Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 30, 2006

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » नाटक कसे वाटले » Archive through March 30, 2006 « Previous Next »

Dineshvs
Thursday, December 22, 2005 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, शेवट बघितला नाहि का ? लक्ष्मी त्याला, त्यावेळिहि साथ देते, असा शेवट आहे.

Prajaktad
Thursday, December 22, 2005 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा!बरच काहि विकत घेण्यासारखे आहे.
एका लग्नाचि गोश्ट,सहि रे सहि..यांच्या vcd नाहित.
पैकि आताच्या भारतवारित सहि रे सहि बघितल!मस्तच आहे...त्यातल गलगलेच पात्र भरतने छान जमवलय.


Gajanandesai
Friday, December 23, 2005 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अच्छा असे आहे का?
शेवट बघीतला होता पण कळला नव्हता. कदाचित लक्ष्मीच्या स्वभावात अचानक आलेल्या धीटपणामुळे असेल.
बाकी सोनाली कुलकर्णी आणि चिण्मई सुमीत दोघींनी चांगला अभिनय केलाय.


Dineshvs
Friday, December 23, 2005 - 4:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन,
लक्ष्मी, हि खर्‍या अर्थाने प्रेमळ आहे. तिच्यात सखारामलाहि शिस्त लावायचे सामर्थ्य आहे. कावळ्या, मुंगळ्यावर प्रेम करणारी ती, वात्सल्याची मुर्ती आहे.
सखाराम कदाचित आता स्थिरस्थावर होईल, त्यालाहि खर्‍या प्रेमाची ओळख पटेल. असे तेंडुलकराना सुचवायचे असेल. अर्थात हा एकमेव अर्थ असेल असे नाही.



Palas
Friday, December 23, 2005 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mau. pÜ. baÜmbaIlavaaDI ho pNa ek Qamaala naaTk Aaho.

Neelu_n
Saturday, December 24, 2005 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, हो पळस, मु. पो. बोंबीलवाडी मध्ये खरच धमाल आहे.
वंदना गुप्ते आणि प्रशांत दामले एक नाटक आहे कविता लाड पण आहे त्यात नाव आठवत नाही पुर्वी इटीव्हीवर बरेच्दा दाखवले होते तेही नाटक फुल टु धमाल आहे... कोणाला नाव माहित आहे का त्याचे??


Boss
Sunday, December 25, 2005 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

neelu_n

श.. कुठे बोलायच नाही!!! हे म्हणत आहेस का?

Dineshvs
Monday, December 26, 2005 - 4:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मु. पो. बोंबीलवाडी खरेच छान आहे. लग्नकल्लोळ पण छान आहे. दिनुच्या सासुबाई राधाबाईची सीडी ऊपलब्ध आहे, पण त्यात स्व. मनोरमा वागळे नाहीत.

वंदना गुप्ते, मोहन जोशी, डॉ. गिरिश ओक यांची श्री तशी सौ पण छान आहे.


Bhagya
Monday, January 02, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गजानन, सखाराम बाईंडर मधली सगळ्यात माझ्या मनाला भिडलेली करूण गोष्ट म्हणजे, समाजात इतक्या बायका गरजू आणि असहाय असतात की सखाराम सारख्याला बायकांचा तुटवडा कधीच पडत नाही आणि त्या निर्दय माणसाला त्यांच्या असहायतेचा फ़ायदा घेऊन एकीला मारून टाकताना काहीच वाटत नाही......
आणि दिनेश, तू म्हणतोस तसाच त्या शेवटातून अर्थ मी पण काढला. पण हे नाटक मी बघितले नाहि, वाचले आहे आणि ते पण इंग्रजीत. माझे काही तपशील सुटले असण्याचि शक्यता आहे.


Champak
Monday, January 02, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राजकारण गेलं चुलीत!

कुलदीप पवार लै झ्याक काम करतु बघा :-)


Dineshvs
Monday, January 02, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, अलिकडेच तेंडुलकरानी हिज फ़िफ़्थ वाईफ़, नावाचे नाटक लिहिले आहे, ते सखारामच्या आधीचा भाग म्हणुन. तु ज्या तर्‍हेने तो, नवीन आलेल्या बाईशी टर्म्स ठरवतो, तो भाग वाचला असशीलच ना, वर्षाकाठी दोन लुगडी, दोन वेळ जेवण आणि जाताना परतीचे तिकीट वैगरे.
लक्ष्मी तर ईतकी गरीब आहे, कि पहिल्यांदा ती बराच वेळ मुक्यानेच वावरते.

चंपक, या नाटकात पहिल्यांदा निळु फुले काम करत असत. कथा अकलेच्या कांद्याची, मिळाले का ?


Dineshvs
Wednesday, February 08, 2006 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अलुरकरानी बाजारात आणलेली घाशीराम कोतवालची सीडी नुकतीच बघितली. त्यबद्दल थोडेसे. नाटकाबद्दल मी माझ्या लेखात लिहिले होतेच, तरि आता परत थोडेसे.

हे नाटक १९७२ साली रंगमंचावर आले. त्यावेळी ते खुप गाजलेदेखील. मुळात हे नाटक काय आहे हेच अनेकजणाना तेंव्हा कळत नव्हते. त्याचा मर्यादित अर्थ लावुन, त्यावेळी पुण्यातील ब्राम्हणानी त्याविरुद्ध आवाज ऊठवला होता.

मुळात हे नाटक ईतिहासाशी कितपत प्रामाणिक आहे, हाच एक प्रश्ण आहे. तेंडुलकरानीदेखील असा दावा केलेला नाही.
या सीडीत, या नाटकाचे संगीतकार भास्कर चंदावरकरानी काहि निवेदन केलय.

आता या नाटकाची कथा थोडक्यात सांगतो. ( मी कथा लिहिली तरी ज्याना बघायचे आहे, त्यांची रुची अजिबात कमी होणार नाही. ) हि कथा आहे साडेतीन शहाण्यांपैकी असलेल्या नाना फ़डणवीस व पुणे नगरीचा कोतवाल घाशीराम यांची.

त्याकाळी पुण्यात ब्राम्हणांचे वर्चस्व होते. अनेक प्रांतातुन तिथे ते येऊन स्थायिक झाले होते, पण तरिहि पुण्यांच्या ब्राम्हणांची म्हणुन एक वेगळीच जीवनपद्धती होती. बावन्नखणीच्या माड्या चढणे त्याना वर्ज्य नव्हते.

उत्तरेकडुन आलेल्या एका घाशीराम नावाच्या माणसावर, नाना खुष होवुन, त्याला एक मोट्याचा सर देतात, पण एक नाची, धाक धपटश्याने तो त्याच्याकडुन काढुन घेते. त्याने अपमानित होवुन, घाशीराम सुड घ्यायचे ठरवतो.
एका गणपतिच्या ऊत्सवात, स्त्रीलंपट नानाची नजर एका गौरी नावाच्या मुलीवर पडते. नाना तिला धरायचा प्रयत्न करतो, पण ती सुटुन जाते. नानाला तीच हवी असते, आणि ती मिळवुन देतो असे त्याना घाशीराम सांगतो, पण त्या बदल्यात पुण्याची कोतवाली मागुन घेतो. नाना काहि डाव योजुन त्याला ती देतो व गौरीची प्राप्ती करुन घेतो. गौरीशी तो लग्न करत नाही, पण तिला ठेवुन घेतो. हा खरेतर घाशीरामाचाहि डाव असतो, गौरी त्याचीच मुलगी असते. आणि आपल्या मुलीचा असा वापर केला, म्हणुन त्याला पश्चातापदेखील होतो.

गौरीच्या सहवासात नाना बुडुन जातो आणि हाती आलेल्या अमर्याद अधिकारामुळे घाशीराम उन्मत्त होतो. तो सामान्य जनांचे जीणेच मुष्कील करुन टाकतो. काहि लोक नानांपर्यंत तक्रारी घेऊन जातातहि, पण नाना लक्ष घालत नाही. शेवटी तक्रार पेशव्यांपर्यंत जाते. मग नानालाहि लक्ष घालावेच लागते.

मधेच नानाचे सातवे लग्न होते. त्याच दरम्यान गौरी बेपत्ता होते. घाशीरामला कळते कि तिला मारुन टाकलेय. तो वेडापिसा होतो आणि त्याचे अत्याचार आणखीनच वाढतात. शेवटी ब्राम्हण बंड करतात. नानाला त्याला जीवे मारण्याचा हुकुन द्यावाच लागतो. लोक त्याला मारतात व नानाचे रंगढंग सुरु राहतात.

या कथानकात तुम्हाला एक राजकिय भाष्य दिसेल. हे नाटक जेंव्हा आले तेंव्हा फ़िलीपीन्सचा मार्कोस धुमाकुळ घालत होता. चंदावरकरानी हि जी प्रव्रुत्ती आहे त्याच्याशी या कथानकाची नाळ जोडलीय, आणि हा ईतिहास अगदी सद्दाम हुसेन पर्यंत चालु आहे. म्हणुन हे नाटक वेगळ्या अर्थाने ऐतिहासिक आहे.

पण हा आशय, सामान्य प्रेक्षकाच्या ध्यानात चटकन येत नाही, याला कारण ठरतो तो या नाटकाचा देखणेपणा.
हे नाटक ना लोकनाट्य आहे ना म्युझिकल कॉमेडी. या नाटकाचा एक वेगळाच बाज आहे. बहुतेक प्रसंग नृत्यमय आहेत. कै. मुळगुंद गुरुजीनी यात अप्रतिम नृत्यरचना केल्या आहेत.

आणि तितकेच मह्त्वाचे आहे ते याचे संगीत. या नाटकाचे ईतर भाषेत जे संगीत वगळुन प्रयोग झाले, ते तितकेसे यशस्वी झाले नाहीत.
हे पारंपारिक संगीत नाटक नाही. महाराष्ट्रातील अनेक लोकगीत प्रकारांचा यात मुक्त वापर केलाय. तसेच शास्त्रीय संगीताचा हि वापर केलाय. लावण्या आहेतच. ज्यावेळी हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आले, तेंव्हा हे सगळे प्रकार निदान व्यावसायिक रंगभुमीवर सादर झालेले नव्हते. या वेगळ्या फ़ॉर्मचे कौतुक झालेच. पण या नाटकात हे सगळे गायनप्रकार ( लावणी सोडल्यास ) कुठलिहि वेगळी वेषभुशा न करता, सादर केले जातात.

हे संगीत लाईव्ह आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव फ़ारच जाणवतो. तबला पखवाज यांचा अप्रतिम वापर आहे. तालाची विविधता तर थक्क करायला लावते. काहि प्रसंगात कथकलीचे तालहि वापरले आहेत.
चंदावरकर म्हणतात कि तेंडुलकरानीच नाटकातच संगीताबद्दल विस्तृत सुचना लिहुन ठेवल्या आहेत. पण मला वाटते हा चंदावरकरांचा विनय असावा.
मुळात तेंडुलकरांची संहिताच मला वाचायला मिळाली नाही, त्यात त्यानी नेमके काय लिहिले असावे, याचा मला प्रश्ण पडतो. कारण या नाटकात संवाद अगदीच मोजके आहेत. ( जे आहेत ते यमक अनुप्रास युक्त आहेत. ) अनेक प्रसंग केवळ मुकाभिनयातुन व नृत्यरचनेतुन सादर झालेत.

यात तसा वैयक्तीक अभिनयाला फ़ारच कमी वाव आहे. मी याचा प्रयोग बघितला तो बहुतेक १९८३ साली. त्यावेळीहि याचे प्रयोग थांबलेच होते, पण एक खास प्रयोग झाला होता. नानाच्या भुमिकेत डॉ. मोहन आगाशे होते.

आता थोडे या सीडीबाबत. यात नानाच्या भुमिकेत माधव अभ्यंकर आणि घाशीरामाच्या भुमिकेत डॉ. मनोज भिसे आहेत.

हे एका स्टेजवर केलेल्या प्रयोगाचे चित्रीकरण आहे. बहुदा चित्रीकरणासाठीच हा प्रयोग केलेला असावा, कारण ध्वनिमुद्रण अतिशय सुंदर आहे, तरिही फ़ूट लाईट्स, स्टेजची लाकडी कड आणि वरच्या काळ्या झालरी दिसत राहतातच. शिवाय अश्या चित्रिकरणामुळे कॅमेराचे ऍंगल मर्यादित झालेत. क्लोजप्स सुद्धा असावे तसे नाहीत. प्रयोग सलग सादर झाला असावा, कारण संकलन फ़ारसे जाणवत नाही.

या नाटकाला फ़ारसे नेपथ्य नाही. एक लेव्हल आणि दोन गणेशपट्ट्या एवढेच. मी बघितलेल्या प्रयोगात या पट्ट्या काळ्या व मधला गणेच शेंदरी रंगाचा होता. तो छोटा असला तरी नजरेत भरत असे. या प्रयोगात हि संपुर्ण कमान केशरी होती, आणि बाप्पा काहि दिसला नाही.

या नाटकात प्रॉपर्टी पण फ़ारच मोजकि आहे. बरेचसे प्रसंग मुकाभिनयातुनच साकार झालेत, हे वर लिहिले आहेच. त्याच अभिनयामुळे प्रॉपर्टीचा छान आभास निर्माण झालाय. तरिही नानानी घाशीरामाला दिलेला मोत्याचा सर तितका किमती वाटत नाही.

या नाटकाचा भर आहे तो वेषभुशेवर. नाना, घाशीराम, एक ईंग्रज ( तो कश्याला लागतो ? ) सोडळे तर बाकि सगळ्या पुरुषपात्रांचा वेष पांढरे धोतर, अंगरखा, उपरणे आणि पगडी असा आहे. याचाच काहि प्रसंगात छान ऊपयोग करुन घेतलाय.

सर्व स्त्रीया नऊवारी साड्यात आहेत. पण त्यात फ़ारसे लक्ष दिलेले नाही. एका ठुमरीच्या वेळी, जेंव्हा ब्राम्हण स्त्री सडा घालताना आणि नाची झोपायची तयारी करताना दाखवलीय, तेंव्हा दोघींच्या साड्या लालच आहेत. जरा शेड वेगळी असली तरी ते फ़ारच खटकले. जेंव्हा लावणीत लाल पैठणी आणि लाल कंचुकीचा उल्लेख आहे, तेंव्हा नाचीने जांभळी साडी नेसलीय.

घाशीरामाला गौरीला कुठे पुरलय ते दाखवणारी स्त्री मुळ प्रयोगात विकेशा दाखवली होती, या प्रयोगात तमासगीर बायका जसा डोक्यावरुन घुंघट घेतात तसे दाखवले आहे.
मुळ प्रयोगात एक बुटका कलाकार होता, तो गणपति आणि साडेसातावा ब्राम्हण अश्या भुमिका करत असे, या प्रयोगात तसा कलाकार नाही, आणि त्यामुळे तसे संवादहि नाहीत.

यातली गाणी ते कलाकार प्रत्यक्ष गात नव्हते असे वाटते, कारण त्यांच्या ओठांच्या हालचाली नीट दिसल्या नाहीत. तरिहि ध्वनिमुद्रण अप्रतिम आहे हे पुन्हा लिहावेसे वाटतेय.

अभिनयाचा मर्यादित वाव लक्षात घेता, प्रत्येकाचा अभिनय वेगळा दिसणे शक्यच नाही, तरिही अभिनयाला वाव देणार्‍या मोजक्या प्रसंगातला सगळ्याच कलाकारांचा अभिनय दर्जेदार आहे.

चित्रीकरण, वरची ऊणीव सोडली तर सुंदरच आहे. एकंदर संग्रहि ठेवावी अशी सीडी. फ़क्त एकच गोची आहे, दोन सीडीज पैकी पहिली कुठली आणि दुसरी कुठली, याचा ऊल्लेखच नाही.



Rar
Wednesday, February 08, 2006 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खल्लास! ' घाशीराम कोतवाल ' VCD वर आले तर...

माझ्याकडे त्याची original संचातल्या लोकांची audio cassette आहे! मला तर हे नाटक ऐकायलापण इतके जबरदस्त वाटते ना...कारण तसं पाहायचं तर मी ' घाशीराम ' बघत आणि अनुभवत मोठी झाले आहे!

घाशीरामच्या माझ्या लहानपणाच्या आठवणी लिहायला घेतल्या तर पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या घाशीरामवर एक वेगळा लेख होईल खर तर!
पण आज दिनेशने हे लिहिल्यावर मला माझं लहानपण आणि त्यातला ' घाशीराम ' डोळ्यापुढे आला.

माझे बाबा म्हणजे घाशीरामच्या मूळ संचातले ' सूत्रधार ' .
श्रीधर राजगुरु, बाबा, जब्बार पटेल, मोहन आगाशे यांनी भालभा केळकरांच्या PDA मधून बाहेर पडून theater academy स्थापन केली केवळ ' घाशीराम ' करण्यासाठी!
Fergussion च्या amphy theater मधे रात्री अपरात्री, कोणालाही पत्ता लागू न देता नाटकाच्या तालमी चालायच्या.

बाबा घाशीरामचे किस्से सांगतातच, पण माझ्या आईने अनुभवलेलं घाशीरामचं वातावरण फ़ार अजब होतं...

माझी मोठी बहिण तेव्हा एक वर्षाची होती.. आणि माझे बाबा धड हाती पायी किंवा जिवंत घरी येतील की नाही याची शाश्वती नसायची.
बाबा दौर्‍यावर जातो इतकच सांगून जात. कुठे प्रयोग आहेत? कधी परत येणार? काही काही माहिती नसायची. कारण विरोध करणार्‍यांना समजलं तर प्रयोग उध्वस्त व्हायची मारझोड व्हायची भीती असायची.
पुण्यातल्या ब्राम्हणांचा नाटकाला विरोध. पोलिस बदोबस्तात नाटकाचे प्रयोग होत असत.

आणि हे असं 1980 पर्यंत चाललं होतं.

मलाही लहानपणी घरी पोलिस आलेले आठवताहेत. आपले बाबा चोर, गुंड नसताना घरात रात्री अपरात्री बाबांना सोडायला पोलिस का? हे मला त्यावेळी समजत नसे.

घाशीराम जेव्हा 1980 ला इंग्लंडच्या दौर्‍यावर गेले तेव्हा अक्षरश्: ' गनिमी कावा ' करून! माझी आई तर त्याला ' आग्र्याहून सुटका ' असंच म्हणते.

नाटक जेव्हा परदेशात ' उचललं ' गेलं तेव्हा ज्या पुण्यातल्या लोकांनी दगडं मारली होती त्यांनीच हारतुरे घालून स्वागत करताना मी स्वत्: पाहिलयं.
आपल्या बाबांनी कोणतही वाईट काम केलं नाही, आपले बाबा वाईट नाहीत हे दोन लहान मुलींना त्यादिवशी दिसलं होतं!

घाशीरामचे अनेक प्रयोग मी हौद्यात ( जिथं वाद्य वाजवायला बसतात तिथ ) बसून पाहिले आहेत.

गालावर scar असणारा घाशीराम ( रमेश टिळेकर) जेव्हा " कहा है मेरी ललितागौरी, कहा है मेरी लाडली बेटी " असं प्रेक्षकातून ओरडत यायचा..मला दर प्रयोगाला नव्यानं भीती वाटायची. मला आठवतय..मी ओरडु नये म्हणून माझी मोठी बहिण माझं तोंड दाबून ठेवायची.

मोहन गोखले ने केलेला ' दिव्याचा scene' अजूनही तसाच्या तसा डोळ्यासमोर येतो आणि अजूनही अंगावर शहारे येतात.

रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचं कौतुक वाटायचं.
सूर पट्टी न चुकता दिवसाला ३-३ प्रयोग, रात्री अपरात्री open air कुठेही गायचे ते!

माझ्या बाबांनीही वयाच्या 56 व्या वर्षापर्यंत घाशीराम केलं. वाढत्या वयानुसार प्रयोगाच्यावेळी दोन-अडीच तास सतत नाचत असताना ' माझ्या नानाचं लगिन ' म्हणताना आपल्याला ढास, दम लागला नाही पाहिजे यासाठी प्रयोगाच्या आधी बाबा घरात घाशीराम चा एक प्रयोग करत. आणि मग ताट वाट्या वाजवत आम्ही पण त्यांच्याबरोबर नाचत असू!

वाढलेली वय, वाढलेले कामाचे व्याप अशा अनेक कारणांनी काही वर्षापूर्वी घाशीरामच्या मूळ संचातल्या लोकांनी घाशीराम करायचा नाही असा निर्णय घेतला.

आमच्या मनात घाशीरामच्या आठवणी आहेत तशाच आमच्या घरातही आहेत...
सूत्रधाराची ती पुणेरी पगडी आणि मूळ नेपथ्यामधला तो काळ्या चौकटीवर विराजमान असणारा शेंदरी रंगाचा बाप्पा, तो " श्री गणराय " !


--------------------
( I am really sorry! मी हे चुकीच्या BB वर आणि त्यातुन जरा जास्तच लिहीलय! पण अक्षरश्: राहवलं नाही. योग्य वाटत नसेल तर please let me know . मी स्वत्: delete करायला तयार आहे!)


Moodi
Wednesday, February 08, 2006 - 8:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिलीट कशाला करतेस रार? तो विचारही मनात आणु नकोस. रोमांचक अनुभव लिहीलेस. दिनेश ना पण अनेक धन्यवाद. मला खरच घाशीरामची स्टोरी माहित नव्हती, कारण नाटक हे क्षेत्र माझ्या दृष्टीने जरा अनोखेच. मी कधी जास्त पाहिले नाही नाटक, तशी संधी पण मिळाली नाही.
दिनेश तुमच्या लेखणीच्या निमित्ताने रारचे पण अनुभव वाचायला मिळाले बघा.


Mepunekar
Thursday, February 09, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Dhanyavad Dinesh, ani Rar
ya natkabaddal kahi controversy hoti te mahit hote pan natakachi story mahit navti. Ata VCD var te alyamule nakkich pahen.

Dineshvs
Thursday, February 09, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती, किती छान लिहिले आहे. मला वाटतय मी बघितलेल्या प्रयोगात पण तेच असतील. मी टाटा थिएटरला १९८३ ला बघितला होता. प्रयोगाला माझ्या बाजुला शेरॉन प्रभाकर होती.
लहान मुलीच्या नजरेतुन हे नाटक असा वेगळाच पैलु आज वाचायला मिळाला.

का करतात माणसं जीवावर ऊदार होवुन अशी नाटकं ? वेडीच म्हणायची. पण वेडी माणसच ईतिहास घडवतात.


Bee
Thursday, February 09, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोघांनीही छान लिहिले आहे. मला खूप उत्सुकता होती खूप दिवसांपासून ह्या नाटकाबद्दल माहिती मिळवण्याची. आज माहिती मिळाली आणि ह्या नाटकाची VCD आली हे कळले असा दुहेरी आनंद झाला.

रार, तुझ्या बाबांचे नाव काय? तुला खूपच कलात्मक family background मिळालेला दिसतो. छानच!


Vinaydesai
Thursday, February 09, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा मी पुण्यात असताना, एका मित्राने Rar च्या बाबांसमोर घाशीरामची (Audio Cassette) लावली.. पुढचा अर्धा तास, मी कान कॅसेटवर आणि डोळे त्यांच्याकडे लाऊन पहात बसलो होतो. खरंच घाशीराम बघायला मिळायला हवं...
त्यांच्याकडून घाशीरामच्या वेळच्या कथा ऐकण्यातही मजा आहे..


Dakshina
Tuesday, February 14, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पोस्ट इथे लिहिण्या आधी सगळा B.B. धूंडाळून पाहीला. " फ़्रिज मधे ठेवलेलं प्रेम " या नाटकाविषयी फ़क्त एक पोस्ट वाचायला मिळाली. ते पण फ़ार काही समजलं नाही.

परवा हे नाटक पहाण्याचा योग आला. सुदर्शन रंगमंच ला होतं.

प्रामाणिकपणे सांगते की मला नाटक पाहून फ़क्त इतकंच कळलं की...

माणसांवरही प्रेम करावं
कुत्रा हा प्राणी इमानदार आहे हे माणसाने ठरवले आहे.

यात पार्वती ( प्रसन्नची बायको ) शेवटी मोकाट कुत्र्यांना गोळ्या घालून मारा असं का सांगते? प्रसन्न तिला सांगतो की हाच एक उपाय आहे, कोणत्या Problem चा हाच एक उपाय आहे?
अतीप्रसन्न फ़्रिजमधलं प्रेम पोत्यात भरतो.. जवळ जवळ सगळी पात्रं थोडं थोडं प्रेम खातात म्हणजे नक्की काय करतात?

असे मला खरंतर बरेच प्रश्नं पडले नाटक पहिल्यावर... ( बहुतेक वेळा जड सिनेमे, आणि नाटकं पाहिल्यावर पडतात )

पण सध्या एक Trend आहे, ( असं मला वाटतं ) की जरा अशी ' हटके ' नाटकं पाहीली, पुस्तकं वाचली की आपलं वेगळेपण सिद्ध करता येतं

बहुतेक लोक हे नाटक पहून म्हणाले की " छान आहे, मला आवडलं " अरे..? मला तर काय आवडलं ते सांगता पण येणार नाही, आणि का अवडलं नाही असं विचारलं तरिही सांगता येणार नाही.

नाटक वाईट नाही आणि पण भयंकर Abstract आहे. संदर्भ लावता लावता दमछाक होते...

स्पष्टता, अचूक आणि मुद्देसूद संवाद, कमी पात्रं.... नेपथ्य, प्रकाश योजना सगळं सगळं छान आहे. ( कारण ते कळलं )


Sameerdesh
Tuesday, February 14, 2006 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, मी " फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम " पुण्यात रविवारीच पाहिले. नाटक सुरुवातीला झेपले नाही. नंतर मात्र सोपे वाटले.

नाटक थोडे रूपककथेसारखे आहे.
प्रसन्न = कला, भावना,
पार्वती = बुद्धि
मोलकरीण = सत्ता
अतिप्रसन्न = हृदय
कुत्री = दुष्ट प्रवृत्ती
असा काहीसा विचार केला की नाटक सोपे वाटते.

पण कुणास ठाउक नाटक बघताना पु. लंच्या " खुर्च्यां " ची आठवण होत राहिली.


Dakshina
Tuesday, February 14, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर,
मी पण या रविवारीच पहिलं नाटक...

तुमची पोस्ट वाचून पण खूप विचार करायचा प्रयत्न केला पण काही जमत नाही..





Dineshvs
Wednesday, February 15, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, तु नियमितपणे साप्ताहिक सकाळ वाचत जा, असल्या नाटकांचा अर्थ दिलेला असतो त्यात.

घाशीराम कोतवालच्या व्हीसीडीत, ईंग्लीश सबटायटल्स आहेत, पण ती एकतर संपुर्ण नाहीत आणि संवाद संपला कि मग ती दिसतात, त्यामुळे अमराठी माणसाना काहि ऊपयोग नाही त्याचा.


Dineshvs
Thursday, March 09, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सखाराम बाईंडर नाटक सीडीवर बघितलं. या नाटकाबद्दल मी माझ्या लेखात लिहिले होतेच. तसा मी बघितलेला प्रयोगहि मुळ संचातला नव्हताच. कमलाकर सारंग गेल्यानंतरचा प्रयोग होता तो. प्रिया तेंडुलकरने ते नाटक परत रंगमंचावर आणले होते. ती स्वत : लक्ष्मीच्या भुमिकेत होती. सखारामच्या भुमिकेत सयाजी शिंदे होता आणि चंपाच्या भुमिकेत लालन सारंगच होती. प्रिया आणि लालनच्या प्रभावामुळे सयाजी तेंव्हा जरा बुजल्यासारखा वाटला होता.

या सीडीत मुख्य भुमिकेत तोच आहे. आता मात्र त्याला बराच आत्मविश्वास आल्याने, त्याने छानच काम केलेय. चंपा म्हणजे लालन हे तर समीकरणच झाले होते. पण या सीडीतल्या चिन्मयी सुमित ने आपली छाप सोडलीय. लालनच्या " हा " ची मजा नाही ईथे तरिहि, तिने लालनची चंपा विसरायला लावलीय.

लक्ष्मीच्या भुमिकेत सोनालि कुलकर्णी आहे. मला आधी हे जरा खटकले होते कारण सोनालिच्या डोळ्यातली चमक या भुमिकेला मारक ठरेल असे वाटले होते. पण नाही, कसलेली अभिनेत्री काय करु शकते, याचे हे उत्तम ऊदाहरण आहे. तिची एकदम वेगळी भुमिका आहे हि.
मुळ प्रयोगातल्या नेपथ्यापेक्षा राजन भिसे चे नेपथ्य थोडे वेगळे आहे. पडवी बंदिस्त आहे शिवाय मुळ नेपथ्यातले आडोश्याला असलेले न्हाणीघर ईथे समोर आहे. मुळ प्रयोगात चुल नव्हती, ईथे आहे व प्रकाशयोजनेने ती पेटलेली पण दाखवलीय.
हे नाटक मुळातच खुप बोल्ड आहे. आजहि त्यातले संवाद व प्रसंग अंगावर येतात. मग त्याकाळी लालन आणि कमलाकरने या नाटकापायी काय मनस्ताप भोगला, ते आठवते. सर्वसामान्य माणसाला लालनची घृणा वाटावी यातच तिचे यश होते. पुढे तिची चंपा लोकप्रिय झाली, हेहि खरे.
या सीडीत सगळेच प्रसंग जास्त जोरकस झालेत. ( पण मारहाणीचे प्रसंग जरा खोटे वाटतात. एका नाटकात, बहुदा पंखाना ओढ पावलाची, मधे सुहास जोशी आणि स्वाती चिटणीस, थोबाडीत मारण्याचा एक प्रसंग फ़ार जोरकसपणे सादर करयच्या. प्रेक्षकांकडे नसलेल्या स्वातीच्या गालावर सुहास एक सणसणीत थोबाडीत मारायची. प्रत्यक्षात त्यावेळी स्वाती तिचा हात, आपल्या हातावर झेलायची, आणि त्या चक्क टाळी वाजवायच्या. पण प्रेक्षकाना हे कळायचेच नाही. ) कालानुसार प्रेक्षक प्रगल्भ झालाय म्हणावे लागेल. मुळ प्रयोगात, गाठ न सुटल्याने, लालन साडी बदलायचा प्रसंग करत नसे. या सीडीत तो आहे. पण तरिही मला दोघींची वेशभुषा पटली नाही. चंपाचे केळ पद्धतीने नेसलेले लुगडे आणि लक्ष्मीचे नऊवारी लुगडे, जरा खटकत होते.
यात सखाराम मृदंग वाजवायचे अनेक प्रसंग आहेत. त्यावरची सयाजीची हालचाल योग्य नाही. त्याला जरा वेळ मिळता, तर त्याने ते जमवले असते. एका प्रसंगात लक्ष्मी फ़ुंकर घालुन निरांजन विझवते ते तर चांगलेच खटकते. पण हि अत्यंत किरकोळ दोष आहेत.
याचे चित्रीकरण पण उत्तम आहे. साहित्य संघात केले असले तरी स्टेज जाणवत नाही. फ़क्त या नेपथ्यात तीन भाग आहेत. यापैकी एकाच भागात कॅमेरा ठेवल्याने, ईतर ठिकाणच्या पात्रांचा बिझिनेस जाणवत नाही. मुळ प्रयोगात ते छान दिसत असे.
मुळात हे नाटक करमणुक म्हणुन बघता येत नाही. गांभीर्यानेच बघावे लागते. आणि अशी मानसिक तयारी असेल तर हि सीडी अवश्य बघावी.




Simeent
Thursday, March 09, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मागच्या रवीवारी वन टु का फ़ोर नाटक पाहीले. दीनानाथ नाट्यग्रुह मुम्बै. मस्त नाटक आहे. संजय नार्वेकर ने भुमिका चांगली वठवली आहे. फ़ारच विनोदी नाटक आहे, बघितले नसेल तर जरुर बघा.

Caljag
Thursday, March 30, 2006 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" खुर्च्यां " writer - V. Tendulkar

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators