उपवासाचे गोड कटलेट.

Submitted by सुलेखा on 9 February, 2013 - 02:07
upwasache cutlet
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ किंवा ३ रताळी.
१ संतर्‍याचा ज्युस.
[संतरे नसेल तर एका लिंबाचा रस ]
राजगिरा लाह्या.
[लाह्या नसल्या तर राजगिरा वडी /लाडू घेतल्यास चालेल]
२ चमचे किंवा आवडीप्रमाणे गुलकंद.
एकेरी काजुपाकळ्या.
चवीपुरते मीठ.
२ चमचे तूप.

क्रमवार पाककृती: 

रताळी छान धुवुन घ्यावी..थोडा वेळ स्वच्छ पाण्यात बुडवुन ठेवावी.
आता तेलाच्या प्लास्टिक पिशवीत किंवा दुधाच्या /तत्सम पिशवीत ही रताळी ठेवुन मावेत फुल पॉवर वर १-१-१ मिनिट भाजुन घ्या.मावे च्या बाहेर काढुन रताळी थंड करा.आता रताळे सुरीने मधुन चिरुन चमच्याने त्यातला गर एका बाऊल मधे काढुन घ्या.
[मावे नसल्यास रताळी ,कूकर मधे वाफवुन घेतली तरी चालतील.पण प्रेशर उतरल्यावर उकडलेली रताळी लगेचच पाण्याबाहेर काढुन ठेवा म्हणजे त्याचा गर पाणचट होणार नाही.साले सोलुन /रताळी आडवी चिरुन गर काढा.म्हणजे रताळ्याचे लांब रेषे गरात येणार नाहीत.]
एका संतर्‍याचा रस काढुन या गरात घाला.त्यात किंचित मीठ व मावतील तितक्या राजगिर्‍याच्या लाह्या आणि गुलकंद घालुन हलक्या हाताने मिश्रण कालवुन एक गोळा तयार करा.
राजगिरा वडी/लाडू वापरणार असाल तर त्यावर संतरा रस घाला म्हणजे वड्या/लाडू रसात भिजतील.
[जर लिंबाचा रस वापरला तर मिश्रण ओले करण्या साठी लागेल तसे थोडेसे[१-१ चमचा]दूध घाला.]
आता फ्राय पॅन गॅसवर तापायला ठेवुन त्यात १ टी स्पून तूप घाला.
एका लहान प्लेट मधे थोड्या राजगिरा लाह्या घेवुन तयार मिश्रणाचे साच्याने कटलेट तयार करुन त्यावरदोन्ही बाजुला मधे काजु लावुनहे कटलेट राजगिरा लाह्यात दोन्ही कडुन घोळवावेत व फ्राय पॅन मधे मंद आचेवर दोन्ही बाजुंनी भाजावेत.बाजु बदलली कि फ्राय पॅन वर १ टीस्पून तूप टाकावे.
रताळे आणि राजगिरा फार लौकर भाजला जातो म्हणुन मंद गॅसवर हे कटलेट फ्राय करावे.
upawaasaasaathee katalet 005.JPGupawaasaasaathee katalet 004.JPG

अधिक टिपा: 

रताळे व राजगिरा यात लोहतत्व भरपूर असते.पण राजगिरा लाह्यांना फारशी चव नाही.त्यामुळे खाल्ल्या जात नाहीत.
संतर्‍याच्या रसाची आंबटगोड चव व गुलकंदाची चव वेगवेगळी जाणवते.
गुलकंदामुळे मी वेगळी साखर घातली नाही.पण संतरा रस व गुलकंद न वापरता जर फक्त लिंबू रस वापरला तर चवीपुरती पिठीसाखर घालावी.

माहितीचा स्रोत: 
असेच माझे स्वयंपाकघरातले प्रयोग.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार. मला मानवेल असाच !

अवांतर : रताळी प्लॅस्टीकच्या बॅगमधे ठेवून भाजायचे काही खास कारण आहे का ? शक्यतो त्या बॅगा मावेच्या दर्ज्याच्या नसतात. तशीही भाजली जातील. कूकरमधे ठेवताना, पाण्याच्या वर राहतील अशी ठेवायची. म्हणजे पाणचट होत नाहीत.

दिनेशदा,मी बटाटे सुद्धा एक-दोन चिर लावुन रिकाम्या तेलाच्या पिशवीत ठेवुन भाजते .पिशवी बंद करत नाही.त्यामुळे भाजलेले बटाटे अगदी कोरडे [सुरकुतलेले]पडत नाहीत. कूकरमधे वेगळ्या भांड्यात /किंवा झाकणावर ठेवुन शिजवली तर नक्कीच पाणचट होणार नाही.

अरे वा.......एकदम वेगळी रेसीपी Happy
तो प्लेटच्या खालचा क्रोशाचा रुमाल पण एकदम भारीये Happy