काजळी

Submitted by vaiju.jd on 18 April, 2013 - 14:12

।। श्री ।।

एकदा एका घरी हळदीकुंकवाला गेले असताना घरच्या बाईंनी माझी एका बाईंशी ओळख करून दिली. नांव, गांव, कुठे राहतो विचारताना लक्षात आले कि आम्ही नातेवाईकच आहोत. म्हणजे त्या बाई माझ्या चुलत आते जाऊबाईच लागत होत्या.त्याची खातरजमा झाल्यावर त्यांनी मला घरी बोलावले. त्या रहातही होत्या आमच्या घराजवळच. त्यानंतर लगेच श्रावणातल्या पूजेच्या निमित्ताने त्यांनी घरी बोलावले. मी लहान असल्याने मीच आधी त्यांच्या कडे जाणे सयुक्तिक होते.

घरी आल्यावर वहिनींनी आधी आम्हाला देवघर दाखवले.सुरेख मांडलेले देव, टांक लखलखित चमकत असलेले. नेटकी पूजा केलेले.बाजूला मोठा पितळेचा दिवा. सांजदिवा असतो ना तसा वात ओवून घालायचा दिवा. पण स्वच्छ घासलेला, ज्या नळीत आपण वात ओवतो ती नळी सुद्धा स्वच्छ चकचकीत. दिव्यावर तेलात केरकचरा पडू नये, म्हणून गोल कापलेला पुठ्ठा ठेवलेला वातीसाठी मधोमध भोक ठेवून. दिवा बराच मोठा जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त तेल मावेल असा.'बापरे! केवढा मोठा दिवा! रोज लावता तुम्ही हा ?' अभावितपणेच म्हटले गेले.

लगेच त्या म्हणाल्या ,' सतत चोवीस तास जळतो ना , तेल संपून शांतवायला नको , तेल घालायचे लक्ष ठेवायला नको, म्हणून मोठाच घेतला.'

'म्हणजे सतत चालू असतो का तो ?'

'हो, त्याच्यासाठी तिळाचे रिफाईड तेल आणतो आम्ही वेगळे, मला तो विझलेला चालत नाही. फक्त सकाळी एकदा तो बंद करून मी काजळी काढते अन पुन्हा लावते. तेव्हासुद्धा शेजारी तुपाचा दिवा लावूनच मी तो बंद करते.'

'त्याला रोज काढायला काजळी धरते?'

त्या सौम्यश्या हसल्या आणि म्हणाल्या,' हो, धरते. म्हणजे काय वैजयन्ती अगं जळणे आले म्हणजे काजळी आलीच! स्वच्छ प्रकाश हवा असेल तर काजळी दूर करायलाच हवी. मला देव्हाऱ्यात स्वच्छ प्रकाश हवा असतो.'

आम्ही पूजेचा प्रसाद घेऊन घरी आलो पण वहिनींचे 'जळणे आले म्हणजे काजळी आलीच! स्वच्छ प्रकाश हवा असेल तर काजळी दूर करायलाच हवी.' हे वाक्य मला सतत आठवत राहिले.किंबहुना पुढच्या आयुष्यात कितीतरी प्रसंगात , नातेसंबंधात या एका वाक्याने प्रकाश दाखवुन मला जागे केले, जागेवर आणले. कधी मला सावरले कधी मला आवरले. कधी समोरच्याबद्दल सम्यक विचार करायला लावले, कधी समोरच्याला विचार करायला प्रवृत्त करायला लावले. 'जळणे' तरी किती प्रकारचे असते, जनातले असते , मनातले असते . 'काजळी' जळणाऱ्याच्या मनात जमते, काजळी ज्याच्याबद्दल जळतो त्याच्याही मनात जमते. पण हे टाळता येऊ शकते, आणि समाधानाचा, सौख्याचा, आनंदाचा प्रकाश मिळू शकतो.

एकूण काय वहिनींच्या दिव्याच्या, वातीच्या काजळीच्या गोष्टीने माझ्या आयुष्यातले खूपच प्रसंग प्रकाशमय झाले हे खरे!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैजूताई... अतिशय सहज सुरेख लिहिताय. रोजच्या आयुष्यातल्या साध्याच घटना वेगळ्या अर्थानं भेटतात तुम्हाला अन ते सहजपणे शब्दांत मांडता येण्याचं सुंदर कौशल्य आहे.
मस्तच.
<<'जळणे आले म्हणजे काजळी आलीच! स्वच्छ प्रकाश हवा असेल तर काजळी दूर करायलाच हवी<<>>

|| श्री ||
एखादी गोष्ट विसरू नये म्हणून वस्त्रास गाठ मारतात म्हणे
अशांपैकी एक एक अलगद उकलून सांगत आहात असे वाटते
खूप छान

te vakya khup avadale .....tyach barobar tya kakunchya devgharache kelela varnan khupach vastunista vatate ...khup cchan lihita ...