'नमष्कार, मैं रवीश कुमार!' - श्री. श्रीरंजन आवटे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.

रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.

raveesh.jpg

इथं राहणं शक्य नाही, ये अपने बस की बात नहीं, असं स्वतःशी पुटपुटत तो स्टेशनवर आला. उंचच उंच इमारती पाहून त्याला आपण आणखीच खुजे आहोत, असं वाटू लागलं. जनरल डब्यातल्या माणसानं एसी कम्पार्टमेन्टकडं औत्सुक्यानं, भीतीनं पाहावं, तसा तो या शहराकडं पाहत राहिला. मॉल्स-हॉटेल्स-फ्लायओव्हर्स…. सारी आधुनिक संस्कृती आपल्या अंगावर धावून येते आहे, हे पाहून जीव मुठीत धरून तो गावी पळू लागला. इंग्रजी भाषेतल्या व्यवहारानं जणू त्याला धमकी दिली. ही देशाची राजधानी. ये महफिल मेरे काम की नहीं. गड्या आपला गाव बरा, अशी मनाची समजूत घालत तो निघाला. त्याचा गावचा दोस्त चंद्रशेखर सोबत होता. दोघांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. निघताना एकवार त्यानं वळून पाहिलं शहराकडं, तर शहर त्याला खुणावत होतं. एक सुप्त आमंत्रण देत होतं आणि तो म्हणाला -

मैं आज स्माल टाउन-सा फील कर रहा हूं
और मैं मेट्रो- सी ।
हां, जब तुम साउथ एक्स से गुजरती हो, मै करावल नगर-सा फील करता हूं ।
चुप करो। तुम पागल हो। दिल्ली में सब दिल्ली-सा फील करते हैं ।
ऐसा नहीं है । दिल्ली में सब दिल्ली नहीं है । जैसे हर किसी के आंखो में इश्क नही होता..
अच्छा, तो मैं साउथ एक्स कैसे हो गयी ?
जैसे की मै करावल नगर हो गया ।
सही कहा तुमने..
ये बारापुला फ्लाइओवर ना होता तो साउथ एक्स और
सराय काले खां की दूर कम न होती ।
तुम मुझसे प्यार करते हो या शहर से ?
शहर से; क्योंकि मेरा शहर तुम हो ।

त्याला हा आवाज ऐकू आला तेव्हा चंद्रशेखर गावी परतला होता, पण तो मात्र परत या शहराकडं वळला होता आणि त्याचं अवघ शहर प्रेमात बुडालं होतं! शहराला त्यानं कवेत घेतलं होतं आणि शहरानंही त्याला. ‘इश्क में शहर होना’ या रवीश कुमारच्या लप्रेक मधील ही एक. लप्रेक म्हणजे लघु प्रेम कथा. फेसबुकवर थोडक्यात लिहिलेल्या गोष्टींचं पुस्तक झालं.

बिहारच्या चंपारण जिल्ह्यातल्या छोट्याशा मोतीहारी गावातला रवीश नावाचा तरुण जेव्हा दिल्लीत आला तेव्हा दिल्ली तो बहुत दूर है असं वाटून परत फिरता फिरता मागे वळला आणि ‘रवीश कुमार’ झाला, त्याची ही गोष्ट.

अर्थातच हा प्रवास काही सोपा नव्हता. घरचं वातावरण अतिशय कर्मठ, पारंपरिक. वडील कनिष्ठ सरकारी नोकरीत.नातेवाइकांमध्ये जमिनीवरून वाद. अशा कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेला रवीश कुमार दिल्लीत आला आणि त्याच्यासाठी अवघं विश्वच बदललं. ग्रामीण सरंजामी परिवेशातून ‘ग्लोबल’, ‘मॉडर्न’ होत चाललेल्या दिल्लीत त्यानं पाऊल ठेवलं. खाजगीकरण-उदारीकरणातून आकाराला आलेल्या जागतिकीकरणाच्या प्राथमिक अवस्थेत सारंच बदलत होतं. सारा चेहरामोहरा बदलत होता. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणा-या पत्रकारितेत होणारे बदल तर अधिक ठळक होते. एकीकडे प्रिंट मिडीयाचा आणखी विस्तार होत होता, तर इलेक्ट्रॉनिक मिडीया नव्यानेच उदयाला येत होता. पत्रकारिता अधिकाधिक ‘प्रोफेशनल’ बनत चालली होती. पत्रकारितेला ग्लॅमर मिळू लागलं होतं. अशा काळात बीए हिस्ट्री करून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन'मधून पूर्ण करून रवीशने एनडीटीवी जॉइन केलं. वार्ताहर म्हणून अल्पवेतनावर तो काम करू लागला; पण एनडीटीव्ही म्हणजे जणू नासाचं ऑफिस आहे, इतकं अनोळखी आणि भीतीदायक त्याला तिथे वाटत होतं. देशभरातून आलेले अनेक वार्ताहर एनडीटीव्हीत रुजू झालेले. एनडीटीव्हीत पडेल ते काम त्यानं केलं. आपण जी स्टोरी कव्हर करतोय ती इतरांच्या इतकीच, त्याच दर्जाची असेल का, अशी भीतीही त्याच्या मनात होती. त्यावेळी राजदीप सरदेसाई यांचा खूप धाक होता. त्यांची भीती वाटायची म्हणून मी मागच्या दरवाजाने ऑफिसला येत असे, असं रवीश सांगतो. एके दिवशी रवीशनं वाढवलेल्या केसांवर चिडून राजदीप म्हणाले, “ तुम यहां रिपोर्टर बनने आये हो या हिरो बनने? क्या देवानंद जैसे बाल बढा रखे है !” या आणि अशा अनेक गोष्टींनी दबलेला रवीश रिपोर्टिंग करू लागला, तेव्हा त्याच्या मनात कमालीची भीती होती. त्याची भाषा गावंढळ आहे, स्टाइल गावठी आहे वगैरे टीका अभिजन-प्रस्थापित पत्रकारांनी केली; पण गावाकडची आपली मुळं न विसरता तो शहरानं परिघाबाहेर ढकललेल्या लोकांचे प्रश्न मांडू लागला. ‘रवीश की रिपोर्ट’ या त्याच्या वार्तांकनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कुठल्याही प्रश्नाच्या मुळापर्यंत जायची त्याची वृत्ती त्याला झोपडपट्टीपासून ते अगदी जी. बी. रोडपर्यंत घेऊन गेली. ‘जी बी रोड-एक अंतहीन सडक’ हे त्याचं रिपोर्टिंग रेड लाइट एरियाच्या आसपास राहणा-या इतर लोकांना तोंड द्याव्या लागणा-या समस्यांच्या बाबत होतं. केवळ पत्त्यात जी. बी. रोडचा उल्लेख आहे म्हणून इतर समाजानं तिथं राहणार्‍यांवर टाकलेला बहिष्कार, असा वेगळा विषय प्रभावीपणे त्यानं मांडला.

त्याच्या रिपोर्टिंगचं वेगळेपण अनेक गोष्टींमध्ये आहे. मुळात आपण टीव्हीवर आहोत, याचा कुठलाच आवेश त्याच्या सबंध देहबोलीत नसतो. जिथे जातो तिथल्या माणसांमध्ये इतक्या सहजपणे मिसळून जातो की, हातात माइक नसला की तो त्या वस्तीतच अनेक वर्षांपासून राहतो आहे, असं प्रेक्षकाला आणि त्या वस्तीतल्या माणसांनाही वाटतं. कधी कामगारांच्या सोबत त्यांच्या ताटात जेवता जेवता रिपोर्टिंग करतोय, तर कधी मायावतींच्या प्रचारसभा हत्तीवर बसून कव्हर करतोय, तर कधीकधी गलिच्छ वस्त्यांमधल्या अरुंद बोळातून जात, कारमधून, सायकल-रिक्शेतून, कुठल्यातरी इमारतीच्या गच्चीतून अशा वेगवेगळ्या प्रकारे रिपोर्टिंग करण्याचं त्याचं अफलातून कसब अनुकरणीय आहे. ट्रायपॉड न वापरता रिपोर्टिंग करणं त्यानं सुरू केलं. त्यामुळे अनेक अंधा-या जागांपर्यंत तो पोहोचू शकला. त्या त्या ठिकाणाच्या लोकांनाही तो सहज बोलतं करू लागला. कॅमेरामुळं येणारं अवघडलेपण त्याच्या देहबोलीत कधीच परावर्तित होत नाही. अनेक वेळा रवीश बोलत असतो आणि कॅमेरा मात्र रवीशच्या ऐवजी तो परिसर किंवा तो विषय अधिक नीट समजेल अशा गोष्टींवरून फिरत असतो. त्यावरून रवीश किती उत्तम दिग्दर्शक आहे, याची प्रचिती येत राहते. रवीश बोलत असतो स्वच्छ भारत मोहिमेविषयी आणि कॅमेरा फील्डवरच्या कचर्‍याच्या ढिगावरुन फिरत असतो. राजकीय संघटनांचा व्यापक पट त्याच्या कथनात, तर गल्लीबोळांमध्ये लावलेल्या छोट्यामोठ्या राजकीय संघटनांचे पोस्टर आपण टीव्हीवर पाह्त असतो. मुळात रिपोर्टिंग करताना कुठलाच पूर्वग्रह त्याच्या मनात नसतो. फील्ड-स्टोरीसाठी आपण कधीही गूगल सर्च केला नसल्याचं तो सांगतो. फील्डवर त्याला स्वतःला आणि प्रेक्षकाला वास्तवाचा चिमूटभर तुकडा एकाच वेळी गवसत असतो. हे वास्तवाचं आकलन आणि त्याचं विश्लेषित स्वरूप तो थोड्या वेळात प्रेक्षकापर्यंत संक्रमित करत जातो. त्याची भाषा इतकी साधी आणि प्रवाही असते की त्यातून सामान्य प्रेक्षकासोबत त्याची पटकन नाळ जुळते. ‘ है ना’ हे खास बिहारी टोनमध्ये म्हणत तो सर्वांसोबत दिलखुलास हसतो. या रिपोर्टिंगला अनेक चाहत्यांचे, प्रेक्षकांचे इमेल्स, फोन येऊ लागले त्यातूनच आपल्याला प्रेक्षकाला काय हवे, हे समजू लागल्याचं रवीश सांगतो. त्याच्या बोलण्यात असलेला हलकासा उपरोध किंवा कोपरखळी हे खास रवीश-शैलीतलं अगदी युनिक असतं. एका कामगारवस्तीत डबक्यावर असलेल्या एक फूट रुंदीच्या फळीवरुन जाताना रवीश म्हणतो-“ प्लीज मनमोहनसिंग वॉच रवीश की रिपोर्ट. इंग्लिश में वैसे भी इंडिया हमेशा डेवलप्ड ही लगता है !”

‘रवीश की रिपोर्ट’ नंतर 'प्राइम टाइम' सुरू झालं आणि रात्री ९ ते १०चा स्लॉट रवीशला मिळाला. या प्राइम टाइममध्ये त्यानं अनेक बदल केले. पॅनेलिस्ट सोबत घेऊन केल्या जाणा-या चर्चेतही किमान ४ ते कमाल ७ मिनिटांची त्याची प्रस्तावना असते. त्याच्या प्रस्तावनेच्या नंतर उर्वरित कार्यक्रम पाहिला नाही तरी किमान विषयाची प्राथमिक माहिती प्रेक्षकाला झालेली असते. या प्रस्तावनेत विषयाची शक्य तितकी सखोल, सर्वांगीण ओळख करुन देण्याचा तो प्रयत्न करतो. माहिती किंवा विश्लेषण यांचे संदर्भस्रोत तो सांगतो. त्यानंतर केल्या जाणा-या चर्चेतही आरडाओरडा न करता सर्वांना बोलायला तो वेळ देतो. त्यात स्वतःचा पूर्वग्रह बाजूला सारुन तो चर्चा घडवून आणतो. युपीएससीच्या नागरी सेवेच्या मुख्य परीक्षेत इंग्रजी माध्यम आणि पूर्व परीक्षेतील सीसॅट पेपरमध्ये इंग्रजीचे प्रश्न वगळणे या संदर्भात चर्चा सुरू होती आणि शांतपणे चर्चा सुरु असताना रवीश म्हणाला, “अब समझ में नही आ रहा है अपनी राय क्या बनाये - दोनो साइड में तथ्य है..” या त्याच्या विधानावरून तो चर्चेत स्वतःसह प्रेक्षकांना बदलण्याची, त्यांचं मतपरिवर्तन करण्याची दारं किलकिली करतो, हे लक्षात येतं. मुख्य म्हणजे रवीशचा प्राइम टाइम शांतपणे ऐकता येतो. सहसा इतर बहुतांश चर्चांमध्ये इतका गोंधळ असतो की कोणताच मुद्दा धड पोहोचत नाही. त्यात ॲन्करचा अभिनिवेश असेल तर एकतर्फी चर्चा होत राहते. या प्राइम टाइमच्या स्वरूपातही त्याने अनेक बदल केले. खूप वेळा फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करत त्याने तो तो विषय मांडला. प्राइम टाइमची प्रयोगशीलता हा खरंतर स्वतंत्र विषय आहे. त्यातल्या काही निवडक कार्यक्रमांचा आढावा घेतला, तरी या प्रयोगांचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. हरियाणातल्या खाप पंचायतीच्या संदर्भात शो करताना या पंचायतीच्या बळी असलेल्या स्त्रियांनाच त्यानं शोमध्ये बोलावलं. त्यांच्या कथनातून खाप पंचायतीच्या कर्मठ, जुलुमी, समांतर ‘न्याय’यंत्रणेची विदारक अवस्था अधोरेखित झाली. मागील आंबेडकर जयंतीला भीमजयंतीच्या विविध कार्यक्रमांतून सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बातचीत करत आंबेडकर विचार कितपत झिरपलाय, याची चाचपणी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. अगदी पाच सप्टेंबरला जेव्हा मोदींनी त्यांचं भाषण ऐकणं शाळाशाळांमध्ये कम्पलसरी केलं, तेव्हा रवीश एका सरकारी शाळेत गेला आणि स्वत: काहीही न बोलता तिथल्या मुलांशी, शिक्षकांशी बोलताना त्यानं भाषणाच्या सक्तीतला पोकळपणा समोर आणला. सेल्फी हा राष्ट्रीय रोग आहे, असं रवीशचं एक आवडतं वाक्य. कुठेही, कसाही सेल्फी काढण्याचा होत असलेला अतिरेक याविषयी त्यानं एक शो केला. या शोमध्ये पूर्ण वेळ तो एकटाच बोलत होता - सेल्फी काढण्याची वृत्ती आणि त्यातल्या समूह मानसिकतच्या विविध पैलूंविषयी.

सामूहिक संस्कृतीचं संचित समजावं आणि त्यातून आपल्या हाती काही ठोस यावं, असा त्याचा प्रयत्न असतो. यासाठी लोककथा, लोकसंस्कृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महम्मूद फारुकी यांच्यासह विक्रमादित्याच्या काही कथांवर दास्तानगोईचा रवीशने एक शो केला. अखलाखच्या हत्येनंतर सर्वांत प्रथम तो त्या दादरीला पोहोचला आणि तिथल्या गावकर्‍यांमध्ये पसरलेली दहशत आणि अखलाखच्या सामूहिक खुनाचं सत्य समोर न येऊ देण्यासाठी केलेला कट पाहून जणू अखलाख मेलाच नाही - हवां का एक झोंका आया और अखलाक चला गया - असं तो म्हणाला. जणू तो गेला ही अफवाच होती की काय असं वाटावं, असं निर्मिलेलं वातावरण त्यानं जेव्हा समोर आणलं तेव्हा अंगावर काटा आला. अगदी अलीकडेच त्यानं १५ ऑगस्टपूर्वी एक शो केला. यात 'तुम्ही पंतप्रधान झालात तर लाल किल्ल्यावरून काय भाषण कराल', असा प्रश्न विचारून त्यातून जनमानसाची नस शोधण्याचा प्रयत्न केला. जेएनयुमधील कथित 'देशविरोधी' घोषणांनंतर काही वृत्तवाहिन्यांनी मिडिया ट्रायल घेत कन्हैय्याकुमारसह काहीजणांना देशद्रोही म्हणून घोषित केलं. एखादी घोषणा देणं अथवा न देणं ही देशभक्तीची / देशद्रोहाची पूर्वअट बनवणं आणि घटनेची सत्यता न पडताळता केलेलं वृत्तांकन हे बेजबाबदारपणाचं लक्षण होतं. रवीशनं या सार्‍या परिस्थितीवर एक अभूतपूर्व शो केला. स्क्रीन पूर्ण अंधारमय. ‘मैं आपको अंधेरे में लेकर आया हूं - यही आजकी टीवी की तस्वीर है- आपके टीवी का सिग्नल बिलकुल ठीक है’ असं सांगत तो आजच्या टीव्ही पत्रकारितेची अवस्था आणि इथेतिथे सर्वत्र विस्तारत चाललेला उन्माद यांचे केवळ आवाज ऐकवत राहिला. टीव्ही डिबेटमधले अभिनिवेशी, रागीट, आक्रस्ताळे आवाज, घोषणांचे आवाज, धमकावणारे आवाज... असे सारे आवाज तो ऐकवत राहिला. सारी स्क्रीन अंधारमय. तीवर काही अक्षरं उमटत राहिली आणि टीव्हीचा सिग्नल व्यवस्थित असल्याबाबत आश्वस्त करताना खूप काही अस्वस्थ करणारं तो सांगत राहिला. अंधार्‍या वास्तवाला विखारी आवाजांचं पार्श्वसंगीत असं प्रतीकात्मक दर्शन घडवणारा तो शो सीएनबीसी-आवाज या चॅनलनं एनडीटीवीच्या सौजन्यानं प्रसारित केला. सीएनबीसी-आवाजसारखा पूर्णतः व्यावसायिक चॅनलनं एनडीटीवीचा शो प्रसारित करणं, यासारखी घटना टीव्ही पत्रकारितेतली कदाचित एकमेव अथवा पहिलीच असावी.

रवीशनं घेतलेल्या मुलाखती हा एक स्वतंत्र अध्याय आहे. ज्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे, तिचा आधी पूर्ण अभ्यास करून तो आलेला असतो. काही वेळा त्याच्या हातात आकडेवारी, वृत्त, संदर्भ लिहिलेला कागदही असतो. कन्हैय्या असो वा योगेंद्र यादव वा लालूप्रसाद, कुणालाही अवघड प्रश्न विचारताना तो जरासाही कचरत नाही. नेत्यांच्या सबगोलंकारी उत्तरांना आव्हान देत तो पुन्हा त्यांना तोडून प्रश्न विचारत राहतो. त्यातही निवडणूक-काळात त्यानं केलेलं वार्तांकन आणि मुलाखती अधिक विशेष. दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी रवीशनं किरण बेदींची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यानं किरण बेदी यांच्या राजकारणात येण्याच्या निर्णयापासून ते आण्णा आंदोलनात त्यांनी केलेल्या भाष्यापासून ते त्यांच्या आश्वासनापर्यंत सर्व बाबींवर प्रश्न विचारले. बागेत चालत चालत घेतलेल्या या मुलाखतीच्या दरम्यान किरण बेदी गोंधळल्या. रवीशच्या साध्या साध्या प्रश्नांना उत्तरं देता येईनात, तेव्हा त्यांनी आपल्याकडे वेळ नसल्याचं कारण सांगितलं. दिल्लीमध्ये भाजपच्या झालेल्या पराभवात रवीशनं घेतलेली ही मुलाखत हेही एक कारण आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. याच मुलाखतीमध्ये किरण बेदींच्या उत्तरांना ‘ ओह याह यस’ असा रवीश उपरोधिक प्रतिसाद देत असताना किरण बेदी चिडून ‘ यह यस यस का क्या मतलब है ?” असं विचारतात. रवीश हसत म्हणतो, “कुछ नही, अंग्रेजी बोलने का प्रयास करता रहता हूं.” किरण बेदींच्या मुलाखतीत असं म्हणण्याचा इरादा वेगळा, पण इंग्रजीचं माजवलेलं अवडंबर याविषयी तो अनेकदा बोलत असतो. बिहारच्या शाळांमध्ये मातृभाषा न शिकवता इंग्रजी शिकवण्याचा अट्टहास त्यानं अशाच एका रिपोर्टमध्ये मांडला होता. 'इश्क में शहर होना' या पुस्तकाच्या निमित्तानं जयपूर फेस्टिवलमध्ये बोलताना रवीश म्हणतो, “जब से ये अंग्रेजी में फ्युचर परफेक्ट टेन्स आया है ना, तब से मै अंग्रेजी नही सिख सका. मै एक विदाउट टेन्स इंग्लिश बना रहा हूं जिस में कोई टेन्स नही होगा. पास्ट इम्परफेक्ट, प्रेझेन्ट कनट्युनियस सब टेन्स से मुक्ती!” हसतखेळत सहज मुद्दे पोहोचवण्याची त्याची शैली सुंदर आहे.

या सा-या पत्रकारितेत रवीशच्या धैर्याला दाद द्यायला हवी. त्याला जे हवं ते तो परिणामांची पर्वा न करता बोलत आला आहे. ‘रवीश की रिपोर्ट’पासून हवा तो विषय निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला वाहिनीनं दिल्याचं तो आवर्जून सांगतो. २०१४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एप्रिलमध्ये ‘क्या सचमुच हमारे बीच कोई हिटलर है?” या विषयावर त्यानं घेतलेली चर्चा असो वा राना अय्युबच्या गोध्रा दंगल आणि फेक एन्काउन्टरचा पर्दाफाश करणार्‍या ‘गुजरात फाइल्स’ या पुस्तकावर त्यानं केलेला शो असो, तो धाडसानं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करत राहिला आहे. अगदी एवढंच नव्हे, तर एका कर्मठ कुटुंबातून आलेल्या रवीशनं नयना दासगुप्तासोबत आंतरजातीय प्रेमविवाह करणं, हेही त्याचं धाडस होतं. आजही त्याच्या काही नातेवाइकांनी त्यानं आंतरजातीय विवाह केला, म्हणून त्याच्यासह त्याच्या आई-वडिलांवर बहिष्कार टाकला आहे. घरी येणं बंद केलं आहे. जात किती खोलवर रुतली असल्याचं सांगताना रवीश त्याच्या मनातला सल बोलून दाखवतो.

मी रवीशला पहिल्यांदा भेटलो ते त्याच्या ब्लॉगमुळे. यू. आर. अनंतमूर्ती यांना रवीशनं लिहिलेलं पत्र माझ्या एका मैत्रिणीनं फेसबुकवर शेअर केलं होतं. ते पत्र वाचून मी त्याच्या कस्बा या ब्लॉगवरचे लेख वाचू लागलो. ‘हे जग असं का आहे’ याचं दुःख आणि ते बदलण्याची आस, तळमळ त्याच्या लेखनातून मला जाणवली. ब्लॉगच्या लेखनातही हलक्या उपरोधाचा तो शस्त्र म्हणून वापर करतो. कोणी काय खावं, यात राज्यसंस्था हस्तक्षेप करत असल्याच्या संदर्भात लिहिताना आता ‘राष्ट्रीय बिर्याणी कमिशन’ स्थापन करायला हवा, असं तो म्हणतो. विनोदाचा आधार घेत तो त्याला मांडायचा असलेला मुद्दा अधिक परिणामकारक पद्धतीनं मांडतो. अगदी फेसबुकवर बजेटविषयी लिहितानाही त्यानं लिहिलं होतं -

“तू पसंद है किसी और की
तुझे चाहता कोई और है”
ये बजट की नही बॉलीवूड के गाने की लाइन है !

हंसल मेहताचा 'सिटीलाइट्स्' पाहून गहिवरून आलेला रवीश जेव्हा हंसल मेहतांना पत्र लिहितो, तेव्हा त्याच्या आत आत खोलवर असलेलं माणूसपण लख्ख दिसू लागतं. पत्र लिहिणं हेदेखील रवीशचं खास वैशिष्ट्य. हंसल मेहतांपासून ते अनंतमूर्ती ते राजनाथ सिंग, एम जे अकबर, मोदी या सार्‍यांशी पत्रातून रवीश संवाद साधतो साध्यासोप्या भाषेत. रस्त्यावरचा सामान्य माणूस ज्या पद्धतीनं बोलेल, त्याच पद्धतीनं तो बोलतो. मात्र त्याची मांडणी तर्कावर, विवेकावर आधारलेली असते. त्यातला ओलावा विचारधारेच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करायला भाग पाडतो.

त्याच्या लेखातून, ब्लॉगमधून होणारी भेट ही अर्धी भेट होती. रवीशला प्रत्यक्ष भेटण्याचा योग मागच्या वर्षी रवीशला एका व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं, तेव्हा झाली. एका अलिशान हॉटेलमध्ये रवीशच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. रवीश आल्यानंतर अवघ्या पंधराव्या मिनिटाला हॉटेलच्या खाली आला आणि एकटाच चालू लागला. थोड्या वेळानं विद्यापीठात जायचं म्हणून आम्ही पाहायला गेलो, तर रवीश समोरच असलेल्या रस्त्यावरच्या माणसांना भेटून पुण्याविषयी समजून घेत होता. कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून त्याला मिळत असलेली वागणूकही त्याला व्हीआयपी ट्रीटमेन्ट वाटत होती. कार्यक्रमाच्या स्थळी असलेल्या व्हीआयपी रूममध्ये जातानाही त्यानं ‘नो व्हीआयपी’ ही सुरू केलेली मालिका अनेकांना आठवली. आपण सामान्य आहोत, माध्यमामुळे आपल्याला वलय प्राप्त होतं आणि आपल्याला सामान्य माणसाप्रमाणेच वागणूक मिळावी, अशी त्याची प्रामाणिक धारणा आहे. त्याच्या भाषणाच्या स्क्रिप्टची प्रिंट काढायला त्यानं मला सांगितलं. गंमत म्हणजे रवीशची ओळख करुन देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्याची करून दिलेली ओळख त्याला आवडल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. अवघ्या तीस मिनिटांच्या भाषणात त्यानं अतिशय सूत्रबद्ध अशी मांडणी केली. सहसा मोठ्या व्यक्तींच्या जवळ गेल्यानंतर त्यांच्यातल्या लक्षवेधक विसंगती पाहून मी त्यांच्यापासून दूर गेलो आहे. रवीश हा काही मोजक्या व्यक्तींपैकी एक आहे, ज्याच्या सार्वजनिक प्रतिमेपेक्षाही त्याचं व्यक्तिगत अस्तित्व अधिक खरंखुरं आहे, असं मला वाटलं. मध्यंतरी रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या बाबत असलेल्या एका शोमध्ये रवीशनं स्मृती इराणी यांनी संसदेत केलेल्या भाषणात सांगितलेल्या अनेक खोट्या, चुकीच्या गोष्टींचा समाचार घेतला. तो शो आवडल्याचं माझ्या एका मैत्रिणीनं मेसेज करून कळवलं. त्यावर रवीशनं उत्तर दिलं - शुक्रिया| लेकिन मुझे जरा ज्यादाही गुस्सा आया| नही करना चाहिये ऐसा!

टीआरपी मिळो अथवा न मिळो, रवीशनं त्याच्या विवेकबुद्धीला पटतील, असे विषय हाताळले. लोकानुरंजनवादी पत्रकारिता करण्यात तो रमला नाही. लोकांची अभिरुची बदलण्याचाच त्यानं प्रयत्न केला. सांस्कृतिक अस्तर बदलून नवी मांडणी करण्याचा त्यानं प्रयत्न केला. ल्युटेन पत्रकारितेला वलय मिळत असताना तो खेडोपाड्यात, वस्तीत, जिथे ओबी व्हॅन पोहोचत नाहीत तिथवर जाऊन पोहोचला. कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ, न्यायमंडळ यांची एक सुव्यवस्थित अशी विकेंद्रिकरणाची व्यवस्था आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ. मात्र त्याचं नीट विकेंद्रीकरण झालेलं नाही. पत्रकारितेचं पंचायत राज मांडण्याची आवश्यकता रवीशच्या वार्तांकनातून व्यक्त झाली. पत्रकारितेतून वार्तांकन हरवत चालल्याची खंत तो व्यक्त करतो. ‘समाजाचा आरसा’ हे बिरुद माध्यमांना अभिमानानं मिरवायचं असेल, तर त्यांना त्यांच्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर येऊन वास्तवाला भिडावं लागेल. आजच्या मिडीयाचा विस्फोट झालेल्या जगातही बहुतांश माध्यमांचा केंद्रबिंदू पी. साईनाथ यांच्या भाषेत 'एबीसी' एवढाच आहे. एबीस म्हणजे - एडव्हरटाइजमेन्ट, बॉलीवूड आणि क्रिकेट. रवीशनं हे रूढ समीकरण बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

मानवतेच्या पातळीवर जाऊन बोलणं आणि वागणं हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. जातधर्माच्या पल्याड तर तो आहेच, पण कुठल्याच कंपूत तो नाही. एका लप्रेक मध्ये तो म्हणतो -
“यह नीले कोटवाला किताब को छाती से लगाए क्यों खडा है? इश्क के लाजवाब क्षणों में उलझ जाना उसकी फितरत रही है। इसलिए वह चुप रहा।उसके बालों मे उंगलियों को उलझाने लगा।बैचेन होती सांसें जातिविहीन समाज बनाने की अंबेडकर की बातों से गुजरने लगी - देखना यही किताब हमें हमेशा के लिए बदल देगी!”

आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ उभ्या असलेल्या प्रेमात पडलेल्या त्याला जातीच्या अडथळ्याच्या कल्पनेनंच घुसमटायला होतं आणि रवीश आंबेडकरांना दलित तबक्यातून बाहेर आणून ह्युमनाइज करतो. तो म्हणतो, प्रेमात असताना आपण जग आणखी सुंदर बनावं म्हणून प्रयत्न करतो. शहराच्या कानाकोपर्‍यात जातो. अनोळखी गल्लीबोळांतून फिरतो. प्रेमात असणं म्हणजे केवळ हातात हात घालून फिरणं नव्हे, तर जग सुंदर बनवण्याच्या नव्या शक्यतांचा वेध घेणं असतं!

रवीशचं हळवं अगदी बावनकशी माणूस असणं पत्रकारितेसारख्या क्षेत्रात टिकण्यासाठी पुरेसं नाही, किंबहुना दुर्बळस्थान आहे, असं वाटावं इतका तो सच्चा आहे. सोशल मिडीयावरच्या विखारी कमेन्ट्स् आणि केवळ वादासाठी वाद घालण्याच्या प्रक्रियेला कंटाळून त्यानं फेसबुक आणि ट्विटरही काही काळ बंद केलं. प्रेक्षकांच्या, वाचकांच्या शिव्याशापांनी व्यथित होणारा रवीश कविता करत नसला तरी कवीमनाचा आहे. त्याची अस्वस्थता प्रेक्षकांपर्यंत संक्रमित करून त्यातून सर्जक काही गवसेल का, याच्या शक्यता तो आजमावतो. यामुळेच कलबुर्गींना श्रद्धांजली वाहताना अचानक पाश त्याला आठवतो -

“मेहनत की लूट सबसे ख़तरनाक नहीं होती
पुलिस की मार सबसे ख़तरनाक नहीं होती
गद्दारी, लोभ की मुट्ठी
सबसे ख़तरनाक नहीं होती
बैठे बिठाए पकड़े जाना बुरा तो है
सहमी सी चुप्पी में जकड़े जाना बुरा तो है
पर सबसे ख़तरनाक नहीं होती
सबसे ख़तरनाक होता है
मुर्दा शांति से भर जाना
ना होना तड़प का
सब कुछ सहन कर जाना
घर से निकलना काम पर
और काम से लौट कर घर आना
सबसे ख़तरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना!”

स्वप्नांचे धागे विरून जातील की काय, असं वाटत असताना रवीश नव्या स्वप्नांची बुनियाद विणण्याची गोष्ट करतो. देशातला ३२ टक्के इलेक्ट्रॉनिक मिडीया एका व्यक्तीच्या हातात असताना, हस्तिदंती मनोर्‍यात बसून ‘नेशन वॉन्टस टू नो’चा आक्रस्ताळा आवाज वाढत असताना आणि टेबल पत्रकारितेचा सुळसुळाट झालेला असताना तो विहिरीच्या तळापर्यंत जातो. त्यातला गाळ उपसून काढण्याचा प्रयत्न करतो. त्याची आणि त्याच्यासारखा प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाची दमछाक होतेच, पण ती सोसणं अटळ आहे, हे लक्षात घेऊन तो पुन्हा जोरानं धावू लागतो. शहर त्याला भीती घालतं. तो त्याच नवख्या नजरेनं पुन्हा शहराकडं पाहू लागतो. शाळेतल्या त्याच्या गुरुजींनी सांगितलेलं वाक्य त्याला आठवतं -
शौक ए दीदार अगर है तो नजर पैदा कर !
तो ते आठवतो आणि प्रकाशाच्या दिशेनं चालू लागतो…

***

पूर्वप्रसिद्धी - 'अनुभव' (दिवाळी - २०१६)

***

हा लेख मायबोली.कॉमवर पुनर्मुद्रित करण्यास परवानही दिल्याबद्दल श्री. श्रीरंजन आवटे, अनुभव मासिक, युनिक फीचर्स व श्रीमती गौरी कानेटकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 
शब्दखुणा: 

उत्तम

जबरदस्त... रविशच्या रिपोर्टसारखाचा.... भन्नाट. आवडला

रविश तर मोस्ट फेवरिट (ओन्ली फेवरीट. Happy )

मुलाखत अतिशय एकांगी वाटली. भाजप शिवाय इतर पक्षांमधील नेत्यांबद्दलचे मत, आधीच्या सरकारचे घोटाळे, घराणेशाही, अपयशी योजना, इत्यादी तसेच सध्याच्या सरकारची काही चांगली कामे असतील तर ती, यावर रवीश कुमारांचे काय विचार आहेत हे काहीच दिले नाही आहे.

रविश कुमारची पत्रकारीता मी पाहिलेली, अनुभवलेली नाही. त्यामुळे माहिती नाही किंवा तोकडी.

पण स्वतंत्र लेखन म्हणून आवडली ओळख.

सुंदर लेख.
इतकी वर्षं हिंदी वृत्तवाहिन्या फार न पाहिल्याने त्याचं फील्ड रिपोर्टिंग पाहिलेलं नाही, याची रुखरुख वाटली. २०१४ च्या निवडणुकांदरम्यान किंवा कदाचित त्याही आधी बिहार की युपीतलं एक रिपोर्टिंग पाहिलेलं. तेव्हा हा माणूस पुस्तकी हिंदी बोलत नाहीए, एवढं लक्षात राहिलं.

@ मॅगी
लिंक दिल्याबद्दल आभार. मी हा लेख वाचला होता पण भाषणही खूप सुंदर आहे.

रवीश कुमारचा कार्यक्रम आवर्जून बघणारे कितीतरी लोक आहेत. आणि दुसरे चॅनेल लावून नन्तर त्याचा कार्यक्रम बघायला घेतला की खरंच त्यात इन्व्हॉल्व व्हायला होतं. लोकांच्या जवळचे आणि लोकांच्या कळकळीचे विषय त्यांच्या कार्यक्रमात नेहमी हाताळले जातात. गेल्या काही महिन्यात तर पाकिस्तानने सरकारला इतकं वाचवलं आहे. एनडीटीव्ही सोडल्यास कुठल्याही चॅनेलनी प्राईम टाइममध्ये तरी इकॉनॉमी घसरल्याची कारणे, वाढलेली बेकारी, प्रचंड घसरलेला मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स, शेतकऱ्यांचा संप (ज्याचा उद्रेक नोटबंदीमुळे जास्त तीव्र झाला) याचं कव्हरेज केलं नाही.

सीमेवरच्या अशांतीचं कव्हरेज करायला हवं हे मान्य आहे, पण आता असे वाटते आहे की २०१९ मध्ये पाकिस्तानशी युद्ध हा सरकारचा अजेंडा आहे आणि त्याची पूर्वतयारी हे चॅनेलवाले करताहेत.

छान लेख. एन डी टीव्ही मला पण आवडते पण इट इज ओन्ड बाय ....... त्यामुळे त्यांची देखील आत कुठेतरी मुस्कटदाबी होत असणार पत्रकारांचे स्वातंत्र्य हा एक ऑक्सीमोरॉन आहे.

२०१९ मध्ये पाकिस्तानशी युद्ध
>> असे होणार नाही. तोंडापाशी घास नेऊन सोडणार आहेत फक्त. जेव्हा युद्ध होते तेव्हा असे स्टुडियोत बसून होत नाही. थेट सुरु होते. आता फक्त वातावरणनिर्मिती करुन देशभक्तीच्या नशेत लोकांना इतर विषयांची आठवण येऊच नये याची तयारी आहे. स्मोकस्क्रिन आहे फक्त मिडीया....

आणि प्रत्येक मिडियाहाऊस कोणाचे तरी विकत घेतलेले आहे. पोलरायजेशन करायला एनडीटीवी सारख्यांना सूट दिली आहे, एन्डीटीवीचे ते काम आहे जेणेकरुन भाजपविरोधकांना व्हेंटआउट व्हायला एक माध्यम मिळेल आणि ते फक्त एन्डीटीवी पाहत बसतील आणि बाकीचे सगळे मेजॉरिटी वेगळी काढून देशभक्तीच्या नशेत झुलवत ठेवता येईल. असे नसते तर रविश कुमार एकतर अनेक प्रकारच्या विषयांवर सर्व राजकिय पक्षांची पोलखोल करत बसला असता, केवळ भाजपवर केंद्रित नसता आणि दुसरे असे की तो या जगातच राहिला नसता.

मला ते एकदा दिल्ली विमानतळावर भेटले होते. त्यावेळी त्यांच्याशी १० मी. तरी बोललो होतो. मस्त माणुस. त्यांच्याबरोबर २/३ ज्युनीअर्स पण होते. मी पण असला बधीर की ना साधी सही घेतली ना सेल्फी काढली. Happy

>>>>पोलरायजेशन करायला एनडीटीवी सारख्यांना सूट दिली आहे, एन्डीटीवीचे ते काम आहे जेणेकरुन भाजपविरोधकांना व्हेंटआउट व्हायला एक माध्यम मिळेल आणि ते फक्त एन्डीटीवी पाहत बसतील आणि बाकीचे सगळे मेजॉरिटी वेगळी काढून देशभक्तीच्या नशेत झुलवत ठेवता येईल.

ही का स्ट्रॅटेजी असेल?
एनडी टीव्हीचे लागेबांधे काँग्रेसशी आहेत हे पटते. पण भाजप त्यांना व्हेन्ट साठी का मोकळे सोडेल!

<असे नसते तर रविश कुमार एकतर अनेक प्रकारच्या विषयांवर सर्व राजकिय पक्षांची पोलखोल करत बसला असता, केवळ भाजपवर केंद्रित नसता आणि दुसरे असे की तो या जगातच राहिला नसता.>
असे असेल तर रवीश कुमार न्युट्र्ल पत्रकार नाही म्हणता येणार. काँग्रेसशी लागेबांधे असतील तर जनकेंद्री, सच्चा, आदर्श इत्यादी विशेषणे बरोबर ठरतील का ?

पारू, माझ्या मते पत्रकार न्यूट्रल आहे कीं नाही या पेक्षा तो मांडत असलेल्या घटना कशा आहेत, काय आहेत, आपल्या जगण्याशी रिलीवन्ट आहेत का, त्याने आपल्या माहितीत भर पडली का, एखाद्या विषयाचा वेगळा माहित नसलेला अँगल आपल्याला कळला का हे महत्त्वाचे.

पत्रकारिता म्हणजे नक्की काय हे जाणून घेतलं कि पत्रकार कसा आहे हे लगेच समजतं.

राविश बद्दल हजार शंका उपस्थित करणारे चौरसिया, शंभर कोटींची लाच घेताना पकडलेला, उघड उघड बायस भूमिका घेणारा अर्णब, अंजन ओम मोदी, नोटेत चिप सांगणारे, गायीपासून ऑक्सिजन मिळतो सांगणारे वगैरे अनेक पत्रकार सॉरी अँकर आहेत त्यांच्या बायस असण्या बद्दल कोणी आक्षेप घेत नाही,

रविश चा काँग्रेस शी सम्बन्ध जोडण्या आधी 2014 आधीचे त्याचे रिपोर्टींग बघावे आणि मग ठरवावं असं माझं मत आहे.

भाजप विरोधी बोलतो आहे म्हणून देशद्रोही, काँग्रेस चा पित्तु अशा अनेक नावांनी ओळख बनवली जाणे हे काही एकट्या रविश च्या नशिबी आलेले नाही, आम्हीही आहोच कि लाईन मध्ये! Happy

रविश चा काँग्रेस शी सम्बन्ध जोडण्या आधी 2014 आधीचे त्याचे रिपोर्टींग बघावे आणि मग ठरवावं असं माझं मत आहे.>>> करेक्ट. तो त्यावेळी सुद्धा त्यावेळच्या सरकार विरोधी रिपोर्टींग करायचा. कदाचीत त्यावेळी सगळेच सरकार विरोधी रिपोर्टींग करत होते म्हणून त्याचे वेगळेपण दिसत नसेल.
आता असे विरोधी रिपोर्टींग करणारे कमी आहेत.

मला रवीश आवडतो ते त्याच्या कार्यक्रमात आरडाओरडा नसतो म्हणून. पण मुळात टिव्हीच क्वचीत कधीतरी बघितला जात असल्याने त्याचा कोणताच कार्यक्रम पुर्ण बघितला नाही.
मात्र बाकी कोणत्याही ॲंकर चा कार्यक्रम दिसला कि आरडाओरड्यामूळे २-३ मिनीटात चॅनेल बदलले जाते, तसे रवीश च्या बाबतित होत नाही.

>>>पारू, माझ्या मते पत्रकार न्यूट्रल आहे कीं नाही या पेक्षा तो मांडत असलेल्या घटना कशा आहेत, काय आहेत, आपल्या जगण्याशी रिलीवन्ट आहेत का, त्याने आपल्या माहितीत भर पडली का, एखाद्या विषयाचा वेगळा माहित नसलेला अँगल आपल्याला कळला का हे महत्त्वाचे. +१११

पूर्ण सहमत. रवीश कुमार चांगली माहिती देतात आणि जे प्रश्न ते उचलून धरतात ते सामान्य जनतेलाही पडलेले असतात. जसे की मध्यंतरी त्यांनी शाळा कॉलेजच्या सुसाट वाढणाऱ्या फियांवर एक कार्यक्रम केला होता. अतिशय अभ्यासपूर्ण होता.

>>>कदाचीत त्यावेळी सगळेच सरकार विरोधी रिपोर्टींग करत होते म्हणून त्याचे वेगळेपण दिसत नसेल.
आता असे विरोधी रिपोर्टींग करणारे कमी आहेत.

हे मला पण म्हणायचे होते आधी. त्यावेळेस बरेच चॅनेल सरकारच्या विरोधच रिपोर्टींग करायचे. आणि लोकपाल आंदोलनाच्या वेळीसुद्धा युपीए सरकारचे सगळे मोठे लोक चर्चा करायला तयार होते. तसेच तेव्हा अतिशय वीक वाटणारे प्रधान मंत्री मनमोहन सिंग हे पत्रकार परिषदांनाही घाबरत नसत. त्यामुळे सरकार विरोधी बोलायची भीती नव्हती.

आजकालच्या बायस्ड लोकांना "नोटेमधे चीप आहे, नोटबंदी ही फार मोठी दुरदृष्टी आहे, डॉक्टरेट केलेले व्हिडीओ, शेण घरावर थापल्याने रेडीएशन पासून बचाव, गोमुत्रात सोने मिळते" इ. बातम्यांचे डीएनए करणारा तिहार जेलची हवा खाल्लेला चौधरी जास्त आवडतो. कारण तो सध्याच्या सरकारविरुध्द अजिबात बोलत नाही. सगळा देश शेतकरी आंदोलनाबद्दल बोलत असेल तर तो काश्मिर मधे ४ लोक दगडफेक करत आहे, जेएनयू मधे फटाके फुटत आहे अश्या कवडीमोलच्या बातम्या सांगण्यात व्यस्त असतो. जे या बायस्ड लोकांना आवडते.
म्हणून अशांना प्रत्येक सरकारवर ताशरे ओढणारा त्यांना बोचणारे प्रश्न विचारणारा "रविश" आवडणार नाही.

रच्याकने २०१४ आधी "रविशकुमार" हे या बायस्ड लोकांच्या "आंखों का तारा" होता. आता तो तारा डोळ्यात टोचू लागला आहे. एवढेच

<2014 आधीचे त्याचे रिपोर्टींग बघावे आणि मग ठरवावं असं माझं मत आहे> हेच माझे म्हणणे होते की या लेखात राजकीय बाबतीत बाकीच्या पक्षांच्या नेत्यांविरुध्द , त्यांच्या योजनांबद्दल काय रिपोर्टिंग केले आहे हे काहीच येत नाही त्यामुळे एकांगी लिखाण वाटते. मी रविश चा कोणाशीही संबध लावलेला नाही.
२०१४ नंतरही सध्याच्या सरकारच्या चांगल्या कामांबद्दल, वा दिल्लीतील आप सरकार बद्दलही काही लिहिले नाही आहे.

रविशकुमार आणि एनडीटीव्ही भक्तांच्या डोक्याला ताप झाले आहेत. इतर सर्व मिडीआ पायाशी लोळण घेऊन भाटगिरी करत असताना यांची सततची कटकट संपतच नाहीए.
चारपाच अँकर्सना 'स्टार' बनवू नका. शक्य झाल्यास टीव्हीच बघू नका असे आवाहन रवीशने या भाषणात केले आहे - https://www.youtube.com/watch?v=aQOKZIj09Js

रवीशकुमारना मॅगसेसे पुरस्कार
"In electing Ravish Kumar to receive the 2019 Ramon Magsaysay Award, the board of trustees recognizes his unfaltering commitment to a professional, ethical journalism of the highest standards; his moral courage in standing up for truth, integrity and independence...

; his moral courage in standing up for truth, integrity and independence... हे फार फार महत्वाचं आहे.

Pages