थांबला न सूर्य कधी....थांबली न धारा - २

Submitted by अनिकेत आमटे on 23 October, 2011 - 04:53

९ ऑक्टोबर २०११ रोजी या लेखाचा पहिला भाग मायबोली वर प्रकाशित केला होता.....
दुसरा भाग:
१ जुलै १९७६ रोजी सुरु केलेली लोक बिरादरी प्रकल्पाची आश्रमशाळा ही या भामरागड भागातील पहिली शाळा होती. आदिवासी बांधवांना शाळा म्हणजे काय हे सुद्धा माहिती नव्हते. त्यामुळे स्वतःच्या मुलांना शाळेत पाठविण्यास आदिवासी तयार नव्हते. अनेक प्रश्न त्यांना पडायचे. कुठे नेणार आमच्या मुलांना? कशाला नेणार? काय शिकविणार? पळवून नाही ना नेणार? नरबळी ची भीतीपण होती त्यात. शाळेच्या पहिल्या वर्षी प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी अनेक दिवस गावं-खेड्यात फिरून मोठ्या परिश्रमाने ५-६ गावातील २० मुलं शाळेकरिता जमा केलीत. बंदिस्त पणे एका चार भिंतीच्या खोलीत शाळा शिकविली असती तर कदाचित त्या काळात एकही मुलगा शाळेत बसला नसता. मुक्त पणे जंगलात फिरणाऱ्या आदिवासींना मुक्तपणेच शिक्षण द्यायचे ठरले. कधी नदीच्या काठावर. तर कधी मोठ्या वृक्षाच्या दाट सावलीत. तर कधी जंगलातील मोठ्या खडकावर शाळा सुरु झाली. अन्न-वस्त्रे आणि निवारा याचा संपूर्ण खर्च संस्था करायची. घरची किंवा पालकांची आठवण आली की ही मुल कोणालाही न सांगता घरी - गावाला पळून जायची. मग त्यांचा मागे आमच्या प्रकल्पातील कार्यकर्ते जायची. त्या काळात रस्ते नव्हते. २०-३० किलोमीटर चालत जावे लागायचे. गावात तो मुलगा नीट पोहोचला की नाही याची काळजी नेहमीच असायची. घरी जाऊन परत त्या मुलांना शाळेत आणायचे आणि समजवायचे. पहिले वर्ष हा त्रास आमच्या कार्यकर्त्यांना झाला. पहिल्या वर्षी असलेल्या २० मुलांपैकी अर्धी मुल मध्येच शाळा सोडून घरी पळून गेलीत ती कायमची. पण जी १० मुलं शाळेत राहिलीत - टीकलीत त्यांनी पुढील वर्षी आमच्या कार्यकर्त्यान बरोबर फिरून शाळेकरिता ४० मुलं गोळा केलीत. जी १० मुलं शाळेत टीकलीत त्यांचे वजन वर्षभरात चांगलेच वाढले. घरी ही मुलं अर्धपोटीच असायची. नुसतीच भाताची पेज असलेल्या जेवणामध्ये जीवनसत्वांचा अभाव असल्याने त्यांच्या बुद्धीचा विकास नीट होत नसे. रक्ताचे प्रमाण पण शरीरात कमी असायचे. प्रकल्पाच्या आश्रमशाळेत राहिल्याने या १० मुलांची तब्येत छान झाली होती. त्यांना घालायला नीट वस्त्रे आणि निवारा सुद्धा मिळाला होता. सोबतीला दवाखाना होताच. या सर्व सोई इथे त्यांना विनामोबदल्यात दिल्या गेल्या होत्या. हे सर्व या १० मुलांनी इतर गावातील मुलांना व पालकांना त्यांच्याच माडिया या बोली भाषेत समजावून सांगितले. त्यामुळे नंतर शाळेकरिता मुलं फिरून गोळा करावी लागली नाही. पहिल्या १० मुलांच्या तुकडी मधील एक विद्यार्थी पुढे शिकून नागपुरातून M.B.B.S. झाला. अजून पुढे शिकून त्याने स्त्री रोग तज्ञाची पदवी संपादन केली. शाळा सुरु केली तेंव्हा या भागातील एकही आदिवासी ४ थी शिकला नव्हता. आज आमची शाळा बालवाडी ते १२ पर्यंत आहे. आसपासच्या ५०-६० किलोमीटर परिसरातील सुमारे १०० गावातील ४०० मुलं आणि २५० मुली या शाळेत शिक्षण घेताहेत. मुला - मुलींना
राहण्याची स्वतंत्र नीट व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणासाठी स्वतंत्र मेस आहे. मुलांसाठी मोठे क्रीडा मैदान तयार केले आहे. ४०० मीटर ची धावपट्टी तयार केली आहे. खेळात ही मुलं अतिशय तरबेज आहेत. शिकविण्याकरिता प्रशिक्षक नसूनही ही मुलं सर्व धावण्याच्या स्पर्धा, भाला फेक, गोळा फेक, लांब उडी व उंच उडी या खेळात नेहमीच शाळेचे नाव राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर गाजवितात. या शाळेत शिकून ६ मुलं डॉक्टर झालीत, वकील झालीत, इंजिनिअर झालीत. अनेक मुलं शिक्षक झालीत. अनेक मुलं पोलीस खात्यात व वन खात्यात नोकरी करताहेत.

शालेय शिक्षणा बरोबर शेतीचे प्रशिक्षण, बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण, बेकरी प्रशिक्षण आणि डेअरी प्रशिक्षण आदिवासी मुलांना दिले जाते. शरीराला व मनाला शिस्त लागावी या करिता रोज पाहते भूपाळी आणि संध्याकाळी मुलांची प्रार्थना घेतली जाते. श्रमाची किंमत कळावी या करिता रोज सकाळी एक तास श्रमदान करवून घेतले जाते. शाळेचा परिसर मुलंच स्वच्छ करतात. शाळेतील निवास्थानाच्या सांडपाण्याचा वापर करून मुलांकडूनच फळबाग लागवड केली आहे. त्याची देखरेख पण मुलंच करतात. वर्षानुवर्षे शिकार करून जंगलावर उपजीविका करणारी ही आदिवासी मुलं इथे शाळे मध्ये झाडे जगविण्याची कामे करतात. आमच्या प्रकल्पातील वन्यप्राणी अनाथालयातील प्राण्यांना खाऊ घालतात. त्यामुळे जंगलाबद्दल आणि प्राण्यांबद्दल त्यांना आपोआपच प्रेम निर्माण होत. पुढे जाऊन ही मुलं शिकारी कडे व जंगल तोडी कडे वळत नाहीत. दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी ही मुलं वृक्ष दिंडी काढतात. गावागावातील लोकांना झाडाचे - जंगलाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात. त्याच दिवशी वृक्षारोपण पण करतात. आणि लावलेल्या वृक्षाचे संवर्धन पण करतात.

परिस्थिती प्रमाणे काम करायचे ठरविले होते. आदिवासींच्या कलेनेच काम करायचे. त्यांच्यावर कुठलेही निर्बंध घालून कुठलेच काम नीट झाले नसते. कारण त्यांनी शिकावे ही पण गरज आमचीच होती आणि अजूनही आहे.

अनिकेत आमटे
संचालक
लोक बिरादरी आश्रमशाळा,
मु. हेमलकसा,
पोस्ट-तालुका. भामरागड,
जिल्हा. गडचिरोली- ४४२ ७१०.
मो. ९४२३२०८८०२
ईमेल - aniketamte@gmail.com
वेबसाईट - www.lbphemalkasa.org.in & www.lokbiradariprakalp.org

गुलमोहर: