच सामी ?? . बघायला पाहिजे. बाभईला इतकी गर्दी असते की आपला नंबर लागेपर्यंत जीव जातो .

दिनेशदा, ज्याला आपण श्रीकृष्णचा बटाटावडा असे म्हणतो त्याला दादरचे जुने रहिवासी "मंजुचा वडा" म्हणुन ओळखतात. मामाकाणेंकडे अजुनही बटाटावडा चांगला मिळतो, पण काही जुने खव्वये आता ती चव राहिली नाही असेच म्हणतात, का ते माहित नाही.

दादरला कबुतरखान्याच्या राममंदीरजवळील बसस्टॉपसमोर स्वागत फास्ट फुड आहे, त्यांच्याकडील बटाटावडा चटणीसुध्दा चांगली आहे.

मामा काणे कडे जाऊन बरीच वर्षे झाली.. तो फ्लायओव्हर झाल्यापासून फार अडचणीचा रस्ता झालाय तो.
झारापकर नाव पण आता फारसे ऐकू येत नाही, हप्त्याने विक्री मला वाटतं त्यांनी आधी सुरु केली.
त्या भागातले काही ओळखीचे गंध... म्हणजे त्यात साळगावकरांचे लोणी पण आले. बेळगावचे, कोईमतूरचे वगैरे वेगळे लोणी मिळायचे त्यांच्याकडे. तो भला मोठा लोण्याचा गोळा अजून डोळ्यासमोर आहे. चक्का आणायला खास त्यांच्याकडे जात असू आम्ही.
त्या साळगावकरांचा एक नातेवाईक गोव्याला माझा कलिग होता.

टी.टी. चे फार्मर ब्रदर्स पण बंद झाले ना ? माझी आणि माझ्या त्या काळच्या भावी वहीनीची पहिली भेट तिथे झाली होती.

छबिलदासच्या समोरचा श्रीकृष्णचा बटाटावडा मात्र खुप काळापासून आहे. तो किंचीत अळणी असतो. >>> सध्या जरा खारट असतो. पण अप्रतिम चव !

Dineshda tumhI ullekh kelyapramane prabhadevi madhey aakar gallery shejaril te shilpa ajunahi ahe...tyala nagda baba mhanun sambodhtana mi aikat ale ahe.

मुंबईतल्या-खरं म्हणजे कोंकण किनारपट्टीतल्या- काही स्थळनावांची माहिती जी लक्षात आहे ती लिहून ठेवीत आहे. पुढेमागे कोणालाही त्याचा उपयोग होऊ शकेल म्हणून.
दादर : "दादरचा अर्थ तरी वोहोटिचे समयीं वीथभर पाणी असत नाहीं व चिखलही नाहीं." -पेशवे दफ्तर रुमाल ३४ पत्र ५०.
सध्या आपल्याला माहीम-माटुंगा रोडजवळचे दादरच माहीत असते. पण दोनशे वर्षांपूर्वी ह्या दादरला काहीच महत्त्व नव्हते. वसईच्या मोहिमेत महत्त्वाचे ठरले ते दुसरेच एक दादर. वसई तालुक्यात सुद्धा दादर नावाचे एक ठिकाण आहे. 'उमेळें ते गोखिरवें या खाडीवर सोपार्‍याचे जवळ हें ठिकाण आहे' - साष्टीची बखर, सूचि पृ.१० . आता ही खाडी कितपत उरलीय ते ठाऊक नाही.
धारावीसंबंधीसुद्धा बहुतेकांना थोडी अज्ञात माहिती या बखरीच्या सूचीत आहे. सध्या आपल्याला एकच शींव-धारावी माहीत असते .पण गोराईजवळही ही दुसरी आणि अधिक ऐतिहासिक महत्त्वाची धारावी अथवा धारावें आहे. खरे तर धारावे हा किनार्‍याचा एक प्रकार आहे, त्यामुळे अशी धारावी गावे किनारपट्टीवर इतरत्रही असू शकतात.
"बोरीवलीच्या पश्चिमेस खाडीच्या तोंडाशीं समोर एक चिंचोळें बेट आहे त्यांत खाडीच्या तोंडाजवळ धारावी हें ठिकाण आहे. येथें एक फार मजबूत किल्ला होता. ह्या बेटांतील किल्ल्यावरून वसईचें संरक्षण उत्तम प्रकारें करितां येत असे. म्हणून या बेटास त्या काळी वसईचा नाका असें म्हणत असत.(पे.द.रु.१६ पत्र २७) धारावी घेतल्याशिवाय वसई मिळत नाहीं असें त्यावेळचे सरदार नेहमीं म्हणत. ह्या बेटांत लांबलांब दगडाच्या खाणी आहेत. डोंगराच्या पायथ्याशीं एक गायमुख आहे. ह्यांतून गोड पाणी वहातें. प्रस्तुतच्या(वसईच्या) मोहिमेंत या गायमुखास फार महत्त्व आलें होतें. ह्या बेटांतून वसईच्या किल्ल्यावर व खाडींत पल्लेदार तोफांचा मारा चांगलाच होई. इ.स.१७३७ तह्या बेटावर पेशव्यांनीं पहिला हल्ला केला होता. 'धारावीमुळें एक काय हलहल लागली तें ईश्वरास ठाउक' असे चिमणाजी आपांचे ता.४|४|१७३८तले (पे.द.रु.३४प.१११) उद्गार आहेत. ता.६|३|१७३९ मध्यें दोनतीन महिन्यांचे वेढ्यानंतर पेशव्यांनी धारावी जिंकली"

आणखीही लिहायचे आहे ते मागाहून.

लोणी साळगावकरांचे? तुम्हाला सामंतांचे म्हणायचे असेल बहुतेक. लोणी आणि चक्का. झारापकर आता बंद झाले.
दादर बद्दल छान माहिती.

Pages