आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद चिनूक्स, ती तोकड्या मराठीत पत्र लिहू शकेल, नाहीच जमले तर तिचे इंग्लिश पत्र मी मराठीत लिहून देउ शकेन. Count us in.

मला सहभागी व्हायला आवडेल. परदेशस्थ असताना बाकी खुप काही मदत कधी करता येत नाही आर्थिक मदतीशिवाय त्यामुळे हे करायला खुपच आवडेल.

परदेशस्थ लोकाना आपल्या पत्राबरोबरच स्टँप्स लावलेले, स्वतःचा व्यवस्थित पत्ता घातलेलं पाकीट पाठवता येईल का? म्हणजे ते त्यांचं पत्र त्यात घालून पाठवु शकतात. ऊदा. माझे सासु सासरे येत आहेत पुढ्च्या महिन्यात, त्यांच्याकरवी मी स्टँप्स मिळवू शकते.

भारतातून स्टँप्स नेऊन मग परदेशातून अशी पत्रे पाठवणे हे माझ्या माहितीप्रमाणे बेकायदेशीर आहे. काही देशांत अशी पत्रे विमानतळावरच जप्त केली जातात. सुदैवाने भारतात तरी टपालाचे दर अगदी कमी आहेत.
भारतात आय आर सी ( इंटरनॅशनल रिप्लाय कूपन्स ) मिळत असत पूर्वी. अजूनही मिळत असावीत. हि टपाल खात्याचीच असतात आणि ती लावून पाठवल्यास परदेशातून स्टँप्स न लावता ( त्याएवजी हे कूपन लावून ) पत्र पाठवता येते. भारतात जोडकार्डे अजून असावीत.

उपक्रम छानच आहे,सहभागी व्हायला आवडेल पण एक उपक्रम म्हणून पोस्टाने पत्रे पाठवण्यात सातत्य राहील का अशी शंका वाटते .

Mala ya upakramat sahabhagi vhayla nishchit avdel. Krupaya mala tapashil kalavava.

मला पण सहभागी व्हायचे आहे या उपक्रमात.

काही विशेष प्रसंगी (उदा. माझ्या पत्रमित्राचा वाढदिवस, दिवाळी) त्याला / तिला भेटही पाठवायला मला आवडेल - अर्थात संस्थेची हरकत नसेल तरच. आलेली भेट संस्थेच्या जबाबदार सभासदाने तपासून मगच ती मुला/मुली पर्यंत पोहचवल्यास ह्यात धोका नसावा (असे मला वाटतय). चिन्मय, शीतलताई तुमचे काय विचार आहेत याबाबतीत ते जरुर कळवा.

< मराठीत टाईप करून त्याची प्रिंटआउट पत्र म्हणून चालेल का?>

नक्की चालेल. स्मित>>>>>>>>>>>>

अरे वा ! असे चालत असेल तर मी पण सहभाग घेउ शकेन. चिनूक्स कृपया मला पण सहभागी करुन घ्या.

धन्यवाद.

मलाही आवडेल पत्रमित्र व्हायला.
पत्रच लिहिले नाहिये बर्‍याच दिवसांपासून.
आणि हाताने लिखाण करायची सवयच राहिली नाहिये. या निमित्ताने ती सवयही होईल.

चिन्मय-
पत्रलेखन करताना घ्यायची काळजी
>>तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या >> आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या

ह्याबद्दल अजून थोडे तपशीलवार सांगाल का?
काय लिहिलेले चालेल? किंवा काय लिहिलेले अजिबात चालणार नाही किंवा- अमुक एखादा मुद्दा लिहिताना जरा जपून...वगैरे?
थोडं अवघड आहे याचं उत्तर देणं, पण उपक्रमात सहभागी होणार्‍यांसाठी गाइडलाईन म्हणता येईल असे काही सांगू शकलात तर सगळ्यांसाठीच बरे होईल.

@ चिनूक्स - मुलांच्या नावाची यादी कधी मिळणार? वाट पहतोय. धागा वर आला कि यादी आली असेच वाटते. पण सहभागी होणार्यांचीच यादी वाढते आहे.

आशिका,
यादी लवकरच देऊ.
इतका प्रतिसाद, तोही परदेशातून मिळेल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे यादी देण्याअगोदर परदेशस्थ मायबोलीकरांची पत्रं आनंदवनात कशी पोहोचतील, आनंदवनातील पत्रं त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवता येतील, इमेल हे माध्यम सोयीचे ठरेल का, याची चाचपणी करत आहोत. उशीर झाल्याबद्दल क्षमस्व, पण तुमच्या भरघोस प्रतिसादामुळे तुमच्या उत्साहावर पाणी पडू नये, याची जबाबदारीही वाटते आहे. Happy

चैतन्य,

तुझ्या मुद्द्याबद्दल लवकरच लिहितो.

chaan upkram aahe. patra kuthalya pattyavar kinva email var pathvayache?

माझा मुलगा (वय १०) या उपक्रमात सहभागी होऊ इच्छितो. मराठी लिहुन / प्रिंट काढुन पत्र पाठवु शकेन. मुंबईतल्या कुणा माबोकराकडे इथुन जाणारे मित्र मैत्रिणी पोहचवु शकतात. किंवा मुंबईहुन माझ्या घरचे लोक आनंदवनात पोस्टाने पाठवु शकतील. त्याच्या वयाचा मित्र मैत्रिण मिळाल्यास छान वाटेल.

Pages