Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 23, 2006

Hitguj » Language and Literature » साहित्यिक » मेघना पेठे » नातिचरामि » Archive through November 23, 2006 « Previous Next »

Mi_anandyatri
Thursday, October 12, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

i once again agree with this "critic"al post!!
pan aata yanantar ha mudda ithech thambavalela bara.....

Bee
Thursday, October 12, 2006 - 7:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Critic- जी व्यक्ती इथे येऊन duplicate ID घेऊन लिहिते त्यांनी नक्कीच मेघना पेठेंच्या पुस्तकाला वाटी जाऊ नये. मेघना पेठे GA ंपेक्षाही सुंदर लिहितात. नातीचरामी नसेल तितके चांगले पण त्यांचे इतर कुठलेही लिखाण घ्या ते चांगलेच असते.

Critic
Thursday, October 12, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही पुस्तके वाचून पाहिली पाहिजेत.
आता पहिली गोष्ट म्हणजे मी 'बीभत्स' हा शब्दप्रयोग कुठेही केला नाहीये. किंवा माझ्या कुठल्याही वाक्यातून तसा अर्थ निघत नाहीये. बोल्डनेस आणि बीभत्सपणा यात फरक आहे. आणि 'नॉटीचरामि' ही एक निखळ कोटी होती. असो.
मला वाटतं की मी ही पुस्तकं वाचल्याशिवाय आपल्यात चांगली चर्चा होऊ शकत नाही. आणि तुमच्या 'विचारकषा' (विचारकक्षा म्हणायचंय का?) वर मला काही म्हणायचं नाहीये... असल्या चर्चेत पडण्यापेक्षा मी मूळ विषयावरच बोलणं पसंत करीन.
आणि मला वाटतं की ज्ञानेश्वरी प्रत्येकच देवनागरी साक्षरास वाचता येईल.(निख़ळ विनोद. पांचट म्हणा हवं तर :-) )


Bee
Thursday, October 12, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादे पुस्तक वाचता येणे आणि ते समजवून घेता येणे ह्यात फ़रक असतो टिकाकार.

Naughty ही कोटी असेल तुमच्यासाठी पण पुस्तकांना नुसते मनोरंजनाचे केंद्रस्थान न समजणार्‍या वाचकांच्या भावना दुखावतात त्यामुळे ही एक गोष्ट आपण नेहमी लक्षात असू द्या.

एकतर आपण खोडकर ह्या अर्थी लहान पोरांना naughty म्हणतो किंवा चालू ह्या अर्थी मोठ्यांना म्हणतो.


Critic
Thursday, October 12, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या भावना दुखावल्याबद्दल मनापासून सॉरी. माझा उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नक्कीच नव्हता. असो.
मी मघाशीच म्हटल्याप्रमाणे, मला ही पुस्तके वाचल्याशिवाय त्यावर बोलायला आवडणार नाही.
माझा शेवटचा केवळ एक (निख़ळ पांचट) विनोद होता.


Shonoo
Thursday, October 12, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तरी या पुस्तकत नॉटी असं काही वाटलं नाही. माझ्या मते आनंद साधले यांच्या आनंद ध्वजाच्या कथा नॉटी म्हणता येतील. Boccaccio's Decameron मधे काही उत्कृष्ट नॉटी गोष्टी आहेत. त्यामानाने हे लेखन स्त्री पुरुष सम्बधांबाबत अगदी क्लिनिकल वाटेल अशा डिटेल लेव्हल वर लिहिलंय म्हणेन. नॉटिचरामी कोटि म्हनून म्हणणे ठीक.

मला तरी भाषा एकदम साधारण वाटली आणि शैली सुद्धा सुमारच वाटली. एखाद्या स्त्रीने, एका स्त्रीचा इतका एकांगी विचार इतकी पानं मान्डावा हे मला पटत नाही. एखादी दीर्घ कथा होऊ शकली असती त्या मूळ कल्पनेला फार ओढून ताणून कादम्बरी केलंय असं वाटतं.

