गणपती इलो रे!

Submitted by गारम्बीचा बापू on 15 September, 2012 - 13:28

गणपती इलो रे!

घराघरातला आणि गावातला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सगळं कोकण उत्साहाच्या धबधब्यात चिंब भिजून जायचं. कारखान्यात मूर्तीवर चाललेल्या रंगकामापासून बाप्पांचा प्रसाद हातात पडेपर्यंतचा प्रत्येक क्षण मनात कोरलेला असायचा. पण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत सगळंच बदललं आहे.

पावसाची सणसणीत सर नुकतीच कोसळून गेलेली असते. गवत्या उन्हात तिळाची पिवळीधम्मक फुले पावसाचे थेंब पाकळ्यांवर घट्ट पकडून आणखीनच सोनेरीसोनेरी होऊन चमकत असतात. सगळ्या हिरवाईवर फुलांचा सुंदर साज चढलेला असतो आणि पोटरीला आलेल्या भाताच्या लोंब्यांचा धुंद सुगंध सगळ्या परिसरात घुमत असतो.. क्षणापूर्वी कोसळून गेलेल्या पावसानंतर आकाशातले ढगही पांगलेले असतात, आणि लांबवरच्या डोंगरकडय़ातून अधीरपणे जमिनीकडे झेपावत कोसळणाऱ्या धबधब्याच्या दुधाळ धारेचे वळसे स्पष्ट दिसू लागतात. पायथ्याच्या रानातला पक्ष्यांचा किलबिलाट घंटानादासारखा घुमत असतो. मधूनच एखाद्या मोराची लांबलचक आरोळी त्या किलबिलाटाला संगीत देते आणि अवघं रान मोहरून डोलू लागतं..
गावाबाहेर असा ‘मोहोर’ फुललेला असतानाच गावातल्या तांबडय़ाभडक मातीच्या रस्त्यांकडेची हिरवी झाडंही आसुसल्या नजरेनं रस्त्याकडे नजरा खिळवून बसलेली असतात. सकाळच्या पावसानं रस्ता कसा धुवून निघालेला असतो. उन्हं पडू लागतात आणि गावात लांबवरच्या रस्त्यापलीकडे ताशाचा तडतडाट ऐकू येतो. घराघरात पहाटेपासून सुरू झालेली लगबग रस्त्यावर दिसू लागते. देवघरात पूजाअर्चा आटोपल्यानंतर घुमणारा घंटांचा किणकिणाट आणि अगरबत्त्या, धूप आणि वळसेदार चंदनी गंधाचा वास घराचे उंबरठे ओलांडून बाहेर पडतो. झांजा खणखणू लागतात आणि ज्यासाठी आसुसलेपणानं रस्त्यांनी आपल्या नजरा खिळवलेल्या असतात ते दृश्य जिवंत होऊन उमटू लागते..
‘कारखान्या’बाहेर लाल रंगात रंगविलेल्या पाटांची रांग लागलेली असते. आंघोळी उरकून, नवे कपडे घालून आणि डोक्यावर टोप्या चढवून बच्चेकंपनीला बरोबर घेऊन आलेली वडीलधाऱ्यांची गर्दी कारखाना उघडायची वाट पाहत थांबलेली असते.
खरं म्हणजे, कारखाना बंद झालेलाच नसतो. फळ्यांच्या दरवाज्याआड रात्रंदिवस तो सुरूच असतो. आदल्या रात्री जेवणखाण उरकून आतमध्ये बसलेली कारागिरांची टोळकी, आपल्यासमोरच्या मूर्तीला ताजा जिवंतपणा देण्यात दंगलेली असतात.
..लावणीची कामं आटपत आली की ज्येष्ठ-आषाढात कारखान्यांची धामधूम सुरू व्हायची. एकेक सुबक गणेशमूर्ती जोडून झाली की त्याला श्रावणातलं कोवळं उन्ह दाखवायचं आणि पांढऱ्या शाडू मातीच्या त्या मूर्तीवर पहिली सफेदी द्यायची.. मग कारखान्यातल्या फळ्यांच्या मांडणीवर रांगेने देखण्या मूर्ती विराजमान व्हायच्या. आमच्यासारखी पोरं शाळेत येता-जाताना कारखान्यासमोर घुटमळायची. मांडणीवरच्या रांगेतलीच एखादी पांढरीशुभ्र मूर्ती तयार होत असतानाच मनात भरलेली असायची. त्या मूर्तीला प्रत्येक नव्या दिवशी नवा साज चढलेला असायचा. श्रावण संपत आला की प्रत्येक मूर्ती रंगांनी सजून जायची आणि डोक्यावरच्या मुकुटांना, गळ्यातल्या आणि दंडावरच्या दागिन्यांना सोनेरी रंग चढायचा. मागचे केस काळे व्हायचे आणि ‘आता घरात गणपती येणार’, अशी एक अधीर जाणीव येणारा प्रत्येक दिवस मोजू लागायची..
गोकुळाष्टमीनंतर कारखान्यातल्या गणपतींची ‘रेखणी’ सुरू व्हायची. मूर्तीचे डोळे रंगविणे हे सर्वात कौशल्याचं काम. बाकीच्या रंगकामासाठी फावल्या वेळात कुणीही कारखान्यात जाऊन मदत करत असे. अवघं गाव गणपतीच्या आगमनाच्या तयारीसाठी आपापल्या परीनं मदत करत असायचं. रेखणीचं काम सुरू झालं की गावातल्या मोजक्या कलावंतांची मागणी वाढू लागायची. प्रत्येक कारखान्यात आळीपाळीनं जाऊन गणपतींचे डोळे रंगवण्याचं काम ते करायचे.
..बशीत तयार केलेला काळा रंग डाव्या हाताच्या मनगटावर घेऊन त्यामध्ये ब्रशचे असंख्य वळसे फिरवत ब्रशला टोक आणून नंतर त्या कालाकाराचा उजव्या हातातला ब्रश मूर्तीच्या भुवईकडे गेला की पाठीमागे उभे राहून दोन्ही गुडघ्यांवर हात घेऊन ओणव्यानं ही कलाकारी न्याहाळणाऱ्या आम्हा पोराटोरांचा श्वास अक्षरश: रोधला जायचा. तो कारागीरही क्षणभर स्वस्थ व्हायचा, आणि श्वास जणू छातीत भरून घेऊन ब्रश हळुवारपणे मूर्तीच्या कपाळाकडे न्यायचा. जिभेचं टोक बाहेर काढून, डोळे बारीक करून, मान किंचितशी तिरपी करून आणि मागे झुकून गणपतीच्या रेखाटलेल्या भुवयांचा अंदाज घ्यायचा, आणि आमची चलबिचल सुरू व्हायची. आता त्या डोळ्यांमध्ये काळी बुबुळं उतरली की गणेशाची मूर्ती पूर्ण तयार होणार असायची. रेखणी करणारा तो कलाकार हळूच आमच्या डोळ्यातही पाहतोय, असा भास आम्हाला व्हायचा. आमचे डोळे गणपतीच्या रंगवून झालेल्या भुवयांवर खिळलेले असायचे. आमच्या नजरेतल्या भावातूनच तो भुवयांचं काम नीट झालंय की नाही याचा अंदाज घ्यायचा, आणि पुन्हा डाव्या मनगटावरल्या काळ्या रंगात ब्रश फिरवून तो डोळे रंगवायला घ्यायचा.. आमच्या छातीत उगीचच धडधडल्यासारखं काहीतरी सुरू झालेलं असायचं. दोन्ही डोळ्यांची बुबुळं प्रमाणशीर झाली नाहीत तर परिश्रमानं घडविलेली आणि रंगानं मढलेली ती गणेशमूर्ती अचानक वेगळीच वाटू लागायची. असं होऊ नये म्हणून आम्ही मनातल्या मनात गणपतीचीच प्रार्थना करायचो, आणि मनातच हात जोडायचो. कारण आमचे हात गुडघ्यांवर असायचे.. ते काढले तर मूर्तीपासून नजर लांब जाणार. ओणवं राहून तासन्तास मूर्तिकाम न्याहाळण्याचा वेगळाच छंद त्या दिवसांत आम्हा शाळकरी मुलांना लागलेला असायचा.
रेखणीकारानं डोळे रंगवले की पुन्हा थोडं मागं झुकून बसल्याबसल्याच तो मूर्ती न्याहाळायचा. मनासारखं काम झाल्यानं मान हलवायचा आणि त्या मूर्तीला जिवंतपणा यायचा. काही वेळाआधीपर्यंतची मूर्ती अधिकच वेगळी वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत खटय़ाळ हास्य भरलंय, असा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती उगीचच, गंभीरगंभीर वाटू लागायची. एखाद्या मूर्तीच्या नजरेत आईच्या मायेचा भास व्हायचा, तर एखादी मूर्ती वडिलांसारखी कडक, कठोर वाटू लागायची. एखादी मूर्ती अगोदरपासूनच कुठेतरी बघितल्यासारखी ओळखीओळखीची वाटू लागायची..
संध्याकाळ झाली, अंधार पडू लागला की घराकडे परतताना, आपल्या घरात दुसऱ्या दिवशी कोणता गणपती आणायचा हे मनात पक्कं ठरलेलं असायचं..
..म्हणून चतुर्थीला कारखान्याबाहेरच्या वडीलधाऱ्यांच्या गर्दीत, आमचीही लुडबुड सुरू असायची. हातातल्या झांजांची उगीचच खणखण करत आम्ही कारखान्याच्या फळ्यांच्या फटीतून आत नजरा लावायचो, आणि काल नक्की केलेला गणपती मांडणीवर कुठे आहे, याचा अंदाज घ्यायचो. पण आज सगळ्याच मूर्ती सारख्याच आहेत, असंच वाटायचं.
कारखान्याच्या फळ्या काढल्या जायच्या. कारखान्याचे मालक, आंघोळ करून, नवे कपडे घालून, डोक्यावर टोपी घालून गल्ल्यावर बसलेले असायचे. त्यांच्या कपाळावर कुंकवाची लालभडक लांबलचक रेषा असायची. वर्षभर दररोज भेटणारा हा माणूस त्या दिवशी काहीतरी वेगळाच, अनोळखी वाटायचा, आणि आपल्या घरचा गणपती याच्या हातून घडलाय हे नकळतपणे जाणवून त्याच्याबद्दल अपार आदर वाटू लागायचा. नंबर आला की आम्ही पुढे व्हायचो. मग मांडणीवरची मूर्ती घेऊन एखादा कामगार आमच्या घरून नेलेल्या पाटावर आणून ठेवायचा, आणि लगेचच त्या मूर्तीसमोर उदबत्त्या ओवाळल्या जायच्या. गणपतीच्या अंगावर रेशमी वस्त्र पांघरले जायचे. समोर सव्वा रुपया ठेवून आम्ही सगळे त्या मूर्तीला नमस्कार करायचो, आणि सगळी गर्दी गजर करायची..
‘गणपती बाप्पा मोरया’..
झांजांचा किणकिणाट एव्हाना रस्तोरस्ती सगळीकडेच घुमू लागलेला असायचा. कारखान्याच्या मालकाच्या हातात गणपतीची किंमत, नारळ देऊन त्याला वाकून नमस्कार करून गणपतीचा पाट उचलला जायचा आणि गणपती आमच्या घराच्या दिशेने निघायचा. वेगळ्याच आनंदात बेहोश होऊन प्रत्येकजण गणपती बाप्पाचा गजर करत असायचा. रस्त्यावर पाहावे तिकडे, घरोघरी निघालेल्या गणेशमूर्ती आणि मोरयाचा गजर..
अचानक एकाच गल्लीत जाणारी पाचदहा कुटुंबं रस्त्यावरच एकत्र यायची, आणि गणपतीबाप्पांची भव्य मिरवणूकच सुरू व्हायची. झांजांचा आवाजही दहापटीनं वाढलेला असायचा, आणि बाप्पाचा गजरही जोशात सुरू व्हायचा. एवढी गर्दी झाली की अचानक ताशेवाले कुठून तरी उपटायचे, आणि मिरवणुकीसमोर न सांगताच ताशांचा तडतडाट सुरू व्हायचा.
दरवाजाशी आलेल्या मूर्तीला ओवाळून तिचं स्वागत व्हायचं, आणि अगोदर तयार असलेल्या मखराशेजारी गणपतीची देखणी मूर्ती विराजमान व्हायची.
मग घराघरांत पूजेची धांदल सुरू व्हायची. स्वयंपाकघरात मोदकांची तयारी सकाळपासून सुरू झालेली असायची. काही वेळातच घरोघरी आरत्यांचे सूर घुमू लागायचे, आणि अवघं गाव धूप, अगरबत्त्यांच्या वासानं घमघमून जायचं.
सणाचं एक वेगळं, पारदर्शक असं रूप गावावर दाटलेलं असायचं.
त्या काळात गावात मुद्दाम सनईवाले यायचे. घरोघरी जाऊन सनईचौघडय़ाची सेवा देणारे हे गट त्या चार दिवसांत कुठल्यातरी एखाद्या घरात हक्कानं मुक्काम ठोकायचे. मग त्या घरात संध्याकाळीही सनईचौघडा घुमायचा. त्यांची ती एकसुरी पेटी वाजवायला मिळावी, म्हणून आम्ही पोरं त्या घरात नेहमीच घुटमळत राहायचो. उत्सवकाळात एकदा तरी ती पेटी वाजवायला मिळावीच, म्हणून!
चतुर्थीच्याच दिवशी अनेक घरांत सहस्रावर्तनं व्हायची. गावातली तरुण मुलं, गट तयार करायची आणि घरोघरी जाऊन सहस्रावर्तनं म्हणायची. पूजेनंतर दुपारच्या नैवेद्याआधी निम्म्या गावातील घरांमध्ये सहस्रावर्तनांचे पाठ झालेले असायचे. मग मोदकांच्या पंक्ती झोडून ही तरणी मुलं दुपारच्या वेळी घरात ताणून द्यायची.. गणेशोत्सवाचा घराघरातला सण पहिल्याच दिवशी अशा तऱ्हेने सगळ्या गावाचा सण बनून जायचा..
गावातल्या मंदिरातही सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. रात्री घरोघरी आरत्यांची जणू चढाओढ लागायची. दिवेलागणीच्या वेळी अवघं गाव आरत्यांच्या सुरात न्हाऊन निघालेलं असायचं. गल्लीतली सगळी गर्दी आरतीसाठी घरं घेत हिंडायची, आणि टिपेच्या आवाजात आरत्या गाताना गावात भक्तिरसाचा जणू महापूर लोटायचा. आरत्यांपाठोपाठ वाटला जाणारा प्रसाद त्या काळात घरीच तयार व्हायचा. तळव्यावर मावणार नाही एवढा प्रसाद घराघरातून पोटात रिचवल्यावर, रात्रीच्या घरच्या जेवणासाठी पंगती तयार व्हायच्या तोवर देवळात शंखनाद सुरू झालेला असायचा. सार्वजनिक गणपतीची आरती हा एक सुंदर सोहळा असायचा. तिला हजेरी लावण्याच्या घाईत कसंतरी रात्रीचं जेवण उरकलं जायचं आणि पळापळ करत माणसं देवळात हजर व्हायची. देवळातली मुख्य घंटा वाजवणारा कुणी जणू मानक ऱ्यासारखा ठरलेला असायचा. आरतीला ताल असला पाहिजे, उगीच बेंबीच्या देठापासून बेसूरपणे कुठलीही ओळ जाऊ नये यासाठी काही जाणकार माणसं गर्दीवर नजरेनंच जरब ठेवत असत.
काही मिनिटं नुसताच घंटानाद झाल्यावर गंभीर शंखनाद घुमायचा आणि तबला-ढोलकीबरोबर झांजांचा तालबद्ध किणकिणाट सुरू व्हायचा.. एकापाठोपाठ एक आरत्यांची चवड उलगडली जायची आणि सुरांच्या लगडीवर स्वार होत रात्र पवित्र होऊन जायची.. ‘येई हो विठ्ठले’.. म्हणणारा एकच कुणी गावात असायचा. ‘निढळावरी कर’.. म्हणणारा त्याचा आर्त स्वर विशिष्ट जागेवर टिपेला गेला की होणारा झांजांचा किणकिणाट, घंटानाद आणि ढोलकीचा ताल यांचा सुंदर मिलाफ आरत्यांच्या वातावरणातला सर्वात आनंददायी, शब्दांत न सापडणारा असा आगळा क्षण ठरायचा..
सगळा गाव जणू त्या क्षणात वेढून जायचा.
असं तब्बल दहा दिवस चालायचं. दुसऱ्या दिवशीपासून गणेशदर्शनासाठी घराघरांत गर्दी सुरू व्हायची आणि प्रसादाची ताटं रिकामी व्हायची. सगळ्या गावावर उत्सवाचं एक सोज्ज्वळ, उत्सवी रूप चढलेलं दिसायचं.
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, गावातल्या गणपतीसमोरच्या आराशीत झाडंपानं, फुलं, वेलींचाच मोठा भरणा असायचा. गावागावांत वीज आली आणि मुंबईहून गणपतीसाठी गावाला येणाऱ्या चाकरमान्याच्या सामानात इलेक्ट्रिकच्या माळाही दिसू लागल्या. फुलं-पानांच्या सजावटींची जागा नंतर लायटिंगनं घेतली. घरी बनणाऱ्या प्रसादाची जागा, मुंबईतून येणाऱ्या माव्याच्या मोदकांनी घेतली, आणि सकाळी लवकर घरच्या गणपतीची पूजा आटोपण्याच्या घाईत भटजीची वाट पाहायला नको म्हणून मुंबईवरनं येणारा चाकरमानी आपल्यासोबतच पूजेची कॅसेट किंवा डीव्हीडी आणू लागला. गावाबाहेरच्या रानात फुलणारी सुगंधी फुलं बाजारातल्या नकली फुलांच्या झगमगाटात लाजल्यासारखी दिसू लागली, आणि सहस्रावर्तनांच्या सुरात घुमणाऱ्या अनेक घरांत दिवसभर अथर्वशीर्षांची कॅसेट उलगडत राहिली.. उकडीच्या मोदकांचा घाट घालण्याच्या घाईत सकाळपासून लगबगलेली स्वयंपाकघरं ऑर्डरच्या मोदकांच्या भरवशावर निवांत दिसू लागली.
गावाचं जुनं रूप पालटून शहरीपणाचं पाणी गावावर चढू लागलं, तसतसा गणोशोत्सवाचा कौटुंबिक ग्रामसोहळाही संकुचित होत गेला. आता गावात गल्लीतली माणसं एकमेकांना फारसं ओळखत नाहीत. गणेशोत्सव अजूनही साजरा होतो. सनईवाल्यांच्या नव्या पिढीनं तो धंदा बंद केलाय. सार्वजनिक देवळातल्या उत्सवासाठी कीर्तनकार मिळणंही मुश्कील झालं, म्हणून कधी जादूचे प्रयोग, नकला आणि मिमिक्री करून उत्सव साजरा होतो. ‘येई हो विठ्ठले’ म्हणताना, स्वरानंदात गुंगणारा तो स्वरही आता थकला आहे. आणि तस्साच खणखणीत नवा स्वर गावाला सापडलेला नाही. देवळातली आरतीही लवकरच संपते. शंख वाजवायला कुणी पुढेच येत नाही, आणि तो शंखनादही अलीकडे कमीच घुमतो. गावात गाडय़ा, रिक्षांची वर्दळ वाढली. त्यामुळे देवळातला घंटानाद अलीकडे घराघरांपर्यंत ऐकूच येत नाही.
..मुख्य म्हणजे, जुने गणपतीचे कारखानेही आता कमी झालेत. नवे मूर्तिकार भव्य मूर्ती बनवतात. गावात सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या वाढलीये. गणेश चतुर्थीच्या आदल्या रात्रीपासूनच गणपतीच्या मिरवणुका सुरू झालेल्या असतात..
पण गणेशोत्सव साजरा होतोच. भक्तीनं, प्रेमानं आणि तितक्याच उत्साहानं!!

दिनेश गुणे
http://www.lokprabha.com/lokprabha/20120921/ganesh09.htm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश गुणे हे मायबोलीकर आहेत हे माहितेय का लेखकाला? इथे 'झुलेलाल' ह्या आयडीने लिहितात. त्यांना टाकायचं तर आपलं लेखन ते स्वतः इथे टाकू शकतील. तेव्हा कृपया उडवा इथून.