Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » सौदागर » Archive through March 06, 2008 « Previous Next »

Farend
Thursday, March 06, 2008 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये बहुत लंबी कहानी है! सनातनपुर आणि पालीनगर अशा भरदार नावाच्या गावातील तेवढ्याच भरदार नावांचे राजेश्वर (राजकुमार) आणि दादावीर (दिलीप कुमार) यांची. एक त्या डोंगरदर्‍यात इकडे तिकडे फिरणारा माणूस यांच्या कहाण्या सांगेल...

कारण बहुधा तोच एक शिल्लक राहिला असावा, कारण गावकर्‍यांपैकी अर्धे यांची दुश्मनी झाली तेव्हा तर उरलेले अर्धे पुन्हा दोस्ती झाली आहे हे माहीत नसल्यामुळे एकमेकांना मारून मेले असावेत असे पिक्चर बघताना वाटते. तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते. आताचे गावकरी, "तुमचे दोस्ती का दुश्मनी काय ते एकदा नक्की ठरवा, आम्हाला आमची कामं आहेत" म्हणून मोकळे झाले असते.

तर ह्या दोघांची फारच मैत्री, "इमली का बूटा बेरी का पेड" टाइपची (म्हणजे काय कोणास ठाऊक). एवढी लंबी कहाणी आहे की यांचे डबल लहानपण दाखवले आहे. म्हणजे खरे लहानपण व तरूणपण सुद्धा. कोण राजकुमार व कोण दिलीपकुमार कळावे म्हणून ते तरूणपण वाले अभिनेते मिमिक्री केल्यासारखे यांची स्टाईल मारत संवाद म्हणतात. लहानपणी एकाच्या पायाला लागते म्हणून दुसरा काही दिवस आपलाही एक पाय गुढघ्यात दुमडून बांधून फिरतो (बाकी ती दोरी सारखी निसटत कशी नाही हे एक आश्चर्यच आहे). गुलशन ग्रोवर राजकुमारच्या बहिणीची छेड काढतो तेव्हा दिलीपकुमार आणि त्याच्यात मारामारी होते, जेव्हा राजकुमार ते पाहतो तेव्हा त्याला पहिला राग त्यानी आपल्या मित्राला मारल्याचा येतो. बहीण वगैरे नंतर.

असेच ते वयाने आणखी मोठे होऊन नकली च्या ऐवजी राजकुमार व दिलीपकुमार होतात. साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे. तेव्हा दोघांचे लग्न ठरते. पण तेवढ्यात दिलीप कुमार तिकडे एका गावी लग्नाला जातो, तेथे हुंड्यासाठी नवरा मुलगा अडून बसतो. लग्न मोडायची वेळ येते तेव्हा दिलीपकुमार स्वत:च त्या मुलीच्या गळ्यात हार घालतो. वास्तविक तेव्हा दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो". कारण त्या मुलीच्या डोळ्यात "मूर्तीमंत भीती" उभी दिसते ती लग्न मोडण्याची नव्हे तर "अवघे पाउणशे वयमान" असलेल्या या दादावीरची.

पण राजकुमारच्या बहिणीचे काय? होणार्‍या नवर्‍याने कोणालातरी वाचविण्यासाठी तिच्याशी लग्न केले हा हिच्यावर फार मोठा कलंक असल्याने आता ती Poison असे लिहिलेल्या बाटलीतून विष घेते, त्यात तिला वाचवायचे प्रयत्न करण्याचे सोडून सगळे राजकुमार ला तुझ्या मित्राने हिला कसे फसवले वगैरे डॉयलॉग मारत बसतात. पुन्हा एवढ्या वर्षांच्या दोस्तीत तू एखादी गोष्ट का केलीस विचारायची पद्धत नसल्याने डायरेक्ट जानी दुश्मनी चालू होते.

मग सगळे आणखी मोठे होतात (वयाने). प्रत्यक्षात यांचे लग्न वगैरे व्हायच्या आधीच हे म्हातार्‍या रूपात दिसतात आणि मग यांची मुलेच काय नातवंडे सुद्धा मोठी होऊन इलु इलु म्हणायला लागेपर्यंत आणि त्यानंतरही तसेच दिसतात.

बहुधा काही वर्षे ही दुश्मनी राज कुमारच्या साईडने असते (पुन्हा खुलासे वगैरे भानगड नाही. "मगर मेरी बात तो सुनो", "मुझे कुछ नही सुनना" च्या ऐवजी थेट कारण लोकांनी सांगितले असते तर अनेक चित्रपट १५-२० मिनिटातच संपले असते :-) ). पण दिलीपकुमार चा मुलगा राजकुमारच्या लोकांकडून मारला जातो (असे दिलीपकुमारला वाटते) त्यामुळे आता दोन्ही कडून चालू होते. मग नंतर एकदा राजकुमारलाही अडकवण्यात येते. चाकू खुपसलेला कोणीही पडलेला दिसला की हिंदी पिक्चरमधल्या सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू आपल्या हातात घेऊन बघण्याची काय सवय असते कळत नाही. त्यामुळे लगेच राजकुमार रंगे हाथ पकडला जातो.

त्यात बाकी लोकांना यांच्या दुश्मनीत भलताच इंटरेस्ट त्यामुळे एकवेळ भारत पाक सीमेवर नसेल एवढी यांची स्वत:ची फौज अगदी गणवेष वगैरे घालून बियास नदीच्या दोन्ही तीरावर कायम उभी असते. दोन कुटुंबातील वैर कंट्रोल करणे का कोणास ठाऊक पोलिसांना अशक्य असल्याने मग सरकार थेट मिलिटरीलाच बोलावते त्यामुळे ते ही येतात. मग यांचे कोण, त्यांचे कोण आणि सरकारचे कोण हे कोणत्याही गोळीबाराच्या वेळी आपल्याला कधीच नीट कळत नाही.

एकदा फारच होते तेव्हा तो मिलिटरी ऑफिसर त्यांना काय जबरदस्त धमकी देतो "तुम्ही गोळीबार थांबवला नाहीत तर मी सरकारकडे तुमचे बंदुकांचे परवाने रद्द करण्यासाठी अपील करीन". That should do it! . इकडे हे दोन्ही तीरांवर बंदुका घेऊन एखादी मुलगी जरी एका बाजूने पाण्यात शिरली तरी गोळीबार करतायत आणि तिकडे तो मिलिटरी ऑफिसर विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे करत सर्कारी कार्यालयात खेटे घालतोय असे चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहिले :-)

विवेक मुश्रन आणि तेव्हाची मनिषा कोइराला यांत कोण जास्त गोंडस दिसतो ते सांगणे अवधड आहे. एवढ्या टाईट बंदोबस्तात हे दोघे मात्र पाहिजे तेव्हा ठरवून किंवा चुकून एकमेकांना भेटत असतात. त्या आधी याला लहान असतानाच दुश्मनीतून वाचविण्यासाठी एका गुहेत राहणार्‍या बाबाकडे "शस्त्रविद्या" शिकायला पाठवलेला असतो. हा केव्हमॅन शहरातून शिक्षण घेऊन आलेल्या मनिषा कोइराला ला इंग्रजीतील शॉर्टफॉर्म चा कन्सेप्ट समजावतो... म्हणजे " T " म्हणजे " tea ", " C " म्हणजे " See " (आधी मला वाटले कॉफी) इत्यादी. एवढी क्लियर हिंट दिल्यावरही आणि मुळात प्रेमात पडण्याच्या वयात असलेल्या शहरी मुलीला I L U म्हणजे काय हे कळायला ते पन्नास वेळा म्हणावे लागते, ते ही लहान मुलांना गाणे शिकवतात तशा हालचाली करत, तेव्हा कळते.

पण दुश्मनी वाढतच असते. "मै ज़मीन पे रहके भी आसमान मे उडता हू" वगैरे संवाद इकडून तिकडून एकमेकांवर सोडले जातात. आणखी एक कारण होते म्हणजे राजकुमारचा नातू दिलीपकुमारच्या गावातील मुलीला फसवतो. पण त्यांना ते एकदम तिला बाळ झाल्यावरच कळते.