त्या इस्त्रीवाल्यांवर किती पाल्हाळ लावलंय. इस्त्रीवाले रूपक जरी असले तरी इतकं तपशीलात विश्लेषण करण्यामागे काय हेतू असेल हे मला तरी कळले नाही.

एकदा अधाशासारखं घाई घाईत वाचलं. आता परत एकदा सावकाश वाचतेय. तेंव्हा परत लिहीनच.


Critic
Thursday, October 12, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं 'नॉटी' या शब्दावर उगीच जास्त चर्चा होत आहे. ती केवळ एक साधी कोटी आहे बस्स.
या पुस्तकाची शैली म्झणजे फ़क्त शब्दकळेबद्दल नाही बोलयचंय मला. तर एकूणच लिहीण्याचा जो फॉर्म आहे तो बरा आहे. म्हणजे मनातून एकामागून एक येणारे विचार मांडत राहणे. पुस्तक वाचतोय असं वाटतच नाही. एकदम एखादं मन वाचतोय असं वाटतं. अर्थात ही स्टाईल काही नविन नाही. ह.मो.मराठे यांचं 'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' हे कुणी वाचलंय का? त्यातही अशीच शैली आहे. फक्त त्यात मनाची अजून आतली अवस्था शैली म्हणून वापरली आहे. तर ही स्टाईल आवडली फक्त.
बाकी शोनो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एकांगी विचार तर आहेच. इस्त्रीवाल्यांच्या उदाहरणातून नीती-अनीती मधला जो सूक्ष्म झगडा मांडलाय ना, ते जरा वेगळं वाटलं.
आणि हो, काही प्रेमप्रकरणं कमी केली असती तर नक्कीच एक चांगली दीर्घकथा झाली असती!! :-) (मंडळी राग नसावा!)


Milindaa
Thursday, October 12, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी राग नसावा <<< आम्हाला कशाला राग येईल? ती काय आम्ही केलेली प्रकरणं आहेत? :-)

Farend
Thursday, October 12, 2006 - 11:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही पुस्तक झेपले नाही. उत्तरार्धात तर अधली मधली पाने इकडे तिकडे टाकून (म्हणजे क्रम बदलून) पुन्हा बाईंड करून वाचले असते तरी मला पत्ता लागला नसता.

Tanyabedekar
Friday, October 13, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मेघना पेठेंच फक्त हे एकच पुस्तक वाचले आहे. टीकाकाराने म्हटल्याप्रमाणे जी एंची मेघना पेठे यांच्याशी तुलना करण्यासाठी उरलेले कथासंग्रह वाचायला पाहिजेत. त्याशिवाय बोलणे व्यर्थ.
नतिचरामि चा फॉर्म खरेच वेगळा आहे. पण ते सोडुन अजुन काही खास नाही. स्त्रीने लिहिले आहे हा काही साहित्य मूल्यमापनाचा दंडक असु शकत नाही (माझ्या मते). वासुनाका वगैरे पुस्तके ३० एक वर्षांपुर्वी येउन गेली तरी आपण हे पुस्तक बोल्ड आहे असे म्हणने थोडे विचित्र आहे नाही का?
आता फक्त फॉर्म वेगळा आहे म्हणुन पुस्तक चांगले होवु शकत नाही. आषय हा कुठल्याही कलाक्रुतीचा अत्यंत महत्वाचा भाग. मांडणी, संवाद, घटनांचा क्रम ह्या गोष्टी बाह्यावरणाचे काम करतात. आषयाला नावीन्यपुर्ण फॉर्म कसा पुरक ठरतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रथचक्र आणि कोसला (पुन्हा माझ्या मते.. उगीच वाद्-विवाद नकोत).. या दोन्ही पुस्तकांमध्ये कथानक अतिशय बळकट आहे. त्यामुळे नवीन मांडणी चांगली वाटते. ह्याउलट नतिचरामि मध्ये थोड्या पानांनंतर नुस्ता फॉमच उरतो. कथानक अधुन्-मधुन येते. नतिचरामि कदाचित एक चांगली दीर्घ्-कथाकादंबरीका
(novellette) झाली असती (कादंबरीका उदा.: प्रवासी, सेरेपी एस्किलार एलि-- जी ए, the man who died by DH Lawrence etc)
कोसला मध्ये सुद्धा जो शेवटचा भाग आहे जिथे पांडुरंग गावी परत जातो, तो भाग फॉर्मच्या मागे लागुन आषयाकडे दुर्लक्ष झाले तर काय होते ह्याचे चांगले उदाहरण आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा शेवटचा भाग कोसलाच्या नंतरच्या आवृत्त्यांमध्ये आला.

Chafa
Wednesday, November 22, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्षभर उशीराने का होईना, शेवटी एकदाचे ते infamous असे 'नातिचरामि' वाचले. गेल्या वर्षी इथे झालेला उहापोह वाचला होताच, तो हे लिहिण्यापूर्वी पुन्हा एकदा वाचून काढला. दिनेश, तुम्ही लिहिलेले पुष्कळसे मुद्दे पटले नाहीत. त्याबद्दल मला जे वाटले ते थोड्क्यात लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. ही केवळ माझी मते आहेत. तुमचा लेखिकेवरचा राग स्पष्ट कळत असूनही मला जे पटले नाही ते सांगावेसे वाटले ते तुमच्या क्रमवार मुद्द्यांनुसार
१. सर्वनामांचा कहर मला अजिबात जाणवला नाही. ठराविक पात्रांभोवती पुस्तक फिरत रहाते त्यामुळे कुठे कोणाबद्दल बोलणं सुरु आहे हे संदर्भानुसार समजायला अजिबात अवघड नाही.
२. नायिका सिगरेट ओढते हा मुद्दा घेऊन निषेधाचे प्रयोजन अजिबात कळले नाही. अगदी शंभर टक्के मान्य की सिगरेट ओढणे हे आरोग्यास हानिकारक असते. मला स्वतःला सिगरेट ओढत असलेल्या माणसांशेजारी उभे रहाणेसुद्धा आवडत नाही. पण म्हणून कथानायिकेने सिगरेट ओढली तर त्याचा गहजब कशाला? हे म्हणजे शेरलॉक होम्सला चिरुट ओढताना दाखवलं तर त्या रहस्यकथा वाईट म्हणण्यासारखे झाले. आणि ती केवळ एक स्त्री असून सिगरेट ओढते यावर आक्षेप असेल तर ट्युलिप म्हणते तसे ते अजिबातच पटत नाही.
३. नायिका पैसे कसे कमावते हे न कळल्याचा काय संबंध? नायिकेचे जे मनोविचार, स्वगत, आयुष्य लेखिकेला रंगवायचे असेल नि जसे रंगवायचे असेल तसे रंगवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. पैसे मिळवण्याचा नायिकेचा स्त्रोत कुठला हा मुद्दा आलाच कुठून? आणि कशाला??? तिने नवर्‍याला पैसे दिले हे कल्पनातीत वाटत आहे का? असेल तर का?
४. नायिकेचा नवरा (हो, तो नायक नाही) आणि नायिका एकमेकांशी जे बोलतात ते सत्य नसेलही. पण ही सत्यकथा कुठे आहे? कदाचित त्या नवर्‍यालाच सत्य माहीत नसेल??? जे कथेतल्या पात्रांच्या तोंडी आहे ते लेखिकेने केलेले त्यांचे हुबेहूब व्यक्तिचित्रण आहे असे तर वाटत नाहीये ना? लेखिकेने प्रस्तावनेत म्हटले आहे की यातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत असा दावा त्या करु शकत नाहीत. पण पुढे असेही म्हटले आहे की याचा अर्थ असा नव्हे की सर्व घटना, प्रसंग, संवाद केवळ त्यांच्या जीवनाचे जसेच्या तसे रिपोर्टाज आहे. सत्य व कल्पना यांची बेमालूम सरमिसळ ही खरी लेखकाची कल्पनाशक्ति. तेव्हा त्यातल्या घटनांचा व त्यांच्या सत्यासत्यतेचा असा पंचनामा करणे व्यर्थ आहे.
६. पुन्हा एकदा लेखिकेने रंगवलेले नायिकेचे विचार पटण्यासारखेच आहेत. नायिकेने म्हटलेही आहे की मिक्सर लग्नाच्या वाढदिवसाला दिला असता तर एकवेळ चाललेही असते पण जेव्हा तिच्या स्वतःच्या वाढदिवसाला तिला मिक्सर भेट मिळतो तेव्हा तिला वाईट वाटून जाते. जेवण रांधण्यात बाईला अपमान वाटतो असा अर्थ कुठून काढला यातून? एखाद्याला नसेल स्वयंपाक करण्याची आवड. ती प्रत्येक बाईलाच असावीच (दोन्ही 'च' महत्वाचे) असे सुचवायचे तर नाही ना? एखाद्या टायपिस्टला; जो दररोज आठ तास टाईपरायटरवर काम करतो; त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी नवा कोरा इलेक्ट्रोनिक टाईपरायटर दिला तरी त्याला तो आवडेल का? तसेच आहे ते.
७. हवोवीबद्दल तसे सूचन केले गेले असे वाटले तरी मला कुठेही ते मर्यादा सोडून गेलेले वाटले नाही. ऐश्वर्या राय काय सुंदर दिसते असे कोणी बायका म्हणूच शकत नाहीत का? त्यातून अन्वयार्थ लावणे हे वाचकांच्या हाती आहे.
८. माझा सर्वात मोठा आक्षेप आहे तो तुमच्या या मुद्द्याला. मुळात माझा आक्षेप आहे तो या पुस्तकातल्या दर्जाहीन भाषेला. माझे तर मत हे आहे की ही भाषा पुस्तकात वापरण्याची काहीएक गरज नव्हती. पण तुमचा विरोध ही भाषा असण्याला नसून ती भाषा अस्सल नसण्याला आहे. आणि हे मला परत पटत नाही. कोणाची भाषा कशी असावी हे आपण कोण ठरवणार. जरी आपल्याला पटत नाही, किंवा 'आयदान' मधे कितीही 'अस्सल' भाषा वापरली असली तरी त्याचा अर्थ असा होत नाही की लेखिकेची भाषा खोटी वाटते. लता मंगेशकर सर्वोत्तम गायिका असली तरी अनुराधा पौडवाल पण ताकदीची गायिका आहे हा मुद्दा तुम्हाला आठवत असेलच. त्यातलाच प्रकार. माझा मूळ विरोध ती भाषा वापरण्यालाच आहे पण तुमचा नाही. तुम्ही म्हटले आहे की चपात्यांना पोळ्या म्हणणारी ही नायिका आहे आणि तिने वापरलेले विरजण, सस्तन प्राणी हे शब्द पाहून तुम्हाला हसू आले कारण तेवढेच शब्द खरे वाटतात. तर मग उलटपक्षी विचार करता, पोळ्यांना चपात्या म्हणणार्‍या वर्गाने विरजण, सस्तन प्राणी हे शब्द वापरुच नये का? ते त्यांना वर्ज्य आहेत का? आणि वापरले तर ते एवढे खटकतील? हे म्हणजे नवभारतच्या संपादकांनी पुलंच्या वाक्याचे "डुकराला डुक्कर म्हणावे, वराह म्हणू नये" या केलेल्या विपर्यासासारखे झाले! कोण कशी भाषा बोलतो हा ज्याच्या त्याच्या वैयक्तिक वातावरणाचा प्रश्न आहे. नायिका सुखवस्तू घरातली असून ती तथाकथित "बोल्ड" समाजवर्गात रहाते आहे तर तिची भाषा तशी असेलही व असली तरी "अस्सल" नसणारच की! त्यात एवढे खुपण्यासारखे काय आहे.

पुढे कुठेतरी असा मुद्दा मांडला गेला आहे की केवळ स्त्रीच्या दृष्टीतून मांडलेले एकांगी विचार यात आहेत. पुरुषाची बाजू मांडली नाही हा अन्याय वगैरे. मला हा मुद्दा अजिबात कळला नाही. ही एक कथा आहे, कोर्टात मांडलेले सत्य परिस्थितीचे वर्णन नाही. लेखिकेने कुठले पात्र रंगवावे, कुठले विचार मांडावेत, कुठली बाजू घ्यावी हा पूर्णपणे तिचा कॅन्व्हास आहे. पुरुषाची बाजू असेल, नव्हे आहेच; पण या कथेची केवळ एक नायिका आहे. यात नायक नाही. लेखिकेला केवळ स्त्रीचीच बाजू रंगवायची आहे हे स्पष्ट आहे. पण त्याचा जाब विचारण्याचे कारण काय? शिवाजीची गोष्ट सांगतांना सईबाईंची जीवनगाथा का सांगितली नाही म्हणून आरडाओरडा करण्यासारखे वाटले हे!

टीपः इथे व्यक्त केलेली सर्व मते केवळ माझी वैयक्तिक आहेत. ती कोणावरही लादण्याचा प्रयत्न नाही. प्रत्येकाला वैयक्तिक मत असण्याचे स्वातंत्र्य आहे व त्याचा मला आदर आहे. पण केवळ आधीची पोस्टस वाचून पुस्तकाबद्दल एकांगी मतप्रणाली होऊ नये म्हणून मला काय वाटले ते लिहिले. पुस्तकातले अधूनमधून येणारे घाणेरडे शब्द सोडले तर मला भाषाशैली आवडली. काही काही वाक्यं, विचार, अलंकार फार सुरेख आहेत. त्या वाक्यांवर रेंगाळून पुन्हा वाचण्याइतके. अनेक जागी (मी वाचलेल्या आवृत्तीत तरी) अगदी अक्षम्य असे मुद्रणदोष आहेत, खास करुन इंग्रजी शब्दांमधे. कथेला खास असे 'कथानक' नाही. सगळा विचारांचा खेळ आहे. कधी कधी तो नको तेवढा खेचल्यामुळे पटत नाही. पण पटण्यासारखे देखील विचार आहेत.

मला तरी हे पुस्तक वाचताना कंटाळा आला नाही किंवा ते वाचल्याचा पश्चात्तापही झाला नाही.


Raina
Wednesday, November 22, 2006 - 8:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा- एक विचारु का? तुम्हाला ह्या पुस्तकात काय आवडलं, किंवा त्याचे साहित्यिक मुल्य काय आहे असे वाटते? Form and Content वगैरे? Poitboilers किंवा अगदी canons of marathi literature ह्या पैकी कुठल्या सदरात ते बसतं असे वाटते?
हे जरा विस्तृतपणे सांगणार का please? .
just wanted to know as you quoted O-Henry once.


Lopamudraa
Wednesday, November 22, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्त्रीचीच बाजू रंगवायची आहे हे स्पष्ट आहे. पण त्याचा जाब विचारण्याचे कारण काय? शिवाजीची गोष्ट सांगतांना >>>>. आणि स्रीची कोणती बाजु रंगवली आहे?...
शिवाजि चे उदाहरण?


Tulip
Wednesday, November 22, 2006 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि स्रीची कोणती बाजु रंगवली आहे?... >>>

लेखीकेला पूर्ण स्वातंत्र्य असू शकते तिला त्या त्या कथानका संदर्भात अभिप्रेत असणारी बाजू रंगवण्याची. मग ती योग्य अयोग्य कशीही असू शकते. शिवाय कोणतीही प्रातिनिधिक बाजू किंवा आपल्या दृष्टीने चुक बरोबर बाजू प्रत्येक वेळी रंगवलीच गेली पाहीजे असा अट्टाहास का?

आणि मला वाटत शिवाजीचे उदाहरण पुरुषप्रधान अथवा स्त्रीप्रधान व्यतिरेखांच्या बाबतीतले म्हणणे अधिक योग्य पणे स्पष्ट करण्यासाठी दिले गेलेले आहे.

मागे जो वाद झाला होता त्यात कोणत्याही प्रकारे साहित्यीक मूल्य वगैरे बाबत वाद झालेलाच नव्हता. रैना .. मला वाटत आताही चाफ़ा त्यासंदर्भात बोलतच नाही आहे. वाद 'भलत्या'च बाबीं साठी आक्षेप घेतला असल्या कारणाने झाला होता. त्या संदर्भातच आता चाफ़ा ने मुद्दे अधिक योग्यपणे मांडले आहेत. :-)

sorry प्रश्न चाफ़ा ला उद्देशून विचारले गेले असताना मी 'मधेच' बोलले. yu can continue...:D


Raina
Wednesday, November 22, 2006 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं Tulip तो प्रश्न लोपानी विचारला आहे.
मी चाफ्यानी मांडलेल्या मुद्यांविषयी काहीच लिहिलेले नाहीये. मला फक्त त्या पुस्तकाचा literary value बद्दल विचारायचे होते.


Robeenhood
Wednesday, November 22, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry प्रश्न चाफ़ा ला उद्देशून विचारले गेले असताना मी 'मधेच' बोलले. yu can continue...:D >>>>>
दोन व्यक्ती बोलत असताना 'मधेच' बोलणे हितगुजवर अपराध मानला जात नाही. खानदानी चोम्बडेपणा हे तर हितगुजकरांचे व्यवच्छेदक लक्षण आहे...
किम्बहुना या चोम्बडेपणा, भोचकपणावर तर हितगुज चालू आहे:-)




Dineshvs
Wednesday, November 22, 2006 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, एका वर्षाने, त्या पुस्तकाबद्दल मला काहि आठवावेसे वाटतच नाही. अजुनहि माझ्या मुद्द्यांवर मी ठाम आहे. आणि त्यापैकी अनेक अनुत्तरीत आहेत.
हा विषय मी माझ्यापुरता केंव्हाच संपवला होता.
या पुस्तकाला अगदी ज्ञानपिठ पुरस्कार मिळाला, तरी हरकत घेणारा मी कोण ?
मी त्यावेळीहि, अनुराधा पौडवालबद्दलच्या तुझ्या मतांचा आदर केला होता. या मतांचाहि करतो. एकमत व्हावे अशी अपेक्षा कधीच नव्हती.


Chafa
Thursday, November 23, 2006 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेश. :-)

रैना, पुस्तकाचे साहित्यिक मूल्यमापन करण्याची अवघड जबाबदारी माझ्यावर सोपवू नका. :-) पण एक सामान्य वाचक म्हणून एखादे पुस्तक आवडले किंवा आवडले नाही अशा दोनच गटांमधे वर्गवारी करायचे झाले तर हे पुस्तक मी पहिल्या वर्गात टाकेन. म्हणजे potboiler किंवा अद्वितीय वगैरे विशेषणं मी या पुस्तकाला लावणार नाही पण ते मला 'टाकाऊ' ही वाटत नाही. (म्हणजेच त्यात थोडेफार तरी साहित्यिक मूल्य असावे?) मी आधी म्हटल्याप्रमाणे मला खटकलेली भाषा आणि क्वचित झालेला विचारांचा अतिरेक अशा एखाददोन बाबी सोडल्या तर पुस्तक आवडले. लिहिण्याची पद्धत आवडली. वेग आवडला. रुपकं आवडली. भाषाशैली आणि शब्दप्रतिभा आवडली. (खटकलेले संदर्भ वगळता). वाक्यरचना आवडल्या. वेगवेगळ्या गोष्टी सांगत कथा आणि विचार फुलवण्याची हातोटी दिसली. एखादे पुस्तक किंवा कलाकृती म्हणूया, ते साहित्यक्षेत्रात (कलाक्षेत्रात) कुठल्या स्थानावर आहे हा मुद्दा मला गौण वाटतो. आता हे पुस्तक प्रत्येकाला आवडावे असा काही माझा आग्रह नाही, आणि नव्हता. आणि ते मला प्रचंड आवडले आहे वगैरे असेही नाही. पण ते न आवडल्याची दिलेली कारणेच असंयुक्तिक वाटल्याने माझे मत मांडले. कुठल्याही कलाकृतीला दुसर्‍या कलाकृतीबरोबर जोखून त्याचे मूल्यमापन करणे मला तितकेसे रुचत नाही. मग ते साहित्य असो वा संगीत. या विषया संदर्भात इथली यापूर्वी लिहिलेली वाटसरु, पमा, अज्जुका, ट्युलिप, रॉबिनहूड यांची मते पूर्णपणे पटली. असो.


Bhagya
Thursday, November 23, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा, या पुस्तकाच्या बाबतीत एकमत होणे अगदी कठीण आहे. पण मी मांडलेल्या काही गोष्टी पटतायत का बघा.

१)लेखिकेने एका स्वतंत्र स्त्री चे व्यक्तिमत्व रेखाटले आहे. ही स्त्री स्वतंत्र बाण्याची असायला, घटस्फ़ोटित असायला किंवा दोन वेळा लग्न प्रेम करणारी असायला काहीच हरकत नाही. कारण आयुष्याच्या प्रवाहात लोकांवर अगदी विचित्र प्रसंग येतात आणि अगदी अकल्पनीय, अतर्क्य अशा घटना घडतात. पण स्वतंत्र बाण्याची असणे म्हणजे
(१)"सणासुदीला दागिना घालतात तशी सिगरेट ओढणारी" असावी का?
मुळात दागिना ही गोष्ट अभिमानाने मिरवायची असते, मंगल प्रसंगी किंवा विशेष प्रसंगी घालायची असते. सिगरेटचे ते स्थान भारतीय स्त्रियांच्या मनात आहे का?
(२)जाणूनबुज़ून तंबाखू खाऊन बघणारी असावी का?
(३)भाषा शिवराळ वापरणारी असावी का?

२)हे तर कबूल करायलाच हवे की लेखक्लेखिका ज्या समाजात वावरतात त्या समाजाशी, सामाजाच्या चालीरीतींशी, नैतिक आणि वैचारिक मूल्यांशी त्यांची अलिखित बांधिलकीकरार असतो योग्य त्या गोष्टी समाजात प्रसारित करण्याचा. जसे ज्ञानेश्वरी वाचून, दुर्गा भागवतांची पुस्तके वाचून काही बोध मिळतो, काही चांगल्या गोष्टी शिकल्याचेसमजल्याचे समाधान मिळते.
नातिचरामी वाचून काय कळते?काय मिळते? what message do we get out of it? किति जणांना आपल्या आई, बहिण किंवा पत्नीने असे वागलेले रुचेल?

३)रैना सारखाच literary value चा प्रश्न मला पण पडला होता. आज हे पुस्तक मला माझ्या मुलांना वाचायला द्यायला आवडेल का? तर नाही हेच उत्तर आहे. त्याऐवजी मी त्यांना दुसरी अनेक सुंदर, जसे की मारुती चितमपल्लींचे चकवाचांदणे वाचायला देईन.

पुस्तक bold असण्याला हरकत नाही, पण कथानकाची ती खरोखर गरज हवी. ह्या पुस्तकात बर्‍याच गोष्टी ओढून ताणून लिहिल्या आहेत.

आजकाल आपली तरूण पिढी पाश्चात्यांचे अंधानुकरण करतेय वेडेवाकडे मॉडर्न कपडे घालून, पब आणि डिस्कोत जाऊन, इतकेच नव्हे तर भरपूर फ़ोर लेटर वर्ड्स वापरून. ती जशी एक (न थांबवता येणारी) क्रांती तशीच असे लिहिणे पण असे म्हणून गप्प बसावे लागेल!

बाकी सगळ्यांच्या मताचा आदर आहेच.





Chafa
Thursday, November 23, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्या, तुमचा मुद्दा क्रमांक २ वाचला आणि त्याच्याशी मी सहमत नाही. अशी कुठलीही बांधिलकी कोणत्याही लेखकावर कोणी लादली? तुम्ही पुस्तकाची प्रस्तावना पुन्हा एकदा वाचा ही विनंती. 'Fiction' हा जो प्रकार असतो तो काही (नेहमीच) परग्रहावरच्या जीवनाबद्दल नसतो. तो असतो आपल्यासारख्याच माणसांभोवती व त्यांच्या दैनंदिन आयुष्याभोवती फिरणारा. पण याचा अर्थ असा नाही की समाजातल्या जीवनाचे ते जसेच्या तसे प्रतिबिंब आहे, मार्गदर्शक आहे, किंवा बोधप्रद आहे वगैरे वगैरे. त्यात अनेक कल्पनारम्य प्रसंग, विचार, संवाद गुंफलेले असतात. असाधारण घटना असतात. त्यातील पात्रे नेहमीच 'आदर्श' जीवन जगत नाहीत. चुका करतात, खोटे बोलतात, दारुही पितात इत्यादी (आणखी यादी वाढवायची गरज नसावी). पण असे असतानाही कुठेतरी एखादा कोपरा आपल्या (वाचकाच्या) आयुष्याशीही जोडून असतात. त्यातले काय वेगळे आहे आणि काय जोडलेले आहे हे ओळखण्याची सूज्ञता वाचकावर आहे. लेखिकेला जर (कल्पनारम्य) नायिका कशीही रंगवायची असेल तर त्यात वावगे काय? (सिगरेट वगैरे मुद्दे). ती नायिका काही समाजाचे प्रतिनिधीत्व किंवा नेतृत्व करत नाही अशा fictional कादंबरीतून. या सोप्या विचारात एवढी गफलत का व्हावी ते कळत नाही.
तसेच, कोणत्याही पुस्तकामधून एखादा good message मिळाला तरच ते चांगले का? मग सहित्यक्षेत्रातल्या अर्ध्याहून अधिक कलाकृतींना रद्दीत टाकावे लागेल! There may be or may not be any message out of a book. A book can not be classified as good or bad solely on the merit of what "message" it conveys, or on the fact that there is a message to begin with or not. तसेच मुलांना हे पुस्तक वाचू देता न येण्याचा मुद्दा इथे अयोग्य आहे. लहान मुलांना हे पुस्तक देता येत नाही म्हणून ते वाईट असे म्हणता येत नाही.

पुन्हा एकदा, तुमचा भाषेचा मुद्दा मला मान्य आहेच. ती भाषा नकोच होती. पण त्या भाषेपलिकडे जाऊनही पुस्तक आहे हे महत्वाचे! माझे इथे लिहिण्याचे प्रयोजन ते पुस्तक फार चांगले आहे असे म्हणण्यासाठी नव्हते; तर न पटणार्‍या कारणांसाठी पुस्तक कसे 'टाकाऊ' आहे असे दर्शवण्याच्या मतप्रणालीविरुद्ध होते. असो, माझ्यासाठीही हा विषय इथे संपला.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators