उंधियु

Submitted by सुलेखा on 21 January, 2013 - 07:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

या दिवसात सर्व प्रकारच्या भाज्यांची रेलचेल असते.उंधियु म्हणजे बर्‍याच भाज्यांचे मिश्रण..त्यातही प्रत्येकाची कृति थोडीफार वेग़ळी असते.
मी उंधियु साठी घेतलेले साहित्य असे आहे:-
१२५ ग्रॅम गुलाबी सुरण.
१ लहान कंद.
२ रताळी.
२ कच्ची केळी.
२०० ग्रॅम सुरती पापडी.
१ वाटी प्रत्येकी हिरवे तुरीचे दाणे ,मटार दाणे.
६ अगदी लहान वांगी.
१ वाटीभर फ्लॉवर चे तुकडे.
८ अगदी लहान गोल बटाटे.
१ लिंबू,
मुठिया साठी-
१ जुडी मेथीची पाने.
१ १/२ वाटी जाडसर बेसन.
१/२ वाटी जाड कणिक.
[नेहमीचे बेसन , कणिक व जाड रवा घेतला तरीही मुठिये छान होतात.]
अर्धी वाटी तीळ.
चवीप्रमाणे तिखट,मीठ,हिंग,जिरे,मोहोरी,हळद,मेथीदाणा,कढीपत्ता ७-८ पाने.
१ टेबलस्पून ओवा,
१ टी स्पून हिंग पूड,
२ टेबलस्पून बडीशोप्,[यातली अर्धी भरडुन मुठियात घालायची आहे.]
१टेबलस्पून जिरे पुड.
२ टेबलस्पून धनेपुड,
१ टेबलस्पून गूळ.
२ टेबलस्पून गरम मसाला.
१ हिरव्या लसणीची पातीची जुडी.
थोडीशी हिरव्या कांद्याची पात ,
१ हिरवी मिरची.
१ कोथिंबीरीची जुडी.
१ १/२ वाटीभरुन तेल.[दिड वाटी]
२ टेबलस्पून मोहनासाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

१]सुरण ,कंद,कच्ची केळी साले काढुन मोठ्या फोडी करुन घ्याव्या.सुरण फोडी भिजतील इतके पाणी घालुन गॅसवर अर्धवट उकडुन घ्याव्या.उकडले कि त्यातील पाणी काढुन टाकावे.असे सुरण खाजरे लागत नाही.
फ्लॉवर चे मोठे तुकडे करुन गरम पाण्यात चिमुटभर मिठ घालुन त्यात टाकावे.फोडणीच्या वेळेस यातील पाणी फेकुन द्यावे.फ्लॉवरचा उग्रपणा पाण्यातुन निघुन जातो.
कंद व केळी च्या फोडी थोड्या पाण्यात टाकुन ठेवाव्या.म्हणजे त्या काळ्या होणार नाहीत.
२]सुरती पापडी च्या रेषा सोलुन घ्याव्या.
३]बटाटे पाण्यातुन छान धुवुन घ्यावे.मातीचा अंश पूर्ण पणे गेला पाहिजे.
४]अर्धी लसूण पात,अर्धी जुडी कोथिंबीर,अर्ध्या लिंबाचा रस ,१ टेबलस्पून तीळ,हिरवी मिरची,जिरे व चवीपुरते मीठ व थोडेसे पाणी घालुन हिरवी घट्टसर चटणी वाटुन घ्यावी.
वांगी व बटाटे यांना सुरीने उभे काप काप द्यावे.
वांगी ,बटाटे,सुरण्,कंद,केळी,फ्लॉवर च्या फोडी पाण्यातुन काढुन्,कापडावर त्यातले पाणी टिपुन घ्यावे.या सर्व फोडींवर वाटलेली अर्धी चटणी लावुन घ्यावी.म्हणजे फोडीत मसाला मुरेल.
मेथीची भाजी चिरुन घ्यावी त्यात बेसन,कणिक,तिखट,मीठ,थोडासा हिंग,हळद,थोडासा ओवा व बडीशोप,१ चमचा तीळ मीठ व पाणी घालुन घट्टसर भिजवुन घ्यावे.
लहान कढईत तेल गरम करावे .गरम तेलाचे मोहन या भिजवलेल्या पिठात घालुन कालवावे व लहान लहान गोल आकाराचे मुठिये खरपुस तळुन घ्यावे.
आता जड बुडाच्या पॅन मधे उरलेल्यातेलाचीफोडणीकरायचीमोहोरी,मेथीदाणा,ओवा,जिरे,हिंग,कढीपत्ता,मेथीदाणा.बडीशोप,कोथिंबीर घालुन त्यात चिरलेली लसुण पात,कांदा पात,उरलेली अर्धी कोथिंबीर, सुरती पापडी,तूर्-मटर दाणे-शेंगदाणे आणि हिरवा मसाला लावलेल्या सर्व भाजीच्या फोडी घालुन परताव्या.तिखट,मीठ,उरलेली चटणी,,जिरेपुड,उरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस ,गरम मसाला ,धनेपुड,गूळ घालुन मिश्रण छान ढवळुन घ्यावे.
साधारण वाटीभर गरम पाणी घालावे. गॅसच्या दुसर्‍या शेगडीवर एक तवा तापवुन घ्यावा.तवा गरम झाला कि गॅस अगदी कमी करुन त्यावर पॅन ठेवावे वर झाकण ठेवुन मंद आचेवर शिजु द्यावे.अधुन मधुन वाफ आली कि परतावे.बटाते शिजले कि त्यात तळलेले मुठीये घालुन पुन्हा एकदा परतावे व एक वाफ आणावी.
आता उंधियु तयार आहे.वाढताना त्यावर डाळिंबाचे दाणे,द्राक्ष टाकावे.
undhiyu--21-01-2013.JPG
या उंधियु बरोबर लहान पुरीसारख्या फुलकेवजा पोळ्या किंवा मेथीचे ठेपले खातात..

अधिक टिपा: 

लाल तिखट व हिरव्या मिरच्यांचे प्रमाण आपल्या चवीप्रमाणे घ्या.
४-५ तास आधी करुन ठेवला तरी चालतो.मसाल्यात मुरलेल्या उंधियु ची चव जास्त छान लागते.

माहितीचा स्रोत: 
रंग रंगिलु मारु गुजरात !
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलेखा , मस्तच. माझी आवडती भाजी.
जर राग येणार नसेल तर थोडेसे अ‍ॅड करते .
उंधियो भाजी च्या फोडणीत ओवा मस्ट आहे. त्याची चव वेगळीच लागते.
मसाला वाटताना थोडे हिरवे मटार पण टाकावे ग्रेवी ला छान हिरवा रन्ग येतो. कोथिंबीर आणि लसूण पात जास्त घ्यावी.
फ्लॉवर ने चव थोडी बदलत असेल असे वाटते.
भाज्या मिक्स करताना थोड्या मुठीया त्यात कुस्करुन टाकल्या की मसाल्याची चव छान लागते किन्वा ताजी मेथी बारीक चिरुन टाकावी.

सामी,तुझ्या सर्व सूचनांचे सहर्ष स्वागत आहे.तू योग्य अ‍ॅडीशन केले आहे.पुढील वेळेस तसे करीन.
माझ्या घरातील तीन "सिनीयर्स" चा विचार करुन उंधियु केले आहे.लसूण,तिखट व मसाले कमी वापरले आहेंत. मुठिये फारच खस्ता होतात त्यामुळे मी सबंध टाकते.

वॉव..... सही रेसिपी!!
मी मुठिये थोडे घट्ट भिजवुन भाजी घातल्यानंतर वरच रचुन ठेवते. तळत नाही Happy

बापरे सुलेखा... खुपच उरकाची तू!!!

माझी अत्यंत प्रिय भाजी!!! माझे एक कलीग गुज्जु आहेत ते दर थंडीच्या मोसमात माझ्या साठी आणतातच!!!!!

माझी पण अत्यंत प्रिय भाजी!!! धन्यवाद रेसिपी बद्द्ल.
नाहीतर नेहमी बाहेरुन विकत आणायचे आता करुन बघेन Happy

दक्षिणा,कर्वे रोड ला अलुरकर च्या ओळीत सागर स्वीट मधे रविवारी सकाळी तयार मिळतो..तुमच्या भागात ही कुठेतरी गुज्जु फरसाण वाल्याकडे मिळत असणार्.थोडी विपू.करुन पहा.

