एरवी मी कॉम्प्युटर व्हायरस सारख्या विषयावर, विज्ञान कादंबरी लिहिता येऊ शकते, यावर विश्वास ठेवला नसता. परंतु डॉ. जयंत नारळीकर यांच्या 'व्हायरस' ह्या विज्ञान कादंबरीने मला ते दाखवून दिले.
डॉ. नारळीकरांनी, ह्या कादंबरीत ज्ञान व मनोरंजनाच्या मिश्रणात, डॉ. विनोद शर्मा ह्या पात्राच्या रुपाने, विज्ञान क्षेत्रातील उच्च स्तरावर खेळल्या जाणाऱ्या राजकीय डावपेचांचे तिखट टाकून, त्यावर परमिंदरसिंग ह्या पात्राच्या रुपाने, रहस्याची खमंग फोडणी देऊन, एक उदबोधक विज्ञान कादंबरी पेश केली आहे.
तसेच, अंतराळातून आपल्या पृथ्वीवर येणाऱ्या रेडीओ सिग्नल्सच्या माध्यमातून, कॉम्प्युटर व्हायरस पाठवून, आपल्यावर बाहेरून अतिक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्याचा दूरदर्शीपणा त्यांनी दाखविला आहे व त्याचा सामना करण्यासाठी पृथ्वीवासीयांना आपापसातले मतभेद मिटवून एकत्र येण्याचा संदेशही दिला आहे.