अशा बर्‍याच गोंधळानंतर अचानक परत दोस्ती का व कशी झाली ते कळतच नाही. विवेक मुश्रन व मनिषा कोइराला यांचे प्रेम जाहीर होते व ते होळी भोवती फेरे वगैरे मारतात (त्या वेळी असे आई वडलांकडे रागाने बघत दिसेल त्या आगी भोवती फेरे मारायचे बरेच फॅड आले होते. पाहा: दिल वगैरे). पण एवढ्या वर्षांतील गोष्टींचे खुलासे फारसे कोणी करताना दिसत नाही. एकदम राजकुमारला दिलीपकुमार गुन्हा करण्यापसून वाचवतो, सांगतो की यांनी (व्हिलन्स) हे सर्व केले आहे, तो याच्यावर रंग फेकतो की दुश्मनी खलास. मग एवढे प्रेम उतू जाते की एकमेकांच्या गालांवर चापट्या मारणे, सॉफ्ट टॉईज घेऊन गाणे म्हणणे, पलंगावर उशा एकमेकांना मारणे ( pillow fight ) वगैरे "मर्दाना हरकती" करतात.

पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्‍या व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात. उरलेल्यांना अमरीश पुरी आणि इतर व्हिलन्स तसेच देशी कमी पडले म्हणून कोणी हॉंगकॉंग चा मायकेल थापा (चीनी लोक अमेरिकेत Xeioufiou ऐवजी Tom सारखे साधे सोपे इंग्रजी नाव घेतात ते ठीक आहे, पण येथे तो व्हिलन आहे. त्याचे नाव लोकांना सहज घेता येईल असे कशाला पाहिजे?) वगैरे मारतात. त्यात मुकेश खन्ना दलीप ताहिल बरोबर कड्याजवळ मारामारी करत असताना राजकुमार मधेच ओरडतो की आता हे आपले दोस्त आहेत. लगेच कड्याला लटकणार्‍या एकाला दुसर्‍याचे "आजा मेरे भाई" वगैरे चालू. तेवढ्यात अमरीश पुरीने गोळी घातल्याने दोघेही खाली पडतात व आपण त्या सिमेंटच्या जाहिरातीसारख्या संवादांतून वाचतो ("ये दीवार टूटती क्यूं नही?").

यात सौदागर नावाचा काय संबंध आला? मला कळाले नाही, तुम्हाला कळाले तर सांगा


Tanyabedekar
Thursday, March 06, 2008 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लै भारी फरेंडा.. मी लहान असताना ह चित्रपट आला होता. तेव्हा टीव्ही वर ते इलु इलु गाणे लागायचे. त्यात सगळे सैनिक नाचताना दाखवले आहेत. मी एकदा माझ्या मोठ्या भावाला विचारले होते की हे सगळे रिक्षावाले का नाचताहेत?

त्यानंतर शाळेतल्या बर्‍याच भिंतिवर, बाकांवर इलु इलु असे लिहिलेले आढळायचे.


Dakshina
Thursday, March 06, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रेंड.. जबरदस्त लिखाण...

(पुन्हा खुलासे वगैरे भानगड नाही. "मगर मेरी बात तो सुनो",
"मुझे कुछ नही सुनना" च्या ऐवजी थेट कारण लोकांनी सांगितले
असते तर अनेक चित्रपट १५-२० मिनिटातच संपले असते >>>> अगदी अगदी....

Psg
Thursday, March 06, 2008 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लगेच कड्याला लटकणार्‍या एकाला दुसर्‍याचे "आजा मेरे भाई" वगैरे चालू

मस्स्स्स्स्स्त लिहिलं आहेस फ़ारेंड! खरंच सगळाच्या सगळा सिनेमा अचाट आणि अतर्क्य आहे! कितीऽऽऽऽऽऽ अभिनेते आहेत एकदा यादी करायला हवी.. जो दिसेल त्याला घेऊन कुठे ना कुठेतरी फ़िट्ट केलाय! आणि 'हीरोंचं' बाल्य, तारूण्य आणि म्हातारपण हे सगळंच दाखवायचं असल्यामुळे सिनेमा लांबलायही खूप- ४ तासांचा आहे ना?

इलू इलू!! कसलं येडचाप आणि आचरट आहे ते! आणि ती बावळट्ट मनिषा आणि तितकाच मूर्ख विवेक!

जबर्‍या चपराकी हाणल्यास! मस्त! :-)


Manjud
Thursday, March 06, 2008 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलीपकुमार एवढा म्हातारा दिसतो की वधुपिता म्हंटला असेल "नको, त्यापेक्षा मी हुंडा देतो".

Kedar123
Thursday, March 06, 2008 - 12:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त हाणलस रे अमोल.

आता तर तो पिक्चर बघायला हवाच.


Deepanjali
Thursday, March 06, 2008 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुपम खेर च्या महा भयानक ओवेर अcतिन्ग विषयी नाही लिहिलस :-)

Rishikeshkale
Thursday, March 06, 2008 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही लहानपणी हा सिनेमा पाहिल्याचे आठवते. तेव्हा ते ईलू ईलू आम्हा मित्र-मैत्रिणीत फारच फेमस होते. सगळे मित्र-मैत्रिणी (इयत्ता दुसरी\तिसरी) ईलू ईलू म्हणत सोसायटी मधे फिरत असू. तेव्हा त्याचे काहीच वाटायचे नाही, आता मात्र हसू येते.

त्या राजकुमार ची एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे फोन चा रिसीव्हर काना पासून चांगला फूटभर दूर ठेऊन बोलणे. नुसता प्रतिकात्मक फोन हातात धरून क्यामेराकडे बघत डायलाॅग म्हणतो. "प्रेक्षकानो, हे माझे डायलाॅग आहेत. हे मी फोन वर बोलतोय असे समजा".


Tanyabedekar
Thursday, March 06, 2008 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खलनायकांची फौज ही सुभाश घईची स्पेशालिटी.. माझ्या आठवणीतला पहिला सिनेमा राम-लखन.. त्यातपण असे १०-१५ खलनायक आहेत.. मी प्रचंड गोंधळून गेलो होतो तो बघितल्यावर..

आणि त्या सौदागर वगैरेंच्या गाण्यातुन केव्हडे एक्स्ट्रा वापरले जायचे.. १०० एक लोक नाचायचे त्या गाण्यातुन...


Tonaga
Thursday, March 06, 2008 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपट 'विनोदी' असला तरी त्यात काही रिलीफ देणार्‍या जागा आहेत.ते म्हणजे दीलीपकुमार आणि राज कुमार यांची कामे.आता खिल्लीच उडवायची असेल तर गोष्ट वेगळी. मला वाटते राज कुमारच्या सगळ्या आयुष्यात हा सुसह्य रोल असावा ज्यात तो नाटकी बोलत नाही. दिलीप कुमारच्या आणि अमरीश पुरीच्या हरयाणवी भाषेचा लहेजा अप्रतिमच आहे.खरे तर voice culture चा दिलीप कुमार हा वस्तुपाठच आहे. आता सर्वच नट डायरेक्टरच्या हातचे बाहुले असल्याने मूर्खपणाला डायरेक्टरच जबाबदार आहे. अनुपम खेरने या चित्रपटातील दिलीप कुमारच्या improvisation ची आठवण सांगितली होती. एके ठिकाणी अनुपम खेर म्हणतो 'लेकिन राजेश्वर तो तुम्हारा दोस्त है'. यावर दिलीप कुमारला फक्त 'था' एवढाच संवाद होता. पण प्रत्यक्ष टेक च्या वेळी दिलीप कुमारने 'था ! था !! था !!! ' असा चढत्या श्रेणीत उत्स्फूर्त बदल केला अन तो प्रसंग एका वेगळ्या उंचीवर गेला. या सगळ्या भरताडात काही सुखद प्रसंगही असतात

Mukund
Thursday, March 06, 2008 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेच ते वयाने आणखी मोठे होऊन नकली च्या ऐवजी राजकुमार व दिलीपकुमार होतात. साधारण पन्नाशीचे झाल्यावर राजकुमारच्या लक्षात येते की आपल्या बहिणीचे दिलीपकुमारवर प्रेम आहे. तेव्हा दोघांचे लग्न ठरते

अमोल.... सकाळी सकाळी हसुन हसुन पोट दुखवलेस... काय जबरी लिहीले आहेस..! तु, श्रद्धा व उचापती... तुमच्या लिहीण्याच्या शैली जबरदस्त असल्यामुळे तुम्ही तिघांनी अश्या चित्रपटांचे असे रिव्ह्युज आठवड्यातुन एक तरी टाकलेच पाहीजेत..:-)

Ajjuka
Thursday, March 06, 2008 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विहित नमुन्याचा अर्ज, मर्दाना हरकती!!! अरे काय मेलो इथे हसून हसून आम्ही!!
अरे त्या अमरीश पुरीच्या तिन चंपाकल्यांचा अनुल्लेख? का बरे? त्या तिघी बायका मिळून जो काही अतर्क्य धिंगाणा घालतात मधे मधे तोंडी लावायला...


