अमेरिका : जगाचे अघोषित राजे?

Submitted by dr.sunil_ahirrao on 29 June, 2011 - 02:46

अमेरिका : जगाचे अघोषित राजे ?
by डॉ.सुनील अहिरराव on Friday, May 6, 2011 at 10:39am

पाकिस्तानच्या भूमीवर अमेरिकन कमांडोस् नी ओसामा बिन लादेनला गोळ्या घातल्या,हे तसे चांगलेच झाले. विचार करा एका देशात एका परक्या देशाचं सैन्य वर्षानुवर्ष वास्तव्य करून राहतं आणि लपलेल्या दहशतवाद्याला स्वत:च शोधून ठार मारतं, आणि पाकिस्तानला समजतही नाही की नेमकं काय होत आहे म्हणून! अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स विशेषतः अमेरिका हे देश आजपर्यंत इतर देशांच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ का करतात? एखाद्या स्वतंत्र सार्वभौम देशातल्या अंतर्गत कलहाला अमेरिका खतपाणी घालते. बंडखोरांना पैसा आणि शस्त्रे पुरवते आणि तिथे तथाकथीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या देशावर आपल्या मित्र राष्ट्रांच्या मदतीने तेथिल तथाकथित हुकुमशाही मोडून काढते. यासाठी दहशतवादाचा बिमोड, लोकशाही स्थापना, मानवी हक्क वगैरे मुद्द्यांचा आश्रय घेतला जातो. गरीब वा विकसनशील देशांत अमेरिकेचा हाच फोर्मूला आहे.दहशतवाद संपला पाहिजे वगैरे ठीक आहे. पण त्या त्या गरीब देशांत तेथिल सैन्य आणि हुकुमशहांना संपवल्यानंतर तेथिल जनतेचे पुनर्वसन अमेरिका कितपत करते?

एखाद्या राष्ट्राला आर्थिक आणि लष्करी मदत करून त्याला लाचार बनवून तेथे स्वतःचे सैन्य ठेवून,लष्करी तळ उभारून आसपासच्या मोठ्या देशांवर नजर ठेवण्यासाठी हा अमेरिकेचा फंडा आहे. आता हेच सुरु आहे.पाकिस्तानच्या माध्यमातून आशियाई देश विशेषतःभारत,चीन या होऊ पहाणाऱ्या महासत्तांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.भारताशी अणुकरार हा चीनला शह देण्याच्या नीतीचा एक भाग आहे. आणि पाकिस्तानला लष्करी व आर्थिक मदत पुरवून अमेरिका भारताच्या प्रगतीला रोखू इच्छिते,हे अनेकदा दिसून आलेले आहे. अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप खूप जुना आहे. त्यातून अमेरिकेला काय मिळाले याचे विश्लेषण केल्यास काही प्रश्न समोर येतात ते असे-

१) अमेरिकेला स्वत:च्या सुरक्षेविषयी भिती वाटते का?

२) अनेक छोट्या राष्ट्रांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून तेथिल सत्ताधाऱ्यांना ठार करूनआणि तेथिल जनतेला वाऱ्यावर सोडून अमेरिकेने काय साधले? ह्या हस्तक्षेपाला आंतरराष्ट्रीय कायदेशीर आणि नैतिक आधार आहे का?

३) या सर्व प्रकारांतून अमेरिकेला फायदा झाला की नुकसान?

४) की अशा राष्ट्रांतील नैसर्गीक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे?

५) स्वत:चे वर्चस्व जगावर राखण्यासाठी अमेरिका हे करीत आहे का?अमेरिका जगाचे "अघोषित राजे" बनू इच्छित आहे का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> अमेरिका,ब्रिटन,फ्रान्स विशेषतः अमेरिका हे देश आजपर्यंत इतर देशांच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ का करतात?

मग दुसरं काय करायचं? त्या देशात जाऊन अतिरेक्यांना मारायचं नाही तर आपल्या देशावर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना सरंक्षण देणार्‍या देशाबरोबर काय शांततेची बोलणी करायची? person-to-person contact वाढवायचा? confidence building measures वाढवायची? बस्-रेल्वे इ. सुरू करून अतिरेक्यांना देशात येण्याकरता वाट मोकळी करून द्यायची? व्हिसाचे नियम शिथिल करून आपल्या देशाची धर्मशाळा करून द्यायची? त्या देशाला गारगार वाटावं म्हणून आपल्याच देशातल्या नागरिकांना खोट्या अतिरेकी हल्ल्याच्या कारवाईत गुंतवून तुरूंगात टाकायचं?

२००१ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही अतिरेकी हल्ला झालेला नाही. हे त्यांच्या जागरूकतेचेच फळ आहे.

>>> पाकिस्तानच्या माध्यमातून आशियाई देश विशेषतःभारत,चीन या होऊ पहाणाऱ्या महासत्तांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.भारताशी अणुकरार हा चीनला शह देण्याच्या नीतीचा एक भाग आहे. आणि पाकिस्तानला लष्करी व आर्थिक मदत पुरवून अमेरिका भारताच्या प्रगतीला रोखू इच्छिते,हे अनेकदा दिसून आलेले आहे.

यात चूक काय आहे? भविष्यात दुसरा एखादा देश आपल्याला आव्हान देऊ शकणार असेल तर त्याला आधीच नेस्तनाबूत नको करायला?

>>> १) अमेरिकेला स्वत:च्या सुरक्षेविषयी भिती वाटते का?

भीति नसावी, पण अमेरिका आपल्या देशाच्या व आपल्या नागरिकांच्या सुरक्षेविषयी खूपच जागरूक आहे.

>>> २) अनेक छोट्या राष्ट्रांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून तेथिल सत्ताधाऱ्यांना ठार करूनआणि तेथिल जनतेला वाऱ्यावर सोडून अमेरिकेने काय साधले? ह्या हस्तक्षेपाला आंतरराष्ट्रीय कायदेशीर आणि नैतिक आधार आहे का?

कायदेशीर आधाराला विचारतंय कोण? नेहरूंनी काश्मिर प्रश्न यूनोत नेऊन त्या प्रश्नात कायमची पाचर मारून ठेवली ना? अमेरिका, इस्राईल इ. देश कायदेशीर वा नैतिक बाजूंचा विचार करत बसले असते तर त्यांचा भारत झाला असता.

३) या सर्व प्रकारांतून अमेरिकेला फायदा झाला की नुकसान?

>>> अर्थातच फायदा. अमेरिका सर्व कृती स्वतःच्या फायद्याकरताच करते.

४) की अशा राष्ट्रांतील नैसर्गीक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे?

>>> हे पण कारण आहेच.

५) स्वत:चे वर्चस्व जगावर राखण्यासाठी अमेरिका हे करीत आहे का?अमेरिका जगाचे "अघोषित राजे" बनू इच्छित आहे का?

>>> अमेरिका जगाचा अनभिषिक्त राजा आहेच आणि हे राजेपद त्यांनी टिकवलेले आहे.

आपण सुरक्षित रहायचे असेल तर शेजार्‍यांना कमजोर करा हे चाणक्याचे तत्व अमेरिका पाळत आहे.

बळी तो कान पिळी

जगाच्या सुरुवातीपासून आजतागायत हेच एक सत्य आहे. आंतराष्ट्रीय कायदे, नैतिकता वगैरे गोष्टी जे बळी नाहीत ते बोलत असतात! "आम्ही अतिक्रमण सहन करणार नाही, तीव्र निषेध करतो" या गोष्टी बोलून काही होत नाही! कृति काय तीच जगाला समजते.

अमेरिका सर्व कृती स्वतःच्या फायद्याकरताच करते.

'स्वतःच्या' हा शब्द महत्वाचा. फायदाहि सबंध अमेरिकेचा नाही, फक्त काही मोजक्या लोकांचा, जे कंपन्यांचे सी इ ओ आहेत, किंवा राजकारणी आहेत, अश्यांचा.

बाकीच्या अमेरिकेची आर्थिक परिस्थिती पार बोंबलली आहे! लोकांना पैसे नाहीत म्हणून घरेदारे सोडून रस्त्यावर यावे लागले, आश्रितासारखे इतरांच्या घरी रहावे लागले. कित्येक मुले उपाशी रहातात.

आउटसोर्सिंग का? पैसे वाचतात. ते सगळे सी इ ओ खाउन जातात. खर्च वाचला म्हणून वस्तूंच्या किंमती कमी होत नाहीत, की सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही, उलट त्यांच्या नोकर्‍या जातात.

आणि असे करून इतर देशांना थोडेसे तरी पैसे का द्यायचे? त्या देशांतील काही लोकांना इकडे बोलावून का ठेवायचे? म्हणजे त्यांना अमेरिकेचा झगमगाट दिसतो, त्यांच्या देशातल्या इतर लोकांपेक्षा पैसे जास्त मिळतात. मग ते परत त्यांच्या देशात गेले की मॅकडोनाल्ड, केंटकी फ्राईड चिकन खातात,
(अगदी ज्या देशातली तंदूरी चिकन जगभर प्रसिद्ध आहे, त्या देशातले लोकहि), कोका कोला पितात. की अमेरिकन सी इ ओं ना पैसे.

अनेक छोट्या राष्ट्रांच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करून तेथिल सत्ताधाऱ्यांना ठार करूनआणि तेथिल जनतेला वाऱ्यावर सोडून अमेरिकेने काय साधले?
अमेरिकेत रोजच्या उपयोगाच्या कुठल्याहि गोष्टींचे उत्पादन होत नाही. कपडे, भांडी, टीव्ही, मोबाईल फोन, काँप्युटर, गाड्या, जे काय म्हणाल ते बाहेरून. उत्पादन कसले, तर फक्त शस्त्रांत्राचे. मग ती विकायची तर जगात अशांतता नको का? 'भारताविरुद्ध वापरू नका हां' असे डोळे मिचकावून सांगायचे नि पाकीस्तानला शस्त्रास्त्रे द्यायची! आणि त्यांनी ती वापरली की फक्त भारतातल्या लोकांसमोर पुटपुटायचे की आम्ही पाकिस्तानचा तीव्र निषेध करतो, पण त्यांना आर्थिक मदत हवी आहे म्हणून पैसे देतो!

कुणि अमेरिकेचातीव्र निषेधच काय, अमेरिकेचा नाश करा असे जरी लोक म्हणत असले तरी, शांतपणे त्यांचे त्यांच्या शेजारच्या देशाशी भांडण लावून द्यायचे नि मग दोघांनाही शस्त्रास्त्रे, जुनी विमाने इ. गोष्टी भरपूर पैसे घेऊन द्यायची!

तुम्ही भारतीय राजकारण्यांना कितीहि शिव्या दिल्यात, भारतीय लोकांवर टीका केलीत तरी ते सर्व अमेरिकेच्या कृष्णकृत्यांपुढे काहीच नाही. उगीच आपली थोडीशी गंमत करतात ते.

तुम्ही अमेरिका 'अनभिषिक्त' राजे म्हंटले तरी अमेरिकन स्वतःला खरेखुरे राजे समजतात - "देवाने दिधले असे जग तये आम्हास खेळाव॑या!"

अमेरिका जगाचे "अघोषित राजे" बनू इच्छित आहे का?>>>>>
म्हणजे काय? अमेरिका आहेच जगाचा अघोषित राजा. मास्तुरेला अनुमोदन..
अमेरिकन्स सगळ्या कृती स्वार्थासाठी करतात.. मग काय चुकले त्यात? तुम्ही पण करा की.. तुम्हाला कोणी जगाचा कैवार घ्यायला सांगितलाय??
कोणी कितीही बोटे मोडली तरी देअर इज ओन्ली वन.. गॉड ब्लेस अमेरिका!

तुम्ही भारतीय राजकारण्यांना कितीहि शिव्या दिल्यात, भारतीय लोकांवर टीका केलीत तरी ते सर्व अमेरिकेच्या कृष्णकृत्यांपुढे काहीच नाही. उगीच आपली थोडीशी गंमत करतात ते. >>> हे बाकि लय भारी लिहलय .... Happy

तुम्ही पण करा की.. तुम्हाला कोणी जगाचा कैवार घ्यायला सांगितलाय??>>> तुम्ही हे लेखकाला उद्देशुन लिहलय का आख्या देशाला?

गंमत अशी की भारतातल्या लोकांना अमेरिकेला शिव्या दिल्या की सर्व कार्यभाग संपला असे वाटते. कारण आपण "निषेध" करण्यात फार माहिर आहोत. बॉम्ब फोडला, कर निषेध, काश्मीर गिळला, कर निषेध असं अहिंसक आपलं कार्य. त्यामुळे जगभर गांधी आणि अहिंसा ह्या सगळ्यांच्या घोषा लावल्यावर पाक नेमका काय करतो, चिनच्या काय हालचाली, बांग्लादेशवाले कसे घुसत आहेत ह्या सगळ्या दुय्यम बाबी!

अर्थात अमेरिकेचे सर्वच आम्हास मान्य नाही, सगळी युद्धे, बनवाबनवी इत्यादी इत्यादी पण अमेरिकेत २००१ नंतर एकही हल्ला नाही व त्यामुळे कोणाचे प्राण गेले नाही हे महत्त्वाचे ठरते. अमेरिका इतरांचे प्राण घेते आहे. उद्या भारत वरचढ ठरला तर भारताचेही घेईलच, म्हणून शिकावे अन आपणही बळजोर व्हावे. अहिंसा वगैरे देश चालवायला कामी येत नाही. तलवारीचे बळ ज्याजवळ असेल तोच अहिंसा राबवू शकतो. उदा अशोक!

निषेधच करायचा तर असा करा, भारतीयांनो अमेरिका पोलीस बनू पाहत आहे, धिक्कार तुमचा, तुम्ही का नाही?

भारतीयांनो अमेरिका पोलीस बनू पाहत आहे, धिक्कार तुमचा, तुम्ही का नाही?

त्यात भारतीयांचा धिक्कार कशाला? त्यांनी काय केले? ते काही अमेरिकेची बरोबरी करू शकणार आहेत का? माझे मत अजून शंभर वर्षे नाही.

त्यांना जमेल तेव्हढे,म्हणजे श्रीलंकेत हस्तक्षेप, बांगलादेश विमुक्ति, हे केलेच. जगभर हिंडून पैसे गोळा केले. बाकी धंदे करायला आधी लष्कर सशक्त पाहिजे, त्याला पैसे लागतात. दुसर्‍याला लुटून आणणे जमायचे नाही, म्हणून परदेशात जाऊन काबाडकष्ट करून पैसे मिळवताहेत

पाकीस्तानविरुद्द हल्ला केला तर मते जातात! पाकीस्तानविरोधी करायला गेले तर मते जातात! आपल्याकडे लोकशाही आहे, मते मिळून जे निवडून येतात तेच राज्य करतात, नि सगळा पैसा खातात. पाकीतान, चीनसारखे नाही! तेंव्हा मते महत्वाची. बाकी काही नाही. बाकी अमेरिकेची बरोबरी म्हणजे, स्वार्थीपणा जमायला लागला आहे पुढार्‍यांना. भारतीय पुढारी अमेरिकेच्या पुढार्‍यांपेक्षा जास्त श्रीमंत झाले आहेत. बाकीचे लोक नसेनात का? असतीलहि, आजकाल. अमेरिकेत तर नक्कीच अनेक लोक दरिद्री झाले आहेत.

जसे इस्राईल विरुद्ध बोलले, नव्हे, येता जाता इस्राईलचे गोडवे गायले नाहीत, तर अमेरिकेत मते मिळतील का? ग्लेन बेकचा शो बंद पडला, फॉक्सवर असून! तसेच असते सगळीकडे.

शिवाय पाकीस्तानवर हल्ला करून उपयोग काय? जगातले एकहि राष्ट्र आपली बाजू घेणार नाही!!
सगळे जण शिव्या देतील नि भारतीयांना फक्त प्रचंड राग येईल, शर्टच काय, धोतर पण बदलतील, एव्हढा. पण भारताबाहेर जाऊन निषेध व्यक्त करायची हिंमत नाही!

तिथले धर्मवेडे लोक भारतात आणून फुकटचा डोक्याला त्रास?! तिथे ना पैसे ना उद्योगधंदे, तिथली माणसे आपल्याला कशासाठी आपले नागरिक करून हवे आहेत? त्यांच्यात काय आहे? त्यांची संस्कृति? बायकांना बुरख्यात ठेवणे नि शिकू न देणे? असले हवे आहे का आपल्याला? त्यांची भाषा, संगीत सगळे काही भारतातच जास्त चांगले होते. भारतीयांना त्याची जाण आहे तशी त्या लोकांना सुद्धा नाही. हुसेनसारखा एखादा हिंदू तिथे असला तर त्याच्या चित्रकलेची स्तुति करतील का? सलमान रश्दी जगप्रसिद्ध लेखक, दिला का त्याला आश्रय पाकीस्तानने?

पाकीस्तान म्हणजे देश नव्हे, तिथले ते अत्यंत गरीब, कुचकामी लोक म्हणजे पाकीस्तान. त्यांची थोडी थेरे सहन केली, शर्ट बदलून धिक्कार केला की भारतीय जनता खूष, मतेच मते (पैसाच पैसा)!!

हा खरतर नवीन प्रकारचा साम्राज्यवाद आहे. गेले ते दिवस जेव्हा दुसर्‍या देशावर हल्ला करून त्यावर प्रत्यक्ष कब्जा करणे म्हणजे स्वतःचे राज्य वाढवणे असे राज्यकर्ते समजत असत. इंग्रजांच्या उदाहरणावरून जगानी घेतलेला पहिला धडा म्हणजे दूर बसून लांबच्या प्रदेशावर सत्ता गाजवता येत नाही. २० व्या शतकात, विशेषतः महायुद्धानंतर अमेरिकेसारख्या महासत्तांना हे कळाले कि परक्या प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांशी युद्ध करून सत्ता प्रस्थापित करणे म्हणजे विकतचे दुखणे आहे. त्यापेक्षा कर्ज वाटून दुसर्‍याची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे, त्याच्या नैसर्गिक साधनसंपतीचा फायदा घेणे आणि त्यासाठी आपण आपल्या देशात बसून मदतीच्या नावाखाली दुसर्‍याच्या देशात अराजक माजवणे हे जास्त फायद्याचे आहे. ह्या नवीन पद्धतीने एखादे राष्ट्र सहज मांडलिक करता येते (अफगाणिस्तान हे उत्तम उदाहरण). ह्याच सूत्रानूसार अमेरिका गेली ५० वर्षे जगात राजासारखी मिरवत आहे. अमेरिकेच्या अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण, इराक इ. देशात्ल्या हस्तक्षेपाचा हा प्रमूख उद्देश.

आणि मग त्यातही सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे खनिज तेल. २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिका स्वतःची तेलाची मागणी स्वतःच्या तेलसाठ्यातून पूरवू शकत होती. पण भविष्यात तेल हा सगळ्यात बहूमूल्य खनिज स्त्रोत होणार आहे हे जाणून त्यांनी स्वतःचे तेलाचे उत्पादन निम्म्याहून कमी केलं आणि आखाती देशांच्या तेलावर घाला घातला. अमेरिकेच्या नशीबानी, आखातातले अरब अत्यंत बिनडोक होते आणि त्यांनी कचर्‍याच्या किंमतीला तेल विकायला काढले होते. त्यात भर म्हणून शीतयुद्ध चालू होते. त्यात मास्तुरे म्हणले तसे अमेरिकेला स्वतः बलवान रहाण्यासाठी रशियाला खाली आणणे गरजेचे होते. म्हणून मग त्यांनी अरबांना शस्त्रे दिली. अर्थात ह्या सगळ्यामागे स्वतःची तुंबडी भरणे हा अमेरिकेचा सगळ्यात मोठा हेतू असल्यामुळे नंतर जेव्हा अरबांना जाग आली आणि ते स्वतःच्या हक्कासाठी भांडू लागले तेव्हा अमेरिकेची गोची झाली आणि ओसामासारखे भस्मासूर उभे राहिले जे नंतर अमेरिकेवरच उलटले.

सद्धया अमेरिकेनी जो जागतिक पोलिसाचा मुखवटा घातला आहे त्याचा हा इतिहास आणि कारणे. तो मुखवटा ओसामासारख्या उलटलेल्या अतिरेक्यांना आवरणे (स्वसंरक्षण) आणि त्याच वेळी जगातल्या प्रमूख साधनसंपत्तीवर आपला हक्क प्रस्थपित करणे ह्या motive मधून आला आहे.

ह्याला कायदेशीर / नैतिक आधार काहीही नाही. बळी तो कान पिळी हाच एक मंत्र आहे. सद्दाम आणि ओसामा ह्या दोन्ही उदाहरणातून त्यांनी ते दाखवून दिलयं. ह्यात अमेरिकेचं नुकसान होत असतं पण ते directly नाही कारण त्यांच्या भूमीवर प्रत्यक्ष काही होत नसतं. त्यांच्या अर्थव्यवस्थेची सद्ध्या जी काही वाट लागली आहे त्याच्या अनेक कारणांपैकी त्यांचा हा साम्राज्यवाद हे एक छोटे कारण आहे. बाकी अनेक इतर कारणं आहेत ज्यांमुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला हे दिवस आले आहेत.

"भारत,...... या होऊ पहाणाऱ्या महासत्तांच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.".......भारत आणी महासत्तां होणार हे वाक्य comedy आहे......पुढची १०० वर्षे तरी हे शक्य नही. तुम्ही अमेरीकेचा गेल्या ५०० वषाचा इतीहास बघा तुमचे अमेरीकेबद्दलचे बरेचसे गैरसमज दूर होतील.

अन्यना, अमेरिकेत ५०० वर्षापूर्वी काय होते? मुळ रहिवासी. त्यांचे काय? ते तर आलेल्या पिलग्रीम्सने मारले. तो इतिहास बघून काय शिकता येईल?
शिकन्यासारखी एक मोठी चळवळ झाली, त्या पासून बोध घ्यावा. सिव्हिल राईटस मुव्हमेंट! किती लवकर एखादा देश बदलतो. नाहीतर आपण त्याच त्या भ्रष्टाचार, गरिबी, आरक्षण, इन्फ्रा, काश्मीर आणि अतिरेकी ह्या व केवळ अश्याच चर्चा गेले ६०-६२ वर्षे करत आहोत. पण चर्चेतून निष्पन्न काहीच नाही कारण आपण निषेध व्यक्त करतो. कारवाई काहीच नाही! मग तो भ्रष्टाचार (पोलीसांना २० रू देऊन सुटन्यापासून ते चारा) संपणार तरी कसा आणि भारत पुढे जाणार तरी कसा?

ते काही अमेरिकेची बरोबरी करू शकणार आहेत का? माझे मत अजून शंभर वर्षे नाही. >> बरोबरी करायची कशाला? एखाद्या कडे महाल असला म्हणून झोपडी वाईट ठरते का? फक्त झोपडी स्वच्छ ठेवता यावी आणि ती कोणी बळकावू नये एवढे पाहिले की झाले. तेवढे पाहावे एवढेच आपले म्हणने आहे.

बरोबरी करायची कशाला?
माफ करा, मला वातले तुम्ही भारताने अमेरिकेसारखे जगाचे पोलीस व्हावे असे म्हणता आहात. म्हणून म्हंटले बरोबरी करता येणार नाही इतक्यात. बाकी फक्त झोपडी स्वच्छ ठेवता यावी आणि ती कोणी बळकावू नये एवढे पाहिले की झाले. हे मान्य.
नाहीतर आपण त्याच त्या भ्रष्टाचार, गरिबी, आरक्षण, इन्फ्रा, काश्मीर आणि अतिरेकी ह्या व केवळ अश्याच चर्चा गेले ६०-६२ वर्षे करत आहोत. पण चर्चेतून निष्पन्न काहीच नाही कारण आपण निषेध व्यक्त करतो. कारवाई काहीच नाही!
अरेरे! खरंच?
बाकी खरे वाटेल असेच आहे. दुसरे काही भारताबद्दल ऐकूच येत नाही - जसे काश्मीर प्रश्न सुटला! गरीबी कमी झाली. आरक्षणाची गरज संपली! असे काही कधी ऐकू आले नाही.

नाही म्हणायला क्रिकेटमधे मात्र पहिला नंबर, आणि अनेक लोक भारत सोडून परदेशात नोकरीला, परकीय कंपन्यांचे काम करायला, कारण भारतात भारतासाठी कुणीच काही काम करत नाही. जसे संशोधन, नवे तंत्रज्ञान वगैरे कधी भारतातून आल्याचे ऐकले नाही.

इथे मात्र एकाहून एक नवीन काही ना काही निघत असते, यशस्वी होते, लोक श्रीमंत होतात. कल्पना इथल्या, पैसे इथले, मालक इथले, पॉलिसी, ऑर्गनायझेशन, डिझाईन सगळे इथले. सगळे निर्णय इथले. मजूरीला आपले स्वस्त म्हणून भारतीय, चिनी, मेक्सिकन वगैरे.

भारत आणी महासत्तां होणार हे वाक्य comedy आहे......पुढची १०० वर्षे तरी हे शक्य नही.>>> कसला जबरदस्त कॉन्फिड्न्स ......

चौकट राजा | 29 June, 2011 - 11:10 >>>>> छान पोस्ट

क्रुड ऑइल ची किंमत जर १०$/बॅरल वाढली तर
जगातील ५% जनता दारिद्र्यरेशेखाली येते.
१ मिलियन जास्त मुले उपाशी झोपतात.
जागतीक महागाइ ४% ने वाढते.
लिस्ट खुप मोठी आहे.
असे हे साठे दुर्दैवाने नुसतेच भ्रष्टाचारी नाही तर माथेफिरु लोकान्च्या हातात आहेत.
त्यांच्यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेउन त्यांचा फायदा करुन देताना, बेजबाबदार लोकांच्या हातात
शस्त्र, साधन, सम्पत्ती जाउ न देणे हे अमेरिकेचे जगाला सर्वात मोठे योगदान आहे.

@झक्की,चौकट राजा ,मास्तुरे,मैत्रेयी,mansmi18,केदार,निवांत,अनार्या,नीलिमा,आपल्या प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार.
कुठेतरी सर्वच देशांनी अमेरिकेला सर्वोच्च स्थान देऊन ठेवलंय,ज्याची खरेच काही आवश्यकता नाही.जी स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे आहेत,त्यांनी अमेरिकेचा दबदबा का म्हणून बाळगावा? अमेरिकेने काहीही केलं तर ते खपवून घेतलं जातं कारण अनेक राष्ट्रांच्या नाड्या अमेरिकेच्या हातात आहेत.पाकिस्तानने तर जणू अमेरिकेचं मांडलिकत्व पत्करलं आहे. भारताने अणुस्फोट घडवला तर अनेक प्रकारची आंतरराष्ट्रीय बंधने लादली जातात.
पाकिस्तान हे काही भारतापेक्षा बलाढ्य राष्ट्र नाही. आपण अमेरिकेसारखी कृती करू शकलो असतो;पण केली नाही.कारण आपले अंतर्गत राजकारण! अगदी सीमेवर दोन्ही बाजूंनी सैन्य जमा झालं तरी आपण एकमेकांच्या मागे सरण्याची वाट का पाहतो? किंवा समोरच्याने हल्ला करण्याची वाट पाहतो.आपले राजकीय नेतृत्व दुर्बल आहे का?की आपण अमेरिकेच्या परवानगीची वाट पहात होतो? इथे इंदिराजी असत्या तर परिस्थिती वेगळी राहिली असती का? अनेक सबळ कारणे असताना आपण युध्द टाळले अर्थात त्यामुळे मनुष्यहानी टळली,हे खरेच आहे. पण भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार आहेच,आणि आपणाला त्याचा सामना करावा लागणारच.
भारताला भविष्यातील सर्व समस्यांचे उत्तर हवे असेल,भारताने प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.नैसर्गीक उर्जा स्त्रोतांची कमतरता सौर उर्जा,अणुउर्जा इत्यादींनी भरून काढली पाहिजे. उदा.पेट्रोल इत्यादींना पर्यायी इंधने/ पर्यायी उर्जेची साधने शोधली पाहिजेत.ब्याटर्यांवर चालणारी वाहने आणली पाहिजेत.थोडक्यात म्हणजे उद्या भारताचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला तरी भारताचे कशामुळेही काही अडायला नको.सरकारचे आसन अनेक कारणांनी डळमळीत असेल,आणि सरकार फक्त खाण्यातच मग्न असेल,तर ते कोणताही निर्णय घेण्यास अपात्र असते.त्यासाठी मुळात सरकार आणि नेतृत्व चांगले हवे.हे आपण करू शकलो तर कुणालाही घाबरण्याचे कारण उरणार नाही.

कुठेतरी सर्वच देशांनी अमेरिकेला सर्वोच्च स्थान देऊन ठेवलंय,ज्याची खरेच काही आवश्यकता नाही.जी स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रे आहेत,त्यांनी अमेरिकेचा दबदबा का म्हणून बाळगावा? अमेरिकेने काहीही केलं तर ते खपवून घेतलं जातं कारण अनेक राष्ट्रांच्या नाड्या अमेरिकेच्या हातात आहेत.

जग पैशावर चालते. अमेरिके कडे नुसती शस्त्रात्रे, लष्करच नाही, तर आर्थिक बाबतीत सुद्धा त्यांचा वरचष्मा आहे.
आँ??!! अहो १४ ट्रिलियन डॉ. चे कर्ज आहे त्यांच्या डोक्यावर! जगातल्या शंभराहून अधिक देशात त्यांचा कर्जबाजारी असण्यात १२ वा नंबर!! तरी त्यांचा आर्थिक बाबतीत वरचष्मा? तो कसा काय बुवा?

तसा हा विषय खरे तर अर्थशास्त्रज्ञांचा, पण तरी अमेरिकेत कुणीहि कुठल्याहि विषयावर बोलतात, कारण टीव्ही वर पाहिले, इंटरनेटवर पाहिले, म्हणून विश्वास ठेवणारे लोक आहेत इथे. अमेरिकन पंडितांचे म्हणणे ऐका:
सध्या १४ ट्रिलियनपैकी चीन,जपान, तेल निर्यात करणारी राष्ट्रे इ. महत्वाचे पहिले दहा 'सावकार' मिळून ३ ट्रिलियन डॉ. होतात, (एक दोन तीनशे बिलियन डॉ. इकडे तिकडे!! भारतात कसे म्हणतात एक दोन हजार कोटी इकडे तिकडे, काय फरक पडतो).

तर या ३ ट्रिलियन डॉ. चा खरा प्रश्न आहे, कारण देशांतर्गत कर्जे कशीतरी सांभाळता येतात, परिस्थिती सुधारेल अशी आशा असते, त्या जोरावर लोक गप्प बसतात. आता हे अमेरिकेतलेच लोक नाही सगळ्या जगातले लोक म्हणतात की अमेरिकेची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

कशावरून? कारण इकडे चीनचे दरडोई वार्षिक उत्पन्न ८ हजार डॉ, नि अमेरिकेचे ४७ हजार, तरी चीन आपले पैसे अमेरिकेकडे ठेवायला देतो (म्हणजे अमेरिकेत ट्रेझरी वगैरे काय म्हणतात ते विकत घेतात. ) तसेच इतरहि सगळे देश. का? कारण सध्या अमेरिका नाही तर दुसरीकडे कुठे गुंतवणार? ग्रीसमधे? यूरोपमधे, जिथे एकामागून एक राष्ट्रे (आयर्लंड, पोर्तुगाल इ.) दिवाळे काढताहेत तिथे? का अफ्रिकेत? की दक्षिण अमेरिकेत (गुंतवता येतील, पण परत मिळावे अशी अपेक्षा असेल तर जरा कठीण.) का भारतात? शक्य आहे, पण भारताला आता चीनच्या पैशाची गरज आहे का? इतर कुठून मिळतील की. शिवाय भारतीयांना खरोखरच चिनी मालक चालतील का?

मग अमेरिकेत नाही गुंतवले तर स्वतःच्याच देशात गुंतवावे. आपल्या जनतेचे कल्याण करावे, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, आपल्या चलनाची किंमत वाढवावी.

नाही, नाही. तसे केले तर मग अमेरिकेचा धंदा कसा मिळेल? अमेरिकेतच सगळे करणे परवडेल. अहो, अमेरिकेतल्या लोकांना प्रोग्रॅमिंग येत नाही, मॅन्युफॅक्चरिंग येत नाही म्हणून दुसर्‍याकडून करून घेतात असे नाही हो, इतर ठिकाणी जाम स्वस्त मिळते म्हणून. उद्या तुमचे चलन महाग झाले तर तुम्ही महाग व्हाल नि अमेरिका स्वस्त, मग गेलात तेल लावत! मग ३ ट्रिलियनच्या कर्जाचे तीन ट्रिलियन नफ्यात रुपांतर व्हायला कितीसा वेळ?

उदा. असे म्हणतात की आज १ डॉ. = ४५ रु. का कायसासा भाव आहे तो कृत्रिम आहे. अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे, गणिताप्रमाणे फार तर १ डॉ. = १४ किंवा १५ रु. असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तिप्पट महाग होणार!! मग कोण विचारतो तुम्हाला? इथेच स्वस्त पडेल!

तर अशी काही काही कारणे इथे सांगतात. कुणा अर्थशास्त्रज्ञाला विचारा, ते सांगतील खरे खोटे.

@झक्कीजी,
अमेरीकन अर्थव्यवस्था आणि अमेरिकन लोकांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकल्याबद्दल धन्यवाद.विचार करायला लावणारी प्रतिक्रिया!

तर मग हे पैसे घेऊन अमेरिकन लोक काय करतात? चैन, उधळपट्टी, बेसुमार, बेजबाबदार भोगवृत्ती ला बळी पडतात.

खूप खायचे, खूप प्यायचे, दररोज नवी फॅशन, नवे कपडे. नवीन मेक अप. नवीन नवीन औषधे, नवीन नवीन गॅजेट्स - नवीन काँप्युटर चिप, नवीन किंडल, ब्लॅकबेरी, ब्लूटूथ, आय फोन, आय पॅड, आय दगड नि आय धोंडे! कस्टमर सपोर्ट, सिस्को यंत्रे, आयसो४२०, सीएमेम ५, टीसीपी आय पी, नवीन सॉफ्टवेअर, क्लाउड काँप्युटिंग, बिंग, क्रोम. भल्ल्या मोठ्ठ्या भरपूर हॉर्सपॉवरच्या गाड्या. ते सगळे करायचे जपान, चीन, भारत नि इतर देशांनी. त्यासाठी त्यांना, ते खूष होतील इतके पैसे द्यायचे. त्या गाड्या चालवायला पेट्रोल लागते, ते घ्यायचे तेल निर्यात करणार्‍या देशातून.

आयला , एव्हढे पैसे आणतात कुठनं?
अहो यडे का खुळे तुम्ही? ते तीन ट्रिलियन डॉ. तुम्हीच दिले ना आम्हाला? मग त्यातलेच थोडे तुम्हाला देतो. मरे मरे तो काम करा, चैन करू नका, गरीबीत रहा, नि पैसे मिळतील ते आम्हाला द्या, म्हणजे आम्ही तुम्हाला धंदा देऊ! नि मग तुमीबी खूष नि आमीबी. तुम्ही आमची केंटकी फ्राईड चिकन खा, कोका कोला, पेप्सि प्या, हार्ली मोटर सायकल बनवा, विमाने, शस्त्रात्रे, मायक्रोसॉफ्ट, वगैरे भरपूर पैसे देऊन विकत घ्या, म्हणजे झाली फिट्टंफाट!
मायबोलीवर म्हणतात तसे हाक्कानाक्का!!

अहो हे किती अप्रामाणिक, अनैतिक नि अन्यायकारक!

बरं मग?
अहो ही वस्तुस्थिती आहे. एव्हढी खा, खा, भोग, चैन कराल का तुम्ही? पैसे असे उधळणं जमेल का तुम्हाला? म्हणून आम्ही जागतिकीकरण करून तुमच्यावर उपकार करतो. म्हणून जगाचे राजे आम्ही, नि आम्ही करतो ते सगळे बरोबरच!!

अरे हो, लक्षात ठेवा - काय चाललय् ते कळायच्या आत आम्ही तुमच्या डोक्यावर २५ हायड्रोजन बाँब टाकू. तुमच्यात आहे का तेव्हढे सामर्थ्य?

म्हणून आम्ही राजे हो!!

खरे काय, खोटे काय, अमेरिका काय, भारत काय, पैसे, नैतिकता, न्याय हे सगळे काय घेऊन बसलात हो? 'अहो जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे....', 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' असे भारतीयांनी जगाला पूर्वीच सांगितले आहे, ते पटावे म्हणून आम्ही असे करतो.

तुमचे सर्वांचे सखोल विश्लेषण पाहुन सर्वांची UNO वर अध्यक्ष म्हणुन नेमणुक करण्यात येत आहे
--- बराक ओबामा ७/१/२०११ - (आमच्यात आधी महिना लिहितात)

अमेरिका किती वाईट्ट आहे नै?
तरीही आम्ही एम एस पासुन (किंवा त्याच्या आधीपासुनही) रिटायर होइपर्यंत आणि त्यानंतर अमेरिकेतच राहणार आणि २५ वर्षे सोशल सिक्युरिटी उपभोगणार. ग्रीन कार्ड च्या रांगेत प्रायॉरिटी डेट करंट कधी होतेय याची चातकासारखी वाट बघत बसणार.. ईएडी मिळतेय का नाही वाट पाहणार. ते झाल्यावर काय इमिग्रेशन रीफोर्म करत नाहीत, पटापट ग्रीनकार्ड/नागरिकत्व देत नाहीत म्हणुन त्यांच्यावरच डाफरणार. आमच्यापेक्षा त्यानाच आमची गरज जास्त आहे हे सगळे होतेय ते आमच्या स्किलच्या जीवावर करतायत नाहीतर काडीचीही अक्कल नाही असे म्हणणार जणु काय १७७६ पासुन एच १ स्किल्ड लोकांच्या बळावरच अमेरिका पुढे आली आहे.

अमेरिकन लोकांची नालस्ती करताना अमेरिकेतील हार्वर्ड, बर्कले, एम आय टी, प्रिन्स्टन, अमेरिकेने जगाला दिलेले वैज्ञानिक, उद्योजक, अमेरिकेमुळे भारतात आलेली सुबत्ता यांचा आपल्याला सोयीस्कररीत्या विसर पडतो. या जगात कोणी कोणावर उपकार करत नाही. आपण त्यांचे काम केले त्याचे पैसेही टिच्चुन घेतले आहेत.

आपल्या देशावर अमेरिकन्सचे मनापासुन प्रेम आहे आणि हा देश समृद्ध, सशक्त करण्यासाठी "whatever it takes" करण्याची त्यांची तयारी आहे (ते सगळेच बरोबर आहे असे मुळीच नाही पण त्यांच्या दृष्टीने ते समर्थनीय आहे). आणि कदाचित त्यामुळे ते राजेपण त्यांच्याकडे आले आहे. आपण अमेरिकन्सच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा त्यांची नीती आत्मसात करुन आपण सशक्त कसे बनु शकु हा विचार करायला हवा. उगाच महासत्ता महासत्ता असा जप करत बसल्याने महासत्ता बनता येणार नाही.

जणु काय १७७६ पासुन एच १ स्किल्ड लोकांच्या बळावरच अमेरिका पुढे आली आहे.>>> हे काय अगदीच खोटे म्हण्ता येणार नाही (जेव्हढ कॉपी पेस्ट केलय तेव्हढच).... पण तेंव्हा एच १ होता कि नव्हता माहित नाहीय... Happy

पण तेंव्हा एच १ होता कि नव्हता
कसला एच १? अहो बोटीत बरून आणायचे नि गुलाम म्हणून विकायचे! गुलाम म्हणून कामाला लावायचे, जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली तरी कोण बोलणार?

कसला एच १? अहो बोटीत बरून आणायचे नि गुलाम म्हणून विकायचे! गुलाम म्हणून कामाला लावायचे, जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली तरी कोण बोलणार?

हे काही अंशी खरे आहे. आजचा भारतीय माणूस अमेरिकनांना मिळालेला(त्यांच्या दृष्टीने) स्वस्तातला नोकर असतो.त्याला साऱ्या सोयी सुविधा मिळतात;पण त्याने काही हजार डॉलर्सच्या बदल्यात ही ऐच्छिक गुलामी पत्करलेली असते आणि त्यात तो खुष असतो.नाहीतरी केवळ भरपूर पैसे कमवून नंतर ऐशोआरामात जगायचे असा हेतू ठेवूनच तो तिथे जातो.काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक लोक तिथल्या श्रीमंतीला भुलून तिथे जातात.मला प्रश्न पडतो,अशा लोकांना आपल्या भारताविषयी काय वाटत असेल? त्याला या देशाबद्दल प्रेम वाटत असेल? की कोणताही मनुष्य आज इतका संकुचित झालेला आहे,की एखाद्या देशाने चांगला जॉब आणि नागरिकत्व दिल्यास आपल्या मायदेशाला कायमचे सोडून जाईल?जर असे असेल तर मग देशप्रेम वगैरे गोष्टी खरेच अस्तित्वात असतात की नसतात?की केवळ वादविवाद आणि चर्चांचे विषय असतात? दुर्दैवाने भारतातही आज फार वाईट परिस्थिती आहे.स्वतंत्र भारतात स्वकीयांची स्वस्तात गुलामी करण्यापेक्षा अमेरिकेची/इतर कोणत्या देशाची गुलामी करणे काय वाईट? अशी मानसिकता यामागे असेल का?

कदाचित काही लोकान्ना त्यान्च्या विषयातील अधिक ज्ञान मिळवायचे, असाहि हेतू असू शकतो. कदाचित त्यान्ना जे शिकायचे ते भारतात नसेल. कदाचित भारतातल्या कामकाजाच्या पद्धती त्यान्ना असह्य होत असतील, काही दिवस इथे राहून सुद्धा लक्षात येते की इथले रोजचे जीवन किती सुसह्य आहे. मग दररोजची कामे पटकन आटपून आपल्या आवडत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला जास्त वेळ मिळतो. थोड्या तडजोडी कुठेहि गेले तरी कराव्या लागतात, जसे स्वतःची कामे स्वतः करायची कारण नोकर मिळत नाहीत, मिळाले तरी परवडत नाहीत.पुष्कळसे नियम पक्के असतात, थोडे पैसे देऊन तात्पुरते बदलता येत नाहीत. आणि बरेच काही काही बिना मनस्ताप होत असते.

माझे कित्येक नातेवाईक आहेत त्यान्ना जराहि बदल सहन होत नाहीत, ते नाही येणार इथे, कितीहि पैसे मिळत असले तरी. ज्यान्ना नवीन गोष्टीन्चे कुतुहल आहे, वेगळे काहीतरी करायचे आहेते येतात.

आणि आले भारतातले लोक इथे तर बिघडले कुठे? भारतात किती लोक आहेत? त्यातले काही कमी झाले तर बरेच नाही का भारताला? भारतात काय कमी आहे, अक्कल आहे, पैसे आहेत. इकडे येणे पैशासाठी आवश्यक नाही. वेगळेपणासाठी येतात, पैसे इथे कसे मिळतात नि का ते वर लिहीलेच आहे. पण भारतातहि खूप खूप पैसे मिळतातच.

आपण काही नवीन पैलू लक्षात आणून दिलेत त्याबद्दल आभार. पण अमेरिकेत जाणारे सरसकट सर्व लोक नवीन काही शिकायला,ज्ञान मिळवायला,वेळ वाचवून आपला आवडता छंद जोपासायला जात असतील असे वाटत नाही.असो,आपण केलेल्या निकोप चर्चेबद्दल धन्यवाद.

While the storm clouds gather far across the sea,
Let us swear allegiance to a land that's free,
Let us all be grateful for a land so fair,
As we raise our voices in a solemn prayer.

God bless America,
Land that I love.
Stand beside her, and guide her
Through the night with a light from above.
From the mountains, to the prairies,
To the oceans, white with foam
God bless America, My home sweet home
God bless America, My home sweet home.

Wishing Happy Independence day July 4th to all Americans!

सरसकट सर्व लोक
मी सरसकट असे म्हण्टलेच नाही. काही असेच म्हण्टले.
आता पैसे मिळवायला अमेरिकेत कोण येतात? एक खरी गोष्ट सान्गतो: १९९५ साली माझा एक मित्र इथून मुम्बईत गेला. तिथे त्याचा एक मित्र होता. माझ्या मित्राने विचारले, काय मुले काय म्हणतात? तो म्हणाला, मोठा ठीक आहे, अभ्यास करतो, डॉक्टर, वकील होईल. पण धाकट्याचे खरे नाही, उनाडक्या करतो, पास होत नाही. त्याला अमेरिकेलाच पाठवावे म्हणतो.

२००८ साली त्या धाकट्या मुलाची अमेरिकेत एक मोटेल नि दोन दुकाने आहेत!

जे करावेसे वाटेल ते करून अमेरिकेत सुखी रहाता येतें, मी स्वतः ज्ञानहि मिळवले नाही, की पैसा. पण सध्या सुखी
स्वतन्त्र आहे. निदान अमेरिकेतले माबोकर नि अमेरिकेतले माझे मित्र यान्चा माझ्यावरील लोभ अनेकदा अनुभवाला येतो.

शिकणारे शिकले, पैसे करणार्‍यान्नी केला! अमेरिकेत येण्यात वाईट काय? माझ्या मते भारतात जरा जास्तच लोकसन्ख्या आहे, म्हणूनच अनेक प्रॉब्लेम्स आहेत, पण होईल, तिथेहि पुनः स्वर्ग होईल.

जे करावेसे वाटेल ते करून अमेरिकेत सुखी रहाता येतें.मी पण सध्या सुखी स्वतन्त्र आहे. निदान अमेरिकेतले माबोकर नि अमेरिकेतले माझे मित्र यान्चा माझ्यावरील लोभ अनेकदा अनुभवाला येतो.हे आवडले!!
शिकणारे शिकले, पैसे करणार्‍यान्नी केला! अमेरिकेत येण्यात वाईट काय? माझ्या मते भारतात जरा जास्तच लोकसन्ख्या आहे, म्हणूनच अनेक प्रॉब्लेम्स आहेत, पण होईल, तिथेहि पुनः स्वर्ग होईल हा आशावादही!!

तिथेहि पुनः स्वर्ग होईल हा आशावादही!!

हे वाचा: http://www.maayboli.com/node/27059

असेच होत राहिले तर तुमच्या आमच्या नाही तरी शंभर वर्षाच्या आत भारत एक समृद्ध राष्ट्र बनेल.
आता जगाचे राजे म्हणजे अमेरिकेसारखे करायचे हे भारतीय संस्कृतीतच नाही! उलट जगाला भारतीय संस्कृती चे प्रेम वाढेल नि लवकरच कलीयुग संपून पुनः रामराज्य येईल!!

Pages