टाहो

व्यर्थ टाहो शंभरांचे कोंडलेले
पाच ठरले थोर येथे जिंकलेले

हा कशाचा एवढा कल्लोळ झाला?
की कुणी आहे स्वतःशी भांडलेले?

काल मजला एक मोठे पत्र आले
मायन्यापाशीच नाते संपलेले!

नेमकी गाडी उशीरा का सुटावी?
अन् कुणी मागे नसावे थांबलेले!

नेहमी नटव्या फुलांवर भाळसी तू
फूल मी साधे - कुणी ना हुंगलेले

धीर करूनी चाळला गतकाळ माझा
गवसले निर्धार सारे भंगलेले

शब्द झाले घाव तेव्हा हारलो मी
(रक्त होते फार थोडे सांडलेले!)


नेमकी गाडी उशीरा का सुटावी?
अन् कुणी मागे नसावे थांबलेले!>>> डोळ्यात पाणी आणलं रे या शेरानी.
आवडली .



मायन्यापाशीच..
अप्रतिम शेर आहे. 'मायन्यापाशीच नाते संपलेले' - खूप आवडला हा शेर, विशेषतः हा मिसरा. गतकाळ चाळण्याचा शेरही खूप छान!
-सतीश



गझल आवडली.
हे शंभर आणी पाच जर महाभारतातले असतिल तर कर्णाच्या मनात
''शब्द झाले घाव तेव्हा हारलो मी '' हेच तर असेल.

चंद्र्शेखर सानेकरांच्या गझलेत एक शेर आहे तो असा...
''जर म्हणावे एकटा तर सोबति आहेत लाखो
अन पहावे तर स्वतःचा हात हि हातात नाहि''



वा! मजा आ गया दोस्त!
गाडीचा आणि मायन्याचा शेर खूप आवडला!
छान गझल.



मायना, गाडी आणि भूतकाळ आवडला

मतला थोडा अस्पष्ट वाटला म्हणजे नेमके काय सांगायचे आहे ते कळले नाही अरेरे

चु. भु. दे. घे.

visit http://milindchhatre.blogspot.com



गझल मस्त. गाडीचा शेर आणि मक्ता जबरी.
मतला कळला (असे वाटते) पण पटला नाही फारसा. 'त्या' शंभरांना टाहो फोडण्याचे (वा कोंडण्याचे) काय कारण? अखेरच्या महायुद्धानंतर त्यांच्या स्त्रियांनी फोडला असेल तो वेगळा.

"Idealism is what precedes experience; cynicism is what follows."



काल मजला एक मोठे पत्र आले
मायन्यापाशीच नाते संपलेले!

नेमकी गाडी उशीरा का सुटावी?
अन् कुणी मागे नसावे थांबलेले!

छानच..!



मतला नाही समजला.. 'कौरव-पांडवां'ना उद्देशून आहे ना? तर मग शंभरांचे टाहो का बरं कोंडलेले?

बाकी सुरेख गजल..

काल मजला एक मोठे पत्र आले
मायन्यापाशीच नाते संपलेले!

नेहमी नटव्या फुलांवर भाळसी तू
फूल मी साधे - कुणी ना हुंगलेले

शब्द झाले घाव तेव्हा हारलो मी
(रक्त होते फार थोडे सांडलेले!)

फार सहज आणि अप्रतिम शेर आहेत.. आवडले..



सर्वांना धन्यवाद....

पत्राचा आणि गाडीचा शेर माझाही आवडता आहे. स्मित

मतला महाभारताशीच संबंधित आहे..
पांडव संपूर्ण सत्याने जिंकलेले नाहीत, ही गोष्ट उघडच आहे...
ते पाच जिंकले, म्हणून थोर झाले आणि शंभरांचे टाहो व्व्यर्थ गेले असं म्हणायचंय.

करकोचा,
त्या शंभरांना टाहो फोडण्याचं कारण काय, हे मी वाचकाच्या रसग्रहणावर सोडलं आहे....

चुभूद्याघ्या.



छान गझल आहे!
मायना आणि गाडी मलाही फार आवडले. शब्दही छान शेर आहे... थोडा अस्पष्ट वाटतो आहे पण.
मतला.. मलातरी सुस्पष्ट वाटला. मत पटो की न पटो, पण शेर स्पष्ट आहे!



एक गोष्ट अजाणतेपणी सांगायचीच राहून गेली...

मायन्याचा बदल स्वाती ताईने सुचवलाय...

आधी मला सुचलेला शेर असा होता -

"काल मजला एक कोरे पत्र आले
त्यात होते एक नाते संपलेले"

तो ही मला आवडला होता...

पण कोरे ऐवजी मोठे आणि "मायन्यापाशीच" या शब्दांच्या योजनेमुळे जो काही परिणाम येतोय, त्याल तोड नाही; नाही का?



उत्तम



अप्रतिम!!!