सही रेसिपी!!
अतिशय सुरेख भाजी. आणि तितकीच अवघड पण.
तू फारच छान लिहिली आहेस.
पण त्याला इतकी पूर्व तयारी लागते की घरी करायचा विचार सुद्धा करू शकत नाही

व्वा! सुलेखा.....मस्तच! खूप जण घरात असतील तेव्हा नक्कीच करून बघीन. माझ्या समोर रहातात त्या बडोद्याच्या आहेत. अप्रतीम उंधियो बनवतात. वर्षातून २/३ दा तरी आयता मिळतो.
इथ बाजारात तुरीच्या शेंगा/दाणे कधीकधी मिळतात. नेहेमी नाही.

नताशा,सागर चा मला आवडला.एकतर घराजवळ दुकान..जरा तिखट असतो.पण घरी करायचा नसतो तेव्हा चालतो.मी त्यात उकडलेला/मावे त भाजुन घेतलेला बटाटा त्यात मिक्स करुन तिखट पणा कमी करुन घेते.मानुषी ,इतक्या तयारीनिशी करायचा तर आवडीने [२-३ वेळा]खाणारेही तितकेच हवेत.पेक्षा असा आयता [समोरच्यांकडुन /दुकानातुन]मिळाला तर खूप्पच छान.

सुलेखा, तुझा उंधियू लाल का दिसतोय? कोथिंबीर आणि लसूण पात वाटून घातल्यावर आणि जनरली सुरती पापडी, मटार, तुरीचे दाणे अश्या हिरव्या भाज्या असल्यामुळे उंधियू पिवळा/ हिरवा अश्या रंगाचा दिसतो.
उंधियूच्या पण प्रदेशानुसार पाककृती आणि चवी वेगवेगळ्या आहेत म्हणे. त्यातला सुरती उंधियू आम्हाला आवडतो.

मंजुडी,डाळिंबाचे दाणे वरुन घातले आहेत.हा फोटो उंधियु केल्याबरोबर लगेच्च मातीच्या भांड्यात ठेवुन लगेच हा फोटो काढला आहे-तेव्हा हिरवा व पिवळा असा दिसत होता.मसाला मुरल्यावर हिरवाच झाला.लसुण व कोथिंबीर वाटुन मसाला केला होता.बटाटा सालासकट होता.तो पिवळा दिसतोय्.मुठियात भरपूर मेथी व हिरवे वाटण घातले होते.आकाराने लहान लहान होते.जाड बेसन व बाफल्याचाच आटा वापरला त्यामुळे खूप छान, ठिसुळ झाले होते.त्यामुळे ते मोडुन टाकायची वेळ च आली नाही..तिखट बेताचे हवे होते त्यामुळे आले व लाल तिखट वापरलेच नाही.सामान्यत: अशीच कृति असते.मुठिये न तळता भाजीबरोबर तसेच कच्चे किंवा काही ठिकाणी इडलीसारखे वाफवुन टाकतात्.मी मुठिये तळुन त्याच तेलात फोडणी केली.मेथीदाणा [कसुरी मेथी ही चालेल],हिंग ,भरपुर ओवा व बडीशोप हे असावेच .टिकण्याच्या दृष्टीने कच्चा कांदा -फोडणीत-घालत नाहीत.पण पात चालते.घरातले सगळे "जर-तर" लक्षात घेवुन तसे बदल करुन सिझन मधे एकदा करते.

मुंबईला बाबूलनाथच्या समोर एका दुकानात खास मिळतो. मूळ पद्धतीने केलेला ( भरपूर तेल घातलेला ) मिळतो आणि डायेट पद्धतीचा ( नुसता वाफवलेला ) देखील मिळतो. ते लोक भाज्या खास सुरतहून आणतात. दोन्ही प्रकार खासच लागतात.

मी गेल्या वर्षी सुरती उंधियो स्वाती_आंबोळे नी लिहिलेल्या रेसिपीने केला होता. तो धागा पण वरती काढला आहे. ही पण रेसिपी छान आहे.

उंधियो भयंकर आवडता प्रकार पण करायला अजिबात उत्साह येत नाही. माझ्याकडे मातीचं भांडं आहे. एकदा त्यात करायचा आहे उंधियो. तुमच्या नाही तर स्वातीच्या रेसिपीने करणार (करणार करणार एकदा तरी नक्की करणार ;)).