Maitreyee
Thursday, March 06, 2008 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विहीत नमुन्याचा अर्ज, परवान्याची मूळ प्रत वगैरे
ती Poison असे लिहिलेल्या बाटलीतून विष घेते गालावर चापट्या, आजा मेरे भाई too much <hasoon melelyaa baahulyaa>

Swaatee_ambole
Thursday, March 06, 2008 - 2:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा, सही लिहीलंयस! असल्या सिनेमांच्या वाटेला न गेल्याचा पुन्हा एकदा आनंद झाला.

Mrinmayee
Thursday, March 06, 2008 - 3:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुप म्हणजे खूपच मस्त!!!
नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्‍या व्हाव्यात तसे यांचे लोक मारत आणि मरत राहतात..
आजवर हा सिनेमा बघीतला नव्हता. आता ही बढीया 'ष्टोरी' वाचल्यावर तर बघण्याचं प्रयोजनही नाही!


Marhatmoli
Thursday, March 06, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"तेव्हा बरे यांना असे ठाकुर, मुखिया, जमीनदार वगैरेंच्या नादी लागणारे लोक मिळत होते. आताचे गावकरी, "तुमचे दोस्ती का दुश्मनी काय ते एकदा नक्की ठरवा, आम्हाला आमची कामं आहेत" म्हणून मोकळे झाले असते. "


:-P

काय मस्त लिहलय. सुभाष घई च्या पिक्चर्स च अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्यात खुप मोठे (म्हणजे मानधनाच्या आकड्यात अभिनय क्षमतेमध्ये मोठे असलेच पाहिजेत असा काहि नियम नाहि) कलाकार २-३ shots मद्ये उगाचच दर्शन देवुन जातात. त्या प्रमाणे ह्यात दिप्ति नवल आहे. ज्या दृश्यात ति दिसते तिथे ति का दिसते आणि जिथे दिसत नाहि तिथे का नाहि ह्याचा काहिच उलगडा पुर्णवेळ होत नाहि.


Asami
Thursday, March 06, 2008 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ROFL

यात सौदागर नावाचा काय संबंध आला? मला कळाले नाही, तुम्हाला कळाले तर सांगा
अरे त्या गाण्यामधे आहे ना सौदागर सौदा कर , दिल दे दे दिल देकर. मनिषाला सुलभ सुबोध हिंदी शिकवण्याचा class असेल रे


Savyasachi
Thursday, March 06, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तू एखादी गोष्ट का केलीस विचारायची पद्धत नसल्याने डायरेक्ट जानी
>सर्वात निर्दोष माणसाला सगळे सोडून तो चाकू
>मै ज़मीन पे रहके भी आसमान मे उडता हू" वगैरे संवाद इकडून तिकडून एकमेकांवर सोडले जातात
>"मर्दाना हरकती" करतात.
>पण नेत्यांची दिलजमाई होऊन त्यांनी प्रीतीभोजन करावे आणि इकडे त्याचा पत्ताच नसल्याने कार्यकर्त्यांत मारामार्‍या व्हाव्यात तसे फारेंडा, महान... अशक्य.... भिषण हसलो रे बाबा :-) खरच तो सिनेमा पहाताना एवढा पकलो होतो ना

Chinnu
Thursday, March 06, 2008 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल :-)
आणि ती कपाळाला कपाळ लावून कुंकू (तिलक?) लावण्याची फॅशन या चित्रपटापासुनच आली वाट्टं


Amruta
Thursday, March 06, 2008 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अफाट लिहिलय... सहि धम्माल आली. खरच जाम पकाउ सिनेमा होता तो. :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators