आनंदवनातल्या मुलामुलींशी पत्रमैत्री

Submitted by चिनूक्स on 13 May, 2014 - 00:58

बाबा आमट्यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाबद्दल नव्यानं माहिती देण्याची गरज नाही. बाबांनी वसवलेल्या आनंदाच्या या वनात अनेकांना त्यांच्या आयुष्याचं सुख गवसलं आहे. या आनंदवनात आणि महारोगी सेवा समितीच्या सोमनाथ प्रकल्पात सध्या २५० - ३०० मुलंमुली राहतात. आनंदवन हेच त्यांचं हक्काचं घर आहे.

या मुलामुलींना आनंदवनात आणि सोमनाथला प्रेम, आपुलकी, मैत्री मिळत असली, तरी बाहेरच्या जगातही त्यांचे मित्र, किंवा नातलग असावेत, अशी इच्छा आहे. याचं कारण असं की, यांपैकी काही मुलंमुली अनाथ आहेत. काहींना एकटे पालक वाढवत आहेत. काही मुलामुलींना आनंदवनातल्या रहिवाशांनी दत्तक घेतलं आहे. अनेकांच्या पालकांना त्यांच्या कुटुंबांनी कुष्ठरोगामुळे किंवा अपंगत्वामुळे घराबाहेर काढल्यानं हक्कानं आजी-आजोबा-मामा-आत्या अशी हाक मारता येईल, अशा व्यक्ती नाहीत. काहींचे पालक अंध किंवा मूकबधिर आहेत, तर काहींचे अशिक्षित. त्यामुळे पालकांशी संवाद साधणं, हीदेखील समस्या आहे. या मुलामुलींनी आनंदवनातच त्यांची नाती निर्माण केली असली, आनंदवनवासीयांनी या मुलामुलींना जिव्हाळ्यानं वाढवलं असलं, तरी आनंदवनाबाहेरची नातीही त्यांचं आयुष्य नक्कीच अधिक सुखकर, समृद्ध करतील, असं आम्हांला वाटतं.

त्या दृष्टीनं मायबोलीकरांच्या मदतीनं एक उपक्रम सुरू करावा, अशी इच्छा आहे. आपल्यापैकी अनेकांचे पूर्वी पत्रमित्र होते. उत्तम शाईच्या पेनानं आपण पानंच्या पानं भरून पत्रं लिहीत असू. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, गमतीजमती त्यांना कळवत असू.

आनंदवनातल्या या मुलामुलींचे मित्र बनून, किंवा त्यांच्याशी आजोबा-आजी, काका-मामा-मावशी-आत्या असं नातं जोडून तुम्ही त्यांना पत्रं लिहिलीत तर त्यांना खूप आनंद होईल. तीही तुम्हांला पत्रांतून उत्तर देतील. तुमचं जग आणि त्यांचं जग पत्रांच्या माध्यमातून एकत्र यावं, त्यांना आनंदवनाच्या बाहेरही आप्त आणि सुहृद लाभावेत, अशी आमची मनापासून इच्छा आहे.

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत. तुमच्याशी पत्रातून संवाद साधू शकतील, अशी ५-१८ या वयोगटातली पन्नास मुलंमुली आनंदवनात आहेत. या उपक्रमात तुम्ही सहभागी होऊ इच्छित असाल, तर कृपया या बाफवर तसं लिहा. लवकरच मुलामुलींची नावं इथे आम्ही लिहू, आणि तुम्ही त्यांना पत्रं लिहू शकाल.

या उपक्रमातून तुम्हांलाही आनंदच मिळेल, याची आम्हांला खात्री आहे.

धन्यवाद.

- डॉ. शीतल आमटे, चिनूक्स (चिन्मय दामले), रार (आरती रानडे)

एक महत्त्वाचं - या उपक्रमातून तुम्ही आनंदवनातल्या मुलामुलींना आर्थिक मदत करावी, अशी अजिबात अपेक्षा नाही. तशी मदत करायची असल्यास कृपया महारोगी सेवा समितीच्या शिक्षणविभागाशी संपर्क साधावा. हा उपक्रम केवळ पत्रं लिहिण्यापुरताच मर्यादित आहे.

त्याच अनुषंगाने अजून एक. कुठलाही गैरसमज करून न घेता तुम्ही हे वाचाल अशी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिलेल्या पत्रांतून मुलांच्या मनांमध्ये कुठल्याही प्रकारच्या न्यूनगंड निर्माण होणार नाही, आपल्या आईवडलांबद्दल, संस्थेबद्दल त्यांना लाज वाटणार नाही, याची कृपया काळजी घ्या. तुम्ही लिहिलेलं पत्र कदाचित तो मुलगा / मुलगी आपल्या वर्गात वाचून दाखवू शकेल, हे कृपया ध्यानात असू द्या. Happy हे लिहिण्यामागे तुमच्या भावनांचा अनादर करण्याचा अजिबात हेतू नाही. मात्र अजाणतेपणी असं होऊ शकतं, म्हणून केवळ हे लिहिलं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकु, हे वाच.

चिनूक्स | 13 May, 2014 - 10:01

तसं काही नाही, हर्पेन. तू तुला हवं तसं पत्र लिही.

इथे लवकरच आम्ही मुलामुलींची नावं आणि त्यांची वयं देऊ. कोणाला पत्र लिहायचं, हे निवडून तुम्ही इथे लिहा. म्हणजे इतर दुसर्‍या कोणाला पत्र लिहू शकतील. कोणा एकालाच चारपाच पत्रं आणि एखाद्याला एकही पत्र नाही, असं होणार नाही.

चिनूक्स, त्या काळात माझे खुप पत्रमित्र होते. खुप छान मैत्री होती.
पण आता परदेशातून अशी पत्रे पाठवणे कठीण आहे. मायबोलीवरच असा पत्रव्यवहार करता आला तर ?
हि पत्रे कुणीतरी प्रिंट करून त्यांना पाठवायची आणि त्यांची उत्तरे देखील अशीच आमच्यापर्यंत पोहोचवायची, हि कल्पना कशी वाटते ?

मुलांचे डिटेल्स इथे (पब्लिक फोरम वर) न देता इथे जे आय डी पत्रमैत्री करण्यास उत्सुक आहेत त्यांना एक मुलगा/मुलगी allocate(?) करावा असे मला वाटते.
तसेच पत्र त्यांच्या संस्थेमार्फ़तच पाठवली/स्वीकारली जावीत असेही माझे मत आहे.
अर्थात हां उपक्रम कसा राबवावा याचा विचार वरील टीम ने केला असेलच!

वत्सला,
पत्रं संस्थेमार्फतच आणि संस्थेच्या पत्त्यावरूनच पाठवली जातील. तुम्हीही पत्रं संस्थेच्या पत्त्यावरच पाठवायची आहेत.
तसंच, इथे मुलांचे तपशील जाहीर करणार नाही. फक्त मुलामुलीचं पहिलं नाव आणि वय इथे देऊ.
एकदा कोणी कोणाला पत्र लिहायचं हे ठरलं की आम्ही तुम्हांला इमेलीद्वारे मुला/मुलीची अधिक माहिती, पत्र कुठल्या पत्त्यावर पाठवायचं इत्यादी तपशील पुरवू. Happy

दिनेशदा,
हा पत्रव्यवहार पूर्णपणे खाजगी असावा, अशी इच्छा आहे. Happy

दिनेशदा,
याबद्दल काय करता येईल ते एकदोन दिवसांत इथे लिहितो.
आनंदवनातल्या सोयी, उपलब्ध मनुष्यबळ हे लक्षात घेता पोस्टानं पत्र पाठवणंच आमच्या दृष्टीनं अधिक सोयीचं आहे. पण अपवाद म्हणून काही मार्ग आपण काढू.

वत्सला,
तुझा प्रश्न आत्ता पाहिला. तिथली मुलं मराठी माध्यमातून शिकतात. मराठीतच प्रामुख्याने बोलतात. त्यामुळे शक्यतो मराठीत पत्र लिहिल्यास बरं, असं लिहिलं आहे. पण तुझ्या मुलीला पत्र लिहायचं असल्यास जरूर लिहू दे. तितकाच त्या मुलांनाही इंग्रजी लिहावाचयचा सराव.

चिनुक्स, मी पण हेच विचारायला आलेले की माझी लेक आठवीत आहे तिने या उपक्रमात भाग घेतला तर चालेल का? ती माबो सदस्य नाही पण पत्र मैत्री करायला तिला आवडेल.

चिनूक्स छान उपक्रम. परदेशातून पत्र पाठवणे कठीण वाटत आहे. दिनेश बोलले तसे काही उपाय लवकर मिळो. मला काही फोटो collage करून त्या देशाची माहिती, famous ठिकाणे असे काही पाठवता आले तर नक्की आवडेल.

चिनूक्स, नायजेरियातही पोस्ट ऑफिस नव्हते. त्यावेळी तिथले भारतीय एक युक्ती करायचे. भारतातील सर्वजण भारतातल्याच एका पत्त्यावर पत्र पाठवायचे. महिन्यातल्या ठराविक दिवशी अशी सगळी पत्रे एकत्र करून ती सर्व पत्रे कुरीयरने नायजेरियाला पाठवली जात, उत्तरे पण तशीच पाठवली जात.

हस्तलिखित हवे असेल तर आमची पत्रे स्कॅन करुनही आम्ही एकाच पत्त्यावर ईमेलने पाठवू शकू. ती प्रिंट करून
पुढे पाठवता येतील.

लहान मुलांनी लिहीलेली पत्र चालणार आहेत का? तसे असेल तर आवडेल मुलीसह सहभाग घ्यायला.

पोस्ट ऑफीस नसलेले देश आहेत असे वाचुन खरच आश्चर्य वाटले. सगळीकडे पोस्ट ऑफीस असणे हे अगदी अध्यारुतच आहे असे वाटत होते.

गुलमोहोर, तुम्हाला परदेशातुन पत्र पाठवणे कठीण का वाटतेय? बर्‍याच ठिकाणी साधे पोस्टकार्ड अतिशय कमी किमतीत उपलब्ध असते. ते २० दिवस ते एखाद महिन्यात व्यवस्थित भारतात पोहोचते असा अनुभव आहे. भारतातुनही असे पोस्टकार्ड पाठवता येते आणि पोचते.
तसेच इंटरनॅशनल इनलँड लेटरही असते. त्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव असु शकेल. असे पत्रही भारतात पोहोचते ( अनुभव आहे). भारतात इं. इनलँड आता मिळत नाही असे उत्तर नुकतेच एका पो. ऑ दिले आहे पण तरी मुख्य पो. ऑ मधे जाऊन चौकशी करणार आहे.

मी उत्सुकतेने गूगल करून बघितले असता अंगोलामधे ६० पोस्ट ऑफिसेस सध्या चालू आहेत अशी माहिती/बातमी मिळाली, इतर ठिकाणच्या ऑफिसेससाठी काम चालू आहे (ऑगस्ट २०१२ ची बातमी आहे)
http://allafrica.com/stories/201208240966.html

तुमच्या भरभरुन प्रतिसदाबद्दल खूप धन्यवाद.

गेला महिनाभर मी , आरती आणि आमचा ग्रुप मुलांसोबत विविध कार्यक्रम करीत आहोत. आयुष्यात कधी केली नाही एवढी धमाल आंम्ही सर्व व जवळपास १५० मुले करीत आहोत. त्यामुळे कधी नव्हे तो हा भयानक उन्हाळा प्रचंड सुखकारक झाला आहे.

पत्र मैत्रीचा उपक्रम गेली अनेक वर्षे डोक्यात होता. मी लहानपणापासून बऱ्याच जणांना पत्रे लिहित असे. पत्र मित्र म्हणजे बाबा आमटे, डॉ . राणी बंग, त्यांची मुले, अनिल अवचट , शाळेतील मैत्रिणी वगैरे. माझी पत्रे रंगीत, चित्रांनी भरलेली, लांबलचक २०-२० पानी असत. खरे म्हणजे ती एक डायरीच होती .काही चांगल्या पत्रांच्या मी xerox ठेवीत असे. अधेमधे वाचायला मजा येई. इमेल चा जमाना आला आणि ती मजा संपली . आता ती आतुरता नाही. आपले इमेल कोणी forward करेल या भीतीमुळे कामाची सोडून पत्रे बंद. लोकांशी संवाद प्रचंड वाढला, सोपा झाला पण त्यात आता तो वैयक्तिक स्पर्श नाही . Facebook ची पोस्ट लोकांना दिसते. त्यात खरेपणा कधी कमी कधी जास्त. पत्रे मात्र १००% खरी असत. त्यात भावनांची सुसूत्र उकल असे जे आज इतर Twitter सारख्या भावनांच्या बजबजपुरीत दिसत नाही.

म्हणून हे प्रयोजन. तुम्ही मला व आमटे परिवारातील इतरांना पण पत्रे पाठवू शकता. पण सध्या इमेल नको असे वाटते.. प्रिंट करणे महाग जाते व त्यात आपण आपला वैयक्तिक स्पर्श हरवून बसतो. फक्त संख्या वाढल्यावर परदेशी पोस्टेजचे कसे करायचे ते बघावे लागेल. म्हणून ५० मुलांपासून सुरु करुया . असे पण होऊ शकते की तुमच्याकडून ज्याना परवडते त्यांनी खरीखुरी पत्रे पाठवा. आमची मुले स्कॅन करून पत्रे पाठवतील व कोणी येणारी जाणारी मंडळी असलीत ती खरी पत्रे सोबत नेऊ शकतात.

